Showing posts with label afzal khan. Show all posts
Showing posts with label afzal khan. Show all posts

Saturday, May 14, 2011

प्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक

प्रतापगडाची झुंज

चौक १

धन्य--धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।

राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।

यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥

विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।

झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।

सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥

पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।

झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।

मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।

पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।

शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।

असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥

खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।

एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।

कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥

जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।

तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।

टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।

शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥

भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥

शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥

क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥

तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥

शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।

ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।

ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।

असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥

शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥

दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥

शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।

मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।

एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।

असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥

शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।

गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥

थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।

हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।

मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥

आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।

मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।

वृत्तांत ऐका पुढील चौकास ॥

चौक २

आहा आहा शिवाजी भोसला । शरण आपणाला ।

कळता यवनाला । हर्षला अफझूलखान ।

बोलू लागला तो गर्वानं । शिवाजीला ठोशात मारिन ॥

शिवाजी डोंगरी उंदिर । लुटारु चोर ।

करुनिया ठार । दावतो यवनांच्या दंडा ।

कापूनिया मराठयांचा तांडा । रोवितो मुस्लीमचा झेंडा ॥

अशा आनंदाच्या लहरीत । प्रताप गडी येत ।

बसता मंडपात । शिवाजी म्हणे मस्त गबर झाला ।

संपत्ती एवढी कुठून त्याला । हिर्‍या मोत्यानं मंडप सजला ।

गुडगुडी तोंडी धरुन सिदीला (बंडाला) सांगे डौलानं ॥

शिवाजीला ठार मारुन । संपत्ती नेतो लुटून ॥

मंडपात खान बैसला , कळले शिवबाला ॥

भवानीचे घेऊन दर्शन । नमून मातेला ।

जाणून काळ वेळेला । अंगभर चिलखत ल्याला ॥

भरजरी पोषाख केला । जिरे टोप शिरी चढविला ।

वाघनखे भरुनी पंजाला ॥ खानाच्या भेटीला ।

सर्जा मंडपामधें आला । आहा आहा शिवाजी पाहून ।

दुष्मनी दिली सोडून । तू दोस्त आजपासून ॥

पतंगाने झडप घालावी जशी ज्योतीला ।

सर्पाने विळखा मारावा जसा मुंगुसाला ॥

तसा खान झडपी तया समयास ।

बगलेत धरुन मानगूट, सुरा खुपसला ॥

शिवाजी शूर भोसला । तोही पुरेपुर कसलेला ।

नव्हता कच्च्या गुरुचा चेला । जिजा आईच दूध प्यायलेला ॥

तो कसचा भितोय खानाला । खानाचे कपट ओळखून ॥

मारा चुकवून । बगल तोडून झाला बाजूला ॥

मग सिंह झडपी जसा मस्त हत्तीला ।

वाघाने धरुन फाडावे जस बकर्‍याला ।

तसा शिवाजीने खानाला । वाघनखे खुपसून पोटाला ।

खानाचा फोडला कोथळा । तो खान आडवा पडला कोसळून ।

बचाव बचाव म्हणून ॥ अल्लाअल्ला म्हणून । प्राण सोडला ॥

सय्यद बंडाने जोराचा वार शिवबावर केला ॥

जिरेटोप तुटून धरणीस खेळू लागला ॥

पाहून राजावर घाला । जिवा महाला होताच बाजूला ।

तात्काळ तुटून पडला । सय्यद बंडाला धाडला खानाच्या भेटीला ॥

जयजयकार डंका गाजला । मराठयांनी हल्ला चढविला ।

रक्ताने प्रतापगड न्हाला । खानाची फौज मारुन ।

केली धूळघाण । यवन हैराण । तया समयाला ॥

खानाचे लाव लष्कर । हत्ती, घोडे स्वार । पायदळ सारं ।

लढुनिया फस्त केले यवनास । विजयाने माळ घातली शिवबास ।

शाहीर कर्डक सांगे कवनात ॥

Friday, October 1, 2010

अफझुलखानाचा वध (पोवाडा) – क्रांतिशाहीर ग.द.दीक्षित, चिंचणीकर (सांगली)

सर्ग १ : चाल १

त्या दैत्य हिरण्य कश्यपूला, नारसिंहानं भला, जसा फाडिला,

शिवाजिनं तसा अफझुलखानास, फाडला प्रतापगडीं आणा ध्यानास ।

भवानी आई साह्य शिवबास ॥ध्रु०॥

चाल ५

स्वातंत्र्य हिंदमातेचे केले ज्यानी नष्ट,

असे रावण कुंभकर्ण दैत्य फार बलिष्ठ आले पुन्हा जन्माला ऐका खरी ती गोष्ट,

रावण औरंगजेब खरा, कुंभकर्ण पुरा, अफझुलखान स्पष्ट ॥

चाल १

त्या विष्णूरुपी शहाजीला, कपटानं बोला, पकडुनी नेला,

विजापुरच्या आदिलशहानं, ठार मारण्याचा विचार करुन,

भिंतीत चिरडण्याची आज्ञा दिली जाण ॥

चाल २

परी सर्जा शिवाजी पुत्रानं, शाहास शह देऊन ॥

सोडविला पिता युक्तीनं, हे प्रसिद्ध जगतीं जाण ॥

दिल्लीपती शहाजहान । याच्याच थोर साह्यानं ॥

चाल ३

इकडे ऐका प्रकार काय झाला सांगतो तुम्हाला ॥

महाराष्ट्रांत शिवाजिनं घातला धुमाकुळ साचा ॥

नुकताच दरबारीं प्रताप आपल्या दिमाखाचा ॥

दाविला शहाला बोकड म्हणून दाढीचा ॥

तोरणा घेऊन घातला पाया स्वराज्याचा ॥

असं पाहून भडकला क्रोध कादिलशहाचा ॥

म्हणे कौन करील हा ठार चुव्वा डोंगरचा ॥

चाल लगट

त्यावेळीं भवानी मातेनं, तुळजापुरच्या अंबाबाईनं, लक्ष्मीला हांक मारुन,

शिवाजीला साह्य करण्याची आज्ञा दिली छान ॥

लक्ष्मीचं साह्य शिवबाला, कसं झालं ऐका त्या वेळा,

त्या तोरणा किल्ल्यावर भला, द्रव्याचा साठा गवसला शिवराजाला ॥

दिली धडक त्यानं बेधडक, तेव्हा सुरतेला अन्‌ कल्याणचा खजिना आणिला,

खर्चून द्रव्य प्रतापगड किल्ला बांधला ॥

मग मोठया भक्ति भावानं, भवानीला केलं स्थापन, अशी घोर वार्ता ऐकून,

भडकलं शहाचं मन, दरबार त्यानं भरवून, केला प्रश्न आदिलशहानं,

ठार करिल पहाडका चुव्वा ऐसा वीर कौन ॥

चाल १

ऐकून असे हे बोल, झाला बेताल, खान अफझूल,

ठार म्हणे करीन शिव्या सैतान,

शिवाजी किस चिडिया का नाम, वीर मैं बडा हूं अफझुलखान ॥

सर्ग २ : चाल १

ही वार्ता कळतां शिवबाला, तैयार हो झाला,

विचार करण्याला, भरविला राजगडीं दरबार,

जमविले सर्व वीर सरदार, जिजामाई त्यांत मुख्य आधार ॥

मोरोपंत पिंगळे नेताजी, जेधे कान्होजी, तसाच तानाजी,

जिवा महाला तो खरा कल्याण, तोंच स्वामी समर्थ शिष्य कल्याण,

गर्जना करती शुभ कल्याण ॥

चाल २

संदेश रामदासांचा, कथियला त्यानी दरबारीं ॥

हे अरिष्ट खानाचे, नच जाण फक्त तुजवरी ॥

हे अरिष्ट धर्मावरती, येतसे देवळांवरी ॥

चाल ३

ऐकून असा संदेश---

बंदोबस्त केला देवळांचा शिवाजीनं खास ॥

तुळजापुरची भवानी ठेवली गुप्त जाग्यास ॥

पंढरपुरचा विठोबा चंद्रभागेच्या पात्रांत ॥

ठेवून दर्शनी मूर्ति स्थापल्या स्थानास ॥

आणि आपण केला मुक्काम प्रतापगडास ॥

चाल लगट

खान आला तुळजापुरला, फोडलं भवानी देवीला,

जात्यात भरडुनी पीठ केलं समयाला ॥

चाल १

अगणीत फौज संगतीला, घेऊनीया आला, पंढरपुराला,

विठोबा फोडला चढला गर्वास, बोलला किती मूर्ख

हिंदू हे खास, मानीती देव पहा दगडास ॥

चाल लगट

अफझुलखान बोलला आपणाला, किती मूर्ख हिंदू हे बोला,

म्हणत्यात देव दगडाला, आतां कुठं रं तुमचा देव गेला,

त्यो गेला हुता कुठें ऐका सांगतो तुम्हाला ॥

शिवाजीच्या अंगी भवानींन संचार केला ।

देवीनं दृष्टांत दिला शिवबाला । दे बोकड बळी हा मला-

भिऊं नको उभी मी पाठीला सदा साह्याला ॥

(देवीनं दृष्टांत दिल्यावर शिवाजी राजानी अफझुलखानाशी सामना देण्याची तयारी कशी केली)

चाल भेदीक

पश्चिमेस किल्ल्याच्या ठेविले वीर मोरोपंत पिंगळ्याला ।

वीर कृष्णाजी पवार सुपेकर देऊन त्याच्या साह्याला ॥

पायदळ सारे कोंकण प्रांती घोडदळ देऊन नेताजीला ।

सज्ज ठेविले त्याला सैन्यासह करण्या वाईवर हल्ला ॥

कान्होजी जेधे वीर राहिला कोयनेच्या त्या तीराला ।

स्वतः संगं तानाजी आणी घेतला जिवाजी महाला ॥

चाल १

कृष्णाजी नामें ब्राह्मण, खासा प्रधान, खानाचा जाण,

वळविला शिवाजीनं त्या समयास, सांगे तो जाऊन अफझुलखानास,

शिवाजी भ्यालाय, धनी आपणास ॥

चाल कटाव १

(याप्रमाणे व्यवस्था केल्यानंतर)

प्रतापगडच्या मार्‍या खाली, जागा भेटीची त्यांनी ठरविली,

ठराव झाला अफझुलखानानी, सेना सारी दूर ठेवूनी,

फक्त हुजरे दोन यावं घेऊनी, भ्यालाय शिवाजी मेल्यावाणी,

अशा तर्‍हेचा फांसा टाकूनी, मासा गळाला ओढला

शिवबानी, रस्ते करण्याच्या निमित्तानी, दहावीस हजार मावळे त्या रानीं,

ठेवले कामावर मजूर म्हनोनी, भले दांडगे खंदक खणुनी,

वेळ भेटीचा मोजतो क्षण सत्याचा ॥

चाल दांगटी

मग विचार केला शिवबानं, यावा पाहून, अफझुलखान,

आधींच पाहिलेला असावा चांगला, म्हणून वेश पालटून त्या वेळा,

बहिर्जी नाईक संग घेतला, कधीं तो होई तमाशेवाला,

कधीं कधीं शाहीर गोंधळी बनला, कवा कवा मोळीविक्याही झाला,

कधीं जाई घेऊन भाजीपाला । असा रोज रोज क्रम चालला,

परी नाही खान त्या दिसला, गा ऐका तुम्ही दादा--

चाल १

एके दिवश आंबे घेऊन, डोक्यावर जाण, चालला जलदीनं,

आंब घ्या आंबं आवाज दिधला, वेष कसा घेतला ऐका बावळा,

शिवाजी शोभे खरा मावळा ॥

सर्ग ३ : चाल १

कंठी काळा दोरा पायामधें जाडजूड वहाणा,

घेतला शेतकरी बाणा । काळी कांबळी खांद्यावरती कपाळी ते गंध,

डोई मुंडास पगडबंद । कमरे भवतीं जाड करदोडा घालून लंगोटी ।

डोईवर आंब्याची पाटी । गेला विकाया श्रीशिवराया धर्माच्यासाठी ।

खरोखर राष्ट्र कार्यासाठी ।

चाल ३

आंब्याच्या मिषानं खानाला ठेवला पाहून ।

कृष्णाजी वकील खानाचा फितूर करुन ।

चकविला शिवाजीनं सरदार अफझुलखान ॥

चाल

मग फक्त दोन वीरांना खानानं यावं घेऊन ठरलं त्या क्षणा ॥

चाल १

आशिर्वाद आईचा घेऊन, पोषाख घालून, तयार झाला जाण,

शिवाजी जाण्या गडाखाली, घेऊन दोन वीर वीर्यशाली,

जय विजय जणूं तशा कालीं ॥

(छत्रपती शिवाजी महाराजानी त्यावेळी पोषाख कसा केला होता )

चाल भेदीक

अंगामाजी चिलखत सार्‍या वज्र जाळीदार,

रुभरी बंडी त्यावर, बंडी त्यावर हो, तंग आंगरखा घोळदार ॥

डोईवरती पोलादाचे जाड शिरस्त्राण,

त्यावरी साफा चढवून साफा चढवून हो,

जरीचा चढाव पायीं जाण ॥

मुसेजरी ती तुमान तंगदार जरी कलाबूत,

रेशमी गोंडे झळकत, गोंडे झळकत हो,

मधोमध शोभा खुलवीत ॥

गुप्त हत्यारे वाघ नखे ती डाव्या हातांत,

बिचवा उजव्या अस्तनीत, उजव्या अस्तनीत हो, भवानी डाव्या कमरेवरत ॥

चाल १

अंबेच घ्याया दर्शन, गेला जलदीनं, हात जोडून,

प्रार्थना करी भवानीला । प्रसाद दे माते तुझ्या बाळा,

भीत मी नाही कळीकाळा ॥

चाल लगट

भवानीच करुन दर्शन, आशिर्वाद तिचा घेऊन,

तानाजी जिवाजी जाण चालले संगती जाण,

शिवराया निघाला जलदीनं, सुरु झाला डंका नौबत धडाड धाड धूम ॥

"डंका"

दुडुम दुडुम नौबत, वाजली, दुडुम दुडुम नौबत ॥ध्रु०॥

चालला छत्रपती राणा, शिवभूप गडाखाली जाणा,

रणभेरी वाजे दणाणा दुडुम ॥१॥

स्वातंत्र्या देती प्राणा, ते पुरुष खरे जगीं जाणा,

रक्षितात क्षत्रिय बाणा, दुडुम ॥२॥

स्वातंत्र्य देवी जय बोला, जय माय भवानी बोला,

जय शंकर श्री शिवभोला दुडुम ॥३॥

चाल १

उतरली स्वारी गजगती, गंभीर वृत्ती, समर्थ उक्ती,

भालदार, चोपदार, करती जयजयकार, छत्रपती श्री शिवाजी महाराज,

आ रहे हैं---आस्ते कदम निग्गा रख्खो महाराज ॥

॥ छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ॥

सर्ग-४ : चाल कटाव २

घेऊन संग सय्यद बंडा, दावण्या शिवाजीला दंडा,

बांधी हाता मधें गंडा, अफझुलखान, जिवा महाला शिवाजीही,

येऊ लागले लवलाही, जीवशीव जोडी पाही गहिंवरुन ॥

खूष झाला अफझुलखान बोलतसे गर्वानं, वकीलासी तेव्हां जाण,

गेला भिऊन पहाडका चुव्वा भला, शिवाजी हा काफर झाला,

धाडतो आता स्वर्गाला मुंडी दाबून ॥

कडकडून मिठी मारी, मुंडक त्याचं दाबून धरी,

मनी म्हणे ढेकणापरी, टाकीतो चिरडून ।

उपसुनिया कट्टयार, बरगडीत त्याच्या वार,

खुपसण्याचा यत्‍न करे, चपळाईनं ॥

चाल १

कपटासी करितसे कपट, शिवराया

सर्जा तो धीट, सोडवुनी मुंडी आटोकाट ॥

चाल कटाव २

करुनिया चपळाई बिचवा काढून लवलाही,

पोटामधे त्याच्या पाही, खुपसून आंतडयाचा त्याच्या गोळा,

पोटातुन बाहेर काढला, खान म्हणे अल्ला अल्ला, ये धाऊन ।

पण त्यानं जलदी करुन, आपली तलवार ऊपसून,

वार केला शिवाजीवर, त्यानं जोरानं ।

चुकविला शिवबानं वार केला उलट प्रहार,

भवानी तलवार परजून ॥

चाल ३

वार आता करणार, तोच गेला शूर वीर,

जीवा महाला नरवीर, तेव्हां धावून वरच्यावर त्याचा हात,

फक्त एकाच धावात कलम केला हातोहात, मोठया शौर्यानं ॥

चाल ४

होता जिवा म्हणुनिया शिवा,

वांचला इतिहास पहावा, राष्ट्राचा जगविला ठेवा ॥

चाल कटाव २

अफझुलखान झाला ठार, सय्यद बंडा केला गार,

शिवराया जिजाईचे, पाय धरुन ।

म्हणे तुझे पुण्य जबर, खान मोठा मातब्बर,

आलो करुनिया ठार, तुझ्या कृपेनं ॥

चाल १

तो धन्य धन्य शिवराय, धन्य जिजामाय,

भवानी साह्य, धन्य ती वंद्य भवानी तलवार,

धन्य हा भारत धर्म साधार, धन्य शाहीर धन्य होणार ॥

दीक्षित क्रांतिशाहीर, चिंचणीकर, बंधू मम प्यार,

छोटा दीक्षित मी गातो कवनास, दोघेही एकाच गुरुचे दास,

न्यायरत्‍न विनोद पूज्य आम्हास ॥

Wednesday, July 29, 2009

प्रतापगडचा रणसंग्राम (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार ।
कपटभाव वळखिला खानाचा, केला त्याचा मग संहार ॥ध्रु०॥
चौक १
चंद्रराव मोरे ठार करविला, जावळी जोडली मुलखाला ।
बाई कर्हामड सुभे आदिलशाहाचे हळुहळु आले कबजाला ॥
बातमी कळली ही आदिलशहाला मोठी धडकी भरली त्याला ।
म्हणे "बडा सैतान मत्त हुवा ! क्या करना अल्ला ! अल्ला !! " ॥
आदिलशाहानं लौकर तेव्हां मोठा दरबार भरवीला ।
बडे अमीर उमराव जमविले कितिक हिंदु सरदारांला ॥
कर्नाटकांतुन जल्दी बोलावुन आणलं शहाजी राजाला ।
"धाक घालुन बापाला बंदोबस्त करिन"" आशा ही अल्लीला ॥
चाल
जरि होता शहाजी शाहाचा मसबदार ॥
तरी तोच होता खरा, शहा , मोठा शिरजोर ॥
त्याच्या हुकमावीण एक नव्हतं पान हलणार ! ॥
चाल
बादशाहा शब्द दुभंगला । बाद शाहा झाला ।
शहाजी शहा झाला ! । एवढी त्याची होती फौज तय्यार ।
अल्ली आदिलशाहा झाला गारेगार ! ।
उसना पर आणला जोर त्यानं फार ॥
चाल
आदिलशहा बोलला शाहाजीला । "तुम्ही आमचे नोकर झाला ।
पोरानं पुंडावा केला । कल्याणचा खजिना पळविला ।
वाई, कर्हा ड, बेजार केला । हा आमचा अपराध झाला ! ।
दोन गोष्टी सांगा पोराला । बरं वाईट होईल जीवाला" ।
मग बोलला शहाजी शाहाला । "किती सांगू, हुजूर ! कारटयाला ? ।
काय म्हणता ? लुटलं खजिन्याला ? । हा मोठा अपराध झाला ।
पण पोरटा हूड फार झाला । ऐकेना माझ्या शब्दाला ।
म्हणून ठेवला दूर मी त्याला ! । पुणें प्रांतीं जाहगीरिला ।
आमचंच बापलेकांचं आधीं पटेना एकमेकांला । मग सांगूं काय मी त्याला ? ।खावंद ! आपण आणावं त्याला वठणीला ! लावावी वेसण नाकाला ।
दरदर ओढुन आणावं आपल्या सदरेला ॥ मग दोन शब्द सांगावे त्याला" ।
असं बोलला आदिलशाहाला । मग शाहा बोलला सदरेला ।
शाहाजीचा उपाय सारा थकला । कोण कैद करील हो त्याला ? ।
"मैं जाता हूँ; क्या बात है !" असा नाद आला कानाला ।
मग शाह बोलूं लागला । "जिता धरुन आणावं सदरेला" ।
पैजेचा विडा मांडला । सारा लोक बसला जागेला ।
पर एक कोणी जाऊन घेईना पैजेला ॥ मैं मैं ! करणं काम तोंडाला ।
वैं ! वैं ! करावं लागेल जीवाला ॥ म्हणून कोणी नाहीं उठला ।
पर जरा वेळ गेल्यावर आला । एक वजीर, धिप्पाड झाला ।
अफझुल्ला म्हणति हो त्याला । त्यानं लावला हात पैजेला ।
अन्‌ बोलला काय सदरेला । "मैं गिरफदार करता हूँ " विडा उचलला ! ॥
या अल्ला ! अल्ला ! शब्दाचा गजर जाहला ॥
चाल
शाहाजी राजानं लिहिलं शिवबाला "असा घडला हा प्रकार ।
गाफिल कधीं रे राहूं नको, करि फौजफांटा तूं तय्यार" ॥१॥
चौक २
पान उचललं हिरवं पैजेचं, पिकला परि अफझुलखान ।
’आपल्या हातानं मरण ओढवलंस’ बोललं सदा मन जोरानं ॥
उंट, घोडा, पायदळ जमविलं, बारा हजार खानानं ।
विजापूरहून खान चालला दौड मोठया सरंजामानं ॥
वेशीबाहेर अपशकुन जाहला हत्त्ती बीनीवरचा मेला ।
निशाण पडलं ! ऊर धडधडलं, बेत अल्लाचा ना कळला !॥
धीर धरुन पर पुढं चालला, लागलं गांव पंढरपूर ।
तुकडे केले विठ्ठल मूर्तीचे, नाहीं कुणाचा दरकार ॥
चाल
खान आला तुळजापुरला । छिन्नभिन्न केलं देवीला ।
जात्यानं भरडलं तिला । देवीचा कोप जाहला ।
जगदंबामाई शिवबाच्या गेली सप्नाला ॥ काय बोलली ऐका राजाला ।
"बत्तीस दातांचा बोकड कांपावा मला ॥ रक्तानं त्याच्या माखावं माझ्या अंगाला ॥
मुंडक्याचा नारळ बांध माझ्या देवळाला" ॥ इकडं खान पुढं चालला ।
जातां जातां फोडेलं त्यानं अशा कैक मूर्तीला ! ॥ बाटवले कैक लोकाला ।
घरंदारं लुटली कैकांची त्रास लोकाला ॥ किती बळी पडले चैनीला ।
कितिकांची नरडीं उडविलीं, डोळा काढला ! ॥ कितिकांच्या बायका पळविल्या ।
दारुचा पाट चालला । गुडगुडी लावती तोंडाला । देहभान नव्हतं कोणाला ।
ब्राह्मणाच्या धरती शेंडीला । अन् बांधती उंच झाडाला ।
अंगात्नंा खुपसती भाला । असं हाल करती जीवाला ! ।
अशा अशा करुन खेळाला । खान आला वाई गांवाला ।
तळ दिला वाईला पुढचा बेत करण्याला ! ॥
चाल
भरली घडी खानाची मृत्युच्या आला जवळ जो अफझुल्ला ।
पतंग विसरुन देहभानाला झडपी जोरानं वणव्याला ॥२॥
चौक ३
एके दिवशीं दोन घटका रात्रिला किल्ल्याच्या गच्चीवरती ।
सभोंवार सरदार, शिवाजी राजे होते मध्यावरती ॥
नीलनभाच्या हृदयावरती फुलली चंद्राची कोर ।
स्फटिकासम चांदण्या चमकती शीतळ वेळिं सभोंवार ॥
सह्यगिरीच्या हृदयावरि ’शिवचंद्र’ शोभला सुकुमार ।
नेता पालकर, ताना मालुसरे, तारे झळकती रणवीर ॥
सह्यगिरीवर जणु शिव बसले घेउनियां निज परिवार ।
प्रळयकाळ यवनांचा आला ! झाला महिवर अवतार ॥
रानफुलांचा गंध पसरला मंजुळ वार्यानच्या लहरी ।
प्रतापगडच्या किल्ल्यावरुनी यश राजाचें ललकारी ।
गडबड धडपड आरडाओरड रड भूमिवरची सरली ।
सर्व शांत जग झालं ऐकली पर वाघाची उरकाळी ! ॥
चाल
करवंदी झाडी कांटेरी कुंप करणार ।
धबधबे खळाळत नित्य गाणं गाणार ।
चाल
उंच उंच अति उंच धांवली आभाळांतुन शिखरं किती ।
चित्रं काढलीं जणुं शिखरांचीं नभोमंडळाच्या वरती ॥
चाल
अशा वेळिं एक हेर किल्ल्यावरती चालला ॥
झपझपा चढुन गड राजाजवळ पोंचला ॥
मग बोलला शिवरायाला । "रामराम ! ऐका खबरेला ।
विजापूरच्या ऐकलं बातमीला । कां आपण वाई प्रांत घेतला ।
कल्याणचा खजिना पळविला । म्हणून बादशहा लालेलाल झाला ॥
घेण्याला आपल्या सूडाला । त्येनं धाडलं अफझलखानाला ।
बारा हजार घेऊन फौजेला । आतां येईल वाई प्रांताला ।
अशी बातमी आली कानाला" । असं बोलून हेर तो गेला ! ।
तय्यारीचा बेत मग केला । गडाखालीं मावळा सरदार सारा उतरला ॥
रातोरात पल्ला मारला । एक चालला बंदोबस्ताला ।
एक चालला फौज तय्यार खडी करण्याला ॥ एक दारुगोळा बघण्याला ।
असा सारा मावळा सरदार लागला कामाला ॥
चाल
शरदऋतूच्या निळ्या नभामधीं कडकडाट हा बिजलीचा ।
झाला एकदम जीवघातकी खेळ कळेना दैवाचा ! ॥३॥
चौक ४
वाईगांवाहून त्वरित धाडला कृष्णाजी भास्कर वकिल ।
प्रतापगडला अफझुल्लानं, सांगतो पत्र काय काय लिहिलं ॥
"द्यावा मुलुख परतून शाहाचा, घ्यावी भेट या वजिराची ।
म्हणाल ’नाहीं’ तर मग आतां आशा सोडावी जीवाची" ! ॥
चाल
कृष्णाजी भास्कर प्रतापगडिं पोचला ।
संदेश खानाचा शिवाजीस कळविला ।
त्या रात्रीं कृष्णाजी प्रतापगडिं राहिला ।
चाल
मध्यरात्रीचा वेळ जाहली रात्रहि बुडली झोपेंत ।
शिवरायानं त्या वकिलाला नेलं अंबेच्या देवळांत ! ॥
देवी भवानीपुढं बोलला राजा कृष्णाजी पंतास ॥
"सांगा बेत खानाचा, घातली शपथ देवीची तुम्हांस ॥
चाल
या भूवरचे तुम्हांस म्हणति भूसुर ।
आम्ही नित्य ठेवावं मस्तक चरणावर ।
कां पाप जोडतां बनुन यवन नोकर ? ।
केसानं कांपतां गळा सोडा अविचार ।
चाल
मस्तक चरणावरी ठेवतों सांगा बेत त्या खानाचा ।
देवी भवानी असे साक्षिला घात करुं नका स्वजनांचा ।
चाल
कृष्णाजीपंत भास्कर । विरघळले झाले मनिं गार ॥
चाल
डबडबला पाण्यानं डोळा । अंगीं कंटाळा ।
कंप देहाला । मोहाचा कडा पार कोसळला ।
विवेकाचा डोळा उघडला । अभिमान आला । बोलला शिवबाला ॥
चाल
"जय नमोऽस्तुते जगदंबे पदरीं घे मला ॥
शिवराया ! धन्य तूं, यश येईल रे तुला ॥
देहभान नव्हतं रे मला । रोग जडला होता दृष्टीला ।
अंजन भेटलं डोळ्याला । स्वातंत्र-बुद्धि-कोकिला ।
आनंद देती जीवाला । महाराज ! जीव वाहिला आपल्या चरणाला ॥
खानाचा कपटभाव झाला । जिता मेला धरणं तुम्हाला खानाचा मानस झाला ॥
म्हणून त्याला एवढा भेटीचा आला उमाळा" ॥
असं बोलला कृष्णाजीपंत शिवरायाला ॥
शिवराय बोलला मावळ्याला । "हा पेंच आला जीवाला ।
काय करावं सांगा या वेळा" । तानाजी बोलूं लागला ।
"महाराज ! बोलवा खानाला । किल्ल्याच्या खालच्या बाजूला ।
’भ्यालो’ असं दाखवावं त्याला । मग करुं खानाचे तुकडे उडवु मुंडक्याला !" ॥
शिवराय बोलले लोकांला । "हा सल्ला योग्य नाहीं झाला । असं करणं योग्य नाहीं मला !
शत्रु मित्र कोणी जरी झाला । तरी न्यायमार्ग थोरांनीं पाहिजे घेतला ॥
पर आणूं त्याला भेटीला । मी जाईन भेट घेण्याला ।
जर रंग घाताचा आला । तर असा सज्ज युद्धाला ।
नाहींतर जाऊं दे खान आपल्या देशाला" ॥
असं बोलला राजा मावळ्याला । पंताजी गोपिनाथ वकिल त्यानं नेमला ॥
चाल
काय निरोप धाडला खानाला सांगिन पुढच्या चौकांत ।
वीर मर्दाचा गुण गौरव करि कवी आपल्या कवनांत ॥४॥
चौक ५
पंताजी गोपीनाथ चालला खानाच्या वकिलासहित ।
आला वाईला पत्र राजाचं दिलं खानाला सदरेंत ॥
रघुरायाचा अंगद जैसा शिवरायाचा पंताजी ।
भला सराईत, मिठ्ठा बोलका, नाहीं ठाव कधीं इतराजी ! ॥
पत्र लिहिलं जें शिवरायानं तेव्हा अफझुलखानास ।
सांगतो आज मी तें तुम्हांला, जाग करावं कानास ॥
"पर्वत कुणीकडं ? कुठं मातीचा कण ! सिंधु तो कुठं नाला !!
कुठं सूर्य कुठं मशाल साधी ! कुठं वाव त्या बेडकाला ! ॥
कुठं इंद्राचा ऐरावत तो कुठं शाम्भटी तट्टाणी ।
कुठं सिंह, कुठं उंदिर झाला ! मोठी शाहाची अमदानी ॥
चाल
खानसाहेब घ्यावा मेरा सलाम द्यावं अभयाला ।
मोठी धडकी भरली जीवाला । वाई प्रांतिं पुंडावा केला ।
हा मोठा अपराध झाला । सारा मुलुख देतों शहाला ।
पण द्यावं जीवदानाला ! । डोई लावतों आपल्या पायाला ।
नुसतं नांव ऐकल्यावर आला घाम अंगाला । मग कोण करिल दोन हात बोला ? ।
आज चुकलों, शरण तुम्हांला" । असा निरोप धाडला खानाला ।
खानाला संतोष झाला । दाढीवरनं हात फिरविला ।
गांजाचा झुरका मारला । आणि खान बोलूं लागला ।
"अहमदुल्लिला ! बंदे का क्या रोब है !
मेरा सिरफ नाम ही सुनकर उसका पसीना पसीना हो गया !
वाहवा अफझलखानबहादर !" । कृष्णाजीपंत बोलला !
"जंवा बातमी ऐकिली कीं, आपण आला युद्ध करण्याला ।
आणि आणलं इतक्या फौजेला । तवा टाकलं अंग धरणीला ।
त्यानं लावले डोळे आकाशाला । जसं भूतखेत झडपावं तसा जाहला ।
मग आणलं त्याला ताळ्याला । त्याचा वाण सारा बदलला ।
तो येणार नाहीं भेटिला । तर आपण जावं त्याच्या भेटिला ।
अन साधावं आपल्या बेताला" । "अच्छा है" खान बोलला ।
तसा निरोप धाडला शिवबाला । खानानं तळ हालवला ।
पसरणीच्या घाटावरनं चालला प्रतापगडाला ॥
चाल
जा खाना, जा दुष्टा, जल्दी जा, ओढवलं सत्वर मरण ।
मृगपंचानन सह्यकंदरी करिल तुझी रे धुळदाण ॥५॥
चौक ६
भेट घेण्याला अफझुल्लाची मंडप श्रीशिवरायानं ।
प्रतापगडच्या खालीं सजविला नाहीं तिलोकीं उपमान ।
निळा चांदवा दिला छानदार चंद्रतारका त्यावरती ।
झालर तांबुस सभोंवार ती शोभा देई घडी घडीवरती ॥
हंडया झुंबर किती लटकती लौलक झळके त्यावरती ॥
आरसे टांगले किती मनोहर, काय राजाला हो कमती ॥
नीलमण्यांचे खांब बनविले, लोंबती मोतियांचे घोस ।
शिवरायानं क्षुद्र खानाचा किती पुरवावा तो सोस ! ॥
वेलबुटया काढल्या भिंतीवर चित्रं काढलीं रंगाचीं ।
इंद्रधनुष्या रंग लाजवित, अपार शोभा मंडपाची ॥
चाल
जमखाने शुभ्र हांतरले शोभे भरजर ।
गाद्या गिरद्या तिवासे तक्के ठेविले त्यावर ।
गालीचे पसरले उंची कैक त्यावर ॥
चाल
कुबेर अलकापुरी घेऊनी जणूं वाटला तो आला !
रत्ना कर करिं रत्नव घेउनी, विष्णु सोडि वैकुंठाला ॥
कुणी कधी ऐकला असा हा विष्णुशिवांचा हो मेळा ।
छत्तीस आंकडा सदैव त्याचा गब्बार एक दुसरा दुबळा ॥
उडती फवारे कारंजांचे बाग फुलली हिरवीगार ।
यज्ञभूमी श्रीशिवरायानं केली जणूं काय तय्यार ! ॥
चाल
आधींच पर्वतावरचा देखावा गोड ।
त्यात असा सजविला मंडप नव्हती तोड ।
किती कसब शिवाचं होतं मोठं बिनजोड ।
चाल
मंडप झाला, खानहि आला, झाला भेटिला तय्यार ।
पण तो आला फौज घेऊनी हत्यारबंद दीड हजार ॥
चाल
मग निरोप धाडला शिवबानं अफझुलखानाला ॥
"फौजेचं काय काम कळलं नाहीं हो मला ॥
जर आणतां एवढया फौजेला । तर कसला भेटू तुम्हाला ।
आत्ताच जीव आला घाईला । जर एकटे याला भेटिला ।
तर कसं तरी भेटणं तुम्हाला !" । खानाला वाटलं ते वेळा ।
शिवाजी शिवाजी तो केवढा ? । सहज घेइन खाकुटींत त्याला ।
अन् चिरडीन त्याच्या नरडयाला ॥ भेटिला एकटं जाण्याला ।
कृष्णाजी पंतांनी ही सल्ला जेव्हां त्याला दिला । तवा खान चालला भेटिला ।
शिवाजीनं ठेवली बडदास्त मोठी ते वेळा ॥ मग खान आला सदरेला ।
मानमरातब घेऊन गारेगार झाला ॥ वर हांसरा चेहरा केला ।
पर आंता ’दगा’ राहिला । ’कधी भेटिन एकदां मी’ असं झालं हो त्याला ॥
चाल
आला आला ! रे सर्जा शिवाजी खाना !
आतां तू सांभाळ । नागसापापर चपळ जाहला घेईल चावा तो काळ ॥६॥
चौक ७
आला भेटिचा दिवस सकाळिंच केली पुजा जगदंबेची ।
हात जोडुनी शिवरायानं करुणा भाकली अंबेची ॥
"आई ! संकटीं कोण तुझ्याविण सोडविणारा दीनाला ।देइ आशीर्वाद आज माय ! तूं घेई पदरिं या लेंकराला !" ॥
डोळे झांकले शिवरायानें, चमत्कार, दिसला त्याला ।
जगदंबा पुढं उभी राहिली, वर्णूं कसं त्या स्वरुपाला ! ॥
किरिट डोक्यावर, केंस पाठीवर, लांबलचक काळे भोर, ।
कुंकुम शोभे रुंद कपाळीं, कंठीं मोतियाचा हार ॥
शंख चक्र करि पद्म घेतलं त्रिशूळ भाला तलवार ।
सिंहावर होती बसलेली खालीं होता महिषासूर ॥
जबडा लाला सिंहाचा, डोळेही लाल, पंजेही लाल अती ।
दिला पोटावर पाय सिंहानं त्या दैत्याच्या---अशी मूर्ती ॥
एका हातामधिं महिषासुराचं डोकं धरलं जगदंबेनं ।
थेंब रक्ताचे टपटप गळती पट चालला भूवरनं ।
हंसरं तोंड देविचं जाहलं बोलली देवी शिवरायाला ।
"आशीर्वाद हा दिला लेंकरा । होशिल भारी कळिकाळा ॥"
चाल
देविनं शिवाच्या शिरीं मुगुट घातला ।
असुराच्या रक्ताचा टिळा त्यास लावला ।
हा असा देखावा शिवाजीनं पाहिला ॥
चाल
डोळे उघडले, गुप्त जाहली देवी, दिला साक्षात्कार ।
नंतर शिवराजानं जमविले सर्व मावळे सरदार ॥
मोरो, शाम, रघुनाथ पेशवे, नारो शंकर माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी, शूर जिवाजी, पिलाजी, नेता, तानाजी ॥
चाल
मग बोलला राजा गहिंवरुन सार्याू मावळ्याला ॥
"काय सांगू तुमच्या प्रेमाला ? ही राहिली तुमची आठवण जन्मोजन्माला ॥
राखायला माझ्या जीवाला । तुम्ही सोडलं सार्या् सुखाला ।
घरदारं सोडली वार्यालला । उतराई होऊं कसा बोला ।
काय सांगूं वेळ कशि येईल कोणत्या वेळा ? ॥
जगलों वाचलो येईन भेटिला । नाहींतर----" ।
शिवबाचा कंठ दाटला । पाण्यानं डोळा दाटला ।
ढळढळा सारा मावळा रडूं लागला ॥
प्रेमाचा दोर भला मोठा खंबीर झाला ।
पर दांत लावेना कमळाला । जवा कमळामाजिं आडकला ! ।
प्रेमाचं कोडं समजेना ब्रह्मदेवाला ! ॥ "जगलों वाचलों येईन भेटिला ।
नाहींतर राज्य हें द्यावं उमाजीराजाला ॥
रामराम दादांनो घ्यावा आतां या वेळां " ॥
मग सारा मावळा बोलला । हुंदक्यानं आला उमाळा ।
"जाऊं नको राजा ! भेटिला ! तो खान कपटी बघ झाला ।
बरं वाईट होईल जीवाला !" मग तान्या बोलूं लागला ।
"मी जातो शिवा म्हणुनशान त्याच्या भेटीला ॥
अन् उडवतों त्याच्या मुंडक्याला " । पर राजा त्याला बोलला ।
"फसवणं कधीं खपणार नाहीं देवाला ॥ मी जातों त्याच्या भेटिला ।
तुम्ही असा जाग जागेला । कमजास्त झालं तर यावं घुसुन त्या वेळा" ॥
चाल
जागो जागेला मावळ ठेवला दर्यासखोर्यांघतुन तय्यार ।
शाहिर पुढच्या चौकीं सांगणार पुढं घडलेला प्रकार ॥७॥
चौक ८
पोशाख केला कसला राजानं सांगतो आतां मी तुम्हांला ।
वर्णन कधिं कां शिवरायाचं शिणविल माझ्या वदनाला ॥
टोप शिरीं पांढरा शोभला, तुरा मोत्याचा, त्यांत हिरा ।
शिवमौलींतुन शुभ्र चालला ओघ गंगेचा काय खरा !
खांद्यांतून जणु गुप्त जाहली शिवरायाच्या सुरगंगा ।
उजव्या हातिं तलवार रुपानं प्रगट जाहली धवलांगा ! ॥
आंत पोलादी सील, पांढरा झगा शोभे अंगावरती ।
मुसेजरी सुरवार पायाला बंद लोंबती त्यावरती ॥
उजव्या हातामधिं बिचवा, वाघनख होत राजाच्या पंजाला ।
पट्टा जिवा म्हाल्यानें घेतला, तलवार लटके कमरेला ॥
जिजाबाईच्या भेटिस गेला ठेवलं डोकं पायावरती ।
शिवनेत्रांतुन टपटप गळले थेंब पायावर, धन्य सती ! ॥
हळुच उठवलं शिवरायाला, अवघ्राण मस्तकिं केलं ।
जिजामाईनं शिवबाळाला गालबोट तें लावियलं ! ॥
जिजा बोले, "कां शिवबा ! डोळे आले पाण्यानं भरभरुन ।
शूर पुत्र तूं, जा प्रेमाचा बंध तोडुनी हौसेनं ॥
क्षत्रियकुळी मी जन्म घेतला, तूंहि तसा क्षत्रियपुत्र ।
आशीर्वाद हा दिला बाळका ! काय करिल अफझुल कुत्रं ? "
दृष्ट काढली शिवरायाची, दहीं साइचं तळहातीं ।
दिलं आईनं; शिवबाळानं चाटुन खाल्लं गोड अती ! ॥
किल्ल्यावरच्या उंच तटावर फडफड करि भगवा झेंडा ।
फडफड करुनी त्यास बोलला , ’फाड ! फाड ! रे तो मेंढा’ ! ॥
चाल
आठवलं मनीं शिवबानं रामदासाला ।
चुचकारलं कृष्णेला वरती स्वार मग झाला ।
धडधडा सात तोफांचा नाद जाहला ।
चाल
दुपारची भरवेळ जाहली, सूर्य छत्र धरी किरणांचं ।
वार्याीपर वेगानं चालला राजा, दैव त्या खानाचं ! ॥८॥
चौक ९
कृष्णी चपळ बहु शिवरायाची मोठी लाडकी ती झाली ।
चालली घोडी चौफेर सारखी, लाज वार्या ला ही आली !! ॥
टाप घोडिची कणखर मोठी, जमीन भ्याली दणक्यानं ।
झाडंझुडपं किति टकमक बघती पळति मागंमागं भीतीनं ॥
मंडप आला, राजा उतरला, नेली घोडी दूर हुजर्या नं ।
शिवबा बोले त्या हुजर्यााला, "जपा घोडीला प्रेमानं !" ॥
दबकत दबकत सर्जा शिवाजी चालला भेटिच्या मंडपांत ।
आनंदाच्या उकळ्या उसळती वेडया खानाच्या हृदयांत ! ॥
शिवरायानं सलाम केला खूष जाहला मनिं खान ।
म्हणे शिवाला, "असा शाहाला नाहिं कधीं मिळला मान" ! ॥
खान उठुन राजाला बोलला, "शिवा ! एक आशा मजला ।
मुलासारखा तूं मला वाटतोयस कडकडून भेटावं तुला" ॥
"ठीक ! ठीक ! शिवराय बोलला, हरकत नाहीं मुळिं आतां ।
वडिलही तुम्ही मला जाहला, नसे मनाला मुळिं चिंता" ॥
चाल
खानानं हातीं कवटाळलं शिवरायाला ॥
खान केवढा धिप्पाड ! शिवबा पोर वाटला ॥
खानानं कवळ मारली शिवबा दचकला ! ॥
शिवबाचं मुंडकं त्यानं दाबलं डाव्या बगलेला ॥
प्रसंग जीवावर आला । पर शिवबा चपळ फार झाला ।
ओळखलं त्याच्या बेताला । अन् हिसडा मारला त्याला ।
वाघनखं भिडली पोटाला पंजा मारला ! ॥
खानाची आंतडीं काढलीं, फाडलं पोटाला !
खान हत्ती फार खवळला । पर करतो काय सिंहाला ?।नानं केला वार जिरेटोप छाटला ॥
पर इकडं सर्जानं पट्टा वेगिं चालवला ॥
जणुं नारसिंह प्रगटला । खांद्यात्नं चिरलं खानाला ! ।
"खान ’लवा लवा’ बोलला ! " । खान ’पट्टा पट्टा’ बोलला ।
आतां कंचा पट्टा ? सर्जानं घातल्म झडपेला ! ॥
बघा झालीं त्याचीं दोन छकलें आला भूमीला ! ॥
एक मुंगी मोठया हत्तीच्या घेइ जीवाला ॥
मुंगसाचं पिल्लु करि ठार नागसापाला ॥
अभिमन्युबाळ करि जेर कितिक लोकाला ॥
श्रीकृष्ण मारी कंसाला । रामचंद्र मारी रावणाला ।
सर्जाची खूण लोकांला । लगबगीनं जमला मावळा ।
बंडा सय्यद करतो वाराला । पर जिवा म्हाल्यानं बंडा सय्या पुरा केला ॥
घनघोर केलं युद्धाला । रक्ताचा पाट चालला ।
शिवराय वेगानं आला । खानाच्या छाटलं मुंडक्यांला ।
अन् मुंडकं घेऊन शिवराय किल्ल्यावर गेला ! ॥
रक्तानं माखलं देवीला । मग मुंडकं टांगलं बुरजाला ।
यवनांचा मोड पुरा झाला । पळ काढला यवनी फौजेनं, आनंद झाला ! ॥
दुंदुभी झडूं लागल्या कर्णा वाजला ! ॥ नऊ तोफा झडल्या, लोकाला आनंद झाला ! ॥
गुढया तोरणं घरदाराला । उभी केली उत्साव केला ।
’धन्य धन्य अवतारी राजा’ डंका गाजला ! ॥
चाल
मागं रचला अज्ञानदासानं शिवरायाचा पोवाडा ।
भाग्य त्याचं राजानं दिला एक तोडा सोन्याचा आणि घोडा ॥
कोण मला देणार सोन्याचा तोडा शेराचा आणि घोडा ? ।
दाता गेला ! आज फार तर पायिं घालतिल हो खोडा ! ॥
ये शिवराया ! पुन्हां कधीं तूं येशिल तोडा देण्याला ! ॥
नित्य उभा कर जोडुनि तुमच्या ’पांडुरंग’ हा कवनाला ॥९॥

Sunday, July 12, 2009

अफजल खानचा वध (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १
यवनराज्य पद्धती राक्षसी जाचक झालि चहूवर्णां ।
स्वधर्मग्लानी पाहुनी हानी शिवप्रभूला आली करुणा ॥ध्रु०॥
साल पंधराशे एकुण पन्नास म्हणती शालिवाहन शक ज्याला ।
श्री शिवराये पवित्र केलें निजक्षत्रिय कुलबीजाला ॥
द्वितीय मासीं हा द्वितीय पुत्र अद्वितीय शहाजी राजाला ।
द्वितियेचा चंद्रमा अजुनी पहा सूख दर्शवी मनुजाला ॥
यवन भूपती पुसे माहिती आजुबाजुच्या खोज्याला ।
कंसापरि मज स्वप्नें भासती शिवाजी ग्रासिल राज्याला ॥
चाल
जिजाबाईस जाहला पुत्र, तेजस्वी जैसा हिरा ।
शककर्ता होईल स्वतंत्र, आठविली भवानी गिरा ।
पराक्रमी चतुर जगमित्र, उभवील राजमंदिरा ।
कल्पनाशक्ति विचित्र, बाळपणीं भासली तर्हाय ॥
चाल दुसरी
विजापुरीं शिवाजी पित्राज्ञा ऐकुन ।
दरबारीं जाय परि मुजरा न करीं वांकुन ।
राजरस्त्यावरती गोवध अवलोकुन ।
एक कसाई मारला ठार भाला भोकुन ।
म्लेंच्छासी वर्तन सदा ठेवी वांकुन ।
राजनीती राक्षसी अधर्मता देखुन ।
चित्तांत म्हणे ही सत्ता द्यावी फेंकुन ॥
मोडते
स्वातंत्र्याची ज्योत प्रदीप्त झळाळली अंतःकरणा ।
स्वराज्य मी स्थापीन सांगतो साक्ष ठेवुनी आई तव चरणा ॥१॥
चौक २
बाजी तानाजी तिसरा येसाजी परम मित्र अनुसंगाला ।
जशी रामाची वान्नरसेना सहाय्य झाली प्रसंगाला ॥
प्रथम तोरणा किल्ला घेउनी ब्रीद बांधिले चंगाला ।
दहा सहस्त्र मावळ्यासहित पूजितसे भूलिंगाला ॥
कल्याणाचा लुटुनी सुभेदार काम आणिलें रंगाला ।
चाळीस किल्ले शीघ्र जिंकिले वायु न भिडतां अंगाला ॥
चाल
शिव प्रताप ऐकुनी ऐसा, दरबार आले झांजिला ।
कपटाचा घातला फासा, केली अटक राव शहाजीला ।
परि गळां न लागे मासा, त्याणें, उलट डाव योजिला ।
दिल्लीपति शहाजान बादशाह, अति नम्रपणें आर्जीला ॥
चाल दुसरी
गेला हुकूम दिल्लीहुनी विजापुरीं सत्वर ।
द्या सोडून शहाजीला शिव आमुचा नोकर ।
अशी तंबी मिळतां कार्य झालें प्रियकर ।
वडिलांची मुक्तता झाली मग लौकर ।
सद्‌गुरु रामदासाची कृपा ज्यावर ।
काळ लंडी करिल काय साह्य होता ईश्वर ।
जिथें लाथ मारी तिथें पाणी काढी भरपूर ॥
मोडते
भरभराट चहुंकडुन वाढली हात जोडून पुढे अनपूर्णा ।
सरस्वती लक्ष्मी एके ठाई जमुन फुंकती जयकर्णा ॥२॥
चौक ३
यवनभूपती करी प्रतिज्ञा चोर बंडखोर शिवाजी ।
जिवंत धरुनी आणिल त्यास मी देईन जहागिरी नवी ताजी ॥
सकळ सरदार झाले भयाभित अफझुल त्यामध्यें रणगाजी ॥
उभा राहुनी म्हणे हजरत हुकूम द्या तरी मला आजी ॥
डोंगरांतिल उंदिर बेटा पकडून आणतों पहा सहजीं ।
खावंदाच्या चरणीं बांधिन पूर्ण प्रतिज्ञा ही माझी ॥
चाल
एका हत्तीचें बळ त्याला, चालला प्रतिज्ञा करुन ।
बारा हजार स्वार हातीं भाला, वीस हजार पायदळ धरुन ।
अग्नीबाण उंट जेजाला, तोफखाना अफाट भरुन ।
तीन वर्षें पुरेल तबेला, अशी पूर्ण तयारी करुन ॥
चाल दुसरी
आला दीन गर्जत प्रथम तुळजापुरीं ।
केली चूर्ण भवानी जात्यांत घालून पुरी ।
मग आला पंढरीस भिमा नदीच्या तीरीं ।
बडव्यांनीं लपविली विठ्ठल मूर्ती खरी ।
गांव लुटून पुण्याकडे वळला मग लौकरी ।
बाई जवळ तळ देऊनी विचार करी ॥
मोडते
प्रातापगडावरी होते शिवाजी विचार करित अंतःकरणा ।
प्रचंड फौज घेऊन आला खान बहादूर नव तरणा ॥३॥
चौक ४
काय करावें कसें करावें विचार करी शिव मनाप्रती ।
स्वप्नीं येउनी दृष्टांत दिधला भवानीनें त्या शिघ्रगती ॥
भिऊ नको रे मुला खानाचा मृत्यू आहे पहा तुझ्या हातीं ।
पाठिराखी मी आहे तुजला विजय पावसी रणक्षितीं ॥
आरंभुनी मग शिवप्रभूनें कपट युक्तिची राजनीती ।
पत्र रवाना अफझुलखाना नम्रपणा दर्शवी अती ॥
चाल
बादशहाचा मी अपराधी, तुम्ही प्रतापी रण बहाद्दर ।
युद्धाची गोष्ट नव्हे साधी, तुम्ही कृपा करा मजवर ।
द्या अभय वचन मज आधीं, मी पिढीजात नोकर ।
मी नव्हे तुमचा वादी, तुम्ही पित्यासमान रणशूर ॥
चाल दुसरी
असा निरोप ऐकुनी खान हर्षला पुरा ।
मग कपट बेत ठरवूनी निज अंतरा ।
कळविले मनोगत कृष्णाजी भास्करा ।
म्हणे जाउनी तुम्ही शिव बोधावा पुरा ।
मज विषयीं किलमिष नको ठेवूं चातुरा ।
दरबारीं वजन मीं खर्चुनी नाना तर्हा। ।
तुज राज्य देवविन करुनी शिफारस जरा ।
देउनी थाप मग नेऊं विजापुरा ॥
मोडते
कसें करुनी तुम्ही आणावा भेटिला ही वस्त्रें प्रावर्णा ।
इकडे नसेल आम्ही येऊं तिकडे आठवण ठेवा हो स्मरणा ॥४॥
चौक ५
वकिल येउनी कचेरी होउनी बेत खानाचा कळवियला ।
धन्य तुमची अक्क्लहुषारी राग आमुचा पळवियला ॥
मग शिवरायें रात्रीं एकांतीं वकिल युक्तिनें वळवियला ।
घात खानाचा बेत उभयतां आत्महितास्तव जुळवियला ॥
पंत गोपिनाथ वकिल आपुला खानाकडे पळवियला ।
बहु विनयानें जाऊनी त्यानें खान बहादुर आळवियला ॥
चाल
भेट घ्यावी गडाच्या खालीं, उभयतांत ठरलें असे ।
शिवाजीनें तयारी केली, त्यांत कमतरता मुळीं नसे ।
मंडप सिद्धता झाली, गाद्या गिरद्या लोड तिवासें ।
खानासाठीं मुक्काम स्थळीं, तंबु दिले शोभतील तसे ॥
चाल दुसरी
घेऊनी फौज तो यवन गडाखालीं आला ।
वर कृष्णाजी भास्कर पाठवून दिला ।
आम्ही आलों संकेतापरी यावें भेटिला ।
शिवाजीनें तयारी केली शकुन गांठिला ।
वाम हातीं वाघनख काचा कमरपट्टीला ।
सव्य हातीं बिचवा अस्तनींत लपविला ॥
मोडते
गुप्त झाडीमध्यें फौज ठेवुनि वंदुनि मातुश्रीचरणा ।
गडाखालीं उतरले महाराज कदम कदम वाजे कर्णा ॥५॥
चौक ६
दीड सहस्त्र खानानें शिपाई जवळचि ठेउनियां मागें ।
हुजर्या् आणि एक पंच हत्यारी आपण वकील ऐसे चौघे ॥
अशी खानाची होती तयारी शिवा जीनें पन्नास अवघे ।
टप्यावरी ठेवुनि शिपाई आपण तानाजी आले दोघे ॥
मंडपाजवळ येऊनि महाराज भ्यालासारखी करी सोंगे ।
वकीलानें खानाचा हत्यारी दूर धाडिला अति वेगें ॥
चाल
आसपास मराठे लोक, बैसले होते बहु लपून ।
शिवाजीचा त्यावेळीं झोक, हळु हळु पायपडे जपून ।
खानाकडे लावुनी रोख, पाहे कपट क्रियेमध्यें निपुण
मनीं आठवुनि बंधु शोक, सूड घ्याया गेला हाप हापून ॥
चाल दुसरी
तानाजी सहित मंडपांत आले सत्वर ।
ताजीम घ्यावया उठला खान लौकर ।
दोघांच्यामध्यें तो कृष्णाजी भास्कर ।
दिली ओळख करुनी उभयतांची रितसर ।
राजनीतिप्रमाणें सरळ झाले इथवर ।
खान झाला उताविळ त्यावेळीं खरोखर ।
कडकडून भेटाया उभारिले द्वय कर ॥
मोडते
दोन पावलें जाउनि धरितां शिवाजीस म्हणे क्यौं डरना ।
काखेंत मुंडी दाबुनी धरुनी कटयार काढी जीव हरणा ॥६॥
भाग ७
भेट होतां खानानें कटयार शिवाजीचे कुशी वाजविली ।
कपट जाणुनी महाराजांनी वाघनखानें गाजविली ॥
काखेंतुनी मानगुटी काढुनी समशेर आपली साजविली ।
खानाची तरवार हिरावुनी तोडातोडी बहु माजविली ॥
येसाजी तानाजी धांवले पुनरपि तलवार पाजविली ।
शीर खानाचें तोडुन नेले नौबद विजयी वाजविली ॥
चाल
किल्ल्यावरी फुंकिले शिंग, पूर्वींच्या संकेतापरी ।
तोफा सुटल्या साधला रंग, करा कत्तल तुम्ही लौकरी ।
नेताजी बांधुनी चंग, गेला चालूनी सैन्यावरी ।
मोरोपंत जैसे बजरंग, जावळीचें सैन्य संहरी ॥
चाल दुसरी
झाली दाणादाण शत्रूचे एकंदर हंसे ।
शिवाजीस लूट लाभली हत्ती पाउणशे ।
आठ हजार घोडे उंट हजार बाराशे ।
बारा लक्ष रोकड रुपये चांदीचे ठसे ।
सोनें मोतें जवाहिर दोन लक्षाचें तसें ।
तीस हजार बैल, होन मोहोरास गणती नसे ।
तोफखाना एकंदर आणखी शूर माणसें ।
आली चालुन लक्ष्मी कृपा केली जगदीशें ।
विजापुरीं बातमी कळतां झालें पहा कसें ।
घरोघरीं शंखध्वनी शहर भयाण दिसे ।
तीन दिवस राज नौबद बंद केली असे ॥
मोडते
अल्ली आदिलशहा रडे धाय धाय तखदीर अल्ला क्या करना ।
रामचंद्र म्हणे पुढिल प्रसंगीं शिद्दी जोहार येईल रणा ॥७॥

Thursday, July 9, 2009

अफजल खानचा वध (पोवाडा) - शाहीर अज्ञानदास

चौक १

माझें नमन आधी गणा । सकळिक ऐका चित्त देऊन ॥

नमियेली सारज्या । ल्याली जडिताचें भूषण ॥

अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्‌गुरु नारायण ॥

सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥

गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजा दलभंजन ॥

फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥

अज्ञानदास बोले वचन । गाइन राजाचें भांडण ॥

देश इलाइत । काबिज केलें तळकोंकण ॥१॥

चौक २

गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥

पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ॥

मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी आनसवाडी दोन ॥

कारला कासागड मंडन । दर्यांत दिसताती दोन ॥

गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥

कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥

धोडप तळकोंकणचे किल्ले, घाटावरले गड गाइन ॥२॥

चौक ३

गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥

मकरंदगड वांसोट । सिंहगड वृंदावन ॥

पुरंधराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ॥

सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन ॥

कोंडाण्यापासून तोरणा वर्ता । कोर रेखिली घाटमाथा ॥

तुंग आणि तुकोना । विसापुर लोहगड झुलता ॥

गड राहेरीची अवस्था । तीन पायर्‍या सोन्याच्या तक्ता ॥

दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥

चौक ४

मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥

पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर, पाटण ॥

शिरवळ सुपे देस । घेतला ज्यानें इंदापुरा पासुन ॥

महाड गोरेगांवापासून । घेतले शिणगारपूर पाटण ॥

असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविलें चवदा ताल कोंकण ।

घेतली बारा बंदरें । भाग्य राजाचें संगिन ॥४॥

चौक ५

देश दुनिया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ॥

चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ॥

चेतपाउली काबिज केली । ठाणी राजाचीं बैसलीं ॥

घेतली जाउली न् माहुली । कल्याण भिवंडी काबिज केली ॥

सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥

कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ॥

मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ॥

बाच्छायजादी क्रोधा आली । जैशी अग्न परजळली ॥

जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥

चौक ६

बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर बोलावा तमाम ॥

अबदुलखान, रस्तुम जुमा ॥ सिद्दी हिलाल, मुशेखान ॥

मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ?

बोलावी बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ॥

बोलावी खर्‍या कोबाजीला । त्या नाइकजी पांढर्‍याला ॥

देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्याला ॥

बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छाय सभेला ॥६॥

चौक ७

बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला ॥

बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ॥

सवाई अबदुल्या बोलला । जिता पकडूं मैं राजाला

निरोप दिला कुल्‌वजिराला । अबदुल सदरे नवाजिला ॥

विडा पैजेचा घेतला (म्हणून) । तुरा मोत्याचा लाविला ॥

गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥

फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ॥

तीवरसांची मोहीम । घेऊन अबदुल्या चालला ॥७॥

चौक ८

खान कटकबंद केला । कोटाबाहेर डेरा दिला ॥

मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला ॥

खबर गेली बाच्छायाला । बिनीचा हत्ती पाठविला ॥

बारा हजार घोडा । अबदुलखानालागीं दिला ॥८॥

चौक ९

संगात कुंजर मस्त हत्ती । घेतली झगडयाची मस्तुती ॥

आरोब्याच्या गाडया । कोतवालतेजी धांवा घेती ।

सातशें उंट आहे बाणांचा । करडा लष्करी खानाचा ।

वजीर अबदुलखान । त्याच्या दळाची गणती ।

बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥९॥

चौक १०

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥

फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली ॥

मसुद बांधुनी । पुढें गाय जब केली ॥

अबदुलखान फोडी देवीला । कांहीं एक अजमत दाव मला

कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजाप दिला ।

अंबा गेली सपनांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥

बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला॥१०॥

चौक ११

तेथून कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल माणकेश्वरा आला ॥

तेव्हां त्या अबदुलखानानें । हाल मांडिले देवाला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल करकंभोशा आला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥

मजलीवर मजल । वेगीं पंढरपुरा आला ॥

फोडिला विठोबा । पुंडलिक पाण्यात टाकिला ॥११॥

चौक १२

खान (नें) कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । वेगीं महादेवासी आला ॥

तेव्हां त्या अबदुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥

हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ।

मजलीवर मजल । अबदुल रहिमतपुरा आला ॥१२॥

चौक १३

अबदुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥

वजीर उंबराव बोलती । शिवाजीस गडे कोंडू’, म्हणती ।

अबदुल सारा आहे किती । त्याच्या दळाची गणती ॥

बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥

सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥

चौक १४

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल वांईलागी आला ॥

आपुल्या मुलखांत राहिला । कोट बांधुन पिंजरा केला ॥

बरेपणाचा कागद (देउन) । हेजिब महाराजाप गेला ॥

राजा पुण्यात मस्त झाला । देश पाठीशीं घेतला ॥

सोडून दिले किल्ले । डेरा जाउलींत दिला ॥

राजा जाउलींत राहिला । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥

चौक १५

हेजिब बोले महाराजाला । खान बर्‍यापणाशीं आला ॥

खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला झाला

राजा बोले हेजिबाला । कशाला बोलवितां वांईला ?

किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥

जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला ॥

बैसूं दोघेजण । खान बुध सांगेल आम्हांला

लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब बेगींरवाना झाला॥१५॥

चौक १६

हेजिबाची खबर ऐकुनी । अबदुल महाभुजंग झाला ॥

अबदुलखान (नें) कउल दिला । रोटीपीर पाठविला ॥

भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा मेरा सल्ला ॥

तुझे गड तुझ्या हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥

तुझी थोडीशी गोष्ट । क्रिया शहाजीची आम्हाला

इकडे कउल पाठविला । (पण) शीलचा राउत निवडिला ॥

हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजढाळा ॥

नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥

चौक १७

राजा हेजीबासि बोलतो । "खंड काय मला मागतो ॥

चउआगळे चाळीस गड । मी अबदुलखानालागीं देतों ।

मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥

तेथें यावें भेटायाला । मी खानाची वाट पाहतों "॥

हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखानाजवळ आला ॥

अबदुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥

अबदुल पाहतो वाचुन । "खुंटले गनिमाचें मरण" ॥

हाती आले गड किल्ले । खुशी जहाला अबदुलखान ॥१७॥

चौक १८

हिगडे सल्ला कउल दिला । खासा राउत निवडिला ॥

चार हजार घोडा । हालका धराया चालला ॥

हत्तींचे पायिं तोरड ज्याला । वरी सोडिल्या गजढाला ॥

फौजामागें फौजा । भार कडक्यानें चालला ॥

रडतोंडीच्या घाटाखालीं । अबदुल सारा उतरुं दिला ॥

इसारत सरज्याच्या लोकांला । ज्यांणीं घाट बळकाविला ॥

मागल्याची खबर नाहीं पुढिल्याला । कटकाची खबर, कैची त्याला ॥

जाऊं जाणें येऊं नेणें । ही गत झाली अबदुल्याला ॥

जावलींत उतरुनि । अबदुल दिशीभुला जाहला ॥१८॥

चौक १९

राजानी सदरा सवारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥

तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेविल्या ॥

सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥

माणिकाच्या भरणी । हारी मोत्यांच्या बसविल्या ॥

दुसरे सदरेची मांडणी । सूर्य लखलखितो गगनीं ।

मणिकाचे ढाळ । सदरे सुवर्णाचें पाणी ॥

काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥

चौक २०

तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥

खासियाचे पलंग । ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥

वाळियाच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥

बराणपुरी चिटाचे । आडोआड पडदे बांधुनी ॥

चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥

घोंस मोतियांचे । वर ठिकडी नानापरिची ॥

अवघी जडिताची लावणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥

बहुत सवारिल्या सदरा ॥ ऐशी नाहीं देखिल्या कोणी ॥२०॥

चौक २१

राजानीं सदरा सवारिल्या । हेजिब अबदुल्यास धाडिला ॥

मोरो ब्राह्मण पाठविला । अबदुलखानासी बोलाविला ॥

"चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?" (म्हणून) त्यानें बाहेर निराळा ठेविला ।

दहा पांचांनिशीं चालिला ॥ "एकांतीच्या गोष्टी ।

तेथें दहा पांच कशाला ॥ पालखी दुर करा भोईयाला ।"

खासा अबदुल चालला ॥ "हात चालावा व्हा । दुर करा" म्हणे खानाला ॥

वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवाजीला ॥२१॥

चौक २२

भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला ॥

भोग पुरला खानाचा । अबदुल जावळींत आला ॥

बिनहत्याराविण मोकळा । अबदुल सदरेलागीं आला ।

अबदुल पहिले सदरे गेला । सदर देखुनी सुखी झाला ॥

ऐशी सदर नव्हती । आमच्या आली इदलशाला ॥"

खान दुसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥

ऐशी सदर नव्हती । नवरंगशा बाच्छायाला" ॥

अबदुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥

"ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला" ॥ अबदुलखान बोलिला ।

"शिवाजीस आणा भेटायाला" ॥२२॥

चौक २३

राजा नवगजींत बैसला । मोरो, शाम बोलविला ॥

रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥

दहातोंडया माणकोजीला । त्या इंगळ्या सुभानजीला ॥

देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥

करनखर्‍या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला ॥

त्या बोबडया बहिरजीला । सरदार आले भेटायाला ॥२३॥

चौक २४

राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥

बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥

भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥

मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥

डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।

पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

चौक २५

"माझा रामराम दादानु" ॥ गडच्या गडकर्‍या बोलिला ॥

जतन भाईनु करा । आमच्या संभाजीराजाला ॥

सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला ॥

गड निरवितो गडकर्‍याला राज्य निरवितो नेतोजीला ॥

निरवानिरव दादानु । विनंती केली सकलीकाला ॥

"येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला" ॥

खबर गेली जिजाऊला । शिवबा जातो भेटायला ॥

पालखींत बैसुनी । माता आली भेटायाला ॥२५॥

चौक २६

शिवबा बोले जिजाऊ सवें । "बये वचन ऐकावें ॥

माझी आसोशी खानाला । "बये जातों भेटायाला" ॥

जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा न जावें भेटायाला ॥

मुसलमान बेइमान । खान राखिना तुम्हांला" ॥

राजा बोले जिजाऊला । "येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला ॥

येवढी गोष्ट माते । आज द्यावी मला ॥

आई अबदुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला" ॥

जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा बुद्धिनें काम करावें ।

उसनें संभाजीचें घ्यावे" ॥२६॥

चौक २७

जिजाऊ घेती अलाबला । "शिवबा चढती दवलत तुला ॥

घे यशाचा विडा" । शिवबा स्मरे महादेवाला ।

गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी लागला ॥

ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥

चौक २८

"पहिला सलाम । माझा भवानीशंकराला ॥

दुसरा सलाम । माझा शहाजी महाराजाला ।

तिसरा सलाम । अमचे अबदुलखानाला " ।

शिवाजी सरजे सलाम केला । अबदुलखान (नानें) गुमान केला ॥

मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥

मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥

"तूं तो कुणाबीका छोकरा । सवरत बाच्छाई सदरा" ॥२८॥

चौक २९

इतक्या उपरी राजा बोले । त्या अबदुलखानाला ॥

"खाना ज्याची करणी त्याला । कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥

तुम्ही जातीचे कोण । आम्ही जाणतों तुम्हाला ॥

तूं तरी भटारनीका छोरा । शिवाजी सरज्यापर लाया तोरा" ॥

यावर अबदुल बोलला ॥ "शिवा तुम चलो विजापुराला" ॥

"शिवाजी सरजे नेतां । बहुत दिन लागतील खानाला ॥

कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला" ॥२९॥

चौक ३०

"अबदुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी" ॥

इतकिया उपरी । अबदुल मनीं खवळिला पुरा ॥

कव मारिलि अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा ॥

चालविली कटयार । सीलवर मारा न चाले जरा ॥

सराईत शिवाजी । त्यानें बिचव्याचा मारा केला ।

उजवे हातीं बिचवा त्याला । वाघनख सरजाच्या पंजाला ॥

उदरच फाडुनी । खानाची चरबी आणिली द्वारा ॥३०॥

चौक ३१

खान "लव्हा लव्हा" बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥

राजानें पट्टा पडताळिला । अबदुलखानानें हात मारिला ।

शिरींचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा लागला ।

भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥

मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥

अबदुलखान शिवाजी दोनी । भांडती दोनी धुरा ॥

बारा हजार घोडा । सरदार नाहीं कोणी तिसरा ॥३१॥

चौक ३२

अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥

शिवाजी राजा बोलला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।

तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला" ॥ नाइकतां ब्राह्मणें ।

हात दुसरा मारिला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।

क्रिया शहाजीची आम्हांला" ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।

हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।

( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।

सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।

त्यानें सैद पुरा केला ॥३२॥

चौक ३३

संशय खानाचा फिटला । खान (नें) पळतां पाय काढिला ॥

मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला ॥

कावजीचा संभाजी भोंसला । मोठे उडीनें आला ॥

जखमा केल्या भोग्यांच्या पाया(ला) । खटारां धरणीवर पाडिला ।

शिवाजीराजा बेगिन आला । शिर कापुनी गडावर गेला ॥

जराचाच मंदिल । शिरीं त्या संभाजीचे घातला ॥

फाजिलखाना क्रोध आला । बाण आणि बंदुखा थोर वर्षाव एकच केला ॥

शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा ॥

हाल महाराजाचे झाले । अबदूलच्या लोकांला ॥३३॥

चौक ३४

प्रतापगडाहुनि केला हल्ला । मारिती खुण सरज्याच्या लोकांला ॥

धरल्या चारी वाटा । ज्यांनीं घाट बळकाविला ॥

दळ त्या समई । पायदळाचा कडका आला ॥

सिलीमकर, खोपडया, । काकडया, सुरव्या, लोटला ॥

अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला ॥

"फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । राखु नका तुम्ही उगारल्या पाइकाला" ॥

फत्ते महाराजाची झाली । वाट दिली कुलवजीराला ॥३४॥

चौक ३५

पळतां फाजिलखान । त्याचा दुमाळा घेतला ॥

माघारा फिरोनि । जान(नें) हातीचा आरोबा दिला ॥

शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।

घोडा आणि राऊत । ज्यांणीं पाडाव केला ॥

वळल्या हातीवरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥

भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।

सरज्या तोरड महीमोर्तब शिवाजीला । फत्ते झाली महाराजाची ते वेळ पन्हाळा घेतला ॥३५॥

चौक ३६

अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्मला ॥

नळनीळ सुग्रीव जांबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥

एकांती भांडन । जैसें राम रावणाला ॥

तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥

दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्मला ॥

विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला ॥

मोठें भक्तीचें फळ । महादेव भाकेला गोंविला ॥

जिकडे जाती, तिकडे यश राज्याच्या खंडाला ॥३६॥

चौक ३७

माता जिजाऊ बोलली । पोटीं अवतार जन्मला ॥

शंकपाळ शिवाजी महाराजानें केला । आतां मी गाईन ।

भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।

अखेर संग्रामाच्या गति ॥ राजगड राजाला ।

प्रतापगड जिजाऊला ॥ धन्य जिजाऊचे कुशी ।

राजा अवतार जन्मला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।

बीरमाल राज्याचा गाइला ॥ शिवाजी सरज्यानें ।

इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा ।

तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें ।

तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥