Showing posts with label tanaji malusare. Show all posts
Showing posts with label tanaji malusare. Show all posts

Tuesday, December 15, 2009

नरवीर तानाजीचा पराक्रम (पोवाडा) – शाहीर सदाशिव लक्ष्मण ठोसर

चौक १

गातो असा सिंहगडाचा पोवाडा । उदयभानु बडा ।

बाटगा नोडा । ठेचला ऐका नवलाई ॥

स्थापिली हिंदु पातशाही ॥ धन्य मातोश्री जिजाबाई ॥ध्रु०॥

जगामध्ये कितीक झाल्या । होतील आहेत आता ।

त्यात श्रेष्ठता । पावली एक जिजाबाई ॥

एकटया शिवरायाची नाहीं । हिंदु धर्माची झाली आई ॥

दिल्लीपती आला जोरदार । झाला शिरजोर ।

घेऊन तलवार । उठला हिंदु धर्मावरती ॥

बाटविले कैक नाहीं गणती । नाव ऐकता हिंदु पळती ॥

जिकडे तिकडे उडाला हाहाःकार । रजपुत भिऊन सारं ।

मराठेही वीर । मिळाले थोडे बादशहाप्रती ॥

बाकी आपसात चुरस करती । स्थापण्या राज्य कठीण किती ॥

चाल

ती वेळ आणीबाणीची । हिंदूच्या मर्दुकीची ॥

पुत्रांच्या मातृभक्तीची । मातांच्या मातृत्वाची ॥

मारण्याची किंवा मरण्याची । कर्त्यांची कर्तृत्वाची ॥

चाल

त्या जिजाबाई माउलीनं केला सुविचार सोडलं विजापूर ॥

स्वातंत्र्यांकुर म्हणी इथं नाहीं फोफावणार ॥

घेऊन गेली पुण्याला संग बाल शिववीर ॥शिक्षण दिलं धर्माचं राजकारणाचं केला हुश्शार ॥

सोळाव्या वर्षी सुरवात गनिमी लढणार ॥

किती किल्ले बळकावले नाहीं कुठें हार ॥

चाल : मिळवणी

संगे रणधीर वीर तानाजी । फासलकर बाजी ।

कंक येसाजी । जिवाचे कलिजे भाई भाई ॥

मानिती जिजाईस आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१॥

चौक २

आला चालून सिद्दी जोहार । मोठा सरदार ।

बढाईखोर । विडा उचलून पाच पानी ॥

बोले हम बडा खानदानी । पिला दूँ मराठेकु पानी ॥

मराठयांशी पडली त्याची गांठा । लढती अफाट ।

दाविती न पाठ । स्वाराला स्वार जाऊन भिडती ॥

मराठे वीर अचुक लढती । उपजली सिद्दीमनी भीती ॥

बोल बोलता जिरली घमेंडी । पळतां भुई थोडी ।

बचावुनी दाढी । सिद्दी जोहार पळत सुटला ॥

बोले ये सैतान है अल्ला । तोबा तोबा अल्ला भिसमिल्ला ॥

चाल

दुसरा बडा भाई-शाहिस्तेखान । पळवीला बोटे छाटून ॥

दगाबाज तो अफझलखान । मारीला वाघनखानं ॥

एक एकटे हरविले तीन । बादशहा झाला बेभान ॥

चाल

मग मोअज्जिम जयसिंग दोघे वीर धाडले ॥

मोठे सैन्य तोफखाना संगे घोडे दौडले ॥

मजल दर मजल करित सारे दक्षिणेंत पातले ॥

दर्यावानी तुफान सेना बघुन मराठे हादरले ॥

दोन हल्ले मराठयांनीं शिताफीनें चढविले ॥

परि पुढं टिकाव अवघड शिवबा उमजले ॥

चाल : मिळवणी

बलाबल जाणून टाकितो डाव । आमचा शिवराव ।

किल्ले म्हणी घ्याव । आम्च्यापासून परत कांहीं ॥

मुलगा त्यो कोणाचा हाई । त्याची मातोश्री जिजाबाई ॥२॥

चौक ३

(शिवाजीनें वेळ प्रसंग ओळखून मोगलांशी तह केला व २६ किल्ल्यांपैकीं १८ किल्ले मोगलांना दिले. त्यांत कोंडाणाही दिला.)

मोअज्जिम जयसिंगाला । आनंद लई झाला ।

दोन बोटं उरला । स्वर्ग; त्याला चढली विजयधुंदी ॥

मराठेशाहीची नाकेबंदी । कोंडाणा घेऊन केला संधी ॥

आपल्या सैन्याचा तळ हालविला । खंद्या वीराला ।

उदयभानूला । कोंडाण्यावर नेमून परत फिरले ॥

ताब्यांत त्याच्या दिले सारे किल्ले । म्हणती काय मराठे आतां मेले ॥

नाकेबंदीचा किल्ला गेला । कोंडाणा आपुला ।

जीव हळहळला । शिवबा मनीं चिंतातुर झाले ॥

मराठे वीर सारे जमले । बारांनीं बारा बेत केले ॥

चाल

गडामधीं गड-गेला कोंडाणा । मराठेशाहीची होईल दैना ॥

रात्रंदिन झोप नाही कोणा । लागली हुरहुर सर्वांना ॥

कांहीं केल्या बेत जमेना । उपाय सुचविती नाना ॥

चाल

चलबिचल अशी ही पाहून जिजाबाई बोले ॥

मुर्दाड भार भूमिला कशाला रे जगले ॥

स्वातंत्र्य पारखे जिवंत असुनी मेले ॥

शिवराय डिवचता सिंह जसे खडबडले ॥

पाहुनि सोन्याची संधी ही माता काय बोले ॥

भवानीनं रात्रीं मला स्वप्नामधिं सांगितले ॥

चाल : मिळवणी

सकाळच्या रामप्रहराला । तुझ्या नजरेला ।

पडेल जो किल्ला । सोडाव जीव त्याचे पायीं ॥

कोंडाणा आज पाहिला म्हणी आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥३॥

चौक ४

शिवराय राजकारणी । माता त्याहुनी ।समशेर भवानी । दावुनी पाया पडुनि आईला म्हणती ॥

हरवील हिला अशी कुणाची छाती । माता काय बोले ऐका पुढती ॥

दावता कमरेच्या नुसत्या तलवारी । ऐट वरिवरी ।

विराटाच्या घरी । मुलगा (उत्तर) काय थोडकं रे बडबडला ?

अखेर काय त्यानं दिवा लावला । सांग का रे कोंडाणा घालविला ॥

वेद उपनिषद सार सांगुनी । कृष्ण देवांनी । अर्जुना रणीं ।

लढविलं सांग कशासाठीं ॥ फुकट जन्मलास माझ्या पोटीं ।

हिर्‍याच्या खाणींत गारगोटी ॥

चाल

एकीकडं आईच्या इच्छेची आड । विहीर बघा लढाईची दुसरीकडं ॥

शिवबा राजाला पडलं मोठ कोडं । दोन्ही बाजू आहेत कशा बिनतोड ॥

अखेर दिलं वचन आईला लै गोड । शत्रूचा पुरा करतो बीमोड ॥

चाल

ऐकुन आनंदाश्रू आईच्या नयनीं बघा थबथबले ॥

फिरविताच पाठीवर हात शिवबा गहिवरले ॥

इतक्यांत रायाच्या लग्नाला बोलवाया आले ॥

शेलारमामा तान्हाजी दोघे भेटले ॥

आम्ही चाललों आमच्या लग्नाला शिवबा त्यांना बोले ॥

वरघोडा निघायचा आज कोंडाण्यावर बोहलें ॥

चाल : मिळवणी

ऐकतां शब्द हे कानीं । शेलारमामांनीं ।

स्वार सांडणी । धाडीला लगीन थांबबाई ॥

धन्य त्या मर्दांची आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥४॥

चौक ५

तिकडं बघा तान्हाजीच्या गावाला । (उमराठे गावाला) ।

सोयरा जो आला । त्याचे दिमतीला । कामकरी हेटकरी लई ॥

माहीतगार आणखी मराठे भाई । देऊन सोयर्‍यांच्या केल्या सोई ॥

दोन्ही बाजूंच्या मांडवांचा थाट । सहस्त्र साठ । दिव्यांचा लखलखाट ।

पाहुनी डोळे दिपून जाती ॥ सूर्य काय आलाय पृथ्वीवरती ।

पाहण्या मराठेशाहीची धर्ती ॥ पाहावया रायाचा मुखचंद्र ।

लाळ घोटी इंद्र । सूर्य आणि चंद्र । शाहीर म्हणे इथं झाली यूती ॥

होतांच जनसागराला भरती । नवल नाहीं निसर्गाची रीती ॥

चाल

इतक्यामधी आला स्वार सांडणी । लखोटा वाचला रायांनीं ॥

लगीन थांबवा याच क्षणीं । लढाईला निघावं सर्वांनी ॥

चाल

रुकार पाहिला दिला वरुमाईंनीं निरामाईंनी ॥

हुकूम सर्वाला सोडला रायांनी सूर्यरायांनीं ॥

राजा बघा बोले तसे दळ हाले बोलतां क्षणीं ॥

आपापले सैन्य घेऊन निघाले देशमुख वतनी ॥

पुढें चालले पहिले मानकरी हत्तीवर बीनी ॥

मोहिते चव्हाण महाडीक जाधव थाटांनीं ॥

चाल : मिळवणी

इकडे तान्हाजी म्हणे शिवराया । गड जिंकाया ।

सांडीन मी काया । रायाला समजा माझ्या ठायीं ॥

गहिवरुन आशीर्वाद देई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥५॥

चौक ६

(तानाजीराव म्हणतात-----"शिवबा राजे, र्‍हाऊ द्या माझ्या पोराचं लगीन;

आधीं लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं !" तान्हाजीच्या तोंडचे हे

शब्द ऐकून जिजाईचं हृदय भरुन आलं.)

तोंडावाटे शब्द उमटेना । स्तब्धता मना ।

मनीच्या खुणा । मनाला कळल्या एकमेका ॥

जिव्हाळ्याचा शेवट असाच मुका । मुक्यानं चालतो पुढं ऐका ॥

पंचारती घेऊनी आई । आली लवलाही । कमती तिथं कायी ।

टिळक लावी ठळक कुंकुमाचा ॥ पाठीराखा म्हणी तू आर्यभूचा ।

महाराष्ट्राच्या सौभाग्याचा ॥ ओवाळणी देई मज तान्हा ।

गड कोंडाणा । मनची कामना । पुरविता वीर नाहीं दूजा ॥

तुझ्यावीण कोण करील काजा । आला संदेश निघाल्या फौजा ॥

चाल

आतां तान्हाजी ठेवितो डोई । जिजाबाई मातेच्या पायीं ॥कडकडुनि भेट मग घेई । शिवबाची तान्हा लवलाही ॥

शाहीर अशा या समयीं । शिव जीव एकता पाही ॥

चाल

तो सुभेदार तान्हाजी तडक निघाला ॥

शेलार मामा म्हातारा त्याचे मागें गेला ॥

निघतांच जिजा माऊली वदे तान्हाजीला ॥

बघ वळुन मागं डोळे भरुन पाहु दे तुला ॥

तान्हाजीनं मागं बघतांच प्रकार काय झाला ॥

स्तब्धता चराचराला कंठ दाटला ॥

चाल : मिळवणी

सारे पशू पक्षी आणि वृक्ष । तान्हाजीकडं लक्ष ।

सूर्यही साक्ष । थांबला वायू झुळूक नाहीं ॥

आईची स्थिती सांगूं काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥६॥

चौक ७

सिंहगडच्या पायथ्यापाशीं । थोडया लोकानिशीं ।

गेला त्याच दिशी । मराठा खरा समर गाजी ॥

गडाचा भेद काढूं म्हणे आजी । युक्ति सांगतां मामा राजी ॥

नाईक चौक्यांचा रायाजी कोळी । वळवूं याच वेळीं ।

होऊन गोंधळी । नाद त्याला भारी पोवाडयांचा ॥

त्याला ऐकवूं दोष त्याचा । टाकूं डाव राजकारणाचा ॥

तान्हाजीनं घेतलं तुणतुणं । शेलार मामानं ।

मोठया ऐटीनं । मारिली थाप डफावरती ॥

ऐकता सारे लोक जमती । शाहीर कोण आलाय पाहूया म्हणती ॥

चाल

आला नाईक रायाजी कोळी । चौकीवर जमली सारी मंडळी ॥

लवुन मुजरा करी आमचा गोंधळी । मुजर्‍याला खूष सारी मंडळी ॥

चाल

त्यो मामा म्हातारा थाप डफावर मारी ॥

गोंधळी म्हणे सर्वांना ऐका करझारी ॥

हवालदार म्हणतां जसा खूष शिपाई भारी ॥

तशी खूष मंडळी सारी म्हणतां कारभारी ॥

जरी सिंह विसरला स्वतः जात लढणारी ॥

त्याचं त्याला देईल पटवून ऐना शाहीरी ॥

चाल : मिळवणी

(मामा) गोंधळी म्हणे ऐका एक घडी ।

करील मजा थोडी । आमचा हा गडी ।

नात्यानं भाचा माझा हाई ॥

ऐका आतां गोंधळ म्होरं गाई ।

धन्य मातोश्री जिजाबाई ॥७॥

चौक ८ : गोंधळ

उदे ग अंबाबाई उदे ॥ उदे ग अंबाबाई उदे ॥

कोल्हापुरच्या अंबाबाई गोंधळा यावं ॥ तुळजापुरच्या भवानी गोंधळा यावं ॥

राजगडच्या जगदंबे गोंधळा यावं ॥ प्रतापगडच्या भवानी गोंधळा यावं ॥

शिवनेरीच्या शिवाई गोंधळा यावं ॥ जेजुरीच्या खंडोबा गोंधळा यावं ॥

पंढरीच्या विठोबा गोंधळा यावं ॥ औंधाच्या यमाई गोंधळा यावं ॥

गाणगापूरच्या दत्तात्रेया गोंधळा यावं ॥ बार्शीच्या भगवंता गोंधळा यावं ॥

वाडीच्या नरसोबा गोंधळा यावं ॥ उदे ग अंबे उदे उदे उदे ॥

चाल : मिळवणी

गोंधळी नमी जगदंबेला । मूळ मायेला ।

जगन्मातेला । ऐका आईचं सुयश गाई ॥

रणांगणीं वीरां यशदायी । युद्ध हा तिचा खेळ पाही ॥

येऊं देऊं नका मनामधी शंका । सुयश मिळे एका ।

दुजा तो फुका । रणीं लढतांना मरुन जाई ॥

जिंकिता एक भोगी मही । दुजा धारातीर्थी मुक्त होई ॥

सारखेंच सुयश देई दोघांला । एकमेकाला । नांव ठेवायाला ।

तीळभर जागा ठेवीत नाहीं ॥ म्हणून जो तिचा भक्त हाई ।

मारतो वा मारतो त्याच ठायीं ॥

चाल

न्याय हा लागू स्वातंत्र्याला । धर्मवीर आणि राष्ट्रवीराला ॥

गुलाम जरी शूर वीर निपजला । मारतां मरता लाभ नाहीं त्याला ॥मरतां, महीभोग दुसर्‍याला । मरतां बघा जातो रौरवाला ॥

चाल

परतंत्र इहपर सौख्य नाहीं गुलामाला ॥

मनाला पटुन रायाजी कोळी गोरामोरा झाला ॥

या गुलामीचा नायनाट कराया अवतरला ॥

म्हणती कैलास सोडूनी सांभ शिवाजी झाला ॥

गोंधळी म्हणे आम्ही हिंडतो चारी मुलखाला ॥

आसेतु हिमाचल असा वीर नाहीं पाहिला ॥

चाल : मिळवणी

ऐकतां शत्रुची स्तुती । रागाला येती ।

मंडळी किती । मुख्य रायाजी बोलत नाहीं ॥

मनाची साक्ष जनाला काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥८॥

चौक ९

रायाजी कोळी म्हणे गोंधळ्याला । अधीर बहु झाला ।

जीव आपुला । शिवाजीच्या दर्शनाचे साठीं ॥

आजवर पडली होती तुटी । जिवाला जशि अविद्या गुरफाटी ॥

गोंधळी म्हणे राया कोळ्याला । वेळ काय त्याला ।

सिंह पाहायाला । सांपडे पारधीच्या पाठीं ॥

वनच्या राजाच्या वनांत गांठी । पडायच्या नाहींत गावांत भेटी ॥

रायाजी कोळी म्हणे निक्क्याचा पण (कमलदेवीच्या निक्क्याचा पण)

बळजबरीनं । ठरलाय आज म्हणून । गडावर पहारे झिंगताती ॥

(रजपूत आणि पठाण दोन्ही जाती) । कुसुंबा पिऊन तर्र हायती ।

चौक्या सार्‍या आमुच्याच हातीं ॥

चाल

वेळ ही पारधीची असली । कळवील कोण या काळीं शिवबा सिंहाला ॥

अजुनिया भ्रष्ट नाहीं केली । मध्यरातची वेळ नक्की ठरली कळव तू त्याला ॥

द्रौपदी जशी सोडविली । शिवबानं व्हावं वनमाली याच वेळेला ॥

चाल

मदत सारी करुं मनोभावानं शपथ वाहातों ॥

या मावळत्या सूर्याची साक्ष आम्ही ठेवितो ॥

लगेच गोंधळी वेश टाकूनी तान्हा गर्जतो ॥

नरडीचा घोट म्हणी उदयभान्याच्या घेतों ॥

देवाची करणी, नारळांत पाणी । पाहून कोळी नेमितो ॥

तान्हाजी गळ्यांतील कंठा कोळ्याला देतो ॥

चाल : मिळवणी

भेद किल्ल्याचा मिळविला सारा । देऊन इशारा ।

तान्हा माघारा । परतला मामा संग हाई ॥

आजच्या तरुणांत जोम नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥९॥

चौक १०

मामा काय बोले आपल्या भाच्याला । अपशकुन झाला ।

पहिल्या फितुरीला । मावळत्या रविची शपथ वाही ॥

चर्र झालं मन त्याच ठाईं । लेका (तान्ह्या) धडगत दिसत नाहीं ॥

चैन खालीं पडणार नाहीं पायथ्याला । तुला सोडून मला ।

आतां एकल्याला । होणारं कधी चुकत नाहीं ॥

म्हणून तुझ्या संग येणार मीही । नाही हो म्हणू नको कांहीं ॥

ऐकून तान्हाजीला आनंद लै झाला । म्हणी जाऊं चला ।

पश्चिम बाजूला । गडावर तिकडं पहारा नाहीं ॥

उंच कडा खोल दरी हाई । सुयश आपणाला त्याच ठायीं ॥

चाल

रात्र अंधारी भयाण भारी । तीही ना किर्र शब्द करी ॥

आणखी किती सांगूं खोल दरी । पोचेना रविकर तेथवरी ॥अशा त्या ठायीं गेली स्वारी । निवडक मावळे बरोबरी ॥

चाल

टेहेळकरी तुम्ही सांगा सूर्याजीला गेलो आम्ही पुढती ॥

आतुन उघडतों कल्याण दरवाजा घुसा मग वरती ॥

मोहिते चव्हाण महाडीक जाधव आपले सेनापती ॥

यांच्यासह तुम्ही सावध रहावं कल्याण दारावरती ॥

आता शेंदूर थापून मस्तकीं घोरपद पुजिती ॥

चढायासाठीं कठीण तो कडा नाव यशवंती ॥

चाल : मिळवणी

बांधुनी दोरखंड तिच्या कमरेला । तान्हाजीनं तिला ।

प्रणिपात केला । वेळ आतां लावूं नको ग बाई ॥

चढ यशवंती सुयशदाई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१०॥

चौक ११

यशवंती सरसर चढली । अर्ध्यावर गेली ।

भविष्य समजली । परतली खालतं येण्यासाठीं ॥

मामाच्या धस्स झालं पोटीं । रक्षिता म्हणे जगजेठी ॥

मामा काय बोलला यशवंतीला । झालं काय तुला ।

आजच्या येळला । मागं अशी कधी फिरलीस नाहीं ॥

यशा अपयशाची पर्वा नाहीं । वीराची वीर भावना ही ॥बर्‍या बोलानं वर तू ग जाई । नाहींतर पायीं ।

ठेचीन तुझी डोई । मागं म्होरं आतां पाहणार नाहीं ॥

गेली वर तिचा पाड काई । बिचारी रडत धायी धायी ॥

चाल

भारती त्यावेळी अशी ही मुकी । जनावरे पाळीत होती नेकी ॥

चराचरी राष्ट्रकार्यी एकी । तत्त्वज्ञान पटलं होतं लोकीं ॥

देह जरी पडला मृत्युमुखीं । आत्मा अविनाशी राहतो बाकी ॥

खरोखर दादा ॥ दादा रंऽऽजीरंदाजीरंऽऽजी ॥

चाल

जाणून तो सुभेदार तान्हाजी पहिला वर चढला ॥

शेलारमामा म्हातारा त्याच्या मागं गेला ॥

एका मागून एक असा दोनशे वीर वर चढला ॥

पोचले कडयाच्या वरतं वेळ नाहीं त्याला ॥

अर्धे तुम्ही उघडा छापा घालूनी कल्याण दरवाजाला ॥

तोवर आम्ही हिकडं सोडवितों कमलदेवीला ॥

चाल : मिळवणी

सारे गाफील रजपूत पठाण । अर्धे अधिक जाण ।

टाकले छाटून । बघा बोलबोलतां वेळ नाहीं ॥

रणीं जगदंबा साह्य होई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥११॥

चौक १२

हलकल्लोळ एकचि झाला । कोठून कसा आला ।

कुणाचा घाला । सपन कीं खरें कळत नाहीं ॥

सैरावैरा पळती दिशा दाही । भोंबावले हत्यार गावत नाहीं ॥

थोडया वेळेमधी सावध झाले । लगेच उलटले ।

सरसावून भाले । घे घे हाणमार करती ॥

परस्पर दांतओठ खाती । मारुं वा मरुं तुटून पडती ॥

वार्ता ही ऐकतां क्षणीं । जसा जाळींतुनी । निघे चवताळुनी ।वाघ-तसा भानू बाहेर पडला ॥ घेऊन तलवार ढाल आला ।

तोच तान्हाजी येऊन भिडला ॥

चाल

नजरेला नजर दोघांची भिडली । वीराची वीराला खूण पटली ॥

नंग्या तलवारी चमक झडली । काळोखांत आकाशीं जशी बिजली ॥

आतां तोडीला तोड सुरु झाली । दोघांनी शर्थ बहु केली ॥

चाल

बारा रेडयांची शक्ती एकटया उदयभानूला ॥

तान्हाजी कांहीं कमी न्हवता ऐका भाग पुढला ॥

दहा हजार जोर बैठका काढी येळेला ॥

त्याला पाच पाचुंदे रोट लागत न्याहारीला ॥

द्वापारीं भीम-जरासंध जसा लढविला ॥

भगवान पाठीराखा तसा मामा बाजूला ॥

चाल : मिळवणी

डावासी डाव टाकती । सांगूं तरी किती ।

खुंटली मती । कवीला पुढं स्फूर्ति देई ॥

अहा तूं धन्य माझे आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१२॥

चौक १३

वरती तान्हाजीच्या तमंचा वाराला । कंबर त्यानं केला ।

बहिरा उलट दिला । भानूच्या शिरवारानं ढाल फुटली ॥

(तान्हाजीच्या हातची ढाल फुटली ) । गुंडाळुन शेला ढाल केली ।

धन्य त्याची माय त्याला व्याली ॥

एकमेकांना वार लागती । सांगूं तरी किती ।

तेल तोवर ज्योती । रक्तानं न्हाले वीर दोन्ही ॥

लाली त्याची चढली आकाशी पाही । तान्हा मावळला उगीच नाहीं ॥

चाल

भानूही थकला त्राण नाहीं । माराया परी लाथ धांव घेई ॥

म्हातारा मामा आडवा होई । कमरेचा वार चुकवी पाही ॥केला चवताळुन वार जनोई । भानूला उभा चिरला वेळ नाही ॥

तो खरोखर दादा ॥ दादा रंऽ जीरं दाजी रंजी ॥

चाल

पडतांच तान्हाजी जोर शत्रूनं केला ॥

जरी मर्द मावळे परी धीर त्यांचा खचला ॥

आवरुन शोक मागानं चंग बांधीला ॥

लाजले तरुण वीरश्री चढली सर्वांला ।

इतक्यांत कल्याण दरवाजानं सूर्याजी आला ॥

शाबास लढून शर्थीनं किल्ला सर केला ॥

चाल : मिळवणी

ओवाळावे दिवे जीवाचे लक्ष कोडी । त्यांच्यावरुन कुडी ।

कुरवंडुनि सांडी । शाहिर म्हणे जिवाची दूर बलाई ॥

नांवासाठीं यांत काय नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१३॥

चौक १४

किल्ला जिंकिला बातमी ही खास । कळाया शिवबास ।

आग गंजीस । लावली ज्वाळा गगनभेदी॥

मामा सूर्याजीला न्हवती शुद्धी । हरपलं भान आणि बुद्धी ॥

तिकडं धीर कुठाय माय लेकाला (जिजा शिवबाला । प्रताप गडाला )।

आधींच निघाला । अर्ध्या वाटेला । गडावर दिसली विजयी ज्वाळा ॥

रात्रभर न्हवता डोळ्याला डोळा । सूर्य उदयाची होती वेळा ॥

मारली टाच कृष्णा घोडीला । वेळ काय तिला ।

किल्ला गाठायाला । येतांच तिथं लागली पहिली चौकी ॥लगेच घोडीवरनं उडी टाकी । सारे शोकाकुल अवलोकी ॥

चाल

शिवबा जरी धीर वीर मुत्सद्दी । तरी गोंधळला खालतं आधीं ॥

उठेना पाऊल त्याचं जलदी । चित्तीं खवळला दुःख-उदधी ॥

वरतं देखावा एकच गर्दी । तान्हा पहुडला सर्वांमधीं ॥

चाल

येतांच शिवबा कडकडून मामा भेटला ॥

शिवबास दुःख अनिवार कंठ दाटला ॥

म्हणी गड आला परी सिंह माझा हरपला ॥

आतां काय जाऊनी सांगूं माझ्या आईला ॥

बरं झालं देवा आई नाहीं अशा या वेळेला ॥

आकांत किती केला असता ठाऊक एक तुला ॥

चाल : मिळवणी

सदाशिव शाहीर सांगे सर्वाला । मातृभक्ताला ।

अनुभव आपुला । सुशिक्षण धीर वीर दायी ॥

जगीं देवता एक आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥

अखेर सांगणें एक राहिलें । ताल-सूरवाले ।

पाठीराखे भले । लाभले म्हणून रंग हाई ॥श्रोते तुम्ही हंस-क्षीर न्यायी । सदाशिव शाहीर धन्य होई ॥१४॥

Thursday, August 13, 2009

वीररत्ना तानाजीराव मालुसरे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,

तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥

चौक १

एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।

"कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।

राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥

सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।

स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।

राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥

रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।

धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।

कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥

ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला,

त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार;

दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥

चाल

हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥

षड्‌विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥

मग दृष्टि राहिल सदैव पापावरी" ॥ ऐकून आईचे बोल ।

शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे "माय । काय आम्हि केलं ?

कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।

गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।

मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं" ॥

मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं,

"जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।

तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।

मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर" ।

डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥

"माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।

करि पूर्ण आस ही बाळा " । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥

चाल

"जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।

होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।

माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला" ॥१॥

चौक २

उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।

लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।

पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥

जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।

स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।

रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥

शेलारमामा सांगत तानाजीला । "रायबा थोर झाला ।

आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।

पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं" ॥

तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।

मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।

थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥

चाल

तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥

"लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥

त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥

त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥

घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥

त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ? ।डोळ्याचं पारणं फेडावं ? हा ताना शिवरायाच्या मर्जीतला

असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥

या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।

त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।

जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं" ॥

चाल

तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।

रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।

बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥

चौक ३

ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।

युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।

ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥

युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।

मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।

करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार

औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।

शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।

कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ ----॥

असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।

त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।

तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ?

चाल

हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥

ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥

हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।

शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।

तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥

परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।

त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।

आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥

परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।

मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं॥मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।

जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।

देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥

चौक ४

पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।

आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।

मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥

चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।

बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।

प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ "तुमचं कुशल आधीं ऐकावं ।

मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।

राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥

जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।

नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।

चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला" ॥

शिवराज छत्रपति बोले । "विशेष नाहीं झालं ।

विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।

आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं " ॥

चाल

मालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,

तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।

घटकेंत वाळुनी सारा ! ॥ "शेलारमामानं सांगितलं आम्हांला,

रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,

मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥

सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,

शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,

होईल तोष डोळ्याला॥ सारीं कामं ठेवून बाजूला,

जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,

तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला" ।

खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥

शिवराज बोलले तान्यास, ॥ "आमचं मन धांवे येण्यास,

चाल

पर शरीर दुसर्‍या कामावर । झालं तय्यार ।

घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।

माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर" ॥४॥

चौक ५

माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।

आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।

काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला

अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।

करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।

रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥

या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।

युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।

हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार" ॥

हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।

संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।

उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ "आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।

नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।

युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥

चाल

जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !

तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥

आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।

मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।

दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।

तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।

करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।

माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥

झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥

ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !" ॥

चाल

अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।

गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।

शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥

चौक ६

लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।

टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।

वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥

घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी हां जी !

यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।

मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।

तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।

चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥

रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।

यवनाचा आला त्यास तिटकार ॥

चाल

"अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।

वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।

अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला ।दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।

लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥

देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।

राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।

धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥"

तानाजी लागला बोलण्यला । "दावावा बुरुज आम्हाला ।

पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।

जिथ्‌नं चढुनशान गांठावं उदयभानाला" ॥

चाल

घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।

रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।

भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥

चौक ७

तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।

सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।

पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥

निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।

गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।

काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥

झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।

लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।

चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥

यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।

नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।

पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !

असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।

दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।

असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥

चाल

मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥

"आज इचार काय ग तूं हा केलास ?

असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।

पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥

आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।

नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला" ॥

घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।

मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।

हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।

जीवाची फिकीर नाहिं त्याला । चला या होबोलला लोकाला ।

झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।

झट्‌कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥

अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।

तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।

असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।

खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।

सैतान किल्ल्यावर आलाया कोणि राखा आम्हाला

चाल

आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।

ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।

केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥

चौक ८

अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।

करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।

आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥

"हरहर महादेव" बोला । आला ऊत भला ।

खोर्‍यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।

थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥

उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।

भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।

भानुच्या उदयिं गुंतली आस ॥

चाल

"तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।

तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।

रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥

गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥

आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।

तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।

टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।

घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।

धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।

साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।

त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥

चाल

तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।

जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।

येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥

चौक ९

उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।

सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।

मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥

तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।

पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।

बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥

दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।

देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।

डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥

गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।

सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ?

दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥

तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।

झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।

भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥

चाल

इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।

त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । "कुठं जाता ?" बोलला तो त्याला ।

सूर्याला मावळा बोलला । अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला

डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।

तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ "अर भित्र्या लोकांनो ?

जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।

इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ?

जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।

ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।

कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।

डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।

मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।

जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥

लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।

इथनं जाउन्‌शान गांवाला । सांगाल काय राजाला ?

हर हर महादेवबोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला" ॥

चाल

धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।

कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।

देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥

चौक १०

पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।

केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।

पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥

मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।

फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥

वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।

लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।

शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥

हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।

"हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।

सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥

चाल

स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥

काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥

तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥

माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।

ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥

पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥