Showing posts with label shahir vishnupant kardak. Show all posts
Showing posts with label shahir vishnupant kardak. Show all posts

Saturday, May 14, 2011

प्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक

प्रतापगडाची झुंज

चौक १

धन्य--धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।

राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।

यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥

विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।

झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।

सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥

पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।

झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।

मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।

पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।

शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।

असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥

खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।

एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।

कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥

जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।

तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।

टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।

शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥

भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥

शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥

क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥

तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥

शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।

ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।

ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।

असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥

शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥

दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥

शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।

मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।

एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।

असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥

शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।

गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥

थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।

हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।

मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥

आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।

मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।

वृत्तांत ऐका पुढील चौकास ॥

चौक २

आहा आहा शिवाजी भोसला । शरण आपणाला ।

कळता यवनाला । हर्षला अफझूलखान ।

बोलू लागला तो गर्वानं । शिवाजीला ठोशात मारिन ॥

शिवाजी डोंगरी उंदिर । लुटारु चोर ।

करुनिया ठार । दावतो यवनांच्या दंडा ।

कापूनिया मराठयांचा तांडा । रोवितो मुस्लीमचा झेंडा ॥

अशा आनंदाच्या लहरीत । प्रताप गडी येत ।

बसता मंडपात । शिवाजी म्हणे मस्त गबर झाला ।

संपत्ती एवढी कुठून त्याला । हिर्‍या मोत्यानं मंडप सजला ।

गुडगुडी तोंडी धरुन सिदीला (बंडाला) सांगे डौलानं ॥

शिवाजीला ठार मारुन । संपत्ती नेतो लुटून ॥

मंडपात खान बैसला , कळले शिवबाला ॥

भवानीचे घेऊन दर्शन । नमून मातेला ।

जाणून काळ वेळेला । अंगभर चिलखत ल्याला ॥

भरजरी पोषाख केला । जिरे टोप शिरी चढविला ।

वाघनखे भरुनी पंजाला ॥ खानाच्या भेटीला ।

सर्जा मंडपामधें आला । आहा आहा शिवाजी पाहून ।

दुष्मनी दिली सोडून । तू दोस्त आजपासून ॥

पतंगाने झडप घालावी जशी ज्योतीला ।

सर्पाने विळखा मारावा जसा मुंगुसाला ॥

तसा खान झडपी तया समयास ।

बगलेत धरुन मानगूट, सुरा खुपसला ॥

शिवाजी शूर भोसला । तोही पुरेपुर कसलेला ।

नव्हता कच्च्या गुरुचा चेला । जिजा आईच दूध प्यायलेला ॥

तो कसचा भितोय खानाला । खानाचे कपट ओळखून ॥

मारा चुकवून । बगल तोडून झाला बाजूला ॥

मग सिंह झडपी जसा मस्त हत्तीला ।

वाघाने धरुन फाडावे जस बकर्‍याला ।

तसा शिवाजीने खानाला । वाघनखे खुपसून पोटाला ।

खानाचा फोडला कोथळा । तो खान आडवा पडला कोसळून ।

बचाव बचाव म्हणून ॥ अल्लाअल्ला म्हणून । प्राण सोडला ॥

सय्यद बंडाने जोराचा वार शिवबावर केला ॥

जिरेटोप तुटून धरणीस खेळू लागला ॥

पाहून राजावर घाला । जिवा महाला होताच बाजूला ।

तात्काळ तुटून पडला । सय्यद बंडाला धाडला खानाच्या भेटीला ॥

जयजयकार डंका गाजला । मराठयांनी हल्ला चढविला ।

रक्ताने प्रतापगड न्हाला । खानाची फौज मारुन ।

केली धूळघाण । यवन हैराण । तया समयाला ॥

खानाचे लाव लष्कर । हत्ती, घोडे स्वार । पायदळ सारं ।

लढुनिया फस्त केले यवनास । विजयाने माळ घातली शिवबास ।

शाहीर कर्डक सांगे कवनात ॥

Sunday, February 28, 2010

धन्य मातोश्री धन्य जिजाबाई (पोवाडा) – शाहीर विष्णूपंत कर्डक

धन्य मातोश्री धन्य जिजाई जन्म दिला तिनं शिवबाला ।
पारतंत्र्याची तोडून शृंखला स्वतंत्र करण्या देशाला ।
हिदुस्थानामध्यें हिरवं निशाण फडकू लागलं यवनांच ।
नाम निशाण मग मोडु लागलं स्थाईक हिंदु लोकांच ॥
जिकडे तिकडे जुलुम यवनाचा छळती हिन्दु लोकांना ।
भर रस्त्यामध्यें गाई कापिती । शिवबाला हे सहन होईना ।
हिंदु अबलांना पळवून नेती, लावती आपल्या ते कामा ।
बळजबरीने करती मुसलमान पढवित होते कलमा ।
थोर थोर लढवय्ये मराठे संरक्षक ते राष्ट्राचे ।
पारतंत्र बेडीने जखडले गुलाम बनले यवनांचे ॥
देश पसरले परकीय जाळे । हिन्दु बांधवांचा होतो छळ ।
जिकडे तिकडे हलकल्लोळ । शेतकरी झाले कंगाल ।
मुला बाळांचे होते हाल । आया बहिणी रडती खळखळ ।
किती भटकती रानोमाळ । अस पाहून जीजाईचा बाळ ।
अंतर्यामी सदा जळफळ । कधी देश स्वतंत्र होईल ।
जैसा मत्स्य तळमळ उदकावीण । तैसा शिवाजी ।
स्वातंत्र्यास्तव रात्रंदीन तळमळ ॥
यवनांचा हा जुलूम पाहून शिवराय करि गर्जना ।
मर्द मराठयांना म्हणे बंधुनो कसा साहिता धिंगाना ।
आया बहिणींची अब्रू घेती लाज कशी रे धराना ।
बोडून मिशा भरुन बांगडया लुगडी कारे नेसाना ।
हिन्दुभूमीचे लेक म्हणविता कुठे गेला तुमचा बाणा ।
मायभूमी रसातळाला चालली नेत्र कारे उघडना ।
ढाल तलवार घेऊन भाला हरहर महादेव बोला ।
शत्रुवरी करुन हल्ला देश आपुला जिंकु चला ।
शिवबाची ऐकुन ही गर्जना मावळा उतरला समररंगणा ।
शिवबाला म्हणती सारे धर्मासाठी अर्पू प्राणा ।
मायभवानी सदा यशदानी तलवार देई शिवबाला ॥शिवरायाला कदा न विसरे सदा लटकली कमरेला ।
स्वातंत्र्यासाठीं सारा मावळा लढे संगरी जोमात ।
जिकडे तिकडे मग भगवा झेंडा फडकू लागला किल्ल्यात ।
सारा मावळा एकवट आला । लढू लागला रणांगणाला ।
धर्माचे रक्षण करण्याला देशासाठी अर्पिती प्राणाला ।
जर्जर करिती आपुल्या शत्रुला । किती तरी मग देश जिंकला ।
शिवाजीला राजा केला । सदा वंदिती जीजामातेला ।
अंबाभवानी कुल देवतेला । सुखी केलं आपल्या लोकाला ।
दिसती आनंदात मावळे मग दिसती आनंदात ।
मराठयांच भगव निशाण फडकु लागलं देशांत ॥
देशासाठी किती वीरांनी रक्त सांडूनी भूमीला ।
पारतंत्र्याची तोडूनी बेडी स्वराज्य केलं देशाला ।
शूरवीर नेताजी पालकर, उजवा हात तो शिवाजीचा ।
हिरोजी, बहिर्जी आणि सूर्याजी इंगा जिरवी शत्रूचा ।
मर्द मावळा शूर तानाजी सोडून पुत्राच्या लग्ना ।
स्वराज्यासाठी अर्पूनी प्राणा, घेतला कोंडाणा ।
मुरारबाजी मराठा पडला गड पुरंदरी लढतांना ।शीर तुटलं पर धडानं कापलं त्यान तीनशे हो लोकांना ।
पावन खिंडीमध्यें शिकस्त केली सुखी पोहचण्या शिवराणा ।
पांच तोफांचे आवाज होता । मग बाजी प्रभु सांडी प्राणा ।
हंबीरराव मोहीते मराठा मर्द गडी तो खंबीर ।
शिव कार्याला सदा तय्यार असे त्याची हो तलवार ।
असा किती वीर कामी आला । देश आपला जिंकण्याला ।
शिवाजी सारखा पुढारी मिळाला । म्हणून देश स्वतंत्र झाला ।
सुखी केला आपुल्या लोकाला । धन्यवाद देती शिवबाला ।
सारे नमिती भगव्या झेंडयाला । सदा तय्यार शिवकार्याला ।
मराठे सारे ते हो वीर । शिवरायाचा वाढु लागला विस्तार ॥ध्रु०॥
स्वराज्य स्थापूनी शिवरायाने सारा मावळा एक केला ।
जो जो आडवा झाला त्याला उभा धरुनी चिरीयेला ।
कितीक तरी थोर थोर मराठे स्वराज्यात करिती फाटाफुट ।
परि शिवराय स्वातंत्र्याची करी हो एकजुट ।
बहु प्रयत्ने् शिवरायाने देश आपुला जिंकिला ।
स्वातंत्र्याची मेढ रोवूनी धर्म आपुला रक्षियला ।
असा मोहरा महाराष्ट्राचा अभिमानी जो धर्माचा ।
दैव तयाला आड आले रोग झाला हो गुडघीचा ।
महाराष्ट्राचा हिरा हरपला तारा एकाएकी तुटला ।
मावळ देशाचा दिनमणी अंधार गडद पडला ।
धन्य शिवाजी धन्यच झाला । स्वराज्य स्थापिला ।आपल्या देशाला पारतंत्र्याची तोडून शृंखला ।
देश धर्म आपुला रक्षिला । नाव अजरामर करुन भूमिला ।
शिवराय ते गेले स्वर्गाला । दुःखित केलं आपल्या जनतेला ।
किती वर्णु मी त्यांच्या गुणाला ?
शिवरायानं जन्म घेतला । म्हणूनच हिंदु धर्म राहिला ।
त्यांना रामदास गुरु मिळाला । तुकारामानं उपदेश केला ।
अशा संतांचा लाभ झाला । मराठे तय्यार वेळेला ।
मातोश्रीची मात सारी ही, मातोश्रीची मात ।
शाहीर विष्णुपंत कर्डक गातो कवनात ॥ध्रु०॥