Showing posts with label agryahun sutka. Show all posts
Showing posts with label agryahun sutka. Show all posts

Thursday, August 13, 2009

ठकास महाठक (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

महाठक ठका भेटला । अजब युक्तीला ।
योजून पार झाला । शेराला सव्वाशेर शिवराय ।
दिल्लिपति सदा करित हाय ! हाय ! ! ।
पोवाडा पांडुरंग कवि गाय ॥ध्रु०॥
चौक १
जंवा पुरंदरचा तह झाला । शाहा खुष झाला ।
जयसिंगाला । शिवाजीनं मदत केली हो फार ।
आदिलशाही त्यानं केली बेजार । शौर्याची शर्थ केली अनिवार ॥
शाहानं लिहिलं शिवाजीला, । "तुमच्या शौर्याला । तुमच्या कीर्तीला ।
तोड नसे, फिदा झालों मी फार ! । यावं भेटिला, करिन दरबार ।
करिन बहुमान तुमचा मी फार ! ॥ मनिं शंका मुळीं नच धरा ।
माझ्या या घरा । विचार ठाम करा । येण्याचा, तोष होईल चित्तास ।
एकमेकांचा जडेल विश्वास । एकदां आम्हांकडं यावं तुम्ही खास" ॥
विश्वासु मित्र जमविले । किल्ल्यावर भले । राजा मग बोले ।
"गडयांनों ! शहा बोलवी आम्हांस । सल्ला काय तुमचा असल्या समयास ।
धरावा कसा त्याचा विश्वार ? ॥ तरी जावं वाटतंय् मला । भेट देण्याला ।
हिंदुराज्याला । चार शाह्या झोंबती आजच्या समयास ।
कांहीं काळ वश करणं एकास । खास जरुरीचं वाटतं आम्हांस" ॥
सर्वांनीं विचार जरा केला । अभिप्राय दिला । अनुकूल त्याला ।
राजा मग बोलला फिरुन सर्वांस । "शाहाचा मुळीं नसे विश्वास ।
केव्हां दगा होईल कळे ना कोणास " ! ॥
चाल
म्हणुन मोरोपंत पेशवे पंडित; । अण्णाजी दत्तो सुरणीस; ।
निळो सोनदेव मदतीस । तीघांच्या हातीं सोंपविली सत्ता ते वेळा ॥
किल्ल्यांची पाहणी शिवराय करुन हो आला ॥
राज्याचा बंदोबस्त केला । अन् कोण कोण घेतले मदतीला ।
दादांनो ! सांगतों तुम्हाला ॥
चाल
निराजी आवजी न्यायाधीश । बाळाजी आबजी चिटणीस ॥
त्रिंबक सोनदेव डबीर । आणि प्रतापराव गुजर ॥
जीवनराव माणकोजी खास । नरहरपंत सबनीस ॥
राघो मित्र घेतले मदतीस । दत्ताजी त्रिंबक हि खास ॥
हिरोजी फर्जंद वीरास । राजानं घेतलं मदतीस ॥
कित्येक असले सरदार घेतले मदतीला ॥
संभाजी राजपुत्राला । त्येनं संग घेतलं ते वेळा ।
पांच हजार घेतलं फौजेला । भवानीच्या केले स्मरणाला ।
आठवलं रामदासाला । जिजाईला भेटून आला ।
आणि राजा चालला आगर्यााला ॥ दोन महिने लागले जाण्याला ।
शिवाजिला खास राहण्याला ॥ शिवपुरा तयार होता केला ।
ततं राजा जाऊन उतरला । रामसिंग दिला दिमतीला ।
असा राजा थाटमाटानं गेला आगर्यादला ॥
चाल
पुढं काय प्रकार झाला । पुढच्या चौकाला ।
सांगिन तुम्हांला । कथानक गोड मोठं छानदार ।
शिवाजी सांबाचाच अवतार । असा कधिं हिरा पुन्हा होणार ? ॥१॥
चौक २
दरबार शाहानं भरविला । दुसर्याम दिवसाला ।
थाट लइ केला । वाटे जणु ’मयसभा’ ही छान !
कराया शिवाजीचा अपमान । बादशाहा झाला होता बेभान ! ॥
तंवा जमले सारे सरदार । मोठे सुभेदार । शाहीचे नोकर ।
जमले पाहण्याला शिवाजीला । दरबारीं जो तो खडा झाला ।
मनाप्रमाणंच ते वेळा ॥ पच्चिस हात मारतोय उडी ।
शिवाजी गडी । वाघाला फाडी । असला हा वीर कसला झाला ! ।
पाहावं एकदां तरी त्याला । जो तो करि असल्या विचाराला ! ॥
शिवाजीनं पोशाख छान केला । तरवार कमरेला ।
चालला दरबाराला । ज्याचा त्याचा डोळा खिळुन गेला ।
वाटे जणुं मदनाचाच पुतळा । अमीर उमराव थक्क झाला !! ॥
चाल
शिवाजीनं लवुन शाहाला मुजरा तंवा केला ॥
पंधराशें होनांचा वरती नजराणा दिला ॥
सहा हजार मोहरा देऊन बहुमान केला ॥
असा बहाणा राजनिष्ठेचा ठाकठीक केला ! ॥
असा विधि झाल्यावर शहा बोलला शिवबाला ॥
"राजनिष्ठा तुमची पाहुन शाहा खुष झाला ! ॥
जसवंतसिंगराजाच्या खालच्या बाजूला ॥
जा, उभे रहा, तो मान तुम्हांला दिला !" ॥
असं बोलला शहा शिवबाला । शिवाजीचा अपमान झाला ! ।क्रोधाग्नि आंत भडकला ! । जसा सूर्य बारा डोळ्यानं, तसा चमकला ! ॥
जसा वणवा रानाला,तसा राजा भडकला ! ॥
जसा जलधि खवळावा, तसा राजा खवळला ! ॥
तंवा शिवबा बोलूं लागला । अपमान माझा करण्याला । काय इथं आणलं तुम्ही मला ? ।
जो करार जयसिंगराजानं माझ्याशीं केला । तो आज तुम्ही मोडला ! ।
बस्स ! पुरे ! जातों माघारा " । असं बोलला राजा ते वेळा ! ।
सरदार सुभेदार जिरले जागच्या जागेला ! ॥ जणु महारुद्र खवळला ।
शाहानं दरबारच जल्दी बरखास्त केला !! ॥२॥
चौक ३
शिवाजीचा बाणा पाहून । दरबारी खान । गेले हादरुन ।
शहाही झाला थक्क ते वेळा ! । सर्वांची मति कुंठित ।
धाक पोटांत । एक चित्तांत । शिवाजी हो दिसला ! ॥
जंवा शहा विचारमूढ झाला । सुचेना कांहीं त्याला ।
सल्ला देण्याला । आली तंवा त्याची मामी जोरानं ।
नवर्यादचीं बोटं कापली । म्हणुन भडकली ।
बोलाया आली । मामी आणि सून ! ॥
"अवरंग ! ऐक सल्ल्याला ॥ शिव्या आयता हातीं गवसला ।
कैद कर त्याला । कांटा हा झाला । उपटून काढला पाहिजे या वेळा ।
ही संधी आली चालून । जर म्हणसी आतां तूं न न । शिरजोर पुढं होऊन ।
सूडाची ज्योत घेऊन । करिल हैराण । पादशाहीला ! ॥
मामीचा सल्ला हा पटला बादशहाला । शहानं कैद केलं त्याला ।
शिवपुर्या्मधींच शिवाला । कोंडून ठेवलं ते वेळा ।
पिंजर्यां्त कोंडलं सिंहाला । कडेकोट पहारा वाडयाला ।
पोलादखान मुख्य नेमला । पांच हजार शिपाई मदतीला ।
जो राजा भेटीला आला । शाहानं कैद केलं त्याला ! ।विश्वासघात करुनि हो शिवा पकडला !! ॥
शिवाजीला पूर्वी धरण्याला । बडाबडा खान पाठवला ।
पण ज्यानं थांग नाहिं दिला । तो आज कपटजाळ्यांत सिंह सांपडला ! ॥
चाल
दख्खनचा सिंह कैद झाला । आपदा हिंदुराज्याला ॥
बीं नुकतं रुजलं भूमीला । पर भुंगा लागला त्याला ! ॥
स्वातंत्र्यसूर्य उदयाला । पर केतु ग्रस्त करि त्याला ! ॥
या दुष्ट बातमीचा गोळा । दख्खनला जाळत आला ! ॥
जणुं आला वज्राचा घाला ! । काळ मोठा दारुण आला ॥
चाल
काय युक्ति शिवबा योजील । कसा निसटेल ।
सांगे शाहीर । दादानों ! गोष्ट घ्यावी चित्तांत ।
शिवाजीनं केली शहावर मात । कशी ती ऐका पुढच्या चौकांत ॥३॥
चौक ४
जगदंबा गेली सप्नाला । बोलली शिवबाला ।
"भिंऊ नको बाळा ! निरशीन तुझ्या संकटाला" ।
शिवाजीला तोष फार झाला । उपाय एक सुचलां खासा त्याला ॥
आजार्यााचा बहाणा त्यानं केला । अंथरुणाला खिळला ।
निरोप शाहाला । धाडला त्यानं एक त्याच वेळेला ॥
"लोक माझा हैराण झाला । हवापाणी मानवेना त्याला ।
जाण्याला दख्खन देशाला । आतुर फार झाला । निरोप द्या त्याला ॥
चाल
शाहानं विचार मनिं केला । ’देऊं निरोपाला ।
सार्या फौजेला । शिवाजिच्या, जाऊ द्या दख्खन देशाला ।
मग शिवा एकटा राहील । भय त्याचं कमी होईल ।
मग तोच झुरुन जाईल । मरण पाहील । खास आग्या िर ला" ।
लोक सारा पाठवुन दिला । दख्खन देशाला; । थोडा पण ठेवला ।
ठायीं ठायीं गावामध्नं ते वेळा ॥ ते आपला वेष पालटून ।
गावात्नंय राहिले जाऊन । शिवाजीला जाती भेटून ।
नित्य येऊन, । रोजचा नेम झाला ॥ बरं वाटतं आतां जीवाला ।
म्हणून मिठाई तो वाटतो गांवाला । पेटारे जाती भरुन ते वेळा ।
शिवपुर्यांातून रोज किती । नाहीं गणती ।
अचाट हि युक्ति । सुचली शिवबाला ! ॥
चाल
रोज पहारेवाले नेमानं ॥ पेटारे बघती उघडून ॥
आरंभी रोज उघडून । पाहती नित्य नेमानं ॥
पर कंटाळले रोज पाहून । पुढं पुढं पाहतीना कोण ! ॥
ठकालागीं ठक होऊन । शिवाजीनं केलं वर्तन ! ॥
चाल
रोज असा नेम चालला । विश्वास वाटला सर्वांला ।
एके दिशीं शिवानं कळविलं आपल्या लोकांला ॥
"की व्हा तय्यार अमक्या जागेला । आज आज रात्रीं नेमक्या वेळेला" ।
जंवा सूर्य चालला अस्ताला । तंवा त्यानं सोडलं पलंगाला ।
हिरोजी फर्जंद वीराला । त्यानं पलंगावरती निजवला ।
पांघरली शाल अंगाला । शिवाजीची आंगठी हिरोजीनं घातली ते वेळा ॥
अन् हात बाहेर (उघडा) ठेवला । शिवाजीच्या गादीवर हिरोजी हो पहुडला ! ॥
एक मुलगा मदारी मेहेतर चेपतो पायाला । असा सारा देखावा केला ।
अन् शिवाजी पेटार्यां त बसला । संभाजी जवळ घेतला ।
अन् पहार्यापत्नंि बाहेर चालला ! । शिवा गेला ! गेला ! निसटला !! ।
आणि बघतां बघतां शिवराजा नाहिंसा झाला ! ॥४॥
चौक ५
दुसरे दिवशीं पोलादखान आला । पहारा करण्याला ।
थक्क पार झाला ! । गलबला रोजचा दिसेना त्याला ।
सामसूम वाडा शांत दिसला । पक्षी कोंडलेला उडून गेला ! ॥
लगबगीनं शहाकडं गेला । बोलला शाहाला ।
"हुजूर ! घात झाला! । पिंजरा आज रिकामाच पडला ।
शिवा फसवून निघुन गेला ! । गेला कसा ठाव न कोणाला ! ॥
चोवीस तास पहार खडा केला । तरि ही पार झाला ! ।
कळेना कसा गेला ! । काय जमिनीच्या आंत शिरला ।
अस्मानांत काय उडुन गेला । भूत चेटूक साहाय्य त्याला ! ॥
पचीस हात मारतोय उडी । ऐकलं घडोघडी । म्हणुन मोठे गडी ।
ठेवले होते पहार्याीवरती मी खास । फसवून गेला कसा सकळास ।
समजेना गूढ पडलं आम्हांस ! ॥ दांत ओंठ चावले शाहानं ।
मुठी वळून । बोलला रागानं । "गेला कसा ? कुठं हराम सैतान ।
काय करुं !" ----- बोलला दाढी हालवून । गेलं कंबरडं त्याचं वांकून ! ॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥

Thursday, July 16, 2009

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १, चाल : मिळवणी
धन्य शिवाजी शिव अवतार, पराक्रमी फार,
राष्ट्र उद्धार, कराया हातीं धरिली तलवार ।
समर्थ कृपा ज्यासी अनिवार । कांपती यवन भूप सरकार ॥ध्रु०॥
धारिष्ट ज्याचें अलोट, छातीचा कोट, शाहिस्त्याची बोटं,
तोडितां दिल्लीपती हैराण । पहाडका चूवा शिवाजी नव्हे लहान ।
बडा रे बडा गनिम सैतान ॥ त्यासी धराया जयपुरवाला, जयसिंग भला,
त्याचे मदतिला दिल्लीरखान पठाण बहु बलवान् ।
धाडिला देऊन किताब सन्मान । सैन्य सरसकट मुसलमान ॥
वेढा पुरंदराशी दिला, अशा संधिला, आत्मबुद्धिला शिवाजी निश्चय करुनी छान ।
रघुनाथ पंडित बहु विद्वान । धाडिला तह कराया निर्माण ॥
चाल
त्या वकीलाचा सन्मान, केला उत्तम जयसिंगान ।
शिवाजीचा निरोप ऐकुन, झाला तल्लीन मन प्रसन्न ।
आम्ही कबूल तहा कारण, सत्य प्रमाण सांगा जाऊन ॥
चाल दुसरी
दिल्लीश्वर बादशहा बलाढय पृथ्वीपती ।
त्याजपुढें लढाईत यश न घडे सांप्रतीं ।तुम्ही सख्य करुनी टाळावी आपत्ति ।
तुम्ही हिंदुधर्म स्थापितां मान्य मजप्रती ।
मी तुम्हासी अनुकूल घ्या सन्मती ।
देशकाळ प्रसंग पहावी सद्यस्थिति ।
बादशहाला शरण याल तरि मी तुम्हाप्रति ।
जहागिरी देवविन घ्या शपथ निश्चिती ॥
मोडते
रजपुत प्रतिज्ञा खरी, सत्य वैखरी, आणा लौकरी,
शिवाजीस भेटिस आम्ही तयार । हातावर हात वचन निरधार ।
एकदिल होतां हर्ष अपार ॥१॥
चौक २, चाल : मिळवणी
शिवाजी भेटतां जयसिंगास, आले रंगास, अंगअंगास,
लागतां हर्ष उभय चित्तांस । शिवाजी हात जोडुनी म्हणे त्यास ।
वडिल तुम्ही वंदितों मी चरणास ॥ जें मागाल ते गड देतों,
हुकूम झेलितो, निशाण चढवितों, परि यश देऊं नका यवनास ।
तुमचे माझे एक रक्त आणि मास । राज्य हें मूळ हिंदूचे खास ॥
हिंदू धर्म रक्षण करी, त्याच्या मी तरी, चरणावरी, लोळण घेईन होईन दास ।
आपण थोर पुरुष आत्म देशास । द्याल स्वातंत्र्य वाटे चित्तास ॥
चाल
ऐकुनी शिवाजीचे वचन, जागा झाला त्याचा अभिमान ।
तह करावया प्रेमान, दिले वचन जयसिंगान ।
माझ्या मदतीस दिल्लीरखान, यावें तुम्ही त्यास भेटुन ॥
चाल दुसरी
तह केला खानासी भेटुन आलियावरी ।
वीस किल्ले सोडिले जयसिंगाच्या करी ।
पंच हजारी सरदारी दिली संभाजीस बरी ।
शिवाजीची नदर आग्रहें जंजिर्या वरी ।
लिहुन कलमवार सही मोर्तब अक्षरीं ।
धाडिला आग्या मोरसी तहनामा सत्वरीं ।
आलें उत्तर तिकडूनी भेटिस या लौकरी ।
देऊं समक्ष मग जंजिरा गोष्ट ही खरी ॥
मोडते
शिवाजीचें साह्य पाहुनी, औरंगजेब धनी,
निकड लावूनी, बोलवी भेटिस वारंवार ।
शिवाजी लडका हमे बहु प्यार ।
जलदिसे आग्रा आवो एकवार ॥२॥
चौक ३, चाल : मिळवणी
जयसिंग शिवाजी व्याघ्रास, म्हणे आग्र्यातस,
जाऊन बादशहास, भेटुन यावें तुम्ही बिनखोट ।
तुमच्या अंगास लाविल कोण बोट । राज्य मी बुडविन हें अलोट ॥
मग झाली देवीची आज्ञा, जाई बा सुज्ञा,
कोणाची प्राज्ञा, साह्य मी करीन छातीचा कोट ।
भवानीस वाहुनी तोडे गोट ।
राज्यव्यवस्था करी कडेकोट ॥
वंदुनी समर्थपदा, घेउनि संपदा,
सैन्यामध्यें तदा, बांधिली नाहीं कोणाची मोट ।
तीन सहस्त्रांचा करुनियां गोट । एक मांडीचे वीर सडे सोट ॥
चाल
आग्याहस् सी पुढें गेलें पत्र, उणे पडो नये तिळमात्र ॥
तिथे जयसिंगाचा पुत्र, रामसिंग स्नेहाचे सूत्र ॥
बरोबर संभाजी पुत्र, निळो रावजी राघो मित्र ॥
चाल दुसरी
दत्ताजी त्र्यंबक हिरोजी फर्जंद भला ।
मुख्य शिवाजी तारांगणीं चंद्र शोभला ।
कुच करित राहूच्या केंद्राकडे चालिला ।
दोन महिन्यानें आग्र्यास येऊन पोंचला ।
रामसिंग लवाजमा घेऊन सामोरा आला ।
स्वागत करुनिया शिवाजीस भेटला ।
बिनधोक महाराज नगरामध्ये चला ।
शिवपुरा नांवाचा बंगला तयार ठेविला ॥
मोडते
रस्त्यांत स्वारीला किती, टकमका पाहती,
लोक बोलती, जवान बडा दखनका सरदार ।
मुसलमिन बादशाहीको आधार ।
अल्ला तुम्हें रखे सलामत बहार ॥३॥
चौक ४, चाल : मिळवणी
मग सुमुहूर्त पाहुनी भला, निरोप धाडिला,
स्वतः भेटिला, उद्यां मी दरबारीं येणार ।
ऐकुनी झाला बादशहा गार । ठरल्या वेळीं दरबार केला तयार ॥
बादशहाला काळजी बडी, शिवाजी गडी, पचिस हात उडी, मारितो बेटा चपळ अनिवार ।
हुशार तुम्हीं असावे सब सरदार । गनिमका नही हमको इतवार ॥
पंचहत्यारी बादशहाजवळ, रक्षक निवळ,
शिपाई सोज्वळ, इतुक्यांत ललकारला भालदार ।
शिवाजी आये नजर रखो सरकार । चमके बडी नंगी भवानी तलवार ॥
चाल
पाहुनी सभा सारी दिपली, वीर वृत्ति वीरांची लपली ॥
कुरनीस रिवाज वेळ जपली, क्रिया नजराण्याची संपली ॥
क्षेम कुशल बोलण्यांत आपुली, दोन शब्दांत वेळ आटोपली ॥
चाल दुसरी
बादशहाचा हुकूम आपुल्या उजव्या हातीं ।
मारवाडचा राजा जसवंतसिंग भूपती ।
त्याच्या खालची जागा शिवाजीला सांप्रती ।
म्हणे शिवाजी या तरी अपमानाच्या रीती ।
माझ्या फौजेने याची पाठ पाहिली रण क्षितीं ।
त्याच्या खालीं नाहीं मी उभा राहणार निश्चितीं ।
रामसिंगास म्हणे द्या कटयार हरली मती ।
क्रोधाग्नी भडकला अवघ्यास पडली भीती ॥
मोडते
अशी गडबड ऐकुनी जरा, करुनिया त्वरा,
निरोप दिला खरा, बादशहानें खलास केला दरबार ।
शिवाजी बिर्हााडी गेल्यावर बहार ।
जीवात जीव आला झाला थंडगार ॥४॥
चौक ५, चाल : मिळवणी
राजदरबारीं येउनियां , मुसलमान स्त्रिया, पाहती शिवराया,
चिकांच्या पडद्याआड बसून । शाहिस्त्याची बायको आणि येक सून ।
धाय धाय रडे तोंड वासून ॥ त्यानीं बादशहाची राणी, तियेच्या मनीं, केली पेरणी,
शिवाजीस मारावे फसवून । नका बसूं त्यावरी विश्वासून, स्वप्नीं माझ्या येतो छाप्यापासून ॥
तिनें बादशहाचें मन व्यग्र, करिता अति शीघ्र, हुकूम दिला उग्र, पोलादजंग बोलविला त्रासून ।
शिवजीको अटक करो खेंचून । नरम करुं बहू जाचून जाचून ॥
चाल
बंदोबस्त करुनिया सारा । बाडयाभोवतीं ठेविला पहारा ॥
कपटाचा उलटा वारा । समजला शिव अंतरा ॥
मग रामसिंगाचें द्वारा । धाडिला निरोप अवधारा ॥
चाल दुसरी
स्वदेशीं जावया हुकूम व्हावा मला ।
वेळ प्रसंगीं राहिन हजर पहा दाखला ।
नातरी हुकूम द्या मम सैन्या सकला ।
येथील हवा पाणी सोसत नाहीं लोकाला ।
ऐकुनी बादशहा मनीं हर्षे चमकला ।
औषधाविण काय बरा होतो खोकला ।
काय करील शिवाजी सैन्याविण एकला ।
दिला हुकूम तात्काळ फौज हांकला ।
मोडते
कांहीं निवडक लोक ठेवून, समज देऊन, प्रसंग पाहून,
शिवाजी करी पुढिल सुविचार । ठकाला महाठक मी साचार ।
हातावर तुरी देउनी जाणार ॥५॥
चौक ६, चाल : मिळवणी
दरबारी लोकांच्या भेटी, स्वहितासाठीं, मिठाई वाटी, नजराणे झांकुनी पेटार्यां त ।
नित्य गुरुवारीं करी खेरात । अर्धसहस्त्राची साधु फकिरांत ॥
असा नित्य ठेऊन परिपाठ, विश्वास दाट, बिनबोभाट, आजारीपन पुकारिलें शहरांत ।
हकिम वैद्यांचे रुपये पदरांत । रोग उद्भवला म्हणती जोरांत ॥
संधिसाधुन एकदां छान, पुत्रासह जाण, पेटार्यांीतून, निसटले दिवसा चौथ्या प्रहरांत ।
हिरोजी फर्जंद ठेउनी घरांत । गांठली मथुरा रातोरात ॥
चाल
मग हिरोजी फर्जंद भला । दुसर्यां दिवशीं दुपार समयाला ॥
औषधास्तव अवघ्याला । राजरोस सांगुनी गेला ॥
पुढें तिसर्याय प्रहरी गलबला । चोहोंकडे बोभाटा झाला ॥
चाल : दुसरी
बादशहाला वर्दी पोचतांच तत्‌घडी ।
पोलादजंगावरी वीज कोसळली बडी ।
कैसा गया गनिम तुझी भली रखवाली खडी ।
तैनात जप्त केली सजा दिली रोकडी ।
चोहोंकडे पळाले स्वार शिपाई गडी ।
परि शोध नाहीं कुठें जिव्हा पडली कोरडी ।
निशिदिनीं बादशहा मनामध्यें चरफडी ।
शहरांत शिवाजी गुप्त मारुन काय दडी ।
बडी दर्द हमकु दगा करिल वाटे हरघडी ।
मोडते
बादशहाचें अंतर खिन्न, वाटे दुश्चिन्ह, टाकलें अन्न,
झोप नाहीं दहशत बसली फार । शिवाजी बडा करामतगार ।
इतना क्या करना हुकूम अधिकार ॥६॥
चौक ७ : चाल : मिळवणी
हरी कृष्ण विसाजीपंत, रामदासी संत,
होते मथुरेंत, पेशव्यांचे मेहुणे स्नेह सूत्रास ।
त्याजकडे ठेवूनिया पुत्रास । बैरागी वेष धरिला नित्रास ॥
अंतर्वेदी प्रयाग काशी, गंगासागरासी, जगन्नाथासी, जाऊन शुद्ध केलें अंतरास ।
तेलंगणांतूनी करविर क्षेत्रास । बाराशें कोस भोगिला त्रास ॥
रायगडावरी शिवराय, जाउनि माय, जिजाइचे पाय, वंदितां पाणी आलें नेत्रास ।
भेटतां सकळ प्रधान मित्रास । आनंदी आनंद सर्वत्रांस ॥
चाल
हरी कृष्ण विसाजी जाण । संभाजीस आले घेऊन ॥
उज्जयनींत मुसलमान । त्यांना संशय आला पाहून ॥
हा मुलगा तुमचा कोण । सत्य सांगा शपथ वाहून ॥
चाल : दुसरी
ब्राह्मण म्हणती हा भाचा आमुचा खरोखरी ।
हें सत्य म्हणूं एका पात्रांत जेविल्यावरी ।
दही पोहे भक्षिले त्यांच्या सांगण्यापरी ।
निःसंशय करुनी आले रायगडावरी ।
पाहुनी शिवाजी हर्षभरित अंतरीं ।
एक लक्ष रुपये बक्षिस दिले सत्वरीं ।
विश्वासराव हा किताब मग त्यावरी ।
शके पंधराशे आठयांशीं संवत्सरीं ।
हे महा गंडांतर मराठी राज्यावरी ।
परि कृपा रामदासाची साह्य श्रीहरी ।
कवि रामकृष्ण करी जुळणी कृष्णेच्या तिरीं ।
प्रास यमक मधुरता पटे रसज्ञा खरी ॥
मोडते
गोविंद शाहीर तरि भले त्यांनी चांगलें,
प्रोत्साहन दिलें, म्हणूनी स्फूर्ती कवीला फार ।
वीररस येथुन पुढें अपार । सिंहगड तानाजी घेणार ॥७॥