Thursday, July 9, 2009

अफजल खानचा वध (पोवाडा) - शाहीर अज्ञानदास

चौक १

माझें नमन आधी गणा । सकळिक ऐका चित्त देऊन ॥

नमियेली सारज्या । ल्याली जडिताचें भूषण ॥

अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्‌गुरु नारायण ॥

सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥

गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजा दलभंजन ॥

फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥

अज्ञानदास बोले वचन । गाइन राजाचें भांडण ॥

देश इलाइत । काबिज केलें तळकोंकण ॥१॥

चौक २

गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥

पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ॥

मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी आनसवाडी दोन ॥

कारला कासागड मंडन । दर्यांत दिसताती दोन ॥

गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥

कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥

धोडप तळकोंकणचे किल्ले, घाटावरले गड गाइन ॥२॥

चौक ३

गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥

मकरंदगड वांसोट । सिंहगड वृंदावन ॥

पुरंधराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ॥

सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन ॥

कोंडाण्यापासून तोरणा वर्ता । कोर रेखिली घाटमाथा ॥

तुंग आणि तुकोना । विसापुर लोहगड झुलता ॥

गड राहेरीची अवस्था । तीन पायर्‍या सोन्याच्या तक्ता ॥

दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥

चौक ४

मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥

पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर, पाटण ॥

शिरवळ सुपे देस । घेतला ज्यानें इंदापुरा पासुन ॥

महाड गोरेगांवापासून । घेतले शिणगारपूर पाटण ॥

असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविलें चवदा ताल कोंकण ।

घेतली बारा बंदरें । भाग्य राजाचें संगिन ॥४॥

चौक ५

देश दुनिया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ॥

चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ॥

चेतपाउली काबिज केली । ठाणी राजाचीं बैसलीं ॥

घेतली जाउली न् माहुली । कल्याण भिवंडी काबिज केली ॥

सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥

कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ॥

मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ॥

बाच्छायजादी क्रोधा आली । जैशी अग्न परजळली ॥

जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥

चौक ६

बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर बोलावा तमाम ॥

अबदुलखान, रस्तुम जुमा ॥ सिद्दी हिलाल, मुशेखान ॥

मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ?

बोलावी बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ॥

बोलावी खर्‍या कोबाजीला । त्या नाइकजी पांढर्‍याला ॥

देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्याला ॥

बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छाय सभेला ॥६॥

चौक ७

बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला ॥

बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ॥

सवाई अबदुल्या बोलला । जिता पकडूं मैं राजाला

निरोप दिला कुल्‌वजिराला । अबदुल सदरे नवाजिला ॥

विडा पैजेचा घेतला (म्हणून) । तुरा मोत्याचा लाविला ॥

गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥

फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ॥

तीवरसांची मोहीम । घेऊन अबदुल्या चालला ॥७॥

चौक ८

खान कटकबंद केला । कोटाबाहेर डेरा दिला ॥

मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला ॥

खबर गेली बाच्छायाला । बिनीचा हत्ती पाठविला ॥

बारा हजार घोडा । अबदुलखानालागीं दिला ॥८॥

चौक ९

संगात कुंजर मस्त हत्ती । घेतली झगडयाची मस्तुती ॥

आरोब्याच्या गाडया । कोतवालतेजी धांवा घेती ।

सातशें उंट आहे बाणांचा । करडा लष्करी खानाचा ।

वजीर अबदुलखान । त्याच्या दळाची गणती ।

बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥९॥

चौक १०

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥

फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली ॥

मसुद बांधुनी । पुढें गाय जब केली ॥

अबदुलखान फोडी देवीला । कांहीं एक अजमत दाव मला

कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजाप दिला ।

अंबा गेली सपनांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥

बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला॥१०॥

चौक ११

तेथून कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल माणकेश्वरा आला ॥

तेव्हां त्या अबदुलखानानें । हाल मांडिले देवाला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । अबदुल करकंभोशा आला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥

मजलीवर मजल । वेगीं पंढरपुरा आला ॥

फोडिला विठोबा । पुंडलिक पाण्यात टाकिला ॥११॥

चौक १२

खान (नें) कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥

मजलीवर मजल । वेगीं महादेवासी आला ॥

तेव्हां त्या अबदुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥

हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ।

मजलीवर मजल । अबदुल रहिमतपुरा आला ॥१२॥

चौक १३

अबदुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥

वजीर उंबराव बोलती । शिवाजीस गडे कोंडू’, म्हणती ।

अबदुल सारा आहे किती । त्याच्या दळाची गणती ॥

बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥

सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥

चौक १४

तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल वांईलागी आला ॥

आपुल्या मुलखांत राहिला । कोट बांधुन पिंजरा केला ॥

बरेपणाचा कागद (देउन) । हेजिब महाराजाप गेला ॥

राजा पुण्यात मस्त झाला । देश पाठीशीं घेतला ॥

सोडून दिले किल्ले । डेरा जाउलींत दिला ॥

राजा जाउलींत राहिला । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥

चौक १५

हेजिब बोले महाराजाला । खान बर्‍यापणाशीं आला ॥

खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला झाला

राजा बोले हेजिबाला । कशाला बोलवितां वांईला ?

किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥

जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला ॥

बैसूं दोघेजण । खान बुध सांगेल आम्हांला

लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब बेगींरवाना झाला॥१५॥

चौक १६

हेजिबाची खबर ऐकुनी । अबदुल महाभुजंग झाला ॥

अबदुलखान (नें) कउल दिला । रोटीपीर पाठविला ॥

भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा मेरा सल्ला ॥

तुझे गड तुझ्या हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥

तुझी थोडीशी गोष्ट । क्रिया शहाजीची आम्हाला

इकडे कउल पाठविला । (पण) शीलचा राउत निवडिला ॥

हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजढाळा ॥

नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥

चौक १७

राजा हेजीबासि बोलतो । "खंड काय मला मागतो ॥

चउआगळे चाळीस गड । मी अबदुलखानालागीं देतों ।

मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥

तेथें यावें भेटायाला । मी खानाची वाट पाहतों "॥

हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखानाजवळ आला ॥

अबदुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥

अबदुल पाहतो वाचुन । "खुंटले गनिमाचें मरण" ॥

हाती आले गड किल्ले । खुशी जहाला अबदुलखान ॥१७॥

चौक १८

हिगडे सल्ला कउल दिला । खासा राउत निवडिला ॥

चार हजार घोडा । हालका धराया चालला ॥

हत्तींचे पायिं तोरड ज्याला । वरी सोडिल्या गजढाला ॥

फौजामागें फौजा । भार कडक्यानें चालला ॥

रडतोंडीच्या घाटाखालीं । अबदुल सारा उतरुं दिला ॥

इसारत सरज्याच्या लोकांला । ज्यांणीं घाट बळकाविला ॥

मागल्याची खबर नाहीं पुढिल्याला । कटकाची खबर, कैची त्याला ॥

जाऊं जाणें येऊं नेणें । ही गत झाली अबदुल्याला ॥

जावलींत उतरुनि । अबदुल दिशीभुला जाहला ॥१८॥

चौक १९

राजानी सदरा सवारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥

तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेविल्या ॥

सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥

माणिकाच्या भरणी । हारी मोत्यांच्या बसविल्या ॥

दुसरे सदरेची मांडणी । सूर्य लखलखितो गगनीं ।

मणिकाचे ढाळ । सदरे सुवर्णाचें पाणी ॥

काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥

चौक २०

तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥

खासियाचे पलंग । ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥

वाळियाच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥

बराणपुरी चिटाचे । आडोआड पडदे बांधुनी ॥

चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥

घोंस मोतियांचे । वर ठिकडी नानापरिची ॥

अवघी जडिताची लावणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥

बहुत सवारिल्या सदरा ॥ ऐशी नाहीं देखिल्या कोणी ॥२०॥

चौक २१

राजानीं सदरा सवारिल्या । हेजिब अबदुल्यास धाडिला ॥

मोरो ब्राह्मण पाठविला । अबदुलखानासी बोलाविला ॥

"चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?" (म्हणून) त्यानें बाहेर निराळा ठेविला ।

दहा पांचांनिशीं चालिला ॥ "एकांतीच्या गोष्टी ।

तेथें दहा पांच कशाला ॥ पालखी दुर करा भोईयाला ।"

खासा अबदुल चालला ॥ "हात चालावा व्हा । दुर करा" म्हणे खानाला ॥

वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवाजीला ॥२१॥

चौक २२

भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला ॥

भोग पुरला खानाचा । अबदुल जावळींत आला ॥

बिनहत्याराविण मोकळा । अबदुल सदरेलागीं आला ।

अबदुल पहिले सदरे गेला । सदर देखुनी सुखी झाला ॥

ऐशी सदर नव्हती । आमच्या आली इदलशाला ॥"

खान दुसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥

ऐशी सदर नव्हती । नवरंगशा बाच्छायाला" ॥

अबदुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥

"ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला" ॥ अबदुलखान बोलिला ।

"शिवाजीस आणा भेटायाला" ॥२२॥

चौक २३

राजा नवगजींत बैसला । मोरो, शाम बोलविला ॥

रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥

दहातोंडया माणकोजीला । त्या इंगळ्या सुभानजीला ॥

देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥

करनखर्‍या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला ॥

त्या बोबडया बहिरजीला । सरदार आले भेटायाला ॥२३॥

चौक २४

राजा विचारी भल्या लोकांला । "कैसें जावें भेटायाला" ॥

बंककर कृष्णाजी बोलला । "शिवबा सील करा अंगाला" ॥

भगवंताची सील ज्याला----। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥

मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥

डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।

पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥

चौक २५

"माझा रामराम दादानु" ॥ गडच्या गडकर्‍या बोलिला ॥

जतन भाईनु करा । आमच्या संभाजीराजाला ॥

सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला ॥

गड निरवितो गडकर्‍याला राज्य निरवितो नेतोजीला ॥

निरवानिरव दादानु । विनंती केली सकलीकाला ॥

"येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला" ॥

खबर गेली जिजाऊला । शिवबा जातो भेटायला ॥

पालखींत बैसुनी । माता आली भेटायाला ॥२५॥

चौक २६

शिवबा बोले जिजाऊ सवें । "बये वचन ऐकावें ॥

माझी आसोशी खानाला । "बये जातों भेटायाला" ॥

जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा न जावें भेटायाला ॥

मुसलमान बेइमान । खान राखिना तुम्हांला" ॥

राजा बोले जिजाऊला । "येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला ॥

येवढी गोष्ट माते । आज द्यावी मला ॥

आई अबदुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला" ॥

जिजाऊ बोले महाराजाला । "शिवबा बुद्धिनें काम करावें ।

उसनें संभाजीचें घ्यावे" ॥२६॥

चौक २७

जिजाऊ घेती अलाबला । "शिवबा चढती दवलत तुला ॥

घे यशाचा विडा" । शिवबा स्मरे महादेवाला ।

गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी लागला ॥

ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥

चौक २८

"पहिला सलाम । माझा भवानीशंकराला ॥

दुसरा सलाम । माझा शहाजी महाराजाला ।

तिसरा सलाम । अमचे अबदुलखानाला " ।

शिवाजी सरजे सलाम केला । अबदुलखान (नानें) गुमान केला ॥

मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥

मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥

"तूं तो कुणाबीका छोकरा । सवरत बाच्छाई सदरा" ॥२८॥

चौक २९

इतक्या उपरी राजा बोले । त्या अबदुलखानाला ॥

"खाना ज्याची करणी त्याला । कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥

तुम्ही जातीचे कोण । आम्ही जाणतों तुम्हाला ॥

तूं तरी भटारनीका छोरा । शिवाजी सरज्यापर लाया तोरा" ॥

यावर अबदुल बोलला ॥ "शिवा तुम चलो विजापुराला" ॥

"शिवाजी सरजे नेतां । बहुत दिन लागतील खानाला ॥

कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला" ॥२९॥

चौक ३०

"अबदुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी" ॥

इतकिया उपरी । अबदुल मनीं खवळिला पुरा ॥

कव मारिलि अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा ॥

चालविली कटयार । सीलवर मारा न चाले जरा ॥

सराईत शिवाजी । त्यानें बिचव्याचा मारा केला ।

उजवे हातीं बिचवा त्याला । वाघनख सरजाच्या पंजाला ॥

उदरच फाडुनी । खानाची चरबी आणिली द्वारा ॥३०॥

चौक ३१

खान "लव्हा लव्हा" बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥

राजानें पट्टा पडताळिला । अबदुलखानानें हात मारिला ।

शिरींचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा लागला ।

भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥

मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥

अबदुलखान शिवाजी दोनी । भांडती दोनी धुरा ॥

बारा हजार घोडा । सरदार नाहीं कोणी तिसरा ॥३१॥

चौक ३२

अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥

शिवाजी राजा बोलला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।

तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला" ॥ नाइकतां ब्राह्मणें ।

हात दुसरा मारिला । "ब्राह्मणा मारुं नये तुला ।

क्रिया शहाजीची आम्हांला" ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।

हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।

( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।

सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।

त्यानें सैद पुरा केला ॥३२॥

चौक ३३

संशय खानाचा फिटला । खान (नें) पळतां पाय काढिला ॥

मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला ॥

कावजीचा संभाजी भोंसला । मोठे उडीनें आला ॥

जखमा केल्या भोग्यांच्या पाया(ला) । खटारां धरणीवर पाडिला ।

शिवाजीराजा बेगिन आला । शिर कापुनी गडावर गेला ॥

जराचाच मंदिल । शिरीं त्या संभाजीचे घातला ॥

फाजिलखाना क्रोध आला । बाण आणि बंदुखा थोर वर्षाव एकच केला ॥

शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा ॥

हाल महाराजाचे झाले । अबदूलच्या लोकांला ॥३३॥

चौक ३४

प्रतापगडाहुनि केला हल्ला । मारिती खुण सरज्याच्या लोकांला ॥

धरल्या चारी वाटा । ज्यांनीं घाट बळकाविला ॥

दळ त्या समई । पायदळाचा कडका आला ॥

सिलीमकर, खोपडया, । काकडया, सुरव्या, लोटला ॥

अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला ॥

"फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । राखु नका तुम्ही उगारल्या पाइकाला" ॥

फत्ते महाराजाची झाली । वाट दिली कुलवजीराला ॥३४॥

चौक ३५

पळतां फाजिलखान । त्याचा दुमाळा घेतला ॥

माघारा फिरोनि । जान(नें) हातीचा आरोबा दिला ॥

शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।

घोडा आणि राऊत । ज्यांणीं पाडाव केला ॥

वळल्या हातीवरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥

भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।

सरज्या तोरड महीमोर्तब शिवाजीला । फत्ते झाली महाराजाची ते वेळ पन्हाळा घेतला ॥३५॥

चौक ३६

अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्मला ॥

नळनीळ सुग्रीव जांबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥

एकांती भांडन । जैसें राम रावणाला ॥

तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥

दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्मला ॥

विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला ॥

मोठें भक्तीचें फळ । महादेव भाकेला गोंविला ॥

जिकडे जाती, तिकडे यश राज्याच्या खंडाला ॥३६॥

चौक ३७

माता जिजाऊ बोलली । पोटीं अवतार जन्मला ॥

शंकपाळ शिवाजी महाराजानें केला । आतां मी गाईन ।

भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।

अखेर संग्रामाच्या गति ॥ राजगड राजाला ।

प्रतापगड जिजाऊला ॥ धन्य जिजाऊचे कुशी ।

राजा अवतार जन्मला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।

बीरमाल राज्याचा गाइला ॥ शिवाजी सरज्यानें ।

इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा ।

तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें ।

तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥

सिवाजी न हो तो...

कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।

कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।

खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।

लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।

भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।

और कौन गिनती में भूली गति भब की ।

चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।

सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥


-कविराज भूषण

अर्थ :
भूषण म्हणतो, कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब - त्याने मथुरेची कत्तल करून सर्व शहरात "रब"ची द्वाही फिरवली (मुसलमानी चालविली). शहरातील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देवता खोदून खणून काढल्या. लाखो हिंदुंना बळाने मुसलमान केले, इतकेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होउन पळाले, महादेवाची अशी त्रेधा उडाली तेथे इतरांची काय कथा ? अशा भयाण वेळी जर शिवराय नसते तर चारही वर्णांना आपापले धर्म सोडून नमाज पढावा लागला असता व सर्व हिंदुंची सुंता झाली असती.

Saturday, July 4, 2009

आग्र्याहून सुटका

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और,
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।

कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे,
एकलिए एक जात जात चले देवा की ।

भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो,
धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।

पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो,
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥

-कविराज भूषण

अर्थ :
चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !

हिन्दुपति सेवाने

मन कवी भूषन को सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधु जन सेवाने ।

साधु जन जीते या कठिन कलिकाल
कलिकाल महाबीर महाराज महिमेवाने ॥

जगत मै जीते महाबीर महाराजन
ते महाराज बावन हू पातसाह लेवाने ।

पातसाह बावनौ दिली के पातसाह
दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दुपति सेवाने ॥

-कविराज भूषण

अर्थ :
कवी भूषणाच्या मनात शिवभक्तिने ,शिव भक्तिस साधूजनांच्या सेवेने, साधूजनास कलिकालाने,कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि या शूर आणि कीर्तिवान राजास बावन्न बादशहास जिंकणार्‍या (औरंगजेबाने) आणि त्या बावन्न बादशहाच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास "हिन्दू पति" शिवरायांनी जिंकले.

या छंदात कवि भूषणाने शिवाजी महाराजांना "हिन्दूपति" अशी उपमा दिलेली आहे. यावरूनच पुढील काळात मराठी साम्राज्याला हिंदुपतपातशाही म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.

Thursday, July 2, 2009

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा || धृ. ||

शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
अधर्म लाथेने तुडवी धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी !!! || १ ||

कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्ण कारणी क्षणही न रणी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा ठेला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी मलीन मृत्तिका लव न धरी
नभराजाचा गर्व हरी ... || २ ||

मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची
झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामी भक्ती चे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे हे नंदनवन देवांचे
मूर्तीमंत हा हरी नाचे ... || ३ ||

स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती
नसूनी असणे मरूनी जगणे राख होउनी पालविणे
जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नव विश्व उठे ... || ४ ||

या झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला

(हर हर महादेव !!!)

उठा मराठे अंधारावर घाव निशणीचा घाला
वीज कडाडुनी पडता भुईवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ... || ५ ||

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या

सावळ्या: खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार: मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंध्ड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या: आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की -
किती ते आम्हाला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का ?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी -
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !


लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनि हळू का हसे ?
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर -
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"


गीत - वा. भा. पाठक

सरनौबत प्रतापराव गुजरांवरील कविता..

अजून उठते मृद्गंधातून रक्तझडिची साद,
दरीत घुमते वादळ धरते रणघोषांचा नाद,
थाप कड्यावर देत रंगते एक कथा शाहिरी,
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी,
पुन्हा अनावर खिन्न मनावर उठते ऋचा गभीर,
सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा तीर,
अजुन उठतो सह्यगिरीच्या कुशित हुंकार,
आवरता हुंदके दाटतो दरीत अंधार ,
लकेर ये अतृप्त स्वरांची चुकार वार्या,वरी,
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी !
सात चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी !

शौर्यकथा हिरकणीची

रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।

आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||||

खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||||

तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||

श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||||

सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||||

केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला