Thursday, July 1, 2010

छत्रपती शिवाजी महाराजांचा (पोवाडा) – शाहीर कुंतीनाथ करके

मिळवणी

महाराष्ट्र कुलस्वामिनी । शस्त्र धारिणी ।

दैत्य मर्दिनी । भवानी माय वंदितो आज ।

जन्मले छत्रपती शिवराज । स्थापिले शक्तिशाली साम्राज्य ॥जी जी॥

उत्तुंग दुर्ग शिवनेरी । वंद्य भूवरी । सह्याद्रि गिरी ।

काळ्या खडकांतुन अवतरला । पराक्रमी पुत्र जिजाईला ।

भवानीचे तेज शिवाजीला ॥जी जी॥

दांगटी

ज्यावेळीं सार्‍या देशांत । घ्या दिवसा पाप रस्त्यांत ।

लुटमार अब्रु घेतात । कुणी खाल्ल्या लाथा पेकटात ।

मोंगलानी गिळला भारत । नरसिंह पडले पिंजर्‍यात ।

त्याकाली न्हवता कुणी वाली महाराष्ट्रांत ॥जी जी॥

चाल -- जी जी ची

नवस मागते हात जोडुनी जिजा राजमाता ।

पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता ॥जी जी॥

हांक ऐकुनी प्रसन्न झाली शिवनेरीं माता ।

जगन्मंगले बाळ जन्मले प्रतिपालक जगता ॥जी जी॥

तेजःपुंज रविबिंब प्रभातीं चढे उंच गगनीं ।

जसा चंद्रमा कलेकलेनी तसा शिवा सदनीं ॥जी जी॥

धावती-जी जी ची

घेऊन मांडीवर माता बाल शिवबाला ॥जी जी॥

सांगते कथा वीरांच्या वीर पुत्राला ॥जी जी॥

रामाने कशास्तव चिरले दुष्ट दैत्याला ॥जी जी॥

अर्जुन संगरीं लढे पाप नाशाला ॥जी जी॥

ऐकतां कथा वीरांच्या स्फूर्ति शिवबाला ॥जी जी॥

बाळकडू दिले मातेने राष्ट्रपुरुषाला ॥जी जी॥

मिळवणी

दादोजी कोंडदेवाने । मोठया प्रेमाने । जिवाभावाने ।

मर्दानी धडे दिले शिवबास । रणांगणीं विजयी लढा देण्यास ।

लाठी दांडपट्टा भाला धरण्यास ॥जी जी॥

भरदार छातीचा वीर । शिवाजी शूर । मोठा झुंजार ।

युद्धशास्त्रात झाला निष्णात । अश्वारुढ घोडदौड करण्यात ।

गर्जु लागला दर्‍याखोर्‍यात ॥जी जी ॥

कटाव

सह्याद्रीच्या खांद्यावरती । हिंदु लागला शिवा भूपती ।

झडू लागलय नव्या नौबती । तरणे ताठे मर्द खेळती ।

कुस्त्या लाठया पट्टे फिरती । जोर बैठका दंड मारती ।

पराक्रमाची नवी निर्मिती । शक्ति शौर्य सामर्थ्य जागृति ॥हो॥

दांगटी

पुरुषार्थ केला जागृत । मर्दांच्या मर्द रक्तांत ।

पोलादी दंडा पिंडात । आली स्फूर्ति भगव्या झेंडयात ।

चढविले स्फुरण मावळयात । जे वाढले दगडा धोंडयात ।

जे राहिले कणी कोंडयांत । शिवबानं केला जागृत ।

रांगडा गडी रं तगडा महाराष्ट्रांत ॥जी जी॥

चाल : जी जी ची

सह्याद्रीच्या कडयाकडयातुन स्फूर्ती खळखळते ।

स्वातंत्र्याच्या संग्रामाची दुंदुभी झडते ॥जी जी॥

बोली हरहर महादेव ही गगनाला भिडते ।

त्याग भक्तिचे निशाण भगवे वरती फडफडते ॥जी जी॥

राष्ट्रशक्तीची शिवशक्तीशी युति इथे झाली ।

राष्ट्ररक्षणा धर्मभावना जरी पटक्याखाली ॥जी जी॥

मिळवणी

शत्रुला केले हैराण । क्षात्र तेजानं ।

पेटवी रण । किल्ले कपारीला चढवी हल्ला ।

शोभे पुरुषार्थ पौरुषाला । स्वराज्याची शपथ सह्याद्रीला ॥जी जी॥

तोरण्याला बांधलं तोरण । स्वाभिमानानं ।

शिंग फुंकुन । हिंदवी स्वराज्याला सुरुवात ।

भिजल्या रक्तानं संगिनी ज्यांत । सलामिच्या तोफा उडविल्या सात ॥जी जी॥

चाल : जी जी ची

मस्तवाल मग्रूर मोंगल सरदार ।

शिवशक्तीच्या कथा ऐकतां खचली कंबर ॥जी जी॥

शिवतेजाने महाराष्ट्राचा निरसे अंधार ।

रवितेजाच्या पुढे काजवे किडे थंडगार ॥जी जी॥

चाल : धांवती

कोंकणचा घाट उतरुन । कल्याणचा खजिना आला ॥जी जी॥

आबाजी सोनदेवानं । पकडिला अहमद मुल्ला ॥जी जी॥

सांपडली मुल्लांची सून । तारुण्य रुप नवतीला ॥जी जी॥

आणि आले आबा परतून । दरबारी हजर करण्याला ॥जी जी॥

मिळवणी

आबाजी बोलले शिवबाला । रत्‍नाची माला ।

आपल्या भेटीला । आणली सुंदरी आपल्यासाठीं ।

भडकले शिवा अग्निदृष्टी । शिवकळा भरली आबा कष्टी ॥जी जी॥

आम्ही असतो अधिक सुंदर । आमची आई ।

असती अशी तर । धन्य जन्मुनी हिच्या पोटीं ।

शील रत्‍नाचे शब्द ओठीं । स्वर्गातुन झाली पुष्पवृष्टी ॥जी जी॥

चाल : धावती जी जी ची

मानाने पाठवून दिले विजापुरीं तिला ।

उजळले शीलाचे तेज राजपुरुषाला ॥जी जी॥

मानुनी परस्त्री माता मान राखिला ।

लक्षांत ठेवा बंधुनो अशा घटनेला ॥जी जी॥

या इथें शिवाजी दिसे वंद्य सर्वाला॥जी जी॥

दांगटी

सरदार विजापुरवाला । घेऊन मोठया सैन्याला ।

आला प्रतापगडच्या पायथ्याला । शिवबानं वर्दी दिली त्याला ।

एकटेच यावे भेटीला । भेटीला खान चालला ।

मारुन मिठी राजाला । कांखेत दाबू लागला ।

वाघनखे लावून पोटाला । शिवबाने मोठया धैर्याने चिरलं खानाला ॥जी जी॥

मिळवणी

पुढे आला सिद्दी जोहार । पन्हाळ्यावर ।

कैद करणार । काक हंसाशीं शर्थ धरणार ।

भास्करापुढे दिवा जळणार । तसा शिवबाशीं झुंज देणार ॥जी जी॥

औरंग्याचा शाहिस्तेखान । दिल्ली सोडून ।

आला गर्वानं । सिंहाचा छावा कैद करण्यास ।

गाठलं शिवबानं रात्रीला त्यास । बोटं कापून पळविला खास॥जी जी॥

शिवा गेला दिल्ली दरबारीं । शहा सामोरी ।

हातावर तुरी । ठेवुनी आला महाराष्ट्रांत ।

आग्र्याहुन सुटका झाली प्रख्यात । दख्खनची अब्रू राखिली ज्यांत ॥जी जी॥

असा मर्द वीर अग्रणी । झुंजला रणीं ।

प्राण ओतुनी । भवानीची तळपे नंगी तलवार ।

प्याली दुष्टांच्या रक्ताची धार । गर्जला भवानीचा जयकार ॥जी जी॥

चाल-जी जी ची

जयजय रघुवीर शब्द मिळाले स्फूर्तिचे बोल ।

मेळवावा मर्द मराठा अर्थ ज्यांत खोल ॥जी जी॥

सोनेनाणें आम्हां मृत्तिका बोले तुकाराम ।

संतकृपा ही श्री शिवबावर होती निष्काम ॥जी जी॥

मिळवणी

शिवाजीने मंत्री मंडळ । नेमले तात्काळ ।

राज्य निर्मळ । न्याय नीतीने राज्य हाकणार ।

लोकशाहीने चाले दरबार । शिवाजी छत्रपति सरकार ॥जी जी॥

ही वाहिली शाहिरी कला । राष्ट्रपुरुषाला ।

शिवाजीराजाला । ध्यानीं मनीं स्वप्नीं स्मृति चित्तात ।

कुंतीनाथ करके शाहिर गातात । कोल्हापुरी कला महाराष्ट्रांत ॥जी जी॥

स्वराज्याचे तोरण (पोवाडा) – शाहीर पिराजी सरनाईक

आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला ।

तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला ॥

होम देहाचा ज्याने केला स्वदेश कार्याला ।

असो शाहिरी मुजरा माझा श्रीशिवरायाला ॥

गद्य

(युगायुगात भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो;

त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.)

छत्रपति शिवाजी वीर । पराक्रमी धीर ।

खरा झुंझार । हिंदी स्वराज्य स्थापाया खास ।

स्वराज्याच बांधल तोरण तोरण्यास ।

ऐका हा स्फूर्तिदायक इतिहास ॥

विजापूरचे यवन माजले । वर्चस्व आपले ।

गाजवू लागले । न्याय नाही अन्यायाचा बाजार ।

साधुसंतांची विटंबना फार । वैतागुन गेली जनता अनिवार ॥

चाल : बाणा मर्दानी

शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला । विजापूरी होते नोकरीला ॥

त्यांनी नेले विजापूरी या बाल शिवाजीला । बादशाही दरबार पहाण्याला हो ॥

चाल : कटाव

विजापुरी बाल शिवाजीला । भलभलता प्रकार दिसला ।

कोण मानीत नाही कोणाला । माणुसकी नाही माणसाला ॥

हे कळता सर्व शिवबाला । येऊन परत पुण्याला ।

हिंदवीराज्य स्थापण्याचा निश्चय केला । आई जिजाईने दिला आशिर्वाद शिवबाला ॥

विजापूरच्या यवनी सत्तेला शह देण्याला । त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला ॥

स्वराज्याच तोरणा बांधण्याचा मनसुबा केला ॥

मिळवणी

कानद खोर्‍यात तोरणा किल्ला । दरवाजे पाहा ।

दोहो बाजूला । एक पुण्याच्या उत्तरेला ।

बिनीदरवाजा म्हणती याला । कोकण दरवाजा पश्चिमेला ॥

सह्याद्रीच्या कडे पठारात । दर्‍याखोर्‍यांत ।

वाडया वस्त्यात । स्वराज्याच महत्व पटवून सर्वांस ।

शेकडो मावळे बाल शिवबास । येऊन मिळाले साह्य करण्यास ॥

चाल : जी जी जी

त्यांत बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा ।

एकाहुन एक मावळा घेऊन शपथेला ।

शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला ॥

गद्य

(यावेळी उत्तरेकडे बलाढय मोगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी इतक्याशी मुकाबला करुन स्वराज्य स्थापणं सोपं नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमांत भरली होती म्हणूनच---)

कटाव

वंदन करुन भवानीला । जिंकाया तोरणा किल्ला ।

शेदोनशे मावळे संगतीला । शिवराय घेऊन चालला ।

अंधार्‍या रात्री किल्ल्याचा तळ गाठला । किल्ल्यावर चढून जाण्याला ।

मारुनीया मेखा बुरजाला । पागोटे बांधिले त्याला ।

हा हा म्हणता मावळा चढून वरती गेला । गर्जना केली हरहर महादेव बोला ॥

गद्य

(अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करुन उभा राहिला. तोच शिवाजीने किल्लेदाराला घेराव घालताच-----)

कटाव

किल्लेदार शरण आला । बिनशर्त तोरणा किल्ला ।

शिवबाच्या स्वाधीन केला । यावेळी पंधरावे वर्ष होते शिवबाला ॥

चाल : कोल्हापूरचा शाहीर

तोरणा किल्ल्यावरती पहिला बिनी दरवाज्याला ।

महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडकला ॥

मिळवणी

स्वराज्याच बांधलं तोरण । तोरणा जिंकून ।

शिवाजी राजानं । सारा सह्याद्री गर्जत उठला ।

जय शिवाजी राजा आपला । शाहीर पिराजीचा मुजरा त्याला ॥

बालशिवाजीचा पोवाडा- शाहीर लहरी हैदर

चौक

ज्याची कीर्ति सार्‍या जगतांत । मृत्यु लोकांत दख्खन देशांत ।

महाशूर शिवाजी अवतरला । हिंदुधर्माच्या रक्षणाला ॥जी॥

असुरांनिं सारा मुलुख पिडिला । मानिना कोणी देवाजीला

ऋषींचा होम बंद पडला । न्याय नाही जगामंदि उरला ।

माय वळखिना लेंकराला । लागली चिंता महादेवाला ।

इचार केला बसुनि कैलासाला । दैत्यांचा मोड करायाला ।

अवतार शिवाजीला झाला । गा व्हय म्हन दादा, दादा रजी र दा जी०॥१॥

चौक २

गोरगरिबांचा कैवारी । राजा अवतारी ।

असा श्रीहरी । देशाचा पालनवाला ।

धांवुन येणारा संकटाला । जशि काय माय लेकराला ।

तसा तो शिवबा धनि आपुला । वाघ दख्खनचा जागा जाला ।

करावं साह्य त्येला । वैर्‍यांच्या भुलून संपत्तीला ।

लाळ भलत्याचिच घोटायला । लाज कशी नाहीं मुरदाडाला ।

पेटवा आपुल्या जिनगानीला । गा व्हय म्हन दादा ॥२॥

चौक ३

शिवबाची खरी बहाद्दरी । कोकण हेटकरी, घेऊनि बरोबरी ।

दिली त्यांना घोडीं बसायाला । शिलेदार करुनि बरोबरिला ।

झेंडा मराठयांचा फडकविला । राज्याचा पाया तोचि पहिला ।

घ्यावा म्हणू चाकणचा किल्ला । नरसाळा फिरंगोजी तिथला ।

गडकरी शूर लढनेवाला । शिवबानं जागविलं त्येला ।

वळविला तसल्या बहाद्दराला । पेटवा तुमच्या जिनगानीला ।

गा व्हय म्हन० ॥३॥

चौक ४

म्हणे शूर मर्द फिरंगोजी । मराठी गाजी, अकलेची भाजी,

तुझ्या कशि झाली ? सांग मजला । दास वैर्‍याचा कसा बनला ?

जात गोत धरम बुडवायाला । गेल्या तरि कुठं तुमच्या अकला ?

इसरला कुठं इरसरीला । द्या कि आया बहिणी दुस्मानाला ।

लाज नाहीं मिशा बाळगायला । शूरपणा कुठं तुमचा गेला ?

हिजडयावानि काय जलम असला । थूं तुमच्या जिनगानीला ।

गा व्हय म्हन दाद, दादा, र जी० ॥४॥

चौक ५

ज्याला नाहीं जातीची चाड, मुलूख तो द्वाड, कुत्रा खादाड ।

दुष्टाच्या जिनगानीला भूलला । कुळी नरकांमंदि घालायाला ।

कशापायीं घ्यावा जलम असला । सांगावं काय निलाजर्‍याला ।

धरम किर खास तुमचा बुडाला । लांचावलास कुत्र्या तुकडयाला ।

धरति किर तुमच्या बायकांला । ओढून नेतात रंगमहालाला ।

त्यांचा हंबरडा ऐकायला । कसा येईल रानदांडग्याला ।

थूं तुमच्या जिनगानीला ॥ गा व्हय म्हन० ॥५॥

चौक ६

शिवबाच्या पायिं लागुनी, फिरंगोजी म्हणी, आपुल्यावानी ।

आमाला गुरु नाहीं मिळाला । कुणाला ठावं धरम कसला ।

वाघाचा बच्चा असुनि त्येला । मेंढरामंदीच वाढविला ।

म्हणून जातीचा विसर पडला । झालो चाकर बघा आपुला ।

फिरुन गड सारा त्येनं दावला ।"म्हणा हो अपुला आतां किल्ला" ।

बोलून गड दिला शिवाजीला । फिरंगोजी चढला लौकिकाला

भाऊपणा शिवाजीसी केला । गा व्हय म्हन० ॥६॥

Sunday, May 9, 2010

श्रीशिव जन्माख्यान (पोवाडा) – शाहीर बापूराव विभूते बुधगांवकर

चाल १
वंदून जिजाईच्या सुता । गातो शिवगाथा ।
ऐकावी कथा । ठेवा शांतता सभा स्थानास ।
कुजबूजू नका लागू कानास । विभूते शाहीर गातो कवनास ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाई महालात । उभी वाडयात । चोहीकडे पहात ।
तोच काय तिला प्रकार दिसला । कवळया हृदयात धक्का बसला ।
कोणता होता प्रकार असला ॥१॥
निजामाच्या दरबारातून । लोक सारे जण ।
जाती परतून । तोच किंचाळ्या आल्या कानास ।
पिसाळला हत्ती जुमानी कोणास ? सापडेल त्याच्या घेई प्राणास ॥२॥
चाल
जाधवाच्या दत्ताजी राव । सैनिकाला म्हणे पुढ याव ।
हत्तीन घेतली पर धाव । सोंडेन कैका फाडाव ।
पायाखाली कितिक चिरडाव । सैन्यान काढला पळ सांभाळून जिव ॥३॥
जाधवाचा झाला अपमान । दत्ताजी झाला बेभान ।
हत्तीवर धाव घालून----काढली सोंड कापून ।
पिसाळला हत्ती कोसळला सोडला प्राण ॥४॥
दांगटी
हत्तीची सरता कामगीरी । फिरला माघारी ।
भोसल्यावरी । उगारली जाधवाने तलवार ।
संभाजीराव झाले तय्यार । दोघांचे चालले वारावर वार ।
यात कुणी घेतली नाही माघार । दत्ताजीला बसला वर्मी एक वार ।
फटकार्या सरशी जाहला ठार । लखूजिला कळला घडला प्रकार ।
सरसावून फिरवू लागला तलवार । समोर जावाई शहाजी प्यार ।
नाही वा त्याचा त्याला दरकार । संभाजीला केल जाधवान ठार ।
निजामान पाहून सारा प्रकार । केला मग उपदेशाचा भडिमार ।
जाधव भोसल्याचं नात हे पार ---तुटल गा दादा ॥५॥
चाल ३
सासरची तशी माहेरची पाहूनी दैना ॥६॥
महालात जिजाईला दुःख आवरेना ॥७॥
भावासाठी रडाव कां दिरासाठी समजेना ॥८॥
निजामाचा खरा हा डाव कुणा समजेना ॥९॥
चाल : मिळवणी
देव घरात धावली जिजाबाई । रडे धाई धाई ।
आई अंबाबाई । कधी हे जुलूमी दिवस सरणार ।
मराठी राज्य कधी ठरणार । सांग तू कधी शस्त्र धरणार ॥१०॥
चाल १
जिजाऊला माहेर तुटले । दुःख दाटले ।
हृदय पेटले । परि करुनिया पूर्ण विचार ।
सोडला नाही तिनं आचार । सुरवात करती आप्‌ला विचार ॥१॥
चाल २
नांदती जिजाऊ घरात । वाढतो गर्भ उदरात ॥२॥
जिजाई झाली प्रसूत । जन्माला संभाजी सूत ॥३॥
पुन्हा चार पुत्र पदरात । काळान केला पर घात ॥४॥
चारी पुत्र नेले स्वर्गात । संभाजी बाळ वाढत ॥५॥
चाल ३
तोच निरोप निजामशाहीचा शहाजी राजाला ॥६॥
आंबर मलिकने हुकूम केला शहाजीला ॥७॥

तय्यार व्हावे शत्रूशी सामना देण्याला ॥८॥
शाहाजी बरोबर शरिफ भाऊ संगतीला ॥९॥
सारे चुलत बंधू धावले त्याचे सहाय्याला ॥१०॥
चाल ४
१६२४ सालाला । अहमदनगर भागाला ।
लागले तोंड युद्धाला । घनघोर संग्राम झाला ।
शहाजीन पराक्रम केला । दिले यश वजिर-निजामला ।
असा पराक्रम करुनिया राजा परतला ॥११॥
लढाईला रंग चढलेला । लढाईत शरिफ हरपला ।
लढाईत विजय शहाजीला । असा पराक्रम करुनिया शहाजी परतला ॥१२॥
लढाईत दीर गेल्याचं दुःख जिजाईला ॥१३॥
मिळवणी
म्हणे माझी सख्खी जाऊबाई । रडे धायी धायी ।
ती दुगाबाई । शहासाठी तिचा प्राण लढला ।
सौभाग्य मणी गळून पडला । तिचा संसारी वेल खुडला ॥१४॥
चाल ४
घरधनी असता विचारात । येवून लाडात ।
जिजाबाई बोलत । शहाजी राजाला ।
म्हणे नाथ द्यावं उत्तर माझ्या प्रश्नाला ॥१५॥
सुलतानाच मोंगलाच वैर । त्याचे सरदार ।
मराठे शूर । येती लढण्याला ।
स्वतः मरुन विजयाचा वाटा देती शहाला ॥१६॥
तुम्ही ऐका विचार हे माझे । फेका शाही ओझे ।
व्हा स्वतः राजे । लागा कार्याला ।
या साठी सार्याे मराठयांच्या करा एकिला ॥१७॥
चाल ४
जाणून भविष्य चांगल । शहाजीच मन रंगल ।
पर धूंद होऊन मोंगल । चहूकड करती दंगल ।
म्हणे इथून पाहिजे पांगल । पाठीवर बिर्हा।ड टांगल ।
निराशेन मन खंगल । आशेन तुडवी जंगल ।
गाठला किल्ला शिवनेरी होईल मंगल ॥१८॥
मिळवणी
शिवनेरी किल्ला कडेकोट । होता बळकट ।
मजबूत तट । विश्वासराव किल्लया वरती ।
जिजाउला त्याचे स्वाधीन करिती ।
ठेविली जड जोखिम पुरती ॥१९॥
चाल २
लागला गर्भ वाढिला । डोहाळे जिजाबाईला ॥१॥
मैत्रिणी पुसती राणीला । डोहाळे सांगा आम्हाला ॥२॥
जिजाबाई बोले सर्वाला । डोहाळे सांगते आपणाला ॥३॥
पद
या देशाचे मालक आम्ही आमचे आम्ही काही करु ।
नको गुलामगिरी ही माथेफिरु ॥ध्रु०॥
मला नको मिठाई मेवा । नको गुलाब पाणी शिडकावा ।
सरबताचा पेला दूर ठेवा । अत्तराचा वास नच दावा ।
विहार कसला मला न आवडे चक्र सारखे आहे सुरु ॥४॥
मला वाटे किल्ल्यावर जावे । ध्वज उंच उंच फडकावे ।

सोन्याच्या तक्ती बैसावे । मस्तकी छत्र ते रहावे ।
दानधर्म तो खूप करावा । प्रसन्न होतिल यात्रेकरु ॥५॥
हा मेणा बाजूला काढा । ठाण्यावरुन हत्तीला सोडा ।
अंबारीला झालरी जोडा । मी बसता झडू दे चौघडा ।
डुलत जाईन मुजरे घेत मी निवडीन सच्चा, पोटभरु ॥६॥
लगट
दिवसा मागून दिवस उलटले । नऊ मास नऊ दिवस संपले ।
टाकि जिजाई मंद पाऊले । जिजाबाईला अलगत नेले ।
खास दरवाजे बंद जाहले । दारावरती पडदे लोंबले ।
वैद्य मुरब्बी गोळा झाले । पंचागासह जोतीषी आले ।
विश्वास रावांचे लक्ष वेधले । तोच खाडकन दार उघडले ।
काय हो सांगा । म्हणे मुलगा जाहला मुलगा ॥७॥
चाल १
बाळाची जन्म कुंडली । पुढ मांडली । फुलं सांडली ।
ज्योतिषी म्हणे धन्य सुकुमार । जणू आहे दैवी अवतार ।
पुढे हा शककर्ता होणार ॥८॥
चाल २
हा बाळ जिजाबाईचा । सोनुला हा सह्याद्रीचा ॥९॥
हा पुत्र शहाजी राजाचा । हा तान्हा महाराष्ट्राचा ॥१०॥
किल्ल्यावर थाट बारशाचा । पाळणा भारत वर्षाचा ॥११॥
पाळणा
शिवनेरीवर सर्व सोहळा सुवासिनी सार्याभ जाहल्या गोळा
जिजामाउलीच्या घेऊन बाळा । घ्याग गोविंद घ्याग गोपाळा ॥१२॥
पहिल्या दिवशी नदर भेटी । मुख पाहून शर्करा वाटी ।
न्हाऊ घालूनिया धरिले पोटी । टाहो फोडीतो आवळून मुठी ॥१३॥
दुसर्याा दिवशी दुसरा प्रकार । गुढया तोरणे शिवनेरीवर ।
दान धर्म तो केला अपार । कृपा दृष्टी असो बालकावर ॥१४॥

तिसर्याम दिवशी दत्ताची छाया । चौथ्या दिवशी गणेश माया ।
सार्याा दैवतानो यावे सहाय्या । चंद्र सूर्याला आता पुजूया ॥१५॥
पांचव्या दिवशी सटविचा मान । लपत छपत आली चोरुन ।
भाळि लिहिल भविष्य तीन । पुजिल्या कुवारणी झाला सन्मान ॥१६॥
सहाव्या दिवशी स्वच्छता करा । सातव्या दिवशी साती अप्सरा ।
गुप्तपणे तिचा येईल फेरा । लिंबू नारळ टाका उतारा ॥१७॥
आठवा आनंद आता आवरु । नवव्या दिवशी नवस करु ।
भवानी आईची ओटी ती भरु । सांभाळ आई तुझ लेकरु ॥१८॥
दहाव्या दिवशी मोठा उल्लास । सुगंधी अत्तर येई सुवास ।
उगवला अकरावा हा दिवस । पुजून वंदिले त्या मारुतीस ॥१९॥
बाराव्या दिवशी मोठी आरास । इष्ट मैत्रिणी आल्या सर्रास ।
आंगडे टोपडे घाली बाळास । नाव कळू द्या आता सर्वास ॥२०॥

पाळण्याचा हाती धरुन दोर । माय बोलली तीन अक्षर ।
नाव शिवाजी झाले जाहिर । झाला वाद्यांचा एक नजर ॥२१॥
चाल ३
संपला पाळणा मग बसली पंगत ॥२२॥
रंगला पोवाडा शाहीर आला रंगात ॥२३॥
मिळवणी
शब्दाला शब्द सांधून । कवन बांधून ।
गातो वंदून । विभूते शाहीर कवि सम्राट ।
दीक्षित गुरुकृपा ही दाट । म्हणून कळसाला बांधली घाट ॥२४॥

Saturday, May 8, 2010

शिवछत्रपतींचा पोवाडा (पोवाडा) – शाहीर भा.ल.रानडे

नमन
आधी नमन गौरिनंदना । दत्तगुरु याना । संत सज्जनां ।
देशभक्तांना । नारि रत्नांुना । बालावर असू द्या कृपा हीच प्रार्थना ॥जी जी॥
ध्रुपद--धन्य धन्य शिवाजी राणा । मराठी बाणा । अवतारी जाणा ।
स्थापिले हिंदु स्वराज्याला । पराक्रम करुनि अमर झाला र ॥जी॥
जिजाईने थोर तप केले । फळाला आले । बाळ जन्मले । शिवनेरी गडावरति हो खास ।
दुष्ट संहार जणू करण्यास । सारा महाराष्ट्र धरी त्याची आस ॥जी॥
चाल
पाळण्यातले पाय पहावे दैवी बाळाचे ।
विजापुरी हो प्राण वाचवी एका गाईचे ॥
गुलामगिरीची चीड निर्मिली माता--गुरुजीनी ।
दरिखोरी तुडवून पाहिली स्थिति हो जातीनी ॥
जीवीच्या जिवलगां जमविले मोठया कष्टाने ।

मावळ्यात अंगार फुलविला अति चातुर्याने ॥
रोहिडेश्वरा वरती धरली रक्ताची धार ।
संकल्पाला समशेरीला चढली मग धार ॥
चाल
कल्याणचा खजीना लुटून । तोरणा जिंकून ।
वेवस्था लावून । उडविली झोप मोंगलांची ।
गनीमी कावा, रीत साची र ॥जी॥
चाल
अफझुल्ला ठार मारुन । शाहित्याची बोटं छाटून ।
पन्हाळगडाहून निसटुन । दिल्लीस तेज दावुन ।
गेला नजर--कैद चुकवून । आला दक्षिणेत परतुन ॥
चाल
जिजाईचे डोळे पाणावले । बाळ लाभले ।
भले जाहले । भवानि शंकराची कृपा हो ज्यास ।
कशाची वाण पडे का त्यास ॥जी जी॥
चाल
रायगडी मग राज्यारोहण--सोहळा तो झाला ।
पंडित गागाभट्ट काशिचा पुरोहीत सजला ॥
सुवर्ण तुला करुनि गरीबा अमाप दान दिले ।
नजर गुणांवर ठेवुनि त्याने मंत्री नेमियले ॥
परराष्ट्राच्या वकिलानी त्या नजराणे दिधले ।
"गोब्राह्मण प्रतिपालक" ऐसे बिरुद मिरवीले ॥"
गमे सुरक्षा जनतेला, ती देई त्यास दुवा ।
स्वर्गामधल्या देवांनाही वाटावा हेवा ॥
चाल
असं करुनियां आक्रीत । सोळाशे ऐशीत ।
शिवरुप होत । कीर्ति तो अमर करुनि गेला ।
शाहीर भालचंद्र नमित त्याला रं ॥जी॥

शिवसंभव (पोवाडा) – शाहीर करुणेश भि० डोंगरे

शिवसंभव
सरला शिमगा गुलाल उधळीत पंचमी येई रंगाची
शिवनेरीला चाहुल लागे महाराष्ट्राच्या भाग्याची ॥१॥
जुन्नर क्षेत्री गड शिवनेरी उभा ठाकला डौलात
बुरुजबंद अति सुंदर आणिक भव्य असे तो बलवंत ॥२॥
लेण्याद्रि अन ओझर क्षेत्री कौतुक पाहे गजानन
भीमा शंकरिं वास शिवाचा काय करिल मग तो यवन ॥३॥
निर्दाळित त्या असुरापायी शस्त्रे घेऊनि बहु हाती
महाराष्ट्राची माय भवानी सिद्ध रक्षणा काय भिती ? ॥४॥
अवती भवती फेर धरुनि उंच उभ्या त्या सह्य शिखा
हिरव्या झाडीमधि खेळती मोर वानरे आणि शुका ॥५॥
खाशा वाडयामधीं सजविले दालन जणुं ही इंद्रसभा
शुभ्र रंग त्यावरी रेखिली कुंकुम स्वस्तिक ये शोभा ॥६॥

द्वारपाल अन देवदेवता मंगल चिन्हे आणि किती

वाळ्याचे अन् पडदे सोडुन कलश जलाचे शीत अती ॥७॥

रत्नय मंचकी मृदु शय्येवर मात्र जिजाई विसावली
तेज ओघळे नेत्रां मधुनी गालावरती ये लाली ॥८॥
सुबक पाळणा हिंदोळत त्यावरी चांदवा छतामधी
थरथरती त्या दिपज्योती वाटे क्षण तो येई कधी ॥९॥
उत्तम सुइणी वैद्यराज अन् हकिम देशिंचे आणविले
राजोपाध्ये, हणमंते अन् नाईक सेवेला आले ॥१०॥
फाल्गुन मासी कृष्णपक्ष अन् तिथी तृतीया ये जवळ
महाराष्ट्राची माय माऊली ओठ आवळी सोशि कळ ॥११॥
संध्या छाया करिती किमया पिले-पांखरे जाति घरा
आंदोलत मन आनंदाने अंश प्रभुचा ये उदरा ॥१२॥
अस्ता जाई एक रवी तो दुजा येतसे या भुवनी
आतुर अवघे विश्र्व जणू ती मोदें थरथरली अवनी ॥१३॥
विश्व बुडाले घन अंधारी क्षणभर न कळे काय घडे
चमकुन जाई प्रकाश रेखा रुदन ध्वनी तो कानी पडे ॥१४॥
बाल रुदन ते येता कानी हरखून जाती जन सारे
पुत्र-प्रसवली ती जन-जननी वार्ता क्षणांत ती पसरे ॥१५॥
घेऊनि हाती मशाल दिवटया गडावरी ते जन जमले
आनंदाचे वृत्त ऐकता जयभवानी जय ते वदले ॥१६॥
दिवस उगवता जमुनी सारे गुलाल उधळीत पालविले
तोच रक्तिमा अंगोपांगी लेवुनि पूर्व दिशा उजळे ॥१७॥
कलश जलाचे मीठ मोहर्या आणुनी शुभ्र सुमे बहुती
दृष्ट काढण्या गडकरनी त्या जमुनि बाळ कौतुक बघती ॥१८॥
पळ पळ घटिका, दिवस जातसे पांचवीचे पूजन चाले
सटवाईच्या घुगर्या खाऊन जन अवघे मग विसावले ॥१९॥
आणवुनि ज्योतिषी जमविली जन्म कुंडली बाळाची
दादाजीने मग कथियेली वेळा नाम निधानाची ॥२०॥
द्वादश दिवशी क्षितिज उजळता वाजविती शिंगे बहुत
सनई, चौघडा आणिक मेर्याी, ढोलक ताशे कडाडत ॥२१॥
दागदागिने वसनाभरणे लेउनि जमल्या सुवासिनी
बाळ लेणी अन कुंच्या झबली दाटी जाहली त्या सदनी ॥२२॥
गोट पाटल्या वाक्या, बिलवर नथ वाकी अन गळा सरी
भरजरी पैठण नेसुनि आली दीप कुळाचा घेई करी ॥२३॥
गोंजारुन त्या लावितसे मग तीट काजळा आणि किती
नाना वसने, बाळलेणी ती; नेत्र कौतुके पाणावती ॥२४॥
देउनी हाती बाळ सखीच्या "गोप कुणी घ्या" ती वदली
कर्ण संपुटी नाम बोलली आणि हर्षे सुखावली ॥२५॥
उदरी आले बाल शिवाजी धन्य आज मी झाले
सार्थक होइल मन जन्मीचे हिंदु राष्ट्र जरी मेळविले ॥२६॥
माय जिजाई वदता जैसे तोफ तटावर गडगडली

जाणुनि होती भविष्य नियती बोल तियेचे जणू वदली ॥२७॥

Sunday, February 28, 2010

धन्य मातोश्री धन्य जिजाबाई (पोवाडा) – शाहीर विष्णूपंत कर्डक

धन्य मातोश्री धन्य जिजाई जन्म दिला तिनं शिवबाला ।
पारतंत्र्याची तोडून शृंखला स्वतंत्र करण्या देशाला ।
हिदुस्थानामध्यें हिरवं निशाण फडकू लागलं यवनांच ।
नाम निशाण मग मोडु लागलं स्थाईक हिंदु लोकांच ॥
जिकडे तिकडे जुलुम यवनाचा छळती हिन्दु लोकांना ।
भर रस्त्यामध्यें गाई कापिती । शिवबाला हे सहन होईना ।
हिंदु अबलांना पळवून नेती, लावती आपल्या ते कामा ।
बळजबरीने करती मुसलमान पढवित होते कलमा ।
थोर थोर लढवय्ये मराठे संरक्षक ते राष्ट्राचे ।
पारतंत्र बेडीने जखडले गुलाम बनले यवनांचे ॥
देश पसरले परकीय जाळे । हिन्दु बांधवांचा होतो छळ ।
जिकडे तिकडे हलकल्लोळ । शेतकरी झाले कंगाल ।
मुला बाळांचे होते हाल । आया बहिणी रडती खळखळ ।
किती भटकती रानोमाळ । अस पाहून जीजाईचा बाळ ।
अंतर्यामी सदा जळफळ । कधी देश स्वतंत्र होईल ।
जैसा मत्स्य तळमळ उदकावीण । तैसा शिवाजी ।
स्वातंत्र्यास्तव रात्रंदीन तळमळ ॥
यवनांचा हा जुलूम पाहून शिवराय करि गर्जना ।
मर्द मराठयांना म्हणे बंधुनो कसा साहिता धिंगाना ।
आया बहिणींची अब्रू घेती लाज कशी रे धराना ।
बोडून मिशा भरुन बांगडया लुगडी कारे नेसाना ।
हिन्दुभूमीचे लेक म्हणविता कुठे गेला तुमचा बाणा ।
मायभूमी रसातळाला चालली नेत्र कारे उघडना ।
ढाल तलवार घेऊन भाला हरहर महादेव बोला ।
शत्रुवरी करुन हल्ला देश आपुला जिंकु चला ।
शिवबाची ऐकुन ही गर्जना मावळा उतरला समररंगणा ।
शिवबाला म्हणती सारे धर्मासाठी अर्पू प्राणा ।
मायभवानी सदा यशदानी तलवार देई शिवबाला ॥शिवरायाला कदा न विसरे सदा लटकली कमरेला ।
स्वातंत्र्यासाठीं सारा मावळा लढे संगरी जोमात ।
जिकडे तिकडे मग भगवा झेंडा फडकू लागला किल्ल्यात ।
सारा मावळा एकवट आला । लढू लागला रणांगणाला ।
धर्माचे रक्षण करण्याला देशासाठी अर्पिती प्राणाला ।
जर्जर करिती आपुल्या शत्रुला । किती तरी मग देश जिंकला ।
शिवाजीला राजा केला । सदा वंदिती जीजामातेला ।
अंबाभवानी कुल देवतेला । सुखी केलं आपल्या लोकाला ।
दिसती आनंदात मावळे मग दिसती आनंदात ।
मराठयांच भगव निशाण फडकु लागलं देशांत ॥
देशासाठी किती वीरांनी रक्त सांडूनी भूमीला ।
पारतंत्र्याची तोडूनी बेडी स्वराज्य केलं देशाला ।
शूरवीर नेताजी पालकर, उजवा हात तो शिवाजीचा ।
हिरोजी, बहिर्जी आणि सूर्याजी इंगा जिरवी शत्रूचा ।
मर्द मावळा शूर तानाजी सोडून पुत्राच्या लग्ना ।
स्वराज्यासाठी अर्पूनी प्राणा, घेतला कोंडाणा ।
मुरारबाजी मराठा पडला गड पुरंदरी लढतांना ।शीर तुटलं पर धडानं कापलं त्यान तीनशे हो लोकांना ।
पावन खिंडीमध्यें शिकस्त केली सुखी पोहचण्या शिवराणा ।
पांच तोफांचे आवाज होता । मग बाजी प्रभु सांडी प्राणा ।
हंबीरराव मोहीते मराठा मर्द गडी तो खंबीर ।
शिव कार्याला सदा तय्यार असे त्याची हो तलवार ।
असा किती वीर कामी आला । देश आपला जिंकण्याला ।
शिवाजी सारखा पुढारी मिळाला । म्हणून देश स्वतंत्र झाला ।
सुखी केला आपुल्या लोकाला । धन्यवाद देती शिवबाला ।
सारे नमिती भगव्या झेंडयाला । सदा तय्यार शिवकार्याला ।
मराठे सारे ते हो वीर । शिवरायाचा वाढु लागला विस्तार ॥ध्रु०॥
स्वराज्य स्थापूनी शिवरायाने सारा मावळा एक केला ।
जो जो आडवा झाला त्याला उभा धरुनी चिरीयेला ।
कितीक तरी थोर थोर मराठे स्वराज्यात करिती फाटाफुट ।
परि शिवराय स्वातंत्र्याची करी हो एकजुट ।
बहु प्रयत्ने् शिवरायाने देश आपुला जिंकिला ।
स्वातंत्र्याची मेढ रोवूनी धर्म आपुला रक्षियला ।
असा मोहरा महाराष्ट्राचा अभिमानी जो धर्माचा ।
दैव तयाला आड आले रोग झाला हो गुडघीचा ।
महाराष्ट्राचा हिरा हरपला तारा एकाएकी तुटला ।
मावळ देशाचा दिनमणी अंधार गडद पडला ।
धन्य शिवाजी धन्यच झाला । स्वराज्य स्थापिला ।आपल्या देशाला पारतंत्र्याची तोडून शृंखला ।
देश धर्म आपुला रक्षिला । नाव अजरामर करुन भूमिला ।
शिवराय ते गेले स्वर्गाला । दुःखित केलं आपल्या जनतेला ।
किती वर्णु मी त्यांच्या गुणाला ?
शिवरायानं जन्म घेतला । म्हणूनच हिंदु धर्म राहिला ।
त्यांना रामदास गुरु मिळाला । तुकारामानं उपदेश केला ।
अशा संतांचा लाभ झाला । मराठे तय्यार वेळेला ।
मातोश्रीची मात सारी ही, मातोश्रीची मात ।
शाहीर विष्णुपंत कर्डक गातो कवनात ॥ध्रु०॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

नवा आवेश (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

आला नवा आदेश, बिजातुन स्फुरला नव अंकुर

महाराष्ट्र देवता वाजवी, मंजूळ सनई दूर ॥ध्रु०॥

स्वागत करती दाहि दिशा या, ओवाळून आरति शिवाला ओवाळून आरति

फितुरीचा तो खेळ हरविण्या संत थोर जागती आमचे संत थोर जागती

जिजा माउली पुण्य उधळती राष्ट्रातील घरभर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥१॥

शौर्याचे रणशिंग फुंकुनी शूर दावितो बाणा अमुचा शूर दावितो बाणा

शत्रूसंगे झुंज खेळतो सवंगडयासह राणा शिवबा सवंगडया सह राणा भव तापाचे संकट हरले सुख चाले तूर तूर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥२॥

गिरी शिखरातून नद्या वाहती भय सोडून खळखळ वाहती भय सोडून खळखळ

अभयाचे वरदान मिळाले उसळून आले बळ तयांचे उसळून आले बळ

नत मस्तक होवूंया शिवाच्या जाउन चरणावर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥३॥

भिमा कोयना काठावरली क्षेत्रे ही जागली आमुची क्षेत्रे ही जागली

पंढरपुरच्या विठूरायाला शांत झोप लागली पहा हो शांत झोप लागली

वारकर्‍यांच्या कंठा मधुनी घोष घुमे हर हर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥४॥