Sunday, February 28, 2010

धन्य मातोश्री धन्य जिजाबाई (पोवाडा) – शाहीर विष्णूपंत कर्डक

धन्य मातोश्री धन्य जिजाई जन्म दिला तिनं शिवबाला ।
पारतंत्र्याची तोडून शृंखला स्वतंत्र करण्या देशाला ।
हिदुस्थानामध्यें हिरवं निशाण फडकू लागलं यवनांच ।
नाम निशाण मग मोडु लागलं स्थाईक हिंदु लोकांच ॥
जिकडे तिकडे जुलुम यवनाचा छळती हिन्दु लोकांना ।
भर रस्त्यामध्यें गाई कापिती । शिवबाला हे सहन होईना ।
हिंदु अबलांना पळवून नेती, लावती आपल्या ते कामा ।
बळजबरीने करती मुसलमान पढवित होते कलमा ।
थोर थोर लढवय्ये मराठे संरक्षक ते राष्ट्राचे ।
पारतंत्र बेडीने जखडले गुलाम बनले यवनांचे ॥
देश पसरले परकीय जाळे । हिन्दु बांधवांचा होतो छळ ।
जिकडे तिकडे हलकल्लोळ । शेतकरी झाले कंगाल ।
मुला बाळांचे होते हाल । आया बहिणी रडती खळखळ ।
किती भटकती रानोमाळ । अस पाहून जीजाईचा बाळ ।
अंतर्यामी सदा जळफळ । कधी देश स्वतंत्र होईल ।
जैसा मत्स्य तळमळ उदकावीण । तैसा शिवाजी ।
स्वातंत्र्यास्तव रात्रंदीन तळमळ ॥
यवनांचा हा जुलूम पाहून शिवराय करि गर्जना ।
मर्द मराठयांना म्हणे बंधुनो कसा साहिता धिंगाना ।
आया बहिणींची अब्रू घेती लाज कशी रे धराना ।
बोडून मिशा भरुन बांगडया लुगडी कारे नेसाना ।
हिन्दुभूमीचे लेक म्हणविता कुठे गेला तुमचा बाणा ।
मायभूमी रसातळाला चालली नेत्र कारे उघडना ।
ढाल तलवार घेऊन भाला हरहर महादेव बोला ।
शत्रुवरी करुन हल्ला देश आपुला जिंकु चला ।
शिवबाची ऐकुन ही गर्जना मावळा उतरला समररंगणा ।
शिवबाला म्हणती सारे धर्मासाठी अर्पू प्राणा ।
मायभवानी सदा यशदानी तलवार देई शिवबाला ॥शिवरायाला कदा न विसरे सदा लटकली कमरेला ।
स्वातंत्र्यासाठीं सारा मावळा लढे संगरी जोमात ।
जिकडे तिकडे मग भगवा झेंडा फडकू लागला किल्ल्यात ।
सारा मावळा एकवट आला । लढू लागला रणांगणाला ।
धर्माचे रक्षण करण्याला देशासाठी अर्पिती प्राणाला ।
जर्जर करिती आपुल्या शत्रुला । किती तरी मग देश जिंकला ।
शिवाजीला राजा केला । सदा वंदिती जीजामातेला ।
अंबाभवानी कुल देवतेला । सुखी केलं आपल्या लोकाला ।
दिसती आनंदात मावळे मग दिसती आनंदात ।
मराठयांच भगव निशाण फडकु लागलं देशांत ॥
देशासाठी किती वीरांनी रक्त सांडूनी भूमीला ।
पारतंत्र्याची तोडूनी बेडी स्वराज्य केलं देशाला ।
शूरवीर नेताजी पालकर, उजवा हात तो शिवाजीचा ।
हिरोजी, बहिर्जी आणि सूर्याजी इंगा जिरवी शत्रूचा ।
मर्द मावळा शूर तानाजी सोडून पुत्राच्या लग्ना ।
स्वराज्यासाठी अर्पूनी प्राणा, घेतला कोंडाणा ।
मुरारबाजी मराठा पडला गड पुरंदरी लढतांना ।शीर तुटलं पर धडानं कापलं त्यान तीनशे हो लोकांना ।
पावन खिंडीमध्यें शिकस्त केली सुखी पोहचण्या शिवराणा ।
पांच तोफांचे आवाज होता । मग बाजी प्रभु सांडी प्राणा ।
हंबीरराव मोहीते मराठा मर्द गडी तो खंबीर ।
शिव कार्याला सदा तय्यार असे त्याची हो तलवार ।
असा किती वीर कामी आला । देश आपला जिंकण्याला ।
शिवाजी सारखा पुढारी मिळाला । म्हणून देश स्वतंत्र झाला ।
सुखी केला आपुल्या लोकाला । धन्यवाद देती शिवबाला ।
सारे नमिती भगव्या झेंडयाला । सदा तय्यार शिवकार्याला ।
मराठे सारे ते हो वीर । शिवरायाचा वाढु लागला विस्तार ॥ध्रु०॥
स्वराज्य स्थापूनी शिवरायाने सारा मावळा एक केला ।
जो जो आडवा झाला त्याला उभा धरुनी चिरीयेला ।
कितीक तरी थोर थोर मराठे स्वराज्यात करिती फाटाफुट ।
परि शिवराय स्वातंत्र्याची करी हो एकजुट ।
बहु प्रयत्ने् शिवरायाने देश आपुला जिंकिला ।
स्वातंत्र्याची मेढ रोवूनी धर्म आपुला रक्षियला ।
असा मोहरा महाराष्ट्राचा अभिमानी जो धर्माचा ।
दैव तयाला आड आले रोग झाला हो गुडघीचा ।
महाराष्ट्राचा हिरा हरपला तारा एकाएकी तुटला ।
मावळ देशाचा दिनमणी अंधार गडद पडला ।
धन्य शिवाजी धन्यच झाला । स्वराज्य स्थापिला ।आपल्या देशाला पारतंत्र्याची तोडून शृंखला ।
देश धर्म आपुला रक्षिला । नाव अजरामर करुन भूमिला ।
शिवराय ते गेले स्वर्गाला । दुःखित केलं आपल्या जनतेला ।
किती वर्णु मी त्यांच्या गुणाला ?
शिवरायानं जन्म घेतला । म्हणूनच हिंदु धर्म राहिला ।
त्यांना रामदास गुरु मिळाला । तुकारामानं उपदेश केला ।
अशा संतांचा लाभ झाला । मराठे तय्यार वेळेला ।
मातोश्रीची मात सारी ही, मातोश्रीची मात ।
शाहीर विष्णुपंत कर्डक गातो कवनात ॥ध्रु०॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

राजमाता जिजाऊ (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्या ची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या् ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी
शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी
राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले.
पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा
भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥

नवा आवेश (पोवाडा) – शाहीर भगवान बाळाजी चव्हाण

आला नवा आदेश, बिजातुन स्फुरला नव अंकुर

महाराष्ट्र देवता वाजवी, मंजूळ सनई दूर ॥ध्रु०॥

स्वागत करती दाहि दिशा या, ओवाळून आरति शिवाला ओवाळून आरति

फितुरीचा तो खेळ हरविण्या संत थोर जागती आमचे संत थोर जागती

जिजा माउली पुण्य उधळती राष्ट्रातील घरभर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥१॥

शौर्याचे रणशिंग फुंकुनी शूर दावितो बाणा अमुचा शूर दावितो बाणा

शत्रूसंगे झुंज खेळतो सवंगडयासह राणा शिवबा सवंगडया सह राणा भव तापाचे संकट हरले सुख चाले तूर तूर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥२॥

गिरी शिखरातून नद्या वाहती भय सोडून खळखळ वाहती भय सोडून खळखळ

अभयाचे वरदान मिळाले उसळून आले बळ तयांचे उसळून आले बळ

नत मस्तक होवूंया शिवाच्या जाउन चरणावर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥३॥

भिमा कोयना काठावरली क्षेत्रे ही जागली आमुची क्षेत्रे ही जागली

पंढरपुरच्या विठूरायाला शांत झोप लागली पहा हो शांत झोप लागली

वारकर्‍यांच्या कंठा मधुनी घोष घुमे हर हर ॥ध्रु०॥महाराष्ट्र ॥४॥

Tuesday, January 26, 2010

पुरोगामी छत्रपती (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

हिंदवी स्वराज्याचा जनक । लोकनायक ।

राष्ट्रपाईक । छत्रपति शिवाजी महाराज ॥

जगत् युग पुरुषाचा ताज । महामानवी आत्मतेज ॥

तो सत्त्वगुणांचा चंद्र । जनीं राजेंद्र ।

रणीं महारुद्र । त्रिगुणसंपन्न तीव्रबुद्धी ॥

राजकर्तव्य दक्ष नृपती । जगांतिल महान् मुत्सद्दी ॥

चाल

साम्राज्यशाहीचें प्रस्थ उभ्या अवनीत ।

आन् आदिलशाही मोगलाई देशांत ।

ह्या राहुकेतूंच्या जबरदस्त ग्रहणांत ।

हा भारताचा भास्कर । सह्याद्रीवर ।

खुले प्रखर । स्वराज्य नाथ ॥

चाल

जमिनदारी जहागिरदारीला दिली मूठमाती ।

समता निर्मून समर सिद्धिला केली सैन्य भरती ॥

चाल

पकडला मोहिते मामा । नात्याची धरली नाहीं तमा ॥

तो चंद्रराव सासरा । लावला त्याला कासरा ॥

सोडला नाहीं फितूर सगा सोयरा ॥ तो कठोर कर्तव्याचा होता मोहरा ॥

चाल

घरभेदे शासिले घेतले जन विश्वासांत ।

जनता युग निर्माता शिवबा पहिला विश्वांत ॥

चाल

ती सुभेदाराची सून । असहाय बंदिनी असून ॥

ते मुसमुसतें तारुण्य । तें रसरसतें लावण्य ॥

शिवनीति कराया हरण । मदनानें मारला बाण ॥

पण शिवराया नितिमान । मदनास आणले शरण ॥

चाल

देऊनी वसनें अरिसुंदरीला मानियली माता ।

शत्रुच्याहि अब्रूचा रक्षक शिवराया होता ॥

चाल

सैन्यांत होते रणवीर । ते सर्वं धर्माचे वीर ॥

तानाजी, बाजी झुंजार । नेताजी नि पासलकर ।

तसे होते आरमारावर । नेकीचे मराठे वीर ॥:

इब्राहिम खान बहादुर । दौलतखान रणशूर ॥

आग्र्र्‍याच्या संकटावर । सुटकेची मात करणार ।

शिवबाला साथ देणार । ते राम रहीम मैतर ।

हिरोजी नि मदारी मेहेतर ॥

चाल

स्वराज्य कामीं पणीं लाविले सर्व पंथ धर्म ।

महान राष्ट्रीयतेचा केला महाराष्ट्रधर्म ॥

चाल

तो प्रतापगडचा खटका । पन्हाळी सटका ।

आग्र्‍याहून सुटका । शक्ति बुद्धि न् युक्तिवान ॥

दाखवी शिवबाची शान । विवेकी प्रसंग अवधान ॥

चाल

तो दास होता संताचा...संताचा । हव्यास गुणी पंथाचा ॥ जी जी जी ॥

तो हरहर रणवंताचा....वीरांचा । तो ऋणी सदा शहीदांचा ॥जी जी जी ॥

गावया पवाडा त्याचा....अहो त्याचा । तो प्रेरक डफतंताचा ॥जी जी जी ॥

चाल

वीर रसानें खडा कराया अवघा सह्यकडा ।

तानाजीच्या वीर-गतीचा वदवी पोवाडा ॥

चाल

जयसिंग स्वारीचा बदला । सुरतेवर चढवी हल्ला ॥

नाडीलें नाहीं कोणाला । अन् सज्जन गुणवानाला ।

नाडीलें न महिलां बालां ॥

चाल

दानशूर स्वर्गीय शेठ तो परीख मोहनलाल ।

कीर्ति ऐकुनी सुखी राखला विधवेचा महाल ॥

चाल

कृष्णेची दौड तुफान । शत्रूचे उडवी भान ॥

ती बघतां खडग भवानी । शत्रूची दाणादाणी ॥

सिद्दीचा उतरे माज । शरणीले पोर्तुगीज ॥

इंग्रज राहिले चूप । पाहूनी शिव प्रताप ॥

दिल्लीला आला ताप । दुनियेची उडाली झोंप ॥

चाल

सह्याद्रीच्या कडेकपारीं लढला शिवराया ।

हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया ॥

चाल

श्रीछत्रपती शिवराय । हिंद सरताज ।

अवनीचा साज । आठवा शौर्य स्वरुप गुण ॥

आत्मारामाची तुम्हा आण । चालवा नवा हिन्दुस्थान ॥

शिवदर्शन (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील

(चाल : अलंकार)

अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा,

कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा,

छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥

इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती ।

प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली,

वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई,

रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥

(चाल : दौड )

त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥

ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥

हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥

गातो आत्मारामइतिहास पवाडा ऐका ॥

बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं ।

कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ?

वर्‍हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ?

आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥

जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥

चाल : अलंकार

हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर ।

इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला ।

शहाजी भोंसला त्राता उरला ॥

(चाल : दौड)

इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥

उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥

जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥

डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥

डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा ।

संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा ।

सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा ।

माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥

ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं ।

जाधवाला त्यांनीं फितवलं । चोवीस हजारमनसुबा केला बहाल ॥

मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन्‌ लाल चावलं ॥

दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥

सासर्‍यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्‍यासंगं दंड थोपटलं ॥

चाल : स्फूर्ति

सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां ।

जांवई शहाजीराजा त्राता निजामाला ।

दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला ।

राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला,

पणा लागला, ऐका कवनाला ॥

चाल : वीरश्री

महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं ।

हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥

शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला ।

आणि त्याच्या विधवा मातेला ।

चाल : दौड

घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥

वीर-पत्‍नी बाई जिजाई होती संगतीला ॥

पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥

काय करावं अशा समयाला ?

सुपारीवर आडकित्ता आला !

चाल : वीरश्री

दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥

भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥

चाल : दौड

दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥

चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥

ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥

चाल : अलंकार

ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला ।

कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला ।

निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं,

मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला ।

शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥

चाल : रणघाई

आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥

घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥

रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी !

रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी !

तलवारी पट्टा फडफडा ॥

खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥

लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं ।

साथ

त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥

शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥

साथ

त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥

जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥

साथ

पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥

जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥

साथ

त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली ।

चाल : विजया

आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥

किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥

शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥

जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥

दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥

खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥

चाल : स्फूर्ति

घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं ।

तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती ।

नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती ।

सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥

पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला ।

लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥

चाल : हळहळ

जाधवानं डाव फिरविला ॥जी॥

भेटे निजामाच्या आईला ॥जी॥

लाघवी बोल बोलला ॥जी॥

"बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ?

करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला,

देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला ।

माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥

तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥

त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥

तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥

फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान !

देतों इशार्‍याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात,

भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥

परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला,

झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई,

बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला ।

घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला ।

किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई ।

सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥

गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला ।

तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥

ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥

चाल : दामिनी

बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥

चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥

धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥

आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्‍याला ॥

चाल : वीरश्री

मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला ।

मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥

मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला ।

स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥

चाल : चिंता

फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥

आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥

झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥

चाल : समता

सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं ।

तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान ।

थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण ।

पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥

बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला,

आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला,

हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला,

लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला,

ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला ।

वाहीन प्राण आपुला ।

चाल : दौड

बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥

शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥

आगींत एक; फोफाटा नेई दुसर्‍याला ॥

माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला,

होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला !

तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला ।

तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥

एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥

जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥

अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥

फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥

चाल : अलंकार

रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं ।

वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला ।

आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार ।

जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं ।

हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥

घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा ।

पकडो रे दौडो शहाजी भागा ।लेक-जांवई गेल्या मागा ।

सासरा लागला पाठलागा ॥

चाल : दौड

धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥

विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥

माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला ।

दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥

महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥

तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥

तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥

पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥

त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥

चाल : वीरश्री

पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर ।

मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥

पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती ।

दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥

घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं ।

अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥

चाल : स्फूर्ति

लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा,

नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला ।

दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥

चाल : गजगामिनी

बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥

डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥

पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥

पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ ।

जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥

काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले ।

चाल : वीरश्री

क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया ।

तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥

ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी ।

बोलली वीराला रमणी ।

चाल : स्वयंसिद्धा

तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥

सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥

ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥

चाल : मौलिक

ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥

संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥

चाल : अलंकार

राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर ।

तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार ।

स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला ।

जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला ।

किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥

चाल : समता

सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत ।

सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ ।

रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत ।

सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥

गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत ।

गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥

परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त ।

अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥

चाल : वीरांगना

त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥

संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥

दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥

सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां ।

तारील भवानी माता ॥ते दोन जिवांचे बोल ।

तिसर्‍या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां ।

अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें ।

वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां ।

पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच ।

सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच ।

तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥

चाल : अलंकार

गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे ।

राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली ।

जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥

चाल : छक्कड

सासर्‍याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई ।

हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥

रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली ।

भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥

त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती ।

किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥

पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती ।

जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥

ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी ।

जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥

थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ ।

ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥

ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली ।

अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥

बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले ।

बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥

(लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती,

कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥

मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें ।

तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥

तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे ।

परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥

तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे ।

मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥

क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे ।

पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥

तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे ।

परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥

तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे ।

परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥

चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं ।

बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥

या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं ।

माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥

(पडद्या आडून शाहीर गात आहे---)

चाल : कोंकवती

अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥

तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥

असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥

थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥

घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार ।

ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥

(जिजाबाई म्हणते----)

चाल : मानिनी

जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥

तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥

तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥

हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥

घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक ।

ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें ।

धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥

जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥

उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥

वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥

मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र ।

मत्प्राणपति नि सत्‍पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें ।

तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥

हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥

चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर ।

या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें ।

डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥

या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥

तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥

दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा ।

या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें ।

पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें ।

जा उतरा गड जो चढले ॥जे०॥

(जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्‍या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---)

चाल : कोंकवंती

नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें !

गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें ।

ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे ।

तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर पूर्णमासवेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें ।

तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥

साथ : टाहोचा आवाज

टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर ।

विश्वांत झाला चमत्कार । सांगतो आत्माशाहीर ।

ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार ।

ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर ।

धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार ।

भंवर्‍यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार ।

पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर ।

आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार ।

प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर ।

अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर ।

गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर ।

तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर ।

उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर ।

असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर ।

गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार ।

नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला,

सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा,

झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला,

आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ?

एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥

मुक्त छंद

धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे ।

मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥

भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे ।

रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥

स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे ।

इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥

कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे ।

अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥

अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे ।

नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे ।

परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥

वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे ।

स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥

सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे ।

स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥

तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" ।

डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥

जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे ।

भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥

आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं ।

शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥

काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं ।

शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥

(टाहोचा आवाज--पुढें पोवाडा)

फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा ।

पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥

शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा ।

सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥

धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं ।

मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग ।

हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥

फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद,

संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं,

खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद ।

नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ,

दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट ।

कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत !

कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत ।

कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र ।

होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र ।

फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट ।

पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत ।

शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥

चाल : अलंकार

शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें ।

राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला ।

हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥

आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा,

नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला,

पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला ।

प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला ।

सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला ।

वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला ।

सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर आत्मारामतोच गातो आजला ।

ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥