Thursday, August 13, 2009

ठकास महाठक (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

महाठक ठका भेटला । अजब युक्तीला ।
योजून पार झाला । शेराला सव्वाशेर शिवराय ।
दिल्लिपति सदा करित हाय ! हाय ! ! ।
पोवाडा पांडुरंग कवि गाय ॥ध्रु०॥
चौक १
जंवा पुरंदरचा तह झाला । शाहा खुष झाला ।
जयसिंगाला । शिवाजीनं मदत केली हो फार ।
आदिलशाही त्यानं केली बेजार । शौर्याची शर्थ केली अनिवार ॥
शाहानं लिहिलं शिवाजीला, । "तुमच्या शौर्याला । तुमच्या कीर्तीला ।
तोड नसे, फिदा झालों मी फार ! । यावं भेटिला, करिन दरबार ।
करिन बहुमान तुमचा मी फार ! ॥ मनिं शंका मुळीं नच धरा ।
माझ्या या घरा । विचार ठाम करा । येण्याचा, तोष होईल चित्तास ।
एकमेकांचा जडेल विश्वास । एकदां आम्हांकडं यावं तुम्ही खास" ॥
विश्वासु मित्र जमविले । किल्ल्यावर भले । राजा मग बोले ।
"गडयांनों ! शहा बोलवी आम्हांस । सल्ला काय तुमचा असल्या समयास ।
धरावा कसा त्याचा विश्वार ? ॥ तरी जावं वाटतंय् मला । भेट देण्याला ।
हिंदुराज्याला । चार शाह्या झोंबती आजच्या समयास ।
कांहीं काळ वश करणं एकास । खास जरुरीचं वाटतं आम्हांस" ॥
सर्वांनीं विचार जरा केला । अभिप्राय दिला । अनुकूल त्याला ।
राजा मग बोलला फिरुन सर्वांस । "शाहाचा मुळीं नसे विश्वास ।
केव्हां दगा होईल कळे ना कोणास " ! ॥
चाल
म्हणुन मोरोपंत पेशवे पंडित; । अण्णाजी दत्तो सुरणीस; ।
निळो सोनदेव मदतीस । तीघांच्या हातीं सोंपविली सत्ता ते वेळा ॥
किल्ल्यांची पाहणी शिवराय करुन हो आला ॥
राज्याचा बंदोबस्त केला । अन् कोण कोण घेतले मदतीला ।
दादांनो ! सांगतों तुम्हाला ॥
चाल
निराजी आवजी न्यायाधीश । बाळाजी आबजी चिटणीस ॥
त्रिंबक सोनदेव डबीर । आणि प्रतापराव गुजर ॥
जीवनराव माणकोजी खास । नरहरपंत सबनीस ॥
राघो मित्र घेतले मदतीस । दत्ताजी त्रिंबक हि खास ॥
हिरोजी फर्जंद वीरास । राजानं घेतलं मदतीस ॥
कित्येक असले सरदार घेतले मदतीला ॥
संभाजी राजपुत्राला । त्येनं संग घेतलं ते वेळा ।
पांच हजार घेतलं फौजेला । भवानीच्या केले स्मरणाला ।
आठवलं रामदासाला । जिजाईला भेटून आला ।
आणि राजा चालला आगर्यााला ॥ दोन महिने लागले जाण्याला ।
शिवाजिला खास राहण्याला ॥ शिवपुरा तयार होता केला ।
ततं राजा जाऊन उतरला । रामसिंग दिला दिमतीला ।
असा राजा थाटमाटानं गेला आगर्यादला ॥
चाल
पुढं काय प्रकार झाला । पुढच्या चौकाला ।
सांगिन तुम्हांला । कथानक गोड मोठं छानदार ।
शिवाजी सांबाचाच अवतार । असा कधिं हिरा पुन्हा होणार ? ॥१॥
चौक २
दरबार शाहानं भरविला । दुसर्याम दिवसाला ।
थाट लइ केला । वाटे जणु ’मयसभा’ ही छान !
कराया शिवाजीचा अपमान । बादशाहा झाला होता बेभान ! ॥
तंवा जमले सारे सरदार । मोठे सुभेदार । शाहीचे नोकर ।
जमले पाहण्याला शिवाजीला । दरबारीं जो तो खडा झाला ।
मनाप्रमाणंच ते वेळा ॥ पच्चिस हात मारतोय उडी ।
शिवाजी गडी । वाघाला फाडी । असला हा वीर कसला झाला ! ।
पाहावं एकदां तरी त्याला । जो तो करि असल्या विचाराला ! ॥
शिवाजीनं पोशाख छान केला । तरवार कमरेला ।
चालला दरबाराला । ज्याचा त्याचा डोळा खिळुन गेला ।
वाटे जणुं मदनाचाच पुतळा । अमीर उमराव थक्क झाला !! ॥
चाल
शिवाजीनं लवुन शाहाला मुजरा तंवा केला ॥
पंधराशें होनांचा वरती नजराणा दिला ॥
सहा हजार मोहरा देऊन बहुमान केला ॥
असा बहाणा राजनिष्ठेचा ठाकठीक केला ! ॥
असा विधि झाल्यावर शहा बोलला शिवबाला ॥
"राजनिष्ठा तुमची पाहुन शाहा खुष झाला ! ॥
जसवंतसिंगराजाच्या खालच्या बाजूला ॥
जा, उभे रहा, तो मान तुम्हांला दिला !" ॥
असं बोलला शहा शिवबाला । शिवाजीचा अपमान झाला ! ।क्रोधाग्नि आंत भडकला ! । जसा सूर्य बारा डोळ्यानं, तसा चमकला ! ॥
जसा वणवा रानाला,तसा राजा भडकला ! ॥
जसा जलधि खवळावा, तसा राजा खवळला ! ॥
तंवा शिवबा बोलूं लागला । अपमान माझा करण्याला । काय इथं आणलं तुम्ही मला ? ।
जो करार जयसिंगराजानं माझ्याशीं केला । तो आज तुम्ही मोडला ! ।
बस्स ! पुरे ! जातों माघारा " । असं बोलला राजा ते वेळा ! ।
सरदार सुभेदार जिरले जागच्या जागेला ! ॥ जणु महारुद्र खवळला ।
शाहानं दरबारच जल्दी बरखास्त केला !! ॥२॥
चौक ३
शिवाजीचा बाणा पाहून । दरबारी खान । गेले हादरुन ।
शहाही झाला थक्क ते वेळा ! । सर्वांची मति कुंठित ।
धाक पोटांत । एक चित्तांत । शिवाजी हो दिसला ! ॥
जंवा शहा विचारमूढ झाला । सुचेना कांहीं त्याला ।
सल्ला देण्याला । आली तंवा त्याची मामी जोरानं ।
नवर्यादचीं बोटं कापली । म्हणुन भडकली ।
बोलाया आली । मामी आणि सून ! ॥
"अवरंग ! ऐक सल्ल्याला ॥ शिव्या आयता हातीं गवसला ।
कैद कर त्याला । कांटा हा झाला । उपटून काढला पाहिजे या वेळा ।
ही संधी आली चालून । जर म्हणसी आतां तूं न न । शिरजोर पुढं होऊन ।
सूडाची ज्योत घेऊन । करिल हैराण । पादशाहीला ! ॥
मामीचा सल्ला हा पटला बादशहाला । शहानं कैद केलं त्याला ।
शिवपुर्या्मधींच शिवाला । कोंडून ठेवलं ते वेळा ।
पिंजर्यां्त कोंडलं सिंहाला । कडेकोट पहारा वाडयाला ।
पोलादखान मुख्य नेमला । पांच हजार शिपाई मदतीला ।
जो राजा भेटीला आला । शाहानं कैद केलं त्याला ! ।विश्वासघात करुनि हो शिवा पकडला !! ॥
शिवाजीला पूर्वी धरण्याला । बडाबडा खान पाठवला ।
पण ज्यानं थांग नाहिं दिला । तो आज कपटजाळ्यांत सिंह सांपडला ! ॥
चाल
दख्खनचा सिंह कैद झाला । आपदा हिंदुराज्याला ॥
बीं नुकतं रुजलं भूमीला । पर भुंगा लागला त्याला ! ॥
स्वातंत्र्यसूर्य उदयाला । पर केतु ग्रस्त करि त्याला ! ॥
या दुष्ट बातमीचा गोळा । दख्खनला जाळत आला ! ॥
जणुं आला वज्राचा घाला ! । काळ मोठा दारुण आला ॥
चाल
काय युक्ति शिवबा योजील । कसा निसटेल ।
सांगे शाहीर । दादानों ! गोष्ट घ्यावी चित्तांत ।
शिवाजीनं केली शहावर मात । कशी ती ऐका पुढच्या चौकांत ॥३॥
चौक ४
जगदंबा गेली सप्नाला । बोलली शिवबाला ।
"भिंऊ नको बाळा ! निरशीन तुझ्या संकटाला" ।
शिवाजीला तोष फार झाला । उपाय एक सुचलां खासा त्याला ॥
आजार्यााचा बहाणा त्यानं केला । अंथरुणाला खिळला ।
निरोप शाहाला । धाडला त्यानं एक त्याच वेळेला ॥
"लोक माझा हैराण झाला । हवापाणी मानवेना त्याला ।
जाण्याला दख्खन देशाला । आतुर फार झाला । निरोप द्या त्याला ॥
चाल
शाहानं विचार मनिं केला । ’देऊं निरोपाला ।
सार्या फौजेला । शिवाजिच्या, जाऊ द्या दख्खन देशाला ।
मग शिवा एकटा राहील । भय त्याचं कमी होईल ।
मग तोच झुरुन जाईल । मरण पाहील । खास आग्या िर ला" ।
लोक सारा पाठवुन दिला । दख्खन देशाला; । थोडा पण ठेवला ।
ठायीं ठायीं गावामध्नं ते वेळा ॥ ते आपला वेष पालटून ।
गावात्नंय राहिले जाऊन । शिवाजीला जाती भेटून ।
नित्य येऊन, । रोजचा नेम झाला ॥ बरं वाटतं आतां जीवाला ।
म्हणून मिठाई तो वाटतो गांवाला । पेटारे जाती भरुन ते वेळा ।
शिवपुर्यांातून रोज किती । नाहीं गणती ।
अचाट हि युक्ति । सुचली शिवबाला ! ॥
चाल
रोज पहारेवाले नेमानं ॥ पेटारे बघती उघडून ॥
आरंभी रोज उघडून । पाहती नित्य नेमानं ॥
पर कंटाळले रोज पाहून । पुढं पुढं पाहतीना कोण ! ॥
ठकालागीं ठक होऊन । शिवाजीनं केलं वर्तन ! ॥
चाल
रोज असा नेम चालला । विश्वास वाटला सर्वांला ।
एके दिशीं शिवानं कळविलं आपल्या लोकांला ॥
"की व्हा तय्यार अमक्या जागेला । आज आज रात्रीं नेमक्या वेळेला" ।
जंवा सूर्य चालला अस्ताला । तंवा त्यानं सोडलं पलंगाला ।
हिरोजी फर्जंद वीराला । त्यानं पलंगावरती निजवला ।
पांघरली शाल अंगाला । शिवाजीची आंगठी हिरोजीनं घातली ते वेळा ॥
अन् हात बाहेर (उघडा) ठेवला । शिवाजीच्या गादीवर हिरोजी हो पहुडला ! ॥
एक मुलगा मदारी मेहेतर चेपतो पायाला । असा सारा देखावा केला ।
अन् शिवाजी पेटार्यां त बसला । संभाजी जवळ घेतला ।
अन् पहार्यापत्नंि बाहेर चालला ! । शिवा गेला ! गेला ! निसटला !! ।
आणि बघतां बघतां शिवराजा नाहिंसा झाला ! ॥४॥
चौक ५
दुसरे दिवशीं पोलादखान आला । पहारा करण्याला ।
थक्क पार झाला ! । गलबला रोजचा दिसेना त्याला ।
सामसूम वाडा शांत दिसला । पक्षी कोंडलेला उडून गेला ! ॥
लगबगीनं शहाकडं गेला । बोलला शाहाला ।
"हुजूर ! घात झाला! । पिंजरा आज रिकामाच पडला ।
शिवा फसवून निघुन गेला ! । गेला कसा ठाव न कोणाला ! ॥
चोवीस तास पहार खडा केला । तरि ही पार झाला ! ।
कळेना कसा गेला ! । काय जमिनीच्या आंत शिरला ।
अस्मानांत काय उडुन गेला । भूत चेटूक साहाय्य त्याला ! ॥
पचीस हात मारतोय उडी । ऐकलं घडोघडी । म्हणुन मोठे गडी ।
ठेवले होते पहार्याीवरती मी खास । फसवून गेला कसा सकळास ।
समजेना गूढ पडलं आम्हांस ! ॥ दांत ओंठ चावले शाहानं ।
मुठी वळून । बोलला रागानं । "गेला कसा ? कुठं हराम सैतान ।
काय करुं !" ----- बोलला दाढी हालवून । गेलं कंबरडं त्याचं वांकून ! ॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥

No comments:

Post a Comment