Wednesday, July 29, 2009

वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार ।
धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार ।
त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥
चौक १
अफझुल्लाला ठार केल्यावर । झालं विजापूर ।
भीतिनें गार । शाहा मग झाला मोठा बेजार ।
फार मोठं झालं त्याला शेजार । जडला जणूं घोर त्याला आजार ॥
सारे अमीर करिती विचार । आतां जाणार ।
गांव विजापूर । लौकर सैतानाच्या कबजांत ।
होणार सारा घोर आकांत । साधावा कैसा त्याचा हो घात ॥
अफझुल्लाचा मुलगा फाझलखान । झाल हैराण ।
सुचेला त्याला आन । सूडानं घेरलं त्याच्या हृदयास ।
येईना झोंप, झाला कडु घांस । अंगाचं आटलं त्याच्या लइ मांस ॥
सदा झाला शिवराया काळ । लागली तळमळ ।
परि तो दुर्बळ । एकला काय शिवाला करणार ।
सिंहाला कोल्हं कसं हो धरणार ? । मुंगसाला साप काय करणार ?॥
चाल
एके दिवशीं अफझुल फाजलाच्या स्वप्नामधीं आला ॥
बापाला आपल्या पाहून फाजल दचकला ! ॥
अफझुल्ला तवा बोलला आपल्या लेकाला ॥
"ऊठ कारटया ! काय निजलास ? ।
गोड लागतो काय रे तुला घास ? ।
नेभळट पोरटया ! झालास । गनिमानं शीर कापून टांगलं किल्यास ॥
तंवा फौज घेऊन तयार लेका ! होतास ॥
ततून मूर्खा ! पळून जाऊन राखलं जीवास ॥
मरणाला भित्र्या ! भ्यालास । चल त्याचं मुंडकं आणून टांग वेशीस" ॥
असा झाला फाजलाला भास । विसरला देहभानास ।
ताडकन उठून तलवार लावली कमरेस ॥
खदखडा दार उघडून गांठलं वेशीस ॥ वेशीच्या वरच्या वाशास ।
टांगलेलं होतं लइ दीस । रामरायाचं मुंडकं; मग त्यास ।
तलवार मारुन बोलला तंवा कवटीस ॥ "झालं सरलं आतां तुझ दीस ।
तू पड आतां धरणीस । टांगीन इथं शिव्याचं मुंडक मी खास ॥
चाल
असं म्हणून फिरला माघारा । गेला झरझरा ।
आपल्या घराला । रात्र ती झाली ती कष्टमय फार ।
सूडाचा झाला त्याचा निर्धार । ऐकावा पुढचा सारा प्रकार ॥१॥
चौक २
दुसरे दिवशीं गेला दरबाराला । बोलला आदिलशाला ।
"गप्प काय बसला ? । आला सैतान विजापूरला ।
समजावा नाश सकल झाला । त्याचा काय बंदोबस्त केला ? ॥
पाचोला जसा वार्यालला । रान वणव्याला । दिवटी सूर्याला ।
आदिलशहा तसा शिवाजीला । झाला काय सांगा राव ! मजला ।
पाहिजे आपला विचार कळला ॥ दरबारी थोर अमीर ।
भले झुंजार । पाठवूनि चूर । शत्रुचा करा आज सरकार ।
नाहींतर आपला नाश होणार । शाहिचं चांगलं दिवस सरणार" ॥
आदिलशाह घाबरुन गेला । बोलला फाझलाला ।
"शिद्दी जोहराला । घेऊन करा तुम्ही त्याला ठार ।
नंतर करुन मोठा दरबार । थाटानं देऊ तुम्हां तलवार" ॥
चाल
फाजलखान शिद्दी जोहार झाले तय्यार ॥
मेजवान्या त्यांना थाटाच्या झाल्या घरोघर ॥
त्यानीं फौज घेतली भरपूर । दारुगोळा केला तय्यार ।
किती घोडा होता गणतिला नाहीं हो पार ॥
घोडयांना घातले अलंकार । पायात्नंा बांधले घुंगुर ।
डोक्याला लावले पिसार । मग वरती चढले खोगीर ।
त्यावर बसले रणशूर । बडे बडे होते अमीर ।
ते सारे झाले तय्यार । हातात नंगी तलवार ।
अशी फौज चालली गनिमाला कराया ठार ॥
जंवा जातां जातां तळ देती । तवा ऐका, काय काय करिती ।
मोठमोठे डेरे लावती । गांजाचा नाद हो अती ।
अक्षि पिऊन झिंगुन जाती । मग नाचरंग चालती ।
त्यांचा थाट सांगावा किती ! त्यांना दाणा वैरण किती ।
लागे त्याला नाही गणती । गरिबांना धाक घालिती,
त्यांच्या गंज्या काढुनी नेती । नाहींतर पेटवूनी देती ।
लोकांच्या घरोघर जाती, गाइवासरें धरुनी कांपिती ।
बायकांना ओढुन नेती । त्यांचीं घरं संम्दीं धुंडिती ।
पैसा अडका लुटून नेती । मग हातीं दिवटी घेऊन आगी लावती ! ॥
जवा लोक रडाया लागती । तवा सारे ’खो खो’ हांसती ! ॥
त्यांच्या तोंडात फेंकती माती । इरसाल शिव्या मग देती ।
जर कोणी अंगावर येती । तर त्यांना दोर्याव बांधिती ।
आधीं त्यांचीं नाकं कांपिती । लोखंडी सळ्या मग घेती ।
लाल भडक त्यांना करिती । मग डोळ्यामध्नं खुपसती ।
मग हातपाय तोडती । असे हाल करुन मारिती ।
नाहींतर सुन्ता करुन भाई बनविती ॥
चाल
मराठी राज्याची कळी । नवी उमलली ।
तिच्यावर आली । टोळांची धाड, काय होणार ।
कळेना काय काय घडणार । दैवाचे खेळ कसे हो कळणार ! ॥२॥
चौक ३
ही वार्ता कळली शिवाला । सावध झाला ।
गेला पन्हाळयाला । करुन बंदोबस्त सगळा ।
किल्ल्यावर दारुगोळा चढला । तय्यार सारा लोक झाला ॥
नुकत्याच प्रतापगडाखालीं । झालेल्या भारी ।
लाल तलवारी । पुन्हा पन्हाळगडावरती दिसल्या ।
वीरांच्या हातामध्नं रमल्या । तहानेनं व्याकुळ लइ झाल्या ॥
सूर्याच्या किरणांनीं सारे । चमकले भाले ।
तय्यार झाले । चिरण्याला कंठनाळ सगळे ।
डोक्यावर जिरे टोप चढले । हातांत धनुर्बाण आले ॥
अन्नाचा पुरवठा केला । तय्यार झाला ।
तोंड देण्याला । यवनाला मराठयांचा गोपाळ ।
यवनाला मराठयांचा भूपाळ । यवनाला हिंदधर्माचा लाल ।
यवनाला हिंददेवीचा बाळ । काळाचा काळ्याकुट्ट कळिकाळ ॥
’शिवराय पन्हाळगडावर’ । ऐकून सुभेदार ।
शिद्दी जोहार । फाजलखानासकट तिकडं वळला ।
झटकन किल्ल्याखालीं आला । किल्ल्याला त्यांचा वेढा बसला ॥
चाल
नेताजी पालकर शूर । त्यानं केलं शिद्दीला जेर ॥
परि फौज होती भरपूर । म्हणून होता शिद्दीला जोर ॥
चौक्यांचा पहारा चौफेर । चहुंकडे ठेविले हेर ॥
करि नाच नंगी तलवार । रक्ताला झाली आतुर ॥
चाल
झाले चार महिने तरी होता शिद्दी जोहार ॥
वेढा काढुन जाईना; मग केला शिवानं विचार ॥
नेताजी, बाजी रणगाजी जमविले वीर ॥
मग त्याना बोलला शिवबा जें ऐकावं सारं ॥
"किती दिवस असें हे चालणार ? । दोन वर्सं वेढा बसणार ।
एक वर्स अन्न पुरणार । मग अन्नपाणि सरणार ।
तंवा उपासमार होणार ॥ यवनांच्या पाया पडणार ।
कां आतांच कांही करणार ? ॥" मग बोलले शूर सरदार ।
"कांहीं तोड आतांच काढून व्हावं हो पार" ॥
असा त्यांचा बेत जंवा झाला । तंवा राजा शिद्दीकडं गेला ।
ऐका जी काय बोलला । "तुमचं पडलं फार भय मला ।
द्यावं जीवदान हो मला । घ्यावें पदरीं दीन लेंकराला ।
शहाचा मी अपराध केला । म्हणून आतां पश्चाताप झाला ।
देतों मी त्याच्या मुलखाला । हा किल्ला ठेवा पण मला ।
हा दास शरण तुम्हांला" । असं बोलला सुभेदाराला ।
शिद्दीला आनंद झाला । मग बोलला शिवरायाला ।
"जीव दान आतां तुला दिला । पर किल्लाप पाहिजे आम्हांला ।
तो नाहीं मिळणार तुला" । जर दादा द्यावं चित्ताला ।
सांगीन आतां तुम्हांला । शिवराय फिरुन शिद्दीला काय बोलला ॥
"सुभेदार थोर तुम्ही झाला । अन् किल्ला नाहीं म्हणता कां मला ! ।
द्यावं आतां एवढं पोराला । द्यावं एवढं वचन लेंकराला ।
आज काय तो विचार तुम्ही करा । पुन्हां उद्यां येइन भेटीला ।
तवा काय तें सांगावं मला" । असं बोलून डाव करुन किल्ल्यावर गेला ! ॥
चाल
आनंद फार तंवा झाला । शिद्दी जोहारला ।
धरुन दाढीला । बोलला "अल्ला ! डाव केला ।
काफर खास आतां धरला" । पण त्याचा कावा कायरे कळला !! ॥३॥
चौक ४
समेटाचा बहाणा असा केला । गाफिल झाला ।
पहारा, ढिला पडला । दारुला आला ऊत अनिवार ।
झिंगून गेले अमीर सरदार । खरोखर वेडा शिद्दी जोहार ॥
जो हार सिद्धिचा झाला । रामीं रत झाला ।
तो कां जोहाराला । करील राव जी ! सांगा जोहार ।
जाईल काय त्याला शिव हार । ज्याला सारी हार जाणार हार ॥
जोहार बोलला आपणाला । "यंव रे उंदराला । पिंजर्यांरत धरला; ।
घेऊन जातों विजापूरला । पठयानंच त्याला कैद केला ।
दुसर्यां ना डाव नाहिं जमला" ॥ फाजलखान बोलला आपणाला ।
"सूड पुरा झाला ॥ कापुन शिवाजीला । वेशीला हा मर्द मुंडकं टांगणार ।
बापाचं देणं सारं फेडणार । मोठा मग मानकरी मी होणार ! ॥
चाल
आशेचा असा डोलारा । फाजलान मनांत उभा केला ।
विसरला देहभानाला । दारुनं झिंगुन गेला ।
इकडे विचार काय मग झाला । शिवाजीनं काय बेत केला ।
ऐकावं सांगतों तुम्हाला । हेरानं आणलं खबरेला ।
लगबगीनं बोलला राजाला । "महाराज ऐका वचनाला ।
आज पहारा ढिला लई झाला । जवा गेलो होतो फिरण्याला ।
झोंप आली होती पहार्या ला । अर्धंमुर्धं होतं जागेला ।
त्यांचें बोलणें आलं कानाला । त्यांचं म्हणणं दिसलं हो मला ।
आज गनिम हातीं लागला । कां वेर्थ घ्यावं तसदीला ? ।
अन्‍ त्रास द्यावा आपल्या जीवाला ? । लई दिवस राच्च। जागुन वेडा जीव झाला ॥
आतां पहारा सारा झोंपला । चौकीवाला जोरसे पेंगला॥
अशी बातमी घेउन आला । हा दास आपल्या चरणाला ।
पुढचं सांगणं नाहीं ठावं मला । तें आपलें ठावं आपणाला " ।
असं बोलून बातमी देऊन हेर तो गेला ॥ शिवाजीनं काय बेत केला ।
निवडक घेतला लोकांला । अन्‌ किल्ल्याखालीं चालला ।
दादा ! किल्ला सारा उतरला । चहूंकडं काळोख झाला ।
पर कळलं नाहीं कोणाला । रात्रीला घोर लागला ।
चहूंकडं काळोख झाला । जंवा कृष्ण जन्म बघा झाला ॥
तंवा भूल पडली पहार्याजला । टोपलींत घालुन लेंकराला ।
वसुदेव वाडयांतून आला । तरी कळलं नाहीं कोणाला ! ।
यमुनेला उतार झाला । तवां पार पलीकड गेला ।
असं लहानगं बाळ घेऊन गोकुळांत गेला ॥
थेट तश्शी भूल पहार्याोला । बघा पडली !
एक योग झाला । म्हणून कृष्ण म्हणावं शिवाला ।
शिव कृष्णरुप हो झाला । भेदभाव नाहींसा झाला ।
चौकीवाला घोरुं लागला । सारा पहारा गारद केला ।
शिवाजी पुढं मग गेला । जितका त्याला पहारा भेटला तितका गार केला ॥
रक्ताचा पाट चालला । पर कळलं नाहीं कोणाला ।
पिंजर्यांातून पक्षी उडाला । करा जागं आता शिद्दीला ।
बघ म्हणावं बेरकी उंदराला । करा जागं आतां फाजलाला ।
बघ म्हणावं आतां काफराला । हातावर तुरी देऊन तुमच्या हो गेला ॥
चाल
गर्वाचं घर सदा खालीं । असं लिहिलं भाळीं ।
सत्याचा वाली । सदा प्रभुराय झाला गोपाळ ।
पार्थालाच घातली कीर्तीनें माळ । खळाचा नंद बाळ हा काळ ॥४॥
चौक ५
दोन घटका गेल्यावर झाला । मोठा गलबला ।
जो तो म्हणे "अल्ला ! । गारद केला सारा पहारा ।
रक्तानं रस्ता सारा भरला । देखो सैतान पार झाला" ॥
तंवा आला शिद्दी जोहार । रक्ताचा पूर । पाहून झाला गार ।
चित्तावर आली दुःखाची खार । राग पर त्याचा झाला अनिवार ।
म्यानांतून ओढली तलवार ॥ फाजलखान झाला बेफाम ।
सुटला त्याला घाम । जिरला सारा जोम ।
म्हणे ’क्या हुवा अल्ला ! गेला ’ ! । अल्ला काय सांगणार तुजला ? ।
त्याचा तुला कावा नाहीं रे कळला ॥ मग जोडणी केली लवकर ।
चालले हो स्वार । बारा हजार । पाठलाग केला त्यांनीं जोरदार ।
फौजेवर होते दोन सरदार । फाजल आणि सिद्दी अजीज सुभेदार ॥
चाल
पुढं धावे सूर्य, पाठीमागें केतु असुर ॥
पुढं धावे चंद्र, मागं लागला जणूं राहु चोर ॥
पुंढ धर्म, मागं अधर्म धावतो स्वैर ॥
पुढं नीति, मागं अनीतीचा लागला विचार ॥
स्वातंत्र्य पुढें, मागं लागे दास्य चिरकाल ! ॥
चाल
रात्रिनं काळोख केला । दिसेना कांहीं कोणाला ।
चांदण्यांनीं नाच बंद केला । आभाळांतुन चांद निघाला ।
शिवाच्या डोईवर आला । त्यांनीं कां हो नाच बंद केला ।
असं म्हणतां ? सांगतों तुम्हांला । शिव घोडयावरती स्वार झाला ।
अन्‌ चालला दौड विशाळगडाला । त्याच्या भाळीं चंद्र शोभला ।
पाहवेना हें दैत्य राहूला । चंद्रला आतां गिळण्याला ।
शिवामागं राहू लागला । पाहवेना त्यांना हा घाला ।
म्हणुन त्यांनीं नाच बंद केला । ढगाच्या ओढलं पडद्याला ।
अन्‌ सांगायला गेल्या सूर्याला । काय बोलल्या ऐका सूर्याला ।
"असा असा प्रकार झाला । आमचा पती पृथ्वीवर गेला ।
त्याच्यामागं राहू लागला । त्याला सोडवायला हो चला" ।
इकडं काय प्रकार झाला । ऐका जी सांगतों तुम्हांला ।
भर रात्रीं घोडा फेकला । झाले चार तास हो त्याला ।
वारा मंद वाहूं लागला । पहांटेचा सुमार झाला ।
विशाळ गड दिसूं लागला । तीन कोस किल्ला राहिला ।
आनंद झाला शिवाला । काय बोलला ऐका लोकांला ।
अंबेनं कृपा करुन तारलं आम्हांला ॥ आतां राहिलं नाहीं भय मला ।
आवाज कसला पण झाला ? । ’टप्‌ टप्‌ टप्‌’ हं ! आला ! आला !
शत्रू पाठीवर आला । चला मारा टाचा घोडयाला ।
चला गांठलं पाहिजे किल्ल्याला" । प्रसंग जीवावर आला ।
पुन्हा घोडा दौड धांवला । घोडयांना फेंस बघा आला ।
फाजलखान पाठीवर आला । जीव सारा कासाविस झाला ।
पर शिवा नाहिं बघा भ्याला ! । पुढल्या चौकी सांगिन पुढचा प्रकार जो झाला ॥
चाल
आली आणीबाणीची वेळ । युद्ध जंजाळ ।
रक्तबंबाळ । झाल्यावर कोण कोण मरणार ।
झाल्यावर काय काय घडणार । आपणाला सांगा कसं हो कळणार ? ॥५॥
चौक ६
जवां तांबडं फुटलं पूर्वेला । गनिम शिवाजीला ।
येवून तवा भिडला । परि रात्र नाहिं शिवा डरला ।
तय्यार झुंजण्याला झाला । थोरांना जीव करेकचरा ॥
त्याला नव्हतं जीवाचं भय । होता निर्भय ।
वाटलं पर भय । दुसर्यां ना शिवा प्राणाहून प्यार ।
राज्याचा तेवढा एक आधार । अंबेच्या कंठामधला प्रिय हार ॥
देशाच्या ऐकाजी काजीं । नित्य तो राजी ।
तोच रणगाजी । बाजी प्रभु देशपांडे सरदार ।
चित्ताला होता मोठा दिलदार । शौर्याचा मूर्तिमंत अवतार ॥
चाल
पाहुन असला घोर प्रसंग बाजी पुढं झाला ॥
स्वातंत्र्यवीर रणगाजी बोलला शिवाला ॥
"महाराज ! विनवि तुम्हांला । ऐकावं माझ्या शब्दाला ।
शत्रु हा हांकेवर आला । ही खिंड भली हो मला ।
इथं राहुन धरतो शत्रुला । चार लोक धरती हजाराला ।
द्या संधी येवढी दासाला । करामत दावतों तुम्हांला ।
तवर आपण किल्ल्याकडं चला । आपणासंग घ्याव फौजेला ।
पाचपन्नास ठेवावं मला । जीव चरणीं आपल्या वाहिला ।
जंवर जीव नाहिं रणिं गेला । तवर धोका नाहीं तुम्हांला ।
फेका दौड आता घोडयला । बोलण्यांत फार वेळ गेला ।
आपण आमचा देव दुजा नाहिं देव आम्हांला" ॥
ऐकून अशा बोलला । शिवाचा गळा दाटला ॥
चाल
भर आला त्याच्या हृदयाला, पाहून प्रेमचंद्राला ॥
पाण्याचा लोट खळखळला, उसळून बाहेर आला ॥
चाल
शिवाला आला कळवळा । काय बोलला ऐका ! बाजीला ॥
चाल
"लोक काय म्हणतिल मला,
देवून तोंडाला, एका बाजीला, निष्ठुर गेला ।
कशि दया नव्हती हो त्याला ॥
जसा जीव प्यारा हा मला, तसाच तुम्हांला;
सांगूं कसं बोला, जीव देण्याला ।
आग लागो माझ्या तोंडाला ॥
शत्रूंचा वणवा पेटला, जाळत आला, जाळूं दे मला,
मरण देहाला खास, मग त्याला ।
जपणूक कशाला बोला ?" ॥
ऐकोनि राजवचनाला, बाजीला शोक बहु झाला ॥
तो वीर फिरुन शिवाला, ऐकावं काय बोलला ॥
चाल
"हा जीव प्यारा हो मला, म्हणून देहाला टाकून धरणीला, जातो स्वर्गाला ॥
द्या संधि एवढी दासाला ॥ ज्याला मृत्यु लाभला रणीं,
धर्माकारणीं, त्याची हो जनीं, धन्य ही काया । द्या संधि येवढी दासा या ॥
चाल
विजापूरचा होतों नोकर । तंवा केलं पाप मी फार ।
पण आला योग लवकर । झाली भेट विशाळगडावर ।
आपण केला सारा मोह दूर । चरणांचा घेतला आधार ।
बेईमान होतों मी फार । आज डाग धुवून काढणार ।
आपण जावं आतां लौकर " । शिवबानं केलं उत्तर ।
"तुम्हांसाठीं जातों लौकर । जवां जाईन विशाळगडावर ।
पांच तोफा सोडीन सत्वर । मग समजा झालों मी पार ।
असं म्हणून चालले शिवराय होउन स्वार ॥
चाल
मग बाजी झाला तय्यार । रोखून खिंडार ।
नंगी तलवार । हातामधिं, झाला रुद्र-अवतार ।
सांगिन जी पुढं पुढचा प्रकार । सहाव्या चौकाचा झाला आकार ॥६॥
चौक ७
शिवबांची घोडी कल्याणी । सदा जयदानी ।
घोडयांमधिं राणी । खडकाळ डोंगरामधुनी ।
तशीच मैदानी जशी काय हरणी ।
टाण् टाण् करुनि धांवतांना पाहिली यवनांनीं ।
’इस्कु पकडो’ म्हणुनि । चाल केलि त्यांनी ॥
चौफेर घोडे सुटले । खिंडींतून आले ।
बाण सळसळले । सणणणण करुन अंगीं घुसले ।
घोडे धडधडा खालती पडले । घोडेस्वार थंडगार झाले ! ॥
बाण येती कुठून समजेना । डसती घोडयांना ।
धांवत्या सांपाना । जशा काय झडपा घालती हो घार ।
झाली निम्मी फौज त्यांची थंडगार । रागाने झाले लाल सुभेदार ॥
पाठलाग तसाच करण्याला । जोरानं आला ।
फाजल खिंडीला । परि त्यानं पाहिलं बाजी प्रभुला ।
तीस जण घेऊन राहिला तोंडाला । खिंडीचा रस्ता बंद झाला ॥
जसा राम दिसला रावणाला । कृष्ण कंसाला ।
भीम कीचकाला । बाजी प्रभु तसा फाजलाला ।
दिसला पर जोर त्याला चढला । बाणांचा त्याला सुगावा लागला ॥
बाजीच्या लहानग्या टोळीला । पाहुन फाजलाला ।
हर्ष फार झाला । कां हो ? त्यांचं सैन्य होतं अनिवार ।
इकडं पांच पन्नास बाजीचे स्वार । तिकडं फाजलाचे बारा हजार ! ॥
चाल
फाजलानं केला मग हल्ला । बाजीहि तय्यार झाला ! ।
रणरंग खिंडीला आला । कवटाळी वीर मरणाला ॥
चाल
आली झुंज हातघाईवर । झुलती तलवार ।
ऐकमेकां मार । देती; धुमाकुळ झाला अनिवार ।
शत्रुवर करती जोराचे वार । जिकडं तिकडं झाला एक प्रकार ॥
किती होते मिसळले नाद । देऊ कशी याद ?
उठता पडसाद । खिंडींतून दाद नाहिं कवणा ।
तय्यार सारे वीर मरणा । ठेवील कोण त्यांची गणना ॥
चाल
कोण राम राम बोलती । देवांना हांका मारती ।
कोण धायधाय रडताती । तळमळुन देहांतून कोण प्राण सोडती ॥
कोणाची नाकं ठेंचती । डोळ्याची बुबळं लोंबती ।
छातित्नंा भाले खुपसती । जसे मासे जळीं चमकती ।
आकाशीं विजा चमकती । तलवारी तशा लखलखती ।
रक्ताचे पाट वाहती । डोक्यांच्या कपर्याख ऊडती ।
कोणाचे हात तूटती । बेशुद्ध कैक रक्ताच्या पाटामधिं पडती ॥
निकराचे हल्ले चढविती । ’हर हर महादेव’ असें कैक बोलती ॥
’दीन दीन’ यवन बोलती । किती अर्धमेले बरळती ।
हाणा मारा कापांचा भरला नाद हो अती ॥
शिरकमळं अंबेच्या पायीं वीर वाहती ॥
दशदिशा दणाणुन जाती । तलवारी भाले चमकती ।
एकमेकां घासुन ठिणग्या लाल निघताती ॥
वर मुंडकी उंच उडताती । जणू अंबाबाई चेंडवांचा खेळ खेळती ॥
ऐका जी त्याच वेळेला । विजयश्री आली बघण्याला ।
तिनं हातीं धरलं माळेला । ’माळ घालूं आतां कवणाला’ ।
अशि चिंता पडली हो तिला । जगदंबा बोलली मृत्यूला ।
काय ऐका सांगतों तुम्हांला । "आली विजयदेवी वरण्याला ।
अशी वर्दी द्यावी बाजीला । आणि करावा थाट चांगला" ॥"ठीक ! करतो" मृत्यु बोलला । आणि थाट कराया लागला ।
लाल रंग खिंडीला दिला । रक्तांचा सडा घातला ।
धडांचा कारंजा केला । मांसाचा गालिचा केला ।
हाडकांच्या नक्षी काढल्या । दातांच्या कवळ्या पसरल्या ।
मुंडक्यांच्या केल्या त्यानं माळा । अंबेची वर्दी बाजीला ।
जंवा कळली चेव तंवा आला । जसा वारा उडवी भुश्श्याला ।
तसा बाजी उडवी शत्रुला ॥ रक्ताच्या धारा अंगाला ।
त्याच्या लागल्या, नाहीं पर भ्याला ! । जसा पळस प्रफुल्लित झाला ! ।
त्यानं केलं जेर यवनाला । पर ताजी फौज मदतीला ।
फाजलाच्या आली जोर झाला । म्हणून पुन्हां आला बाजीवर हल्ला ॥
चाल
विजापुरचं आलं पायदळ । फिरुन परतलं ।
सारं घोडदळ । निकराचा हल्ला केला त्यांनीं फार ।
बाजी पर होता मोठा बाणेदार । हल्ला हटवायला झाला तय्यार ॥७॥
चौक ८
आयुष्य सरतं घडोघडीं । काळाजी उडी ।
आल्यावर मढी । पडती; कुडी खास एकदां पडणार ।
पळभर उशीर नाहिं खपणार । जर मरण खास तर प्राण्या !
कसा मरणार ? । जो मर्द मानव झाला । सोडी जीवाला ।
रणांगणिं; त्याला कीर्ति वरणार ॥ पुन्हां चढला बाजीला जोर ।
दिलाय त्यानं मार । केला थंडगार । यवन; तवा झाली होती दोन पार ।
भूमिला झाला मुडद्यांचा भार । अंगावर चालले होते तरी वार ।
जरि झाला शत्रुचा मोड । वाटेना तो गोड । काय अवघड ।
बाजीला झालं सांगतों तुम्हांला ॥ त्यानं पहिला मान फिरवून ।
किल्ला निरखून । नाहीं पर खूण दिसली हो त्याला ! ॥
तोफांचा जाळ दिसेना । म्हणून यातना । होत बघ नाना ।
वाटल त्याला झाला नाश कार्याचा । ज्यासाठीं देह खर्चिला ।
तोंच नाहीं झाला । पार मनीं लागला । घोर----शिवाचा ! ॥
ऐका हा नाद----झाला । कसला हो बोला ।
गोळीबार झाला ! । हाय गोळा आला । लागला वीराला ।
धाडकन पडला भूवर । बाजी रणवीर । जसा काय थोर वृक्ष उन्मळला ॥
चाल
’बाजी पडला ? हाय ! घात झाला’ शब्द हे झाले रणांगणावर ।
त्यानं खचला मावळ्यांचा धीर ।
जिकडं फुटली वाट तिकडं चालले सारे चौफेर ॥
जंवा पाहिलं बाजिन सारं । तंवा बोलला त्यांना रणवीर ।
"मेलों नाहिं मी, फिरा माघार । आणि चढवा हल्ला जोरदार ।
जर मराल स्वर्गाला जाल । जर जगाल सौख्य भोगाल !
जर पळाल, तर नरकाला जाल !! " ॥
चाल
ऐकून अशा शब्दाला, पुन्हां सारा उलटला भाला ॥
निकराचा केला मग हल्ला, हैराण शत्रु हो झाला ॥
मरणाचा विळखा बाजीला, हाय बसला कासाविस झाला ! ॥
चाल
त्याचं लक्ष होतं परि खिळलं विशाळगडावर ॥
बाजी पडला आतां मरणाच्या शय्येवर ॥
जणु भीष्म पहुडला रणीं रणशय्येवर ॥
जगदंबा आणि विजयश्री आल्या लौकर ॥
हातांत माळ घेऊन झाल्या तय्यार ॥
माळ घातली बाजीला, झालं दुःख परि फार ॥
त्याचि दृष्टि होती खिळलेली विशाळगडावर ॥
तोफांचा नाद कुठं गेला ? । बाजीचा गळा दाटला ।
बाजीला घोर लागला । जीव धरुन राहिला आशेला ॥
बाजीचा सरता काळ आला । कुठं गुंतली आस मग बोला ?
जंवर शिवबा पार नाहीं झाला । तंवर आशा राहिली जीवाला ॥
चाल
धूमधडाधडा धड-धडा । धडाडा ! असा तोफांचा नाद कानीं पडला ।
"झालों देवा धन्य !" बाजी बोलला । देहातुन जीव पार झाला ! ॥
धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार । धन्य तो शूर ।
धर्माच्या कामीं जो जो मरणार । त्याचा जयनाद जो जो होणार ।
शाहीर ’पांडुरंग’ गाणार ॥८॥

प्रतापगडचा रणसंग्राम (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार ।
कपटभाव वळखिला खानाचा, केला त्याचा मग संहार ॥ध्रु०॥
चौक १
चंद्रराव मोरे ठार करविला, जावळी जोडली मुलखाला ।
बाई कर्हामड सुभे आदिलशाहाचे हळुहळु आले कबजाला ॥
बातमी कळली ही आदिलशहाला मोठी धडकी भरली त्याला ।
म्हणे "बडा सैतान मत्त हुवा ! क्या करना अल्ला ! अल्ला !! " ॥
आदिलशाहानं लौकर तेव्हां मोठा दरबार भरवीला ।
बडे अमीर उमराव जमविले कितिक हिंदु सरदारांला ॥
कर्नाटकांतुन जल्दी बोलावुन आणलं शहाजी राजाला ।
"धाक घालुन बापाला बंदोबस्त करिन"" आशा ही अल्लीला ॥
चाल
जरि होता शहाजी शाहाचा मसबदार ॥
तरी तोच होता खरा, शहा , मोठा शिरजोर ॥
त्याच्या हुकमावीण एक नव्हतं पान हलणार ! ॥
चाल
बादशाहा शब्द दुभंगला । बाद शाहा झाला ।
शहाजी शहा झाला ! । एवढी त्याची होती फौज तय्यार ।
अल्ली आदिलशाहा झाला गारेगार ! ।
उसना पर आणला जोर त्यानं फार ॥
चाल
आदिलशहा बोलला शाहाजीला । "तुम्ही आमचे नोकर झाला ।
पोरानं पुंडावा केला । कल्याणचा खजिना पळविला ।
वाई, कर्हा ड, बेजार केला । हा आमचा अपराध झाला ! ।
दोन गोष्टी सांगा पोराला । बरं वाईट होईल जीवाला" ।
मग बोलला शहाजी शाहाला । "किती सांगू, हुजूर ! कारटयाला ? ।
काय म्हणता ? लुटलं खजिन्याला ? । हा मोठा अपराध झाला ।
पण पोरटा हूड फार झाला । ऐकेना माझ्या शब्दाला ।
म्हणून ठेवला दूर मी त्याला ! । पुणें प्रांतीं जाहगीरिला ।
आमचंच बापलेकांचं आधीं पटेना एकमेकांला । मग सांगूं काय मी त्याला ? ।खावंद ! आपण आणावं त्याला वठणीला ! लावावी वेसण नाकाला ।
दरदर ओढुन आणावं आपल्या सदरेला ॥ मग दोन शब्द सांगावे त्याला" ।
असं बोलला आदिलशाहाला । मग शाहा बोलला सदरेला ।
शाहाजीचा उपाय सारा थकला । कोण कैद करील हो त्याला ? ।
"मैं जाता हूँ; क्या बात है !" असा नाद आला कानाला ।
मग शाह बोलूं लागला । "जिता धरुन आणावं सदरेला" ।
पैजेचा विडा मांडला । सारा लोक बसला जागेला ।
पर एक कोणी जाऊन घेईना पैजेला ॥ मैं मैं ! करणं काम तोंडाला ।
वैं ! वैं ! करावं लागेल जीवाला ॥ म्हणून कोणी नाहीं उठला ।
पर जरा वेळ गेल्यावर आला । एक वजीर, धिप्पाड झाला ।
अफझुल्ला म्हणति हो त्याला । त्यानं लावला हात पैजेला ।
अन्‌ बोलला काय सदरेला । "मैं गिरफदार करता हूँ " विडा उचलला ! ॥
या अल्ला ! अल्ला ! शब्दाचा गजर जाहला ॥
चाल
शाहाजी राजानं लिहिलं शिवबाला "असा घडला हा प्रकार ।
गाफिल कधीं रे राहूं नको, करि फौजफांटा तूं तय्यार" ॥१॥
चौक २
पान उचललं हिरवं पैजेचं, पिकला परि अफझुलखान ।
’आपल्या हातानं मरण ओढवलंस’ बोललं सदा मन जोरानं ॥
उंट, घोडा, पायदळ जमविलं, बारा हजार खानानं ।
विजापूरहून खान चालला दौड मोठया सरंजामानं ॥
वेशीबाहेर अपशकुन जाहला हत्त्ती बीनीवरचा मेला ।
निशाण पडलं ! ऊर धडधडलं, बेत अल्लाचा ना कळला !॥
धीर धरुन पर पुढं चालला, लागलं गांव पंढरपूर ।
तुकडे केले विठ्ठल मूर्तीचे, नाहीं कुणाचा दरकार ॥
चाल
खान आला तुळजापुरला । छिन्नभिन्न केलं देवीला ।
जात्यानं भरडलं तिला । देवीचा कोप जाहला ।
जगदंबामाई शिवबाच्या गेली सप्नाला ॥ काय बोलली ऐका राजाला ।
"बत्तीस दातांचा बोकड कांपावा मला ॥ रक्तानं त्याच्या माखावं माझ्या अंगाला ॥
मुंडक्याचा नारळ बांध माझ्या देवळाला" ॥ इकडं खान पुढं चालला ।
जातां जातां फोडेलं त्यानं अशा कैक मूर्तीला ! ॥ बाटवले कैक लोकाला ।
घरंदारं लुटली कैकांची त्रास लोकाला ॥ किती बळी पडले चैनीला ।
कितिकांची नरडीं उडविलीं, डोळा काढला ! ॥ कितिकांच्या बायका पळविल्या ।
दारुचा पाट चालला । गुडगुडी लावती तोंडाला । देहभान नव्हतं कोणाला ।
ब्राह्मणाच्या धरती शेंडीला । अन् बांधती उंच झाडाला ।
अंगात्नंा खुपसती भाला । असं हाल करती जीवाला ! ।
अशा अशा करुन खेळाला । खान आला वाई गांवाला ।
तळ दिला वाईला पुढचा बेत करण्याला ! ॥
चाल
भरली घडी खानाची मृत्युच्या आला जवळ जो अफझुल्ला ।
पतंग विसरुन देहभानाला झडपी जोरानं वणव्याला ॥२॥
चौक ३
एके दिवशीं दोन घटका रात्रिला किल्ल्याच्या गच्चीवरती ।
सभोंवार सरदार, शिवाजी राजे होते मध्यावरती ॥
नीलनभाच्या हृदयावरती फुलली चंद्राची कोर ।
स्फटिकासम चांदण्या चमकती शीतळ वेळिं सभोंवार ॥
सह्यगिरीच्या हृदयावरि ’शिवचंद्र’ शोभला सुकुमार ।
नेता पालकर, ताना मालुसरे, तारे झळकती रणवीर ॥
सह्यगिरीवर जणु शिव बसले घेउनियां निज परिवार ।
प्रळयकाळ यवनांचा आला ! झाला महिवर अवतार ॥
रानफुलांचा गंध पसरला मंजुळ वार्यानच्या लहरी ।
प्रतापगडच्या किल्ल्यावरुनी यश राजाचें ललकारी ।
गडबड धडपड आरडाओरड रड भूमिवरची सरली ।
सर्व शांत जग झालं ऐकली पर वाघाची उरकाळी ! ॥
चाल
करवंदी झाडी कांटेरी कुंप करणार ।
धबधबे खळाळत नित्य गाणं गाणार ।
चाल
उंच उंच अति उंच धांवली आभाळांतुन शिखरं किती ।
चित्रं काढलीं जणुं शिखरांचीं नभोमंडळाच्या वरती ॥
चाल
अशा वेळिं एक हेर किल्ल्यावरती चालला ॥
झपझपा चढुन गड राजाजवळ पोंचला ॥
मग बोलला शिवरायाला । "रामराम ! ऐका खबरेला ।
विजापूरच्या ऐकलं बातमीला । कां आपण वाई प्रांत घेतला ।
कल्याणचा खजिना पळविला । म्हणून बादशहा लालेलाल झाला ॥
घेण्याला आपल्या सूडाला । त्येनं धाडलं अफझलखानाला ।
बारा हजार घेऊन फौजेला । आतां येईल वाई प्रांताला ।
अशी बातमी आली कानाला" । असं बोलून हेर तो गेला ! ।
तय्यारीचा बेत मग केला । गडाखालीं मावळा सरदार सारा उतरला ॥
रातोरात पल्ला मारला । एक चालला बंदोबस्ताला ।
एक चालला फौज तय्यार खडी करण्याला ॥ एक दारुगोळा बघण्याला ।
असा सारा मावळा सरदार लागला कामाला ॥
चाल
शरदऋतूच्या निळ्या नभामधीं कडकडाट हा बिजलीचा ।
झाला एकदम जीवघातकी खेळ कळेना दैवाचा ! ॥३॥
चौक ४
वाईगांवाहून त्वरित धाडला कृष्णाजी भास्कर वकिल ।
प्रतापगडला अफझुल्लानं, सांगतो पत्र काय काय लिहिलं ॥
"द्यावा मुलुख परतून शाहाचा, घ्यावी भेट या वजिराची ।
म्हणाल ’नाहीं’ तर मग आतां आशा सोडावी जीवाची" ! ॥
चाल
कृष्णाजी भास्कर प्रतापगडिं पोचला ।
संदेश खानाचा शिवाजीस कळविला ।
त्या रात्रीं कृष्णाजी प्रतापगडिं राहिला ।
चाल
मध्यरात्रीचा वेळ जाहली रात्रहि बुडली झोपेंत ।
शिवरायानं त्या वकिलाला नेलं अंबेच्या देवळांत ! ॥
देवी भवानीपुढं बोलला राजा कृष्णाजी पंतास ॥
"सांगा बेत खानाचा, घातली शपथ देवीची तुम्हांस ॥
चाल
या भूवरचे तुम्हांस म्हणति भूसुर ।
आम्ही नित्य ठेवावं मस्तक चरणावर ।
कां पाप जोडतां बनुन यवन नोकर ? ।
केसानं कांपतां गळा सोडा अविचार ।
चाल
मस्तक चरणावरी ठेवतों सांगा बेत त्या खानाचा ।
देवी भवानी असे साक्षिला घात करुं नका स्वजनांचा ।
चाल
कृष्णाजीपंत भास्कर । विरघळले झाले मनिं गार ॥
चाल
डबडबला पाण्यानं डोळा । अंगीं कंटाळा ।
कंप देहाला । मोहाचा कडा पार कोसळला ।
विवेकाचा डोळा उघडला । अभिमान आला । बोलला शिवबाला ॥
चाल
"जय नमोऽस्तुते जगदंबे पदरीं घे मला ॥
शिवराया ! धन्य तूं, यश येईल रे तुला ॥
देहभान नव्हतं रे मला । रोग जडला होता दृष्टीला ।
अंजन भेटलं डोळ्याला । स्वातंत्र-बुद्धि-कोकिला ।
आनंद देती जीवाला । महाराज ! जीव वाहिला आपल्या चरणाला ॥
खानाचा कपटभाव झाला । जिता मेला धरणं तुम्हाला खानाचा मानस झाला ॥
म्हणून त्याला एवढा भेटीचा आला उमाळा" ॥
असं बोलला कृष्णाजीपंत शिवरायाला ॥
शिवराय बोलला मावळ्याला । "हा पेंच आला जीवाला ।
काय करावं सांगा या वेळा" । तानाजी बोलूं लागला ।
"महाराज ! बोलवा खानाला । किल्ल्याच्या खालच्या बाजूला ।
’भ्यालो’ असं दाखवावं त्याला । मग करुं खानाचे तुकडे उडवु मुंडक्याला !" ॥
शिवराय बोलले लोकांला । "हा सल्ला योग्य नाहीं झाला । असं करणं योग्य नाहीं मला !
शत्रु मित्र कोणी जरी झाला । तरी न्यायमार्ग थोरांनीं पाहिजे घेतला ॥
पर आणूं त्याला भेटीला । मी जाईन भेट घेण्याला ।
जर रंग घाताचा आला । तर असा सज्ज युद्धाला ।
नाहींतर जाऊं दे खान आपल्या देशाला" ॥
असं बोलला राजा मावळ्याला । पंताजी गोपिनाथ वकिल त्यानं नेमला ॥
चाल
काय निरोप धाडला खानाला सांगिन पुढच्या चौकांत ।
वीर मर्दाचा गुण गौरव करि कवी आपल्या कवनांत ॥४॥
चौक ५
पंताजी गोपीनाथ चालला खानाच्या वकिलासहित ।
आला वाईला पत्र राजाचं दिलं खानाला सदरेंत ॥
रघुरायाचा अंगद जैसा शिवरायाचा पंताजी ।
भला सराईत, मिठ्ठा बोलका, नाहीं ठाव कधीं इतराजी ! ॥
पत्र लिहिलं जें शिवरायानं तेव्हा अफझुलखानास ।
सांगतो आज मी तें तुम्हांला, जाग करावं कानास ॥
"पर्वत कुणीकडं ? कुठं मातीचा कण ! सिंधु तो कुठं नाला !!
कुठं सूर्य कुठं मशाल साधी ! कुठं वाव त्या बेडकाला ! ॥
कुठं इंद्राचा ऐरावत तो कुठं शाम्भटी तट्टाणी ।
कुठं सिंह, कुठं उंदिर झाला ! मोठी शाहाची अमदानी ॥
चाल
खानसाहेब घ्यावा मेरा सलाम द्यावं अभयाला ।
मोठी धडकी भरली जीवाला । वाई प्रांतिं पुंडावा केला ।
हा मोठा अपराध झाला । सारा मुलुख देतों शहाला ।
पण द्यावं जीवदानाला ! । डोई लावतों आपल्या पायाला ।
नुसतं नांव ऐकल्यावर आला घाम अंगाला । मग कोण करिल दोन हात बोला ? ।
आज चुकलों, शरण तुम्हांला" । असा निरोप धाडला खानाला ।
खानाला संतोष झाला । दाढीवरनं हात फिरविला ।
गांजाचा झुरका मारला । आणि खान बोलूं लागला ।
"अहमदुल्लिला ! बंदे का क्या रोब है !
मेरा सिरफ नाम ही सुनकर उसका पसीना पसीना हो गया !
वाहवा अफझलखानबहादर !" । कृष्णाजीपंत बोलला !
"जंवा बातमी ऐकिली कीं, आपण आला युद्ध करण्याला ।
आणि आणलं इतक्या फौजेला । तवा टाकलं अंग धरणीला ।
त्यानं लावले डोळे आकाशाला । जसं भूतखेत झडपावं तसा जाहला ।
मग आणलं त्याला ताळ्याला । त्याचा वाण सारा बदलला ।
तो येणार नाहीं भेटिला । तर आपण जावं त्याच्या भेटिला ।
अन साधावं आपल्या बेताला" । "अच्छा है" खान बोलला ।
तसा निरोप धाडला शिवबाला । खानानं तळ हालवला ।
पसरणीच्या घाटावरनं चालला प्रतापगडाला ॥
चाल
जा खाना, जा दुष्टा, जल्दी जा, ओढवलं सत्वर मरण ।
मृगपंचानन सह्यकंदरी करिल तुझी रे धुळदाण ॥५॥
चौक ६
भेट घेण्याला अफझुल्लाची मंडप श्रीशिवरायानं ।
प्रतापगडच्या खालीं सजविला नाहीं तिलोकीं उपमान ।
निळा चांदवा दिला छानदार चंद्रतारका त्यावरती ।
झालर तांबुस सभोंवार ती शोभा देई घडी घडीवरती ॥
हंडया झुंबर किती लटकती लौलक झळके त्यावरती ॥
आरसे टांगले किती मनोहर, काय राजाला हो कमती ॥
नीलमण्यांचे खांब बनविले, लोंबती मोतियांचे घोस ।
शिवरायानं क्षुद्र खानाचा किती पुरवावा तो सोस ! ॥
वेलबुटया काढल्या भिंतीवर चित्रं काढलीं रंगाचीं ।
इंद्रधनुष्या रंग लाजवित, अपार शोभा मंडपाची ॥
चाल
जमखाने शुभ्र हांतरले शोभे भरजर ।
गाद्या गिरद्या तिवासे तक्के ठेविले त्यावर ।
गालीचे पसरले उंची कैक त्यावर ॥
चाल
कुबेर अलकापुरी घेऊनी जणूं वाटला तो आला !
रत्ना कर करिं रत्नव घेउनी, विष्णु सोडि वैकुंठाला ॥
कुणी कधी ऐकला असा हा विष्णुशिवांचा हो मेळा ।
छत्तीस आंकडा सदैव त्याचा गब्बार एक दुसरा दुबळा ॥
उडती फवारे कारंजांचे बाग फुलली हिरवीगार ।
यज्ञभूमी श्रीशिवरायानं केली जणूं काय तय्यार ! ॥
चाल
आधींच पर्वतावरचा देखावा गोड ।
त्यात असा सजविला मंडप नव्हती तोड ।
किती कसब शिवाचं होतं मोठं बिनजोड ।
चाल
मंडप झाला, खानहि आला, झाला भेटिला तय्यार ।
पण तो आला फौज घेऊनी हत्यारबंद दीड हजार ॥
चाल
मग निरोप धाडला शिवबानं अफझुलखानाला ॥
"फौजेचं काय काम कळलं नाहीं हो मला ॥
जर आणतां एवढया फौजेला । तर कसला भेटू तुम्हाला ।
आत्ताच जीव आला घाईला । जर एकटे याला भेटिला ।
तर कसं तरी भेटणं तुम्हाला !" । खानाला वाटलं ते वेळा ।
शिवाजी शिवाजी तो केवढा ? । सहज घेइन खाकुटींत त्याला ।
अन् चिरडीन त्याच्या नरडयाला ॥ भेटिला एकटं जाण्याला ।
कृष्णाजी पंतांनी ही सल्ला जेव्हां त्याला दिला । तवा खान चालला भेटिला ।
शिवाजीनं ठेवली बडदास्त मोठी ते वेळा ॥ मग खान आला सदरेला ।
मानमरातब घेऊन गारेगार झाला ॥ वर हांसरा चेहरा केला ।
पर आंता ’दगा’ राहिला । ’कधी भेटिन एकदां मी’ असं झालं हो त्याला ॥
चाल
आला आला ! रे सर्जा शिवाजी खाना !
आतां तू सांभाळ । नागसापापर चपळ जाहला घेईल चावा तो काळ ॥६॥
चौक ७
आला भेटिचा दिवस सकाळिंच केली पुजा जगदंबेची ।
हात जोडुनी शिवरायानं करुणा भाकली अंबेची ॥
"आई ! संकटीं कोण तुझ्याविण सोडविणारा दीनाला ।देइ आशीर्वाद आज माय ! तूं घेई पदरिं या लेंकराला !" ॥
डोळे झांकले शिवरायानें, चमत्कार, दिसला त्याला ।
जगदंबा पुढं उभी राहिली, वर्णूं कसं त्या स्वरुपाला ! ॥
किरिट डोक्यावर, केंस पाठीवर, लांबलचक काळे भोर, ।
कुंकुम शोभे रुंद कपाळीं, कंठीं मोतियाचा हार ॥
शंख चक्र करि पद्म घेतलं त्रिशूळ भाला तलवार ।
सिंहावर होती बसलेली खालीं होता महिषासूर ॥
जबडा लाला सिंहाचा, डोळेही लाल, पंजेही लाल अती ।
दिला पोटावर पाय सिंहानं त्या दैत्याच्या---अशी मूर्ती ॥
एका हातामधिं महिषासुराचं डोकं धरलं जगदंबेनं ।
थेंब रक्ताचे टपटप गळती पट चालला भूवरनं ।
हंसरं तोंड देविचं जाहलं बोलली देवी शिवरायाला ।
"आशीर्वाद हा दिला लेंकरा । होशिल भारी कळिकाळा ॥"
चाल
देविनं शिवाच्या शिरीं मुगुट घातला ।
असुराच्या रक्ताचा टिळा त्यास लावला ।
हा असा देखावा शिवाजीनं पाहिला ॥
चाल
डोळे उघडले, गुप्त जाहली देवी, दिला साक्षात्कार ।
नंतर शिवराजानं जमविले सर्व मावळे सरदार ॥
मोरो, शाम, रघुनाथ पेशवे, नारो शंकर माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी, शूर जिवाजी, पिलाजी, नेता, तानाजी ॥
चाल
मग बोलला राजा गहिंवरुन सार्याू मावळ्याला ॥
"काय सांगू तुमच्या प्रेमाला ? ही राहिली तुमची आठवण जन्मोजन्माला ॥
राखायला माझ्या जीवाला । तुम्ही सोडलं सार्या् सुखाला ।
घरदारं सोडली वार्यालला । उतराई होऊं कसा बोला ।
काय सांगूं वेळ कशि येईल कोणत्या वेळा ? ॥
जगलों वाचलो येईन भेटिला । नाहींतर----" ।
शिवबाचा कंठ दाटला । पाण्यानं डोळा दाटला ।
ढळढळा सारा मावळा रडूं लागला ॥
प्रेमाचा दोर भला मोठा खंबीर झाला ।
पर दांत लावेना कमळाला । जवा कमळामाजिं आडकला ! ।
प्रेमाचं कोडं समजेना ब्रह्मदेवाला ! ॥ "जगलों वाचलों येईन भेटिला ।
नाहींतर राज्य हें द्यावं उमाजीराजाला ॥
रामराम दादांनो घ्यावा आतां या वेळां " ॥
मग सारा मावळा बोलला । हुंदक्यानं आला उमाळा ।
"जाऊं नको राजा ! भेटिला ! तो खान कपटी बघ झाला ।
बरं वाईट होईल जीवाला !" मग तान्या बोलूं लागला ।
"मी जातो शिवा म्हणुनशान त्याच्या भेटीला ॥
अन् उडवतों त्याच्या मुंडक्याला " । पर राजा त्याला बोलला ।
"फसवणं कधीं खपणार नाहीं देवाला ॥ मी जातों त्याच्या भेटिला ।
तुम्ही असा जाग जागेला । कमजास्त झालं तर यावं घुसुन त्या वेळा" ॥
चाल
जागो जागेला मावळ ठेवला दर्यासखोर्यांघतुन तय्यार ।
शाहिर पुढच्या चौकीं सांगणार पुढं घडलेला प्रकार ॥७॥
चौक ८
पोशाख केला कसला राजानं सांगतो आतां मी तुम्हांला ।
वर्णन कधिं कां शिवरायाचं शिणविल माझ्या वदनाला ॥
टोप शिरीं पांढरा शोभला, तुरा मोत्याचा, त्यांत हिरा ।
शिवमौलींतुन शुभ्र चालला ओघ गंगेचा काय खरा !
खांद्यांतून जणु गुप्त जाहली शिवरायाच्या सुरगंगा ।
उजव्या हातिं तलवार रुपानं प्रगट जाहली धवलांगा ! ॥
आंत पोलादी सील, पांढरा झगा शोभे अंगावरती ।
मुसेजरी सुरवार पायाला बंद लोंबती त्यावरती ॥
उजव्या हातामधिं बिचवा, वाघनख होत राजाच्या पंजाला ।
पट्टा जिवा म्हाल्यानें घेतला, तलवार लटके कमरेला ॥
जिजाबाईच्या भेटिस गेला ठेवलं डोकं पायावरती ।
शिवनेत्रांतुन टपटप गळले थेंब पायावर, धन्य सती ! ॥
हळुच उठवलं शिवरायाला, अवघ्राण मस्तकिं केलं ।
जिजामाईनं शिवबाळाला गालबोट तें लावियलं ! ॥
जिजा बोले, "कां शिवबा ! डोळे आले पाण्यानं भरभरुन ।
शूर पुत्र तूं, जा प्रेमाचा बंध तोडुनी हौसेनं ॥
क्षत्रियकुळी मी जन्म घेतला, तूंहि तसा क्षत्रियपुत्र ।
आशीर्वाद हा दिला बाळका ! काय करिल अफझुल कुत्रं ? "
दृष्ट काढली शिवरायाची, दहीं साइचं तळहातीं ।
दिलं आईनं; शिवबाळानं चाटुन खाल्लं गोड अती ! ॥
किल्ल्यावरच्या उंच तटावर फडफड करि भगवा झेंडा ।
फडफड करुनी त्यास बोलला , ’फाड ! फाड ! रे तो मेंढा’ ! ॥
चाल
आठवलं मनीं शिवबानं रामदासाला ।
चुचकारलं कृष्णेला वरती स्वार मग झाला ।
धडधडा सात तोफांचा नाद जाहला ।
चाल
दुपारची भरवेळ जाहली, सूर्य छत्र धरी किरणांचं ।
वार्याीपर वेगानं चालला राजा, दैव त्या खानाचं ! ॥८॥
चौक ९
कृष्णी चपळ बहु शिवरायाची मोठी लाडकी ती झाली ।
चालली घोडी चौफेर सारखी, लाज वार्या ला ही आली !! ॥
टाप घोडिची कणखर मोठी, जमीन भ्याली दणक्यानं ।
झाडंझुडपं किति टकमक बघती पळति मागंमागं भीतीनं ॥
मंडप आला, राजा उतरला, नेली घोडी दूर हुजर्या नं ।
शिवबा बोले त्या हुजर्यााला, "जपा घोडीला प्रेमानं !" ॥
दबकत दबकत सर्जा शिवाजी चालला भेटिच्या मंडपांत ।
आनंदाच्या उकळ्या उसळती वेडया खानाच्या हृदयांत ! ॥
शिवरायानं सलाम केला खूष जाहला मनिं खान ।
म्हणे शिवाला, "असा शाहाला नाहिं कधीं मिळला मान" ! ॥
खान उठुन राजाला बोलला, "शिवा ! एक आशा मजला ।
मुलासारखा तूं मला वाटतोयस कडकडून भेटावं तुला" ॥
"ठीक ! ठीक ! शिवराय बोलला, हरकत नाहीं मुळिं आतां ।
वडिलही तुम्ही मला जाहला, नसे मनाला मुळिं चिंता" ॥
चाल
खानानं हातीं कवटाळलं शिवरायाला ॥
खान केवढा धिप्पाड ! शिवबा पोर वाटला ॥
खानानं कवळ मारली शिवबा दचकला ! ॥
शिवबाचं मुंडकं त्यानं दाबलं डाव्या बगलेला ॥
प्रसंग जीवावर आला । पर शिवबा चपळ फार झाला ।
ओळखलं त्याच्या बेताला । अन् हिसडा मारला त्याला ।
वाघनखं भिडली पोटाला पंजा मारला ! ॥
खानाची आंतडीं काढलीं, फाडलं पोटाला !
खान हत्ती फार खवळला । पर करतो काय सिंहाला ?।नानं केला वार जिरेटोप छाटला ॥
पर इकडं सर्जानं पट्टा वेगिं चालवला ॥
जणुं नारसिंह प्रगटला । खांद्यात्नं चिरलं खानाला ! ।
"खान ’लवा लवा’ बोलला ! " । खान ’पट्टा पट्टा’ बोलला ।
आतां कंचा पट्टा ? सर्जानं घातल्म झडपेला ! ॥
बघा झालीं त्याचीं दोन छकलें आला भूमीला ! ॥
एक मुंगी मोठया हत्तीच्या घेइ जीवाला ॥
मुंगसाचं पिल्लु करि ठार नागसापाला ॥
अभिमन्युबाळ करि जेर कितिक लोकाला ॥
श्रीकृष्ण मारी कंसाला । रामचंद्र मारी रावणाला ।
सर्जाची खूण लोकांला । लगबगीनं जमला मावळा ।
बंडा सय्यद करतो वाराला । पर जिवा म्हाल्यानं बंडा सय्या पुरा केला ॥
घनघोर केलं युद्धाला । रक्ताचा पाट चालला ।
शिवराय वेगानं आला । खानाच्या छाटलं मुंडक्यांला ।
अन् मुंडकं घेऊन शिवराय किल्ल्यावर गेला ! ॥
रक्तानं माखलं देवीला । मग मुंडकं टांगलं बुरजाला ।
यवनांचा मोड पुरा झाला । पळ काढला यवनी फौजेनं, आनंद झाला ! ॥
दुंदुभी झडूं लागल्या कर्णा वाजला ! ॥ नऊ तोफा झडल्या, लोकाला आनंद झाला ! ॥
गुढया तोरणं घरदाराला । उभी केली उत्साव केला ।
’धन्य धन्य अवतारी राजा’ डंका गाजला ! ॥
चाल
मागं रचला अज्ञानदासानं शिवरायाचा पोवाडा ।
भाग्य त्याचं राजानं दिला एक तोडा सोन्याचा आणि घोडा ॥
कोण मला देणार सोन्याचा तोडा शेराचा आणि घोडा ? ।
दाता गेला ! आज फार तर पायिं घालतिल हो खोडा ! ॥
ये शिवराया ! पुन्हां कधीं तूं येशिल तोडा देण्याला ! ॥
नित्य उभा कर जोडुनि तुमच्या ’पांडुरंग’ हा कवनाला ॥९॥

शिवप्रतिज्ञा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।
येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।
मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥
चौक १
एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, "चल बाळा । जाऊ दरबाराला ॥
जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।
बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा" ॥
"चला, बाबा !" बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।
पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।
शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । कारंजे केले ।
तुषार उडविले । इंद्रधनुष्यांनीं कमान जिथं केली ! ।
अशी शोभा जिथं रंगली । आस भंगली । तिथंच, बघा आली ।
शिउला ओकारी !! ॥ सोन्याच्या फुलांचा सडा । कुबरे जिथं खडा ।
वाद्य झडझडा । झडति जिथं रंग आला नाचाला । जिथं प्राणीमात्र रंगला ।
तिथं शिवबाला कसा वीट आला । ठावं कोणाला !! ॥ तंव शहाजी बोले शहाला ।
"शिवबाळ आला । आपल्या भेटीला । कर रे बाळा ! कुर्निसात मानाचा । हा घ्यावा मुजरा
चाल
पोराचा । बंदा हुकमाचा । मुलगा हा आमुचा" ॥
शिवबाळ बोलला बापाला । "नमावं देवाला ।
नमावं तुम्हांला । नमणार नाहीं कधीं पण याला ।
अपमान झाला । राग मज आला ! ॥
हा ’बंदा’ नाहीं शाहाचा । बंदा रामाचा ।
पठया मानाचा । नमणार मान नाहीं कधीं याला ॥
राहवेना बाबा ! हो मला । जातो मी घरा । आतां या वेळा " ! ॥
चाल
असं म्हणून दरबारात्नंा बाळ थेट चालला ! ॥
जसा छावा सिंहाचा नाहीं ठाव भीतिला ! ॥
रस्त्यानं त्याअ वेळेला । एक ब्राह्मण नेई गाईला ।
तिचं वासरुं होतं पाठीला । येक खाटिक सुरा घेऊन मागं लागला ॥
’जब करतो गाय’ बोलला । पाणी गाईच्या हो डोळ्याला ।
झाली कावरीबावरी त्या वेळा । हंबरडा फोडूं लागली, लागली कांपायाला !! ॥
हजारों लोक बाजूला । पर बघा कोण पुढं आला ? । शिवबाळ वेगानं आला ।
अन् खाटकाचा हात उडविला । सारा लोक थक्क जाहला ! ।
कुजबुजती एकमेकाला । "आतां काय होईल ठाव देवा ! कोणाला" !! ।
शिवबाळ घरीं परतला । पर् त्याचा निर्धार झाला ।
"हिंदवीराज्य" करण्याचा हिय्या घेतला !! ॥१॥
चौक २
हिंदवी राज्य करण्याला । पुणें प्रान्ताला ।
शिवबाळ गेला । मावळीं बारा आणलीं सारीं कबजाला ॥
ध्रुवबाळ याच्या जोडीला । एकटा शोभला । निश्चय केला ! ॥
मावळ्यांची दुःखं ओळखून । द्रव्य देऊन । समाधान करुन ।
जोडली मनं त्यांचीं आपल्या कार्याला ॥ जशीं वानरं रामचंद्राला ।
यादव कृष्णाला । तसा मावळा झाला । शिवबाळाला ! ॥
चाल
नरस प्रभु रोहिला खोर्याळचे । देशपांडे होते त्या वेळा ॥
दादाजी मुलगा हो त्यांचा । दिलदार चित्ताचा झाला ॥
नरस प्रभु ऐंशी वर्साचा । पर सुरकुती नव्हती गालाला ॥
मिश कल्ले पांढरे जरी झाले । तरी लाली होती डोळ्याला ॥
दांत किती घट्ट हो सांगू ? । जणू वज्रपंक्ति तोंडाला ! ॥
हरबरे घट्ट मुलखाचे । करि चूर एका दणक्याला ! ॥
धार्मिक मोठया भक्तीचा । नित्य पूजी रोहिडेशाला ।
चाल
पर विजापुरचा अंकीत ॥ नरस प्रभु होता ॥
वसूल जमा देत ॥ रोहिडया खोर्याुचा यवनी राजाला ! ॥
चाल
एके दिवशीं दृष्टादृष्ट झाली । नरस प्रभु आणि शिवबाची ।
दृष्टिला दृष्टि ती भिडली । गांठ पडली जीवाशिवांची ॥
चाल
मग बाळ चौदा वर्साच बोले नरसाला ॥
"होतो विजापूर गांवाला । खाटीक कांपी गाईला ।
मी उडवलं त्याच्या हाताला । भवानी आली सप्नाला ।
रोहिडेश आला सप्नाला । अन् मला बोलूं लागला ।
’रे बाळा ! येऊं दे चढती दौलत तुला ! ॥
तू राख गायधर्माला । सारा मावळा येईल धांवून तुझ्या मदतीला ॥
कर बाळा ! आपल्या राज्याला, । असा दृष्टांत हो जाहला ! ॥
आतां राखा लाज पोराची यावं मदतीला" ॥
नरस प्रभु आणि दादाजी देती वचनाला ! ॥
चाल
नरसाजी आणि दादाजी । मोठे रणगाजी ।
जोडले निज कापी । झाला आरंभ मोठया कार्याला ।
शिवसांब सहाय हो ज्याला । अडथळा त्याला । कसला नाहीं झाला ! ॥२॥
चौक ३
रोहिडयाच्या डोंगरावर । जमले रणवीर ।
करण्या निर्धार । बेडी आर्यांची दूर करण्याला ॥
धन्य धन्य दिवस तो झाला । धन्य तो मेळा ! ।
अजरामर झाला ! ॥ गुरु कोंडदेव दादाजी ।
बाल शिवाजी । नरस, दादाजी । मावळे जमविले कैक त्या वेळा ।
सांबाच्या देवळामधीं । आणिल काय विधी ! ।
वेळ तशी कधीं । सुदिन तो झाला ! ॥
रोहिडेश सांब साक्षिला । ठेवून त्या वेळा ।
मध्यरात्रीला । बोलला शिवबाळ सार्या लोकांला ॥
"का जमलों आपण या वेळा । आज या स्थळा । सांगतो तुम्हांला ! ॥
चाल
घरदार लुटलं संपूर्ण । हैराण झालों जुलमानं ॥
हरघडी गाईची मान ॥ किती तुटती नाहीं त्या मान ! ॥
जर राखल नाहीं घरदारा । धिःकार आमच्या जगण्याला ! ॥
जर राखलं नाहीं गाईला । थू ! थू !! रे आमच्या जगण्याला !! ।
हिंदवी राज्य करण्याचा । आज आम्ही निश्चय केला ॥
चाल
काय भिताय आपल्या मरणाला ! ।
आज नाहीं उद्यां तर घाव मरणाचा आला ! ॥
नर्कांतले किडे नर्कात करती मौजेला ! ॥
काय तुम्ही तसले हो झाला ? । छे !
माणूस म्हणती तुम्हांला । म्हणून सांबाच्या शिवा पिंडीला ।
अन्‌ घ्यावं आतां शपथेला ।" असं शिवाजी हो बोलला ।
रोहिडयाच्या डोंगरानं, पुन्हां पुन्हां तोच बोल त्यांना सांगितला !! ॥
सांबाच्या पिंडीच्या भोंवती जमला मावळा । अन् पिंडीवरती ठेवलं हाताला ।
अन्‌तिथं घेतलं शपथेला !! ॥ धन्य ! धन्य ! दिवस तो ! धन्य रोहिडा झाला !! ॥३॥
चौक ४
देवळांत जमलेले लोक । होते कित्येक ।
त्यांत पर एक । होता स्वजनांचा घात करणारा ! ॥
जणू फुलं फुलली हो छान । दरवळलं वासाचं रान ।
पर लपला आंत दुष्मान । भुजंगम काळा ॥
जणुं राजहंसाचा मेळा । रोहिडयावर जमला ।
एक पर बगळा । त्यांत होता ठाव नाहीं कोणाला !! ॥
सापाचा विळखा चंदनाला । टोळ हिरव्या हिरव्या पानाला ।
वरी वरी दिसतो एकरंग । भिन्न अंतरंग । नित्य पर संग दोघांचा झाला !! ॥
नांव त्याचं होतं बाळाजी । सासरा नरसाजी । मेहुणा दादाजी ।
ज्याचा, तो हा झाला काळ देशाला । त्यानं लिहिला खलिता शहाला ।
कां "बंडाचा झेंडा उभा झाला । शिवाजीनें नरस वश केला ।
कितिक मावळा । झेंडयाखालीं जमला ! ॥
रोहिडयाच्या डोंगरावर । ऐका, सरकार ! ।
असला हा घोर । काल रात्रीला बेत हो झाला !!" ॥
फितुरीचा संचार झाला । तिनं त्याला खिळखिळा केला ।
अभिमान गेला । घातकी बनला ! ॥
चाल
फितुरानें देश किती मिळाले हो मातीला ॥
किती पापी चांडाळ गेले घोर नरकाला ! ॥
नखं दीड वीत बोटाला । लाली लालबुंद डोळ्याला ।
ते सुळके दांत तोंडाला । दीड हात जीभ टाळ्याला ।
रक्ताचा टिळा डोक्याला । हाडकांचा सांगाडा-असा आकार झाला !! ॥
जिथं जिथं गेली तिथं तिथं नाश तिनं केला ॥
रायगडच्या किल्ल्यावर गेली, माचा कोसळला ! ॥
झांशीच्या बुरुजावर गेली, बुरुज ढांसळला ! ॥
फितुरीच्या जळवा देशाला । सारं रक्त खाऊन देश निस्त्राण केला !! ॥
असो ! आतां ऐका गोष्टीला । असं पत्र धाडलं शाहाला । अन्‌ बाळाजी घरीं परतला ।
मग बोलला काय बायकोला । सांगीन दादांनो ! आतां पुढच्या चौकाला ॥४॥
चौक ५
बाळाजी गेले बायकोला । "ऐक गडे ! बोला ॥
उदयकाळ आला । झाले गेले हाल गरीबीचे ।
मान येतील सुभेदारीचे । सोन्यामोत्यानं ग फुलवीन ।
असा योग छान । आला या काळा ॥
शिवाजीचा नाद लागला । तुझ्या ग बापाला । तुझ्या भावाला । मावळा जमविला ।
बेत त्यांनीं केला ! ॥ रोहिडेश सांब साक्षिला ।
बंडाचा झेंडा उभा केला । आर्याचं राज्य स्थापावं ।
शिवानं बोलावं । थेरडयानं ऐकावं । चाळा असा केला !! ॥
चाल
साठी बुद्धि नाठी ! हे बोल !
खरे झाले ! गेला ग तोल ।
आतां दरी दुःखाची खोल ! ॥
शिवाजीनं पुंडावा केला ।
नरस प्रभु सामीलहि झाला ।
खलिता मी शाहाला असा लिहिला ! ।
चाल
आतां बादशाहा खूष होईल । बढती देईल ।
सुभेदार करील । खास ग मजला ।
मग हिर्यारमाणकानं फुलवीन । सोन्यामोत्यानं ग नटवीन ।
उमलेल हृदयाचं पान । असा योग छान ।
आला या काळा" ॥ ऐकून पतीचे बोल । सतीला खोल ।
मंचकीं घोळ दुःखाचा झाला ! ॥ कीं चवताळली वाघीण ।
काय फणफणली नागीण । पतीस पाहून ।
बोलली बोला ॥ "कधीं नाहीं उलट बोललं ।
वचन मोडलं । दुःख नाहीं दिलं कोणत्या वेळा ।
बाई ! केलं केवढं हें पाप । माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
राहवेना आतां हो मजला । ऐकावं चार शब्दाला ।
बायकोचा शब्द जरी झाला । तरि हळू चित्तावर झेला ॥
चाल
लागला डाग वंशाला । डाग नांवाला ।
डाग अंगाला । बाई ! केलं केवढं हें पाप ।
माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
कां जळली नाहीं लेखणी पत्र लिहितांना ॥
कां झडला नाहीं हो हात पत्र लिहितांना ! ॥
कां झडली नाहीं हो जीभ असं वदतांना ! ॥
म्हणतील ’फितूर’ तुम्हाला । घात देशाला ।
द्यात कीर्तीला । खास हा आर्या ॥
बाई ! मला वाटते लाज । अशांची आज ।
झाले मी भार्या !! ॥ यवनांनीं धूमाकूळ केला ।
भीती साध्वीला । भीती गाईला । फांस कंठाला ! ॥
देवतांच्या मूर्ति भंगल्या । अशा त्यांच्या लीला चालल्या ।
जो झटे मुक्त करण्याला । अशा जीवाला ।
दीन दुबळ्याला । त्याच शिवबाला । वैरी तुम्ही झाला ॥
चाल
आग लागो सोन्यामोत्याला । आणि असल्या उसन्या भोगाला" ।
चाल
पर रुचला नाहीं बोला त्याला । लालेलाल झाला ! ।
म्हणे बायकोला । "हट्‌ गे वेडे ! सांगूं नको कांहीं मजला ॥
नवर्याबची लाज नाहीं तुला । आंवर जीभेला ।
लहान तोंडाला । मोठा घांस झाला !! " ॥५॥
चौक ६ वा
बादशाह खलिता वाचून । झाला रागानं ।
लाल, मग त्यानं । पाठवलं पत्र नरस प्रभुजीला ।
"तुम्ही घोर अपराध केला । शिवाजीच्या नादिं लागला ।
रोहिडयाच्या डोंगरावर । झाला विचार ।
आमचा कारभार । हाणुन पाडण्याला ! ॥
शिवाजी टवाळ एक पोर । तुम्ही पर थोर ।
विचार हा घोर । सुचला तुम्हाला कसा समजेना ।
होतील यातना नाना । बंडखोरांना ।
पाजी हरामांना । तुमच्या सारख्यांना ॥
या शरण आठ दिवसांत । मावळ्या सहित ।
नाहींतर घात । खास हो करिन तुमच्या जीवाला ।
करवून जप्त जहागीर । बेचिराख करिन घरदार ।
उडवीन तुमचं मग शीर, । यावं भेटीला" ॥
चाल
शहाच्या वाचलं पत्राला । नरस प्रभू घाबरुन गेला ! ॥
हाय खाल्ली त्याच वेळेला । पूजितो रोहिडेशाला ॥
अनुष्ठान करित सांबाला । सात दिवस उपास केला ॥
चाल
दादाजी प्रभु तंवा बोलला आपल्या बापाला ॥
"बाबा ! द्यावा धीर चित्ताला । कुणासाठीं करतां चिंतेला ? ॥
दोन दिवस जगणं तुम्हांला । मग कोणच्या करता चिंतेला ? ।
जहागीर राहावी पोराला । म्हणून करतां काय काळजीला ? ।
पर हा देह दिला धर्माला । जहागीर गेली तरी फिकीर नाहीं हो मला ! ॥
रोहिडेश वाली आम्हांला । तो दूर करील दुरिताला ।
असं बाबा ! असल्या प्रसंगीं वाटतंय मला" ॥
चाल
पर कशी बातमी कळली शाहाला । कळेना हो त्याला ।
वैरी कोण झाला । लागली चिंता हीच दादाला ॥
रोहिडेश सहाय हो त्याला । आला मदतीला । देव वश झाला ! ॥६॥
चोक ७
ती बातमी कळली शिवबाला । बाळ जरी झाला ।
धीर त्यानं केला । पत्र मग धाडलं नरस प्रभुजीला ।
काय चौदा वर्साच पोर । देई पर धीर ।
थोरामोठयाला ! ॥ "शाहाचा राग फार झाला ।
आपल्यावर आला । दुःखाचा घाला । कळली ही वार्ता आज आम्हांला ॥
रोहिडेश सांब मदतीला । सोडुं नका आपल्या धीराला ।
भार देवाला । भक्ताचा झाला ॥ ज्यानं दिलं सहाय्य ध्रुव बाळा ।
अंबरीषाला । पंडुकुमारांला । राखील तोच देव आम्हांला ! ॥
हिंदवी राज्य करण्याला । पुढं जो झाला ।
त्याच्या मदतीला । देव हो आला !!
चाल
नरसाजी ! आणि एक बोल । ऐकावा सांगतों तुम्हांला ॥ देहाची करुन हो ढाल । राखीन आधीं तुम्हांला ॥
देहाची करुनियां भिंत । आड करिन तुमच्या जीवाला ॥
माझ्या रक्ताचा हो कारंजा । भिजवील आधीं तुम्हांला ॥
माझ्या लालबुंद डोक्यानं । पूजीन तुमच्या पायांला ॥
पंच प्राणांच्या हो ज्योतीनं । ओंवाळीन आधीं तुम्हांला ॥
ही खूण द्यावी हृदयाला । लक्षांत ठेवा या बोला ।
चाल
जंवर माझा नाहीं जीव गेला ।
तंवर धक्का नाहीं कसला तो तुमच्या जीवाला ! ॥
लौकरच आतां मी येईन तुमच्या भेटिला" ॥
असं पत्र धाडलं नरसाला । इकडं काय प्रकार झाला ।
नरस प्रभू अनुष्ठान करित होते सांबाला ॥
पूजा बांधली रोहिडेशाला । गंधाचा वास पसरला ।
धूप देवाला हो घातला । इतक्यांत पत्र घेऊन एक जण आला ॥
त्यानं दिलं पत्र नरसाला । नरसप्रभू वाची पत्राला ।
शिवाजीचं पत्र पाहून नरस गहिंवरला ! ॥
"म्हणे, धन्य ! धन्य ! शिवबाळ आलं जन्माला !! ॥
अजून मिसरुड फुटलं नाहीं त्याला ! ॥
पद देतो धीर आम्हांला " ! असं बोलला आपलं आपणाला ।
मग डोळे घट्ट झांकून । करित ध्यानाला ! ॥
एकाग्र चित्तानं झाला । मग काय चमत्कार पाहिला ।
ऐकावं सांगतों तुम्हांला । पिंडित्नंा त्याच वेळेला ।
’घुम्‌म्’ असा आवाज झाला ! ॥ दुभंगली पिंडी ते वेळा ।
अन् शिवाजीचं रुप घेऊन सांब प्रगटला ! ॥ असा चमत्कार पाहिला ।
मग डोळे उघडून पाहिलं बाहेर त्या वेळा ॥ शिवबाळ त्याला दिसला ! ।
आला नंदीचा हो कंटाळा । म्हणुन घोडयावर बसून जणु काय सांब भेटिला आला ! ॥
बघा इकडं दुसर्याट बाजूला । हा कोण त्याच वेळीं आला ।
दादाजी पुढच्या बाजूला । अन्‌ बाळाजी मागच्या बाजूला ।
दादानं त्याला कैदा केला ! । पुढं काय प्रकार झाला । सांगीन पुढच्या चौकाला ॥७॥
चौक ८
दादाजी बोले शिवबाला । "वैरी हा झाला ।
बादशाहाला । बेत कळविला यानं हो सारा ।
म्हणून कैद केलं मी याला । आणि आणलं आज या वेळा ।
आतां हातीं घ्यावी तलवार । उडवावं शीर ।
देहाचा चूर । करुन बळि द्यावा ।
घारीगिधाडाला !! ॥ इवितिवी नाश होणार ।
आमचा खरोखर । करा परि ठार ।
दुष्ट हा आधीं घात करणारा । देहान्त प्रायश्चित्त याला ।
अशा पातक्याला योग्य या काळा ॥ बहिणीचा माझ्या पति जरी ।
असे हा तरी । पाप जो करी । दया माया कधीं दाऊं नये याला ॥
आज साप आम्हां चावला । उद्या डसेल कितिक दुसर्यायला ॥
’आईबाप भाऊ सोयरे । कांटे जर झाले ।
उचलावे सारे’ । धर्म हें वदला "।
चाल
दादाचा सल्ला आवडेना बाळ शिवबाला ॥
मग बाळाजीला बोलला । "बाळाजी ! ऐका शब्दाला ।
कठिण काळ आला । धर्म गांजियला ।
फांस कंठाला ॥ निशिदिनीं लागला घोर भरतखंडाला ! ॥
गाय हंबरती हरघडी । रडती बापडी ॥
सुरी पर खडी । मानेवर आली ! ।
झाली मान धडावेगळी ! । जीभ लांब बघा लोंबली ! ।
बघा चालल्या गुळण्या रक्ताच्या जीवा अंतरली !! ॥
जर नसे रुचत हा बोल । घ्या ही तलवार ।
उडवा हें शीर । आधीं या वेळा । मग सुभेदार होऊन भोगा सोहळा !" ।
चाल
उपरति झाली चित्ताला । बाळाजीपंत गहिंवरला ॥
मिठी मारली घट्ट शिवबाला । पाण्याचा पूर डोळ्याला ॥
मग काय बोलला शिवबाला । "अर्पिला जीव चरणाला ॥
जरी दिलं इंद्रपद मजला । तरी नाहीं शिवणार त्याला ! ॥
आपल्या चरणाचा मी पायपोस । काय काम सांगावं मजला" ।
असा सारा प्रकार झाला ।
चाल
पुढं तोरणा किल्ला घेऊन । बाळाजीरावानं ।
बांधलं तोरण । हिंदवी-स्वराज्याचं त्या वेळा ॥
’पांडुरंग’ शाहीर झाला ॥ कीर्ति गाण्याला । आज या वेळा ॥८॥

छत्रपती शिवाजी अवतारी कसे ? (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १, चाल : मिळवणी

चारी खंडांत झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यांत रणशूर,

सर्वांहुनी श्रेष्ठ शिवाजी खास । षड्‌गुणैश्वर्य संपत्ती ज्यास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥ध्रु०॥

औदार्य आणि सत्कीर्ति, विज्ञानस्फूर्ती, वैराग्य वृत्ती,

गुण हे प्रभूवीण नसे कवणास ।

शिवाजीच्या ठायीं दिसती आपणास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

सर्वदा जयाला यश, कधीं न अपयश,

सकळ जन खूष, कार्यामध्यें विघ्न नसे मुळीं ज्यास ।

दहशत पडली यवन राज्यास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

प्रसन्नपूर्ण ज्यास लक्ष्मी, न पडे कधीं कमी,

पाहिजे तिथे भूमी, द्रव्य देउनि उभी साह्यास ।

दरिद्र दिसेनाचि पाहावयास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

औदार्य विलक्षण जाण । त्याचें ऐकुनी घ्या अनुमान ॥

गुण चौथा उत्तम ज्ञान । त्यास म्हणती साधु विज्ञान ॥

वैराग्य पांचवें छान । सत्कीर्ति आली धावून ॥

चाल दुसरी

औदार्य ज्ञान लक्षण पहा शिवबास ।

वाटली मिठाई आग्र्यांत धनिक गरिबांस ।

अटकेंत असूनी ठकविलें औरंगजेबास ।

ऐकुनी सुज्ञजन म्हणती भले शाबास ।

ज्यानें आणून पोंचविलें मथुरेहुन सांभास ।

दिले लक्ष रुपये बक्षीस मुळारंभास ।

मोडते

काशी कृष्ण विसाजीपंतास, कितीक संतास,

साधु महंतास, देणग्या देउनि हारविला त्रास ।

षडगुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥१॥

चौक २, चाल : मिळवणी

एकनिष्ठ सद्गुरु भक्ती, तशीच सुविरक्ति, चरणीं लोळे मुक्ती, गुरुदक्षणा मागतां ज्यास ।

राज्य अर्पिलें उदारपणें खास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

कीर्तनांत असतां भले, यवन धांवले, कौतुक केले, देवानें दूर नेलें यवनास ।

त्यांत कितीकांचा जाहला नाश । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

काम क्रोधादिक सर्वथा, जिंकुनी स्वतः, परस्त्री माता, मानुनी पाळी नीतीधर्मास ।

शिक्षा देतसे दुष्ट कर्मास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

कपटासी कपट लढवून । मारिला अफझुलखान ॥

हें यश नव्हे नव्हे सामान्य । युक्ती बुद्धि शाहाणपण धन्य ॥

शाहिस्त्याचें लाखभर सैन्य । त्यांत शिरुनी केलें महाविघ्न ॥

चाल दुसरी

लक्ष्मी, बुद्धि आणि तिसरी शरीर संपत्ति ।

तपोबळ चौथे त्यामुळें यशस्वी गती ।

छावणींत शत्रुच्या ठरवुनी लग्नतिथी ।

वरातींतुनी शिरतां मनांत नाहीं भिती ।

बोटें तोडून खानाची केली फटफजिती ।

मोडते

कल्पना अजब किती अशा, शत्रूची दशा,

केली दुर्दशा, वाचुनी पहा पहा इतिहास ।

षड्‌गुणैश्वर्य संपत्ति ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥२॥

चौक ३, चाल : मिळवणी

रामकृष्ण अवतार जसा, पुरातन ठसा,

शिवाजी तसा । कलींत गोब्राह्मण पालक खास ।

उज्ज्वल कीर्ति चारी मुलखास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

भगवद्भक्तियुक्त मन स्थैर्य, तसेंच औदार्य, अचाट शौर्य, भारती वीर पाहतां ग्रंथांस ।

कृष्ण आणि शिवाजी एकच रास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

दोघांची समान करणी, जन्म एक वर्णी, जगीं अवतरुनीं, दोघांनीं केला दुष्टांचा नाश ।

रक्षिले स्वधर्म आणि सुजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

सद्‌गुरु सांदिपनी तिकडे । रामदास त्यापरी इकडे ॥

गर्गाचार्य पुरोहित तिकडे । गागाभट काशीकर इकडे ॥

मातृकूळ दोघांसी वांकडे । दर्शवी साम्य दोहीकडे ॥

चाल दुसरी

त्यानें काळयवन याने अफझुल वधिला रणीं ।

मृत गुरुपुत्र त्यानें आणून दिला तत्क्षणी ।

वाघिणीचें दूध यानें दिले गुरुलागुनी ।

त्याचा पुत्र सांब याचा संभाजी दुर्गुणी ।

त्यास उद्धव अक्रूर साह्य मनापासुनी ।

येसाजी तानाजी यास मिळाले बाळपणी ।

मोडते

श्रीकृष्ण श्यामल वर्ण, अवतारी पूर्ण, तसेच अवतीर्ण,

शिवाजी अंश शिवाचा खास ।

कृष्ण योगी हाहि योग्याचा दास ।

म्हणून अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥३॥

चौक ४, चाल : मिळवणी

दोघांच्या अखेरी पदा, आली आपदा, मोक्ष संपदा,

दोघांची मिळणी स्वयंब्रह्मास । आनंदात गेले निजधामास ।

म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास ॥

श्रीकृष्ण गेल्यावर बली, सुटला कली,

तसेंच या स्थलीं, शिवाजी मागें पीडा सुजनास ।

दुजा नच भारतीं वीर तुलण्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

भारती वीर निवडिले तीन, भीष्म आणि कर्ण, युद्धिष्ठिर जाण,

एक उणा गूण प्रत्येकास । शिवाजी त्रिगूण संपन्न खास ।

म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ।

चाल

भीष्मास भक्ति आणि शौर्य । परि मुळीं नसे औदार्य ॥

धर्मास भक्ति औदार्य । परि अंगीं नसे मुळीं शौर्य ॥

कर्णास शौर्य औदार्य । परी नसे भक्तिचें वीर्य ॥

चाल दुसरी

या त्रिगुण बळें परसत्ता लया घालविली ।

दोन तपांत अवघी पातशाही हालविली ।

तलवार भवनी रात्रंदिन झुलविली ।

आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।

म्लेंछाची करुन दुर्दशा नरद भुलविली ।

आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।

राजनिष्ठा प्रजा सोन्या मोत्यानें फुलविली ।

मोडते

यवनांची राक्षसी नीती, लुटली संपत्ती, पाहून अधोगती, दया उपजली शिवरायास ।

षड्‌गुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥४॥

चौक ५, चाल : मिळवणी

सामर्थ्य लंकेमध्यें किती, परी रघुपती,

वान्नरा हातीं, घेतली जिंकुनी त्या रावणास ।

शिवाजीनें तसेंच केलें यवनास ।

म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

अज्ञान गरिब मावळे, दिसती बावळे,

काळे सावळे, परी रणीं नायकती कवणास ।

रंकांचे राव केलें स्वजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

स्वराज्य स्थापुनी बेलाशक, आरंभिला शक, राज्य अभिषेक, करुनी तोषविले देवास ।

छत्रपती पद जोडिले नांवास । म्हणुन अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥

चाल

भाग्यवान भूपती शूर । दारिद्रय पळविलें दूर ॥

अष्टप्रधान मानकरी वीर । वेवस्था केली सुंदर ॥

सैन्यांत शुर भरपूर । नसे कोणी मनीं दिलगीर ॥

चाल दुसरी

राज्यारोहण प्रसंग सारांश सांगतो तुला ।

दीड कोटि होन खर्चिले सढळ हे तुला ।

गागा भटास पांच लक्ष दिले दक्षणा पांतुला ।

सोळा हजार होन भार आपुली सुवर्ण तुला ।

दान करतां कीर्ती गेली हिमाचळ सेतुला ।

रामभक्त पाहुन या मालोजीच्या नातुला ।

थरकांप दिल्ली विजापुरच्या राहू केतुला ।

मोडते

शिवचरित्रावर तुम्ही टिका, शब्दवाटिका,

गुरुकृपें टिका, साधिल्या रामचंद्र विप्रास ।

सुंदर ज्यांचें लाघवी प्रास, साखर जणूं लाविली गोक्षिप्रास ॥

Thursday, July 16, 2009

नरवीर मालुसरे, सिंहगडावर छापा (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

(चाल :- महाराज शिवाजी छत्रपतीची कीर्ति )
चौक १
धन्य धन्य शिवाजी महाराज पराक्रमी महान् ।
महा मत्त मारिला ज्याने अफझुलखान ।
शाहिस्त्याची बोटें तोडुनी केला हैराण ।
कांपती यवन थरथरां, म्हणती अंतरा,
शिवाजी खरा, बडा सैतान ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाबाई विचार करुनी स्वमनाचा ।
शिवाजीस प्रश्न पुसे आपल्या राजकारणाचा ।
सिंहगडावरी अम्मल अझुनी यवनांचा ।
गड किल्ल्याचा हा तात, घेऊनी हातात,
पुणें प्रांतात, खुशाल तुम्ही नाचा ॥
केला विचार शिवाजीनें मातुश्रीच्या वचनाचा ।
आणविला मित्र जिवलग सखा प्राणांचा ।
तानाजी मालुसरे अवतार भीमसेनाचा ।
त्याच्या घरीं पाहुण्यांचा मेळा, झाला होता गोळा,
आनंद सोहळा, मुहूर्त लग्नाचा ॥
सूर्याजी बंधु आणि शेलार मामा त्याचा ।
म्हातारा ऐंशी वर्षाचा लढवय्या साचा ।
बाराशें मावळे जमाव घेऊन लोकांचा ।
आला रायगडावरी शीघ्र, स्वरुप त्यांचे उग्र,
जसा काय व्याघ्र, कलिजा राजाचा ॥
चाल
तानाजी मोठा बलवान, धिप्पाड महान्,
विस्तीर्ण भाळ, स्वरुप विक्राळ ॥
दंडासारख्या मिशा गुलढबू, त्यावरी लिंबू राहे सूढाळ,
हृदय विशाळ ॥ हत्तीचे धरुनिया सुळे,
उभा करी बळें वीर्य तेजाळ, कर्दनकाळ ।
चाल : दुसरी
दांडपट्टा करवाईत नंबर पहिला खरा ।
शिवाजीस भेटतां लवून केला मुजरा ।
कां बोलविले मज सांगा राजेश्वरा ।
काय संकट पडलें सत्य सांग मैतरा ।
राव म्हणे जिजाईस पुस जाऊनि चातुरा ।
आली जिजाबाई पंचारती घेऊनी करा ।
शिवाजीस ओवाळुनी मग तानाजी वीरा ।
ओवाळु लागतां चकित मालुसरा ।
मोडते
काय घालू ओवाळणी राजमाता ही महान ।
म्हणे जिजाबाई शिव थोरला पुत्र तूं लहान ।
तुम्ही दोघे समान मज ओवाळीलें प्रेमानें ।
काय ओवाळणी अवघड, द्यावा सिंहगड,
वैरी तुझ्याकडे वांकवील मान ॥१॥
चौक २
ऐकुनी खवळला व्याघ्र जसा काय दरिचा ।
गर्जना करुनी आदळला पाय आणि बरचा ।
उचलुनी विडा बोलिला हेतु अंतरीचा ।
जाऊनी सिंहगड घेतो, तरिच मागें येतों,
नातरि धरितों, रस्ता स्वर्गीचा ॥
घ्यावा मुजरा शिवाजी शेवटला मित्राचा ।
जरी मेलों तिकडे तरी सांभाळ करी पुत्राचा ।
घरी लहान रायाजी येवढा हेतु अंतरीचा ।
द्यावें भोजन सकळ सैन्यास, हुरुप जाण्यास,
उदयभान्यास दरारा आमुचा ॥
भोजन घालून सर्वांस विडा पैजेचा ।
उचलुनी तानाजी शब्द करी मौजेचा ।
हत्यारबंद जमाव करुनी सार्याच फौजेचा ।
मावळे निघाले फडफडाड, शब्द कडकडाड,
धरला झडझडाड, रस्ता सिंहगडाचा ।
चाल
भाला बरची तलवार पट्टा,
बाण तीर कमटा असा परिवार, चपळ अनिवार ॥
सिंहगड फार अवघड, भयंकर चढ चढले भराभर, केवळ वान्नर ॥
माघ महिना वद्य अष्टमी, काळोख नामी, गडद अंधार, रात्र दीड प्रहर ॥
चाल : दुसरी
चाळीस हात उभा कडा किल्ला अवघड ।
बांधीव तटावर बुरुज तिकोनी गड ।
किल्ल्यावरी सोडली यशवंती घोरपड ।
तीन वेळ परतली मग झाली चरफड ।
रागे धरुन सोडितां तिने धरिली पक्कड ।
तानाजी शेलार मामा सर्वांच्या पुढें ।
तीनशें चढून वर गेले वीर फक्कड ।
इतक्यात तुटला दोर पडले वरकड ।
मोडते
घस्तीस लागली चाहुल गनिम आया कोण ।
एक शिपाई आला पाहवया धरुनी अभिमान ।
ठार केला त्यास पुढे येतां मारुनी बाण ।
बाकीचे पळाले धडधडा, गनिम आया बडा,
चढके अभी कडा खडा दुष्मान ॥२॥
चौक ३
उदयभानू बाटगा रजपूत मगरमस्त ।
एक गाय दीड शेळी नित्य खाऊन करी फस्त ।
अफु, गांज्या, दारुच्या निशेंत निशिदिन मस्त ।
अठरा बिब्या भोगि महालांत, विषय-ख्यालांत,
धुंद तालांत, बलाढय प्रस्थ ॥
त्याच्या पुढें युद्धाला कोण टिकेना दरोबस्त ।
चांदवडी रुपये चिमटीनें तोडितो नुस्त ।
तेल्याची पहार बडी वाकवुनी भारदस्त ।
थट्टेनें करुनियां सरी, बिबीच्या तरी, गळ्याभीतरी, बैसवी तुस्त ॥
आठराशें शिपाई रजपूत पठाण मदमस्त । वेशीच्या आंत सदरेवरी बंदोबस्त ।
रात्रीची वेळ लोक निजले होते काय सुस्त । अशा संधित केला हल्ला,
झाला गलबला, करुन भिसमिल्ला, कापली घस्त ॥
तानाजीनें केली कापाकापी धरुनियां शिस्त ।
पांचशें पठाण कापुनी केले उध्वस्त ।
किती जखमी झाले कितीकांचे तुटले हस्त ।
रक्ताचा झाला कर्दम, पाहून एकदम, पळाले अधम, करुनी शिकस्त ॥
चाल
उदेभानु आणि तानाजी, सहजासहजीं येक झाली नजर, भिडले सामोर ॥
द्वंद्व युद्ध झालें मग सुरु, हिमाचळ मेरु जसे गिरीवर, लढाई घनघोर ॥
एकाचे एकाला वार, झाले अनिवार, उभयता वीर, जाहले ठार ॥
चाल : दुसरी
इतुक्यांत दरवाजा भवानीनें उघडिला ।
सूर्याजी मावळे घेऊनियां वर आला ।
तानाजी पडला पाहुनी फार खवळला ।
गर्जनायुक्त रणीं व्याघ्र जसा धांवला ।
मोड करुनि शत्रुचा पुरा किल्ला घेतला ।
कितीकांनी भीतीनें आपुल्या हातीं आपुला ।
तटावरुन उडया घालूनी जीव काय दिला ।
जय सूचक केंबळ घरासी अग्नी लाविला ।
रायगडावरुनी तो शिवाजीनें पाहिला ।
त्या आनंदात म्हणे धन्य सुभेदार भला ।
मोडते
दुसर्यां दिवशी फडकले मराठयांचे निशाण ।
तीनशे मावळे झाले निकामी सैन्य ।
शिवाजीस समजतां सकळ वर्तमान ।
सिंह गेला आणि गड आला, देव कोपला,
उपाय नाहीं त्याला, भरले मग नयन ॥३॥
चौक ४
जिजाबाईस झालें दुःख त्यावेळी भारी ।
धन्य धन्य तानाजी मोक्षाचा अधिकारी ।
ओवाळणी घालून काय गेला स्वर्गा माझारीं ।
धाय धाय जिजाबाई रडे, बहूत ओरडे, असा वीर पुढें, न होय निर्धारी ॥
सूर्याजीस दिली त्या गडावरची मुखत्यारी ।
रणीं पडले त्यांच्या वारसाला द्रव्य दिलें भारी ।
कडी तोडे कितीकांस दिल्या ढाल तलवारी ।
खूष केले सकळ सैनिका, इनाम किती एका,
पराक्रम पक्का, पाहुन बाहादुरी ॥
रायाजीनें लग्न मग केलें आपुल्या द्वारी ।
रद्द केली प्रतीकुळ समजुनी पहिली नवरी ।
रुपवान कुलवान दुसरी आणुनिया गहिरी ।
समारंभ करुनी ठाकठीकी, देउन देशमुखी, रायाजीस पक्की, दिली सरदारी ॥
चाल
पुढें शिवाजीच्या मर्जीनें, त्या सूर्याजीनं पराक्रम केला, ऐका दाखला ॥
गड किल्ला पुरंधर, डोंगरावर, चढविला हल्ला, यवन फार भ्याला ॥
उदेभानुचा तिथें भाउ, पाहूनी झाला म्याऊ, त्या सूर्याजीला, शरण मग आला ॥
चाल दुसरी
आला आला सूर्याजी आला दंड ठोकुन ।
उदेभानुची दुर्दशा सकळ ऐकुन ।
चट सारे मोंगल पठाण भ्याले देखून ।
केला स्वधीन किल्ला आपुला बोज राखून ।
शिवाजीचें निशाण किल्ल्यावरी अवलोकुन ।
बादशाहासी हेर सांगती तोंड फांकुन ।
ऐकुनी शहाची गेली कंबर वाकुन ।
झाली साह्य भवानी वैरी दिले हांकुन ॥
मोडते
एकापाठीं एक जय मिळतां कांहीं दिवसान ।
दिल्ली विजापूर बादशहाचें गळले अवसान ।
कवि रामचंद्राचें कवन शब्दाची खाण ।
श्रीकृष्णातिरी रहिवास, यमक अनुप्रास, ऐकतील खास, मर्द प्रेमानं ॥४॥

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १, चाल : मिळवणी
धन्य शिवाजी शिव अवतार, पराक्रमी फार,
राष्ट्र उद्धार, कराया हातीं धरिली तलवार ।
समर्थ कृपा ज्यासी अनिवार । कांपती यवन भूप सरकार ॥ध्रु०॥
धारिष्ट ज्याचें अलोट, छातीचा कोट, शाहिस्त्याची बोटं,
तोडितां दिल्लीपती हैराण । पहाडका चूवा शिवाजी नव्हे लहान ।
बडा रे बडा गनिम सैतान ॥ त्यासी धराया जयपुरवाला, जयसिंग भला,
त्याचे मदतिला दिल्लीरखान पठाण बहु बलवान् ।
धाडिला देऊन किताब सन्मान । सैन्य सरसकट मुसलमान ॥
वेढा पुरंदराशी दिला, अशा संधिला, आत्मबुद्धिला शिवाजी निश्चय करुनी छान ।
रघुनाथ पंडित बहु विद्वान । धाडिला तह कराया निर्माण ॥
चाल
त्या वकीलाचा सन्मान, केला उत्तम जयसिंगान ।
शिवाजीचा निरोप ऐकुन, झाला तल्लीन मन प्रसन्न ।
आम्ही कबूल तहा कारण, सत्य प्रमाण सांगा जाऊन ॥
चाल दुसरी
दिल्लीश्वर बादशहा बलाढय पृथ्वीपती ।
त्याजपुढें लढाईत यश न घडे सांप्रतीं ।तुम्ही सख्य करुनी टाळावी आपत्ति ।
तुम्ही हिंदुधर्म स्थापितां मान्य मजप्रती ।
मी तुम्हासी अनुकूल घ्या सन्मती ।
देशकाळ प्रसंग पहावी सद्यस्थिति ।
बादशहाला शरण याल तरि मी तुम्हाप्रति ।
जहागिरी देवविन घ्या शपथ निश्चिती ॥
मोडते
रजपुत प्रतिज्ञा खरी, सत्य वैखरी, आणा लौकरी,
शिवाजीस भेटिस आम्ही तयार । हातावर हात वचन निरधार ।
एकदिल होतां हर्ष अपार ॥१॥
चौक २, चाल : मिळवणी
शिवाजी भेटतां जयसिंगास, आले रंगास, अंगअंगास,
लागतां हर्ष उभय चित्तांस । शिवाजी हात जोडुनी म्हणे त्यास ।
वडिल तुम्ही वंदितों मी चरणास ॥ जें मागाल ते गड देतों,
हुकूम झेलितो, निशाण चढवितों, परि यश देऊं नका यवनास ।
तुमचे माझे एक रक्त आणि मास । राज्य हें मूळ हिंदूचे खास ॥
हिंदू धर्म रक्षण करी, त्याच्या मी तरी, चरणावरी, लोळण घेईन होईन दास ।
आपण थोर पुरुष आत्म देशास । द्याल स्वातंत्र्य वाटे चित्तास ॥
चाल
ऐकुनी शिवाजीचे वचन, जागा झाला त्याचा अभिमान ।
तह करावया प्रेमान, दिले वचन जयसिंगान ।
माझ्या मदतीस दिल्लीरखान, यावें तुम्ही त्यास भेटुन ॥
चाल दुसरी
तह केला खानासी भेटुन आलियावरी ।
वीस किल्ले सोडिले जयसिंगाच्या करी ।
पंच हजारी सरदारी दिली संभाजीस बरी ।
शिवाजीची नदर आग्रहें जंजिर्या वरी ।
लिहुन कलमवार सही मोर्तब अक्षरीं ।
धाडिला आग्या मोरसी तहनामा सत्वरीं ।
आलें उत्तर तिकडूनी भेटिस या लौकरी ।
देऊं समक्ष मग जंजिरा गोष्ट ही खरी ॥
मोडते
शिवाजीचें साह्य पाहुनी, औरंगजेब धनी,
निकड लावूनी, बोलवी भेटिस वारंवार ।
शिवाजी लडका हमे बहु प्यार ।
जलदिसे आग्रा आवो एकवार ॥२॥
चौक ३, चाल : मिळवणी
जयसिंग शिवाजी व्याघ्रास, म्हणे आग्र्यातस,
जाऊन बादशहास, भेटुन यावें तुम्ही बिनखोट ।
तुमच्या अंगास लाविल कोण बोट । राज्य मी बुडविन हें अलोट ॥
मग झाली देवीची आज्ञा, जाई बा सुज्ञा,
कोणाची प्राज्ञा, साह्य मी करीन छातीचा कोट ।
भवानीस वाहुनी तोडे गोट ।
राज्यव्यवस्था करी कडेकोट ॥
वंदुनी समर्थपदा, घेउनि संपदा,
सैन्यामध्यें तदा, बांधिली नाहीं कोणाची मोट ।
तीन सहस्त्रांचा करुनियां गोट । एक मांडीचे वीर सडे सोट ॥
चाल
आग्याहस् सी पुढें गेलें पत्र, उणे पडो नये तिळमात्र ॥
तिथे जयसिंगाचा पुत्र, रामसिंग स्नेहाचे सूत्र ॥
बरोबर संभाजी पुत्र, निळो रावजी राघो मित्र ॥
चाल दुसरी
दत्ताजी त्र्यंबक हिरोजी फर्जंद भला ।
मुख्य शिवाजी तारांगणीं चंद्र शोभला ।
कुच करित राहूच्या केंद्राकडे चालिला ।
दोन महिन्यानें आग्र्यास येऊन पोंचला ।
रामसिंग लवाजमा घेऊन सामोरा आला ।
स्वागत करुनिया शिवाजीस भेटला ।
बिनधोक महाराज नगरामध्ये चला ।
शिवपुरा नांवाचा बंगला तयार ठेविला ॥
मोडते
रस्त्यांत स्वारीला किती, टकमका पाहती,
लोक बोलती, जवान बडा दखनका सरदार ।
मुसलमिन बादशाहीको आधार ।
अल्ला तुम्हें रखे सलामत बहार ॥३॥
चौक ४, चाल : मिळवणी
मग सुमुहूर्त पाहुनी भला, निरोप धाडिला,
स्वतः भेटिला, उद्यां मी दरबारीं येणार ।
ऐकुनी झाला बादशहा गार । ठरल्या वेळीं दरबार केला तयार ॥
बादशहाला काळजी बडी, शिवाजी गडी, पचिस हात उडी, मारितो बेटा चपळ अनिवार ।
हुशार तुम्हीं असावे सब सरदार । गनिमका नही हमको इतवार ॥
पंचहत्यारी बादशहाजवळ, रक्षक निवळ,
शिपाई सोज्वळ, इतुक्यांत ललकारला भालदार ।
शिवाजी आये नजर रखो सरकार । चमके बडी नंगी भवानी तलवार ॥
चाल
पाहुनी सभा सारी दिपली, वीर वृत्ति वीरांची लपली ॥
कुरनीस रिवाज वेळ जपली, क्रिया नजराण्याची संपली ॥
क्षेम कुशल बोलण्यांत आपुली, दोन शब्दांत वेळ आटोपली ॥
चाल दुसरी
बादशहाचा हुकूम आपुल्या उजव्या हातीं ।
मारवाडचा राजा जसवंतसिंग भूपती ।
त्याच्या खालची जागा शिवाजीला सांप्रती ।
म्हणे शिवाजी या तरी अपमानाच्या रीती ।
माझ्या फौजेने याची पाठ पाहिली रण क्षितीं ।
त्याच्या खालीं नाहीं मी उभा राहणार निश्चितीं ।
रामसिंगास म्हणे द्या कटयार हरली मती ।
क्रोधाग्नी भडकला अवघ्यास पडली भीती ॥
मोडते
अशी गडबड ऐकुनी जरा, करुनिया त्वरा,
निरोप दिला खरा, बादशहानें खलास केला दरबार ।
शिवाजी बिर्हााडी गेल्यावर बहार ।
जीवात जीव आला झाला थंडगार ॥४॥
चौक ५, चाल : मिळवणी
राजदरबारीं येउनियां , मुसलमान स्त्रिया, पाहती शिवराया,
चिकांच्या पडद्याआड बसून । शाहिस्त्याची बायको आणि येक सून ।
धाय धाय रडे तोंड वासून ॥ त्यानीं बादशहाची राणी, तियेच्या मनीं, केली पेरणी,
शिवाजीस मारावे फसवून । नका बसूं त्यावरी विश्वासून, स्वप्नीं माझ्या येतो छाप्यापासून ॥
तिनें बादशहाचें मन व्यग्र, करिता अति शीघ्र, हुकूम दिला उग्र, पोलादजंग बोलविला त्रासून ।
शिवजीको अटक करो खेंचून । नरम करुं बहू जाचून जाचून ॥
चाल
बंदोबस्त करुनिया सारा । बाडयाभोवतीं ठेविला पहारा ॥
कपटाचा उलटा वारा । समजला शिव अंतरा ॥
मग रामसिंगाचें द्वारा । धाडिला निरोप अवधारा ॥
चाल दुसरी
स्वदेशीं जावया हुकूम व्हावा मला ।
वेळ प्रसंगीं राहिन हजर पहा दाखला ।
नातरी हुकूम द्या मम सैन्या सकला ।
येथील हवा पाणी सोसत नाहीं लोकाला ।
ऐकुनी बादशहा मनीं हर्षे चमकला ।
औषधाविण काय बरा होतो खोकला ।
काय करील शिवाजी सैन्याविण एकला ।
दिला हुकूम तात्काळ फौज हांकला ।
मोडते
कांहीं निवडक लोक ठेवून, समज देऊन, प्रसंग पाहून,
शिवाजी करी पुढिल सुविचार । ठकाला महाठक मी साचार ।
हातावर तुरी देउनी जाणार ॥५॥
चौक ६, चाल : मिळवणी
दरबारी लोकांच्या भेटी, स्वहितासाठीं, मिठाई वाटी, नजराणे झांकुनी पेटार्यां त ।
नित्य गुरुवारीं करी खेरात । अर्धसहस्त्राची साधु फकिरांत ॥
असा नित्य ठेऊन परिपाठ, विश्वास दाट, बिनबोभाट, आजारीपन पुकारिलें शहरांत ।
हकिम वैद्यांचे रुपये पदरांत । रोग उद्भवला म्हणती जोरांत ॥
संधिसाधुन एकदां छान, पुत्रासह जाण, पेटार्यांीतून, निसटले दिवसा चौथ्या प्रहरांत ।
हिरोजी फर्जंद ठेउनी घरांत । गांठली मथुरा रातोरात ॥
चाल
मग हिरोजी फर्जंद भला । दुसर्यां दिवशीं दुपार समयाला ॥
औषधास्तव अवघ्याला । राजरोस सांगुनी गेला ॥
पुढें तिसर्याय प्रहरी गलबला । चोहोंकडे बोभाटा झाला ॥
चाल : दुसरी
बादशहाला वर्दी पोचतांच तत्‌घडी ।
पोलादजंगावरी वीज कोसळली बडी ।
कैसा गया गनिम तुझी भली रखवाली खडी ।
तैनात जप्त केली सजा दिली रोकडी ।
चोहोंकडे पळाले स्वार शिपाई गडी ।
परि शोध नाहीं कुठें जिव्हा पडली कोरडी ।
निशिदिनीं बादशहा मनामध्यें चरफडी ।
शहरांत शिवाजी गुप्त मारुन काय दडी ।
बडी दर्द हमकु दगा करिल वाटे हरघडी ।
मोडते
बादशहाचें अंतर खिन्न, वाटे दुश्चिन्ह, टाकलें अन्न,
झोप नाहीं दहशत बसली फार । शिवाजी बडा करामतगार ।
इतना क्या करना हुकूम अधिकार ॥६॥
चौक ७ : चाल : मिळवणी
हरी कृष्ण विसाजीपंत, रामदासी संत,
होते मथुरेंत, पेशव्यांचे मेहुणे स्नेह सूत्रास ।
त्याजकडे ठेवूनिया पुत्रास । बैरागी वेष धरिला नित्रास ॥
अंतर्वेदी प्रयाग काशी, गंगासागरासी, जगन्नाथासी, जाऊन शुद्ध केलें अंतरास ।
तेलंगणांतूनी करविर क्षेत्रास । बाराशें कोस भोगिला त्रास ॥
रायगडावरी शिवराय, जाउनि माय, जिजाइचे पाय, वंदितां पाणी आलें नेत्रास ।
भेटतां सकळ प्रधान मित्रास । आनंदी आनंद सर्वत्रांस ॥
चाल
हरी कृष्ण विसाजी जाण । संभाजीस आले घेऊन ॥
उज्जयनींत मुसलमान । त्यांना संशय आला पाहून ॥
हा मुलगा तुमचा कोण । सत्य सांगा शपथ वाहून ॥
चाल : दुसरी
ब्राह्मण म्हणती हा भाचा आमुचा खरोखरी ।
हें सत्य म्हणूं एका पात्रांत जेविल्यावरी ।
दही पोहे भक्षिले त्यांच्या सांगण्यापरी ।
निःसंशय करुनी आले रायगडावरी ।
पाहुनी शिवाजी हर्षभरित अंतरीं ।
एक लक्ष रुपये बक्षिस दिले सत्वरीं ।
विश्वासराव हा किताब मग त्यावरी ।
शके पंधराशे आठयांशीं संवत्सरीं ।
हे महा गंडांतर मराठी राज्यावरी ।
परि कृपा रामदासाची साह्य श्रीहरी ।
कवि रामकृष्ण करी जुळणी कृष्णेच्या तिरीं ।
प्रास यमक मधुरता पटे रसज्ञा खरी ॥
मोडते
गोविंद शाहीर तरि भले त्यांनी चांगलें,
प्रोत्साहन दिलें, म्हणूनी स्फूर्ती कवीला फार ।
वीररस येथुन पुढें अपार । सिंहगड तानाजी घेणार ॥७॥