Thursday, July 16, 2009

सरदार शाहिस्तेखानाची मोहीम (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १
दिल्लीपती बहु भ्याला ऐकुनी शिवाजीचा क्षत्रिय बाणा ।
बंड मोडाया पुंड धाडावा असा कोण रणपटु शाहाणा ॥ध्रु०॥
मामा शाहिस्ता म्हणे हम है तो शिवाजीकी क्या खातर जमा ।
रणांत लोळविन गर्दिस मिळविन तरिच घालिन पायजमा ॥
निवडक घोडा लाख शिपाई थोडी फौज द्या करुनी जमा ।
राज्य खालसा करीन साहसा असा माझा पहा तुर्जमा ॥
आटोकाट लष्कर अफाट घेऊनी खासा लवाजमा ।
विडा उचलुनी आला फांफडा डंका वाजवी लेहेजिमा ॥
चाल
सातशे हत्ती पुढे धाडी । पांच हजार उंट आघाडी ॥
तीन हजार बैलाची गाडी । दोन हजार छकडयाला घोडी ॥
दारु गोळा तोफखाना जाडी । बत्तीस कोटी खजीना काढी ॥
चाल दुसरी
या परि अफाट फौज आला उडवित ।
जिथे मुक्काम पडे तिथें लोक उर बडवित ।
दोन गांवें लांब दीड गांव जमिन आडवित ।
तीन महिने लागले दर्याा डोंगर तुडवित ।
सारी फौज आणविली पुण्याजवळ भिडवित ।
किल्ल्यामागून फिरंगोजी नरसाळा नाइक गड लढवित ॥
मोडते
दोन महिन्यानें किल्ला मिळाला परंतु मेली बहु सेना ।
पुढें लढाई कशी करावी विचार पडला त्या खाना ॥१॥
चौक २
पाहून प्रसंग जसवंतसिंग बादशहानें मदतीस दिला ।
घालुनी पुण्याला वेढा धुतले हत्ती घोडे मुळा मुठा नदीला ॥
लाल महालामध्यें खुशाल जाउनी शाहिस्त्यानें तळ दिला ।
ठीक ठिकाणीं चौक्या ठेवूनी नाहीं मराठा फिरकूं दिला ॥
इकडे महाराज सिंहगडावरी पुसे विचार प्रतिनिधीला ।
कोण्या रीतीनें युद्ध करावें सरदार आणिले मसलतिला ॥
चाल
आला विडा उचलुनी खान । त्याचें फार दिसे अवसान ॥
बंद करुन रसद सामान ॥ आडचणींत धरावा जाण ॥
छापे घालून करावा हैराण । उडवावी दाणादाण ॥
चाल दुसरी
गेले विचारांत महाराज गुंग होऊन ।
बोलली भवानी स्वप्नीं मग येऊन ।
माझ्या बाळा शिवबा नको जाऊ भीऊन ।
जसा अफझुल वधिला रणीं साह्य होऊन, ।
त्यापरि दुष्टाला शासन मी देऊन ।
तुझ्या हातें धाडिते वचन ठेवि लीहून ।
महाराज देविचा अभय वर पाहुन ।
हर्षलें अंतरीं शकुन गांठ देऊन ॥
मोडते
खान घाताचा विचार करतां युक्ति चालवीतसे नाना ।
अजब युक्ति एक अतर्क्य सुचली भवनीची ही कृपा म्हणा ॥२॥
चौक ३
लाल महालांतुनी शिवाजीला एक पत्र धाडिलें खानानें ।
मर्कटासम तू करसी बंडाळी गडाच्या आश्रय स्थानानें ॥
रणीं मी पहा इंद्र मजपुढें का न येसी अवसानानें ।
डोंगरांत किती पळशी दडशी किती वदसी अभिमानानें ॥
शिवाजीनें दिले उत्तर तुजसम गर्व केला दशवदनानें ।
त्याला कसे माकडांनीं जिंकिले व्यर्थ फुगू नको गर्वानें ॥
चाल
मग युक्ती करुन मजेदार । वश केले हिंदु शिलेदार ॥
छावणींत लग्न टुमदार । वरातीचा ठरविला बहार ॥
सैन्य घेऊन दीड हजार । आले आपण पुण्याबाहेर ॥
चाल दुसरी
कात्रजच्या घाटांत युक्ति ठरविली बरी ।ठेवून दिले तिथें दहा वीस कर्णे करी ।
ठाइ ठाइ झाडाला पोत बांधुन सत्वरीं ।
दहा वीस बैलांच्या शिंगालाही त्यापरी ।
फत्ते होतां कर्ण्याची किन्नरी झाल्यावरी ।
हे पोत पेटवुनी जावें तुम्ही लौकरी ।
येसाजी तानाजी पंचवीस गडी बरोबरी ।
शिवाजीनें शिरस्त्राण मंदिल वर भरजरी ।
चिलखत घालूनी झगा चढविला वरी ।
येका हातांत वाघनख तलवार दुसर्यार करीं ॥
मोडते
मिरवणुकींतून आंत सरकले मध्य रात्रीच्या अवसाना ।
जिकडे तिकडे सामसुम रात्र चाहुल नाहीं कळली कुणा ॥३॥
चौक ४
लाल बागेच्या डेर्यां त जाउन तलवारीचा दिला रट्टा ।
आवाज ऐकुन सून खानाची पाहुन कांपे लटलटां ॥
खान हाच काय म्हणून पुसतां ती म्हणे त्याचा हा बेटा ।
कुठें शाहिस्ता सांग ओरडशील तरि मरशिल हा पहा पटा ॥
तिनें दावितां खान फिरविला तलवारीचा हात उलटा ।
त्याची बायको जागी होउनी करी विनंती शब्द मिठा ॥
चाल
जीवादान मागते येक । धर्माची समजा लेक ॥
मर्दासी नव्हे हें ठीक । देव साह्य करील आधीक ॥
आली दया केला विवेक । याला समरीं दाखवूं फेक ॥
चाल दुसरी
जीवदान देतो परी नका करुं गलबला ।
मज पोचवाया तुम्ही गोटाबाहेर चला ।
वाघनखं लाविली मग त्याच्या पोटाला ।
बायकोसहित त्याला वेशीबाहेर आणिला ।
जो शिवाजी तो तरी मीच पहा चांगला ।
तुज रणीं वधाया उशिर नाहीं रे मला ।
जीव नको असेल तर फिरुन पहा मासला ।
असें बोलून त्याचा हात हातीं घेतला ।
दोन बोटें छाटुनी मग सोडुनी दिला ॥
मोडते
जाऊन मिळाला आपुल्या लोकाला मग फुंकिला जय कर्णा ।
मागें खानानें शंख ठोकिला गनिम गया अबी क्या करना ॥४॥
चौक ५
संकेतापरी कात्रज घाटांत पोत लोकांनीं पाजळले ॥
शिंग कर्णे वाजवून एकंदर शीघ्र गडावरी उधळले ॥
इकडे खानाची फौज भयभित गडबड ऐकोनी खळबळले ।
हत्यारबंद होउनी शिपाई घाटाकडे अवघे वळले ॥
घाटावरती दिवटया झाडाला यवन पाहूनी जळफळले ।
बडा हार्दम शिवाजी बेटा तोबा तोबा आम्हा नाहीं कळलें ॥
चाल
मग दिला गडाला वेढा । आणा पकडुनी म्हणे शिव धेडा ॥
दम धरुनी शिवाजीनें थोडा । मारक्यांत येऊं दिला घोडा ॥
मग म्हणे तोफखाना सोडा । शत्रूची टाळकी फोडा ॥
चाल दुसरी
सरबत्ती तोफांची किल्ल्यावरुन झडविली ।
मोंगल सैन्याची दाणादाण उडविली ।
चराचरा कापुनी समूळ नदींत बुडविली ।
खान ऐकुनि म्याला मग छाती बडविली ।
आतां युद्ध नको म्हणे पुरी नरद नडविली ।
तात्काळ उठुनी दिल्लीची वाट मढविली ।
जीवावरचें बोटावर गेलें खूप लढविली ॥
मोडते
खान दिल्लीकडे पळुन गेला रडत रडत केविलवाणा ।
रामचंद्र म्हणे पुढें येईल जयपूरचा जयसिंग राणा ॥५॥

No comments:

Post a Comment