Wednesday, July 29, 2009

वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार ।
धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार ।
त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥
चौक १
अफझुल्लाला ठार केल्यावर । झालं विजापूर ।
भीतिनें गार । शाहा मग झाला मोठा बेजार ।
फार मोठं झालं त्याला शेजार । जडला जणूं घोर त्याला आजार ॥
सारे अमीर करिती विचार । आतां जाणार ।
गांव विजापूर । लौकर सैतानाच्या कबजांत ।
होणार सारा घोर आकांत । साधावा कैसा त्याचा हो घात ॥
अफझुल्लाचा मुलगा फाझलखान । झाल हैराण ।
सुचेला त्याला आन । सूडानं घेरलं त्याच्या हृदयास ।
येईना झोंप, झाला कडु घांस । अंगाचं आटलं त्याच्या लइ मांस ॥
सदा झाला शिवराया काळ । लागली तळमळ ।
परि तो दुर्बळ । एकला काय शिवाला करणार ।
सिंहाला कोल्हं कसं हो धरणार ? । मुंगसाला साप काय करणार ?॥
चाल
एके दिवशीं अफझुल फाजलाच्या स्वप्नामधीं आला ॥
बापाला आपल्या पाहून फाजल दचकला ! ॥
अफझुल्ला तवा बोलला आपल्या लेकाला ॥
"ऊठ कारटया ! काय निजलास ? ।
गोड लागतो काय रे तुला घास ? ।
नेभळट पोरटया ! झालास । गनिमानं शीर कापून टांगलं किल्यास ॥
तंवा फौज घेऊन तयार लेका ! होतास ॥
ततून मूर्खा ! पळून जाऊन राखलं जीवास ॥
मरणाला भित्र्या ! भ्यालास । चल त्याचं मुंडकं आणून टांग वेशीस" ॥
असा झाला फाजलाला भास । विसरला देहभानास ।
ताडकन उठून तलवार लावली कमरेस ॥
खदखडा दार उघडून गांठलं वेशीस ॥ वेशीच्या वरच्या वाशास ।
टांगलेलं होतं लइ दीस । रामरायाचं मुंडकं; मग त्यास ।
तलवार मारुन बोलला तंवा कवटीस ॥ "झालं सरलं आतां तुझ दीस ।
तू पड आतां धरणीस । टांगीन इथं शिव्याचं मुंडक मी खास ॥
चाल
असं म्हणून फिरला माघारा । गेला झरझरा ।
आपल्या घराला । रात्र ती झाली ती कष्टमय फार ।
सूडाचा झाला त्याचा निर्धार । ऐकावा पुढचा सारा प्रकार ॥१॥
चौक २
दुसरे दिवशीं गेला दरबाराला । बोलला आदिलशाला ।
"गप्प काय बसला ? । आला सैतान विजापूरला ।
समजावा नाश सकल झाला । त्याचा काय बंदोबस्त केला ? ॥
पाचोला जसा वार्यालला । रान वणव्याला । दिवटी सूर्याला ।
आदिलशहा तसा शिवाजीला । झाला काय सांगा राव ! मजला ।
पाहिजे आपला विचार कळला ॥ दरबारी थोर अमीर ।
भले झुंजार । पाठवूनि चूर । शत्रुचा करा आज सरकार ।
नाहींतर आपला नाश होणार । शाहिचं चांगलं दिवस सरणार" ॥
आदिलशाह घाबरुन गेला । बोलला फाझलाला ।
"शिद्दी जोहराला । घेऊन करा तुम्ही त्याला ठार ।
नंतर करुन मोठा दरबार । थाटानं देऊ तुम्हां तलवार" ॥
चाल
फाजलखान शिद्दी जोहार झाले तय्यार ॥
मेजवान्या त्यांना थाटाच्या झाल्या घरोघर ॥
त्यानीं फौज घेतली भरपूर । दारुगोळा केला तय्यार ।
किती घोडा होता गणतिला नाहीं हो पार ॥
घोडयांना घातले अलंकार । पायात्नंा बांधले घुंगुर ।
डोक्याला लावले पिसार । मग वरती चढले खोगीर ।
त्यावर बसले रणशूर । बडे बडे होते अमीर ।
ते सारे झाले तय्यार । हातात नंगी तलवार ।
अशी फौज चालली गनिमाला कराया ठार ॥
जंवा जातां जातां तळ देती । तवा ऐका, काय काय करिती ।
मोठमोठे डेरे लावती । गांजाचा नाद हो अती ।
अक्षि पिऊन झिंगुन जाती । मग नाचरंग चालती ।
त्यांचा थाट सांगावा किती ! त्यांना दाणा वैरण किती ।
लागे त्याला नाही गणती । गरिबांना धाक घालिती,
त्यांच्या गंज्या काढुनी नेती । नाहींतर पेटवूनी देती ।
लोकांच्या घरोघर जाती, गाइवासरें धरुनी कांपिती ।
बायकांना ओढुन नेती । त्यांचीं घरं संम्दीं धुंडिती ।
पैसा अडका लुटून नेती । मग हातीं दिवटी घेऊन आगी लावती ! ॥
जवा लोक रडाया लागती । तवा सारे ’खो खो’ हांसती ! ॥
त्यांच्या तोंडात फेंकती माती । इरसाल शिव्या मग देती ।
जर कोणी अंगावर येती । तर त्यांना दोर्याव बांधिती ।
आधीं त्यांचीं नाकं कांपिती । लोखंडी सळ्या मग घेती ।
लाल भडक त्यांना करिती । मग डोळ्यामध्नं खुपसती ।
मग हातपाय तोडती । असे हाल करुन मारिती ।
नाहींतर सुन्ता करुन भाई बनविती ॥
चाल
मराठी राज्याची कळी । नवी उमलली ।
तिच्यावर आली । टोळांची धाड, काय होणार ।
कळेना काय काय घडणार । दैवाचे खेळ कसे हो कळणार ! ॥२॥
चौक ३
ही वार्ता कळली शिवाला । सावध झाला ।
गेला पन्हाळयाला । करुन बंदोबस्त सगळा ।
किल्ल्यावर दारुगोळा चढला । तय्यार सारा लोक झाला ॥
नुकत्याच प्रतापगडाखालीं । झालेल्या भारी ।
लाल तलवारी । पुन्हा पन्हाळगडावरती दिसल्या ।
वीरांच्या हातामध्नं रमल्या । तहानेनं व्याकुळ लइ झाल्या ॥
सूर्याच्या किरणांनीं सारे । चमकले भाले ।
तय्यार झाले । चिरण्याला कंठनाळ सगळे ।
डोक्यावर जिरे टोप चढले । हातांत धनुर्बाण आले ॥
अन्नाचा पुरवठा केला । तय्यार झाला ।
तोंड देण्याला । यवनाला मराठयांचा गोपाळ ।
यवनाला मराठयांचा भूपाळ । यवनाला हिंदधर्माचा लाल ।
यवनाला हिंददेवीचा बाळ । काळाचा काळ्याकुट्ट कळिकाळ ॥
’शिवराय पन्हाळगडावर’ । ऐकून सुभेदार ।
शिद्दी जोहार । फाजलखानासकट तिकडं वळला ।
झटकन किल्ल्याखालीं आला । किल्ल्याला त्यांचा वेढा बसला ॥
चाल
नेताजी पालकर शूर । त्यानं केलं शिद्दीला जेर ॥
परि फौज होती भरपूर । म्हणून होता शिद्दीला जोर ॥
चौक्यांचा पहारा चौफेर । चहुंकडे ठेविले हेर ॥
करि नाच नंगी तलवार । रक्ताला झाली आतुर ॥
चाल
झाले चार महिने तरी होता शिद्दी जोहार ॥
वेढा काढुन जाईना; मग केला शिवानं विचार ॥
नेताजी, बाजी रणगाजी जमविले वीर ॥
मग त्याना बोलला शिवबा जें ऐकावं सारं ॥
"किती दिवस असें हे चालणार ? । दोन वर्सं वेढा बसणार ।
एक वर्स अन्न पुरणार । मग अन्नपाणि सरणार ।
तंवा उपासमार होणार ॥ यवनांच्या पाया पडणार ।
कां आतांच कांही करणार ? ॥" मग बोलले शूर सरदार ।
"कांहीं तोड आतांच काढून व्हावं हो पार" ॥
असा त्यांचा बेत जंवा झाला । तंवा राजा शिद्दीकडं गेला ।
ऐका जी काय बोलला । "तुमचं पडलं फार भय मला ।
द्यावं जीवदान हो मला । घ्यावें पदरीं दीन लेंकराला ।
शहाचा मी अपराध केला । म्हणून आतां पश्चाताप झाला ।
देतों मी त्याच्या मुलखाला । हा किल्ला ठेवा पण मला ।
हा दास शरण तुम्हांला" । असं बोलला सुभेदाराला ।
शिद्दीला आनंद झाला । मग बोलला शिवरायाला ।
"जीव दान आतां तुला दिला । पर किल्लाप पाहिजे आम्हांला ।
तो नाहीं मिळणार तुला" । जर दादा द्यावं चित्ताला ।
सांगीन आतां तुम्हांला । शिवराय फिरुन शिद्दीला काय बोलला ॥
"सुभेदार थोर तुम्ही झाला । अन् किल्ला नाहीं म्हणता कां मला ! ।
द्यावं आतां एवढं पोराला । द्यावं एवढं वचन लेंकराला ।
आज काय तो विचार तुम्ही करा । पुन्हां उद्यां येइन भेटीला ।
तवा काय तें सांगावं मला" । असं बोलून डाव करुन किल्ल्यावर गेला ! ॥
चाल
आनंद फार तंवा झाला । शिद्दी जोहारला ।
धरुन दाढीला । बोलला "अल्ला ! डाव केला ।
काफर खास आतां धरला" । पण त्याचा कावा कायरे कळला !! ॥३॥
चौक ४
समेटाचा बहाणा असा केला । गाफिल झाला ।
पहारा, ढिला पडला । दारुला आला ऊत अनिवार ।
झिंगून गेले अमीर सरदार । खरोखर वेडा शिद्दी जोहार ॥
जो हार सिद्धिचा झाला । रामीं रत झाला ।
तो कां जोहाराला । करील राव जी ! सांगा जोहार ।
जाईल काय त्याला शिव हार । ज्याला सारी हार जाणार हार ॥
जोहार बोलला आपणाला । "यंव रे उंदराला । पिंजर्यांरत धरला; ।
घेऊन जातों विजापूरला । पठयानंच त्याला कैद केला ।
दुसर्यां ना डाव नाहिं जमला" ॥ फाजलखान बोलला आपणाला ।
"सूड पुरा झाला ॥ कापुन शिवाजीला । वेशीला हा मर्द मुंडकं टांगणार ।
बापाचं देणं सारं फेडणार । मोठा मग मानकरी मी होणार ! ॥
चाल
आशेचा असा डोलारा । फाजलान मनांत उभा केला ।
विसरला देहभानाला । दारुनं झिंगुन गेला ।
इकडे विचार काय मग झाला । शिवाजीनं काय बेत केला ।
ऐकावं सांगतों तुम्हाला । हेरानं आणलं खबरेला ।
लगबगीनं बोलला राजाला । "महाराज ऐका वचनाला ।
आज पहारा ढिला लई झाला । जवा गेलो होतो फिरण्याला ।
झोंप आली होती पहार्या ला । अर्धंमुर्धं होतं जागेला ।
त्यांचें बोलणें आलं कानाला । त्यांचं म्हणणं दिसलं हो मला ।
आज गनिम हातीं लागला । कां वेर्थ घ्यावं तसदीला ? ।
अन्‍ त्रास द्यावा आपल्या जीवाला ? । लई दिवस राच्च। जागुन वेडा जीव झाला ॥
आतां पहारा सारा झोंपला । चौकीवाला जोरसे पेंगला॥
अशी बातमी घेउन आला । हा दास आपल्या चरणाला ।
पुढचं सांगणं नाहीं ठावं मला । तें आपलें ठावं आपणाला " ।
असं बोलून बातमी देऊन हेर तो गेला ॥ शिवाजीनं काय बेत केला ।
निवडक घेतला लोकांला । अन्‌ किल्ल्याखालीं चालला ।
दादा ! किल्ला सारा उतरला । चहूंकडं काळोख झाला ।
पर कळलं नाहीं कोणाला । रात्रीला घोर लागला ।
चहूंकडं काळोख झाला । जंवा कृष्ण जन्म बघा झाला ॥
तंवा भूल पडली पहार्याजला । टोपलींत घालुन लेंकराला ।
वसुदेव वाडयांतून आला । तरी कळलं नाहीं कोणाला ! ।
यमुनेला उतार झाला । तवां पार पलीकड गेला ।
असं लहानगं बाळ घेऊन गोकुळांत गेला ॥
थेट तश्शी भूल पहार्याोला । बघा पडली !
एक योग झाला । म्हणून कृष्ण म्हणावं शिवाला ।
शिव कृष्णरुप हो झाला । भेदभाव नाहींसा झाला ।
चौकीवाला घोरुं लागला । सारा पहारा गारद केला ।
शिवाजी पुढं मग गेला । जितका त्याला पहारा भेटला तितका गार केला ॥
रक्ताचा पाट चालला । पर कळलं नाहीं कोणाला ।
पिंजर्यांातून पक्षी उडाला । करा जागं आता शिद्दीला ।
बघ म्हणावं बेरकी उंदराला । करा जागं आतां फाजलाला ।
बघ म्हणावं आतां काफराला । हातावर तुरी देऊन तुमच्या हो गेला ॥
चाल
गर्वाचं घर सदा खालीं । असं लिहिलं भाळीं ।
सत्याचा वाली । सदा प्रभुराय झाला गोपाळ ।
पार्थालाच घातली कीर्तीनें माळ । खळाचा नंद बाळ हा काळ ॥४॥
चौक ५
दोन घटका गेल्यावर झाला । मोठा गलबला ।
जो तो म्हणे "अल्ला ! । गारद केला सारा पहारा ।
रक्तानं रस्ता सारा भरला । देखो सैतान पार झाला" ॥
तंवा आला शिद्दी जोहार । रक्ताचा पूर । पाहून झाला गार ।
चित्तावर आली दुःखाची खार । राग पर त्याचा झाला अनिवार ।
म्यानांतून ओढली तलवार ॥ फाजलखान झाला बेफाम ।
सुटला त्याला घाम । जिरला सारा जोम ।
म्हणे ’क्या हुवा अल्ला ! गेला ’ ! । अल्ला काय सांगणार तुजला ? ।
त्याचा तुला कावा नाहीं रे कळला ॥ मग जोडणी केली लवकर ।
चालले हो स्वार । बारा हजार । पाठलाग केला त्यांनीं जोरदार ।
फौजेवर होते दोन सरदार । फाजल आणि सिद्दी अजीज सुभेदार ॥
चाल
पुढं धावे सूर्य, पाठीमागें केतु असुर ॥
पुढं धावे चंद्र, मागं लागला जणूं राहु चोर ॥
पुंढ धर्म, मागं अधर्म धावतो स्वैर ॥
पुढं नीति, मागं अनीतीचा लागला विचार ॥
स्वातंत्र्य पुढें, मागं लागे दास्य चिरकाल ! ॥
चाल
रात्रिनं काळोख केला । दिसेना कांहीं कोणाला ।
चांदण्यांनीं नाच बंद केला । आभाळांतुन चांद निघाला ।
शिवाच्या डोईवर आला । त्यांनीं कां हो नाच बंद केला ।
असं म्हणतां ? सांगतों तुम्हांला । शिव घोडयावरती स्वार झाला ।
अन्‌ चालला दौड विशाळगडाला । त्याच्या भाळीं चंद्र शोभला ।
पाहवेना हें दैत्य राहूला । चंद्रला आतां गिळण्याला ।
शिवामागं राहू लागला । पाहवेना त्यांना हा घाला ।
म्हणुन त्यांनीं नाच बंद केला । ढगाच्या ओढलं पडद्याला ।
अन्‌ सांगायला गेल्या सूर्याला । काय बोलल्या ऐका सूर्याला ।
"असा असा प्रकार झाला । आमचा पती पृथ्वीवर गेला ।
त्याच्यामागं राहू लागला । त्याला सोडवायला हो चला" ।
इकडं काय प्रकार झाला । ऐका जी सांगतों तुम्हांला ।
भर रात्रीं घोडा फेकला । झाले चार तास हो त्याला ।
वारा मंद वाहूं लागला । पहांटेचा सुमार झाला ।
विशाळ गड दिसूं लागला । तीन कोस किल्ला राहिला ।
आनंद झाला शिवाला । काय बोलला ऐका लोकांला ।
अंबेनं कृपा करुन तारलं आम्हांला ॥ आतां राहिलं नाहीं भय मला ।
आवाज कसला पण झाला ? । ’टप्‌ टप्‌ टप्‌’ हं ! आला ! आला !
शत्रू पाठीवर आला । चला मारा टाचा घोडयाला ।
चला गांठलं पाहिजे किल्ल्याला" । प्रसंग जीवावर आला ।
पुन्हा घोडा दौड धांवला । घोडयांना फेंस बघा आला ।
फाजलखान पाठीवर आला । जीव सारा कासाविस झाला ।
पर शिवा नाहिं बघा भ्याला ! । पुढल्या चौकी सांगिन पुढचा प्रकार जो झाला ॥
चाल
आली आणीबाणीची वेळ । युद्ध जंजाळ ।
रक्तबंबाळ । झाल्यावर कोण कोण मरणार ।
झाल्यावर काय काय घडणार । आपणाला सांगा कसं हो कळणार ? ॥५॥
चौक ६
जवां तांबडं फुटलं पूर्वेला । गनिम शिवाजीला ।
येवून तवा भिडला । परि रात्र नाहिं शिवा डरला ।
तय्यार झुंजण्याला झाला । थोरांना जीव करेकचरा ॥
त्याला नव्हतं जीवाचं भय । होता निर्भय ।
वाटलं पर भय । दुसर्यां ना शिवा प्राणाहून प्यार ।
राज्याचा तेवढा एक आधार । अंबेच्या कंठामधला प्रिय हार ॥
देशाच्या ऐकाजी काजीं । नित्य तो राजी ।
तोच रणगाजी । बाजी प्रभु देशपांडे सरदार ।
चित्ताला होता मोठा दिलदार । शौर्याचा मूर्तिमंत अवतार ॥
चाल
पाहुन असला घोर प्रसंग बाजी पुढं झाला ॥
स्वातंत्र्यवीर रणगाजी बोलला शिवाला ॥
"महाराज ! विनवि तुम्हांला । ऐकावं माझ्या शब्दाला ।
शत्रु हा हांकेवर आला । ही खिंड भली हो मला ।
इथं राहुन धरतो शत्रुला । चार लोक धरती हजाराला ।
द्या संधी येवढी दासाला । करामत दावतों तुम्हांला ।
तवर आपण किल्ल्याकडं चला । आपणासंग घ्याव फौजेला ।
पाचपन्नास ठेवावं मला । जीव चरणीं आपल्या वाहिला ।
जंवर जीव नाहिं रणिं गेला । तवर धोका नाहीं तुम्हांला ।
फेका दौड आता घोडयला । बोलण्यांत फार वेळ गेला ।
आपण आमचा देव दुजा नाहिं देव आम्हांला" ॥
ऐकून अशा बोलला । शिवाचा गळा दाटला ॥
चाल
भर आला त्याच्या हृदयाला, पाहून प्रेमचंद्राला ॥
पाण्याचा लोट खळखळला, उसळून बाहेर आला ॥
चाल
शिवाला आला कळवळा । काय बोलला ऐका ! बाजीला ॥
चाल
"लोक काय म्हणतिल मला,
देवून तोंडाला, एका बाजीला, निष्ठुर गेला ।
कशि दया नव्हती हो त्याला ॥
जसा जीव प्यारा हा मला, तसाच तुम्हांला;
सांगूं कसं बोला, जीव देण्याला ।
आग लागो माझ्या तोंडाला ॥
शत्रूंचा वणवा पेटला, जाळत आला, जाळूं दे मला,
मरण देहाला खास, मग त्याला ।
जपणूक कशाला बोला ?" ॥
ऐकोनि राजवचनाला, बाजीला शोक बहु झाला ॥
तो वीर फिरुन शिवाला, ऐकावं काय बोलला ॥
चाल
"हा जीव प्यारा हो मला, म्हणून देहाला टाकून धरणीला, जातो स्वर्गाला ॥
द्या संधि एवढी दासाला ॥ ज्याला मृत्यु लाभला रणीं,
धर्माकारणीं, त्याची हो जनीं, धन्य ही काया । द्या संधि येवढी दासा या ॥
चाल
विजापूरचा होतों नोकर । तंवा केलं पाप मी फार ।
पण आला योग लवकर । झाली भेट विशाळगडावर ।
आपण केला सारा मोह दूर । चरणांचा घेतला आधार ।
बेईमान होतों मी फार । आज डाग धुवून काढणार ।
आपण जावं आतां लौकर " । शिवबानं केलं उत्तर ।
"तुम्हांसाठीं जातों लौकर । जवां जाईन विशाळगडावर ।
पांच तोफा सोडीन सत्वर । मग समजा झालों मी पार ।
असं म्हणून चालले शिवराय होउन स्वार ॥
चाल
मग बाजी झाला तय्यार । रोखून खिंडार ।
नंगी तलवार । हातामधिं, झाला रुद्र-अवतार ।
सांगिन जी पुढं पुढचा प्रकार । सहाव्या चौकाचा झाला आकार ॥६॥
चौक ७
शिवबांची घोडी कल्याणी । सदा जयदानी ।
घोडयांमधिं राणी । खडकाळ डोंगरामधुनी ।
तशीच मैदानी जशी काय हरणी ।
टाण् टाण् करुनि धांवतांना पाहिली यवनांनीं ।
’इस्कु पकडो’ म्हणुनि । चाल केलि त्यांनी ॥
चौफेर घोडे सुटले । खिंडींतून आले ।
बाण सळसळले । सणणणण करुन अंगीं घुसले ।
घोडे धडधडा खालती पडले । घोडेस्वार थंडगार झाले ! ॥
बाण येती कुठून समजेना । डसती घोडयांना ।
धांवत्या सांपाना । जशा काय झडपा घालती हो घार ।
झाली निम्मी फौज त्यांची थंडगार । रागाने झाले लाल सुभेदार ॥
पाठलाग तसाच करण्याला । जोरानं आला ।
फाजल खिंडीला । परि त्यानं पाहिलं बाजी प्रभुला ।
तीस जण घेऊन राहिला तोंडाला । खिंडीचा रस्ता बंद झाला ॥
जसा राम दिसला रावणाला । कृष्ण कंसाला ।
भीम कीचकाला । बाजी प्रभु तसा फाजलाला ।
दिसला पर जोर त्याला चढला । बाणांचा त्याला सुगावा लागला ॥
बाजीच्या लहानग्या टोळीला । पाहुन फाजलाला ।
हर्ष फार झाला । कां हो ? त्यांचं सैन्य होतं अनिवार ।
इकडं पांच पन्नास बाजीचे स्वार । तिकडं फाजलाचे बारा हजार ! ॥
चाल
फाजलानं केला मग हल्ला । बाजीहि तय्यार झाला ! ।
रणरंग खिंडीला आला । कवटाळी वीर मरणाला ॥
चाल
आली झुंज हातघाईवर । झुलती तलवार ।
ऐकमेकां मार । देती; धुमाकुळ झाला अनिवार ।
शत्रुवर करती जोराचे वार । जिकडं तिकडं झाला एक प्रकार ॥
किती होते मिसळले नाद । देऊ कशी याद ?
उठता पडसाद । खिंडींतून दाद नाहिं कवणा ।
तय्यार सारे वीर मरणा । ठेवील कोण त्यांची गणना ॥
चाल
कोण राम राम बोलती । देवांना हांका मारती ।
कोण धायधाय रडताती । तळमळुन देहांतून कोण प्राण सोडती ॥
कोणाची नाकं ठेंचती । डोळ्याची बुबळं लोंबती ।
छातित्नंा भाले खुपसती । जसे मासे जळीं चमकती ।
आकाशीं विजा चमकती । तलवारी तशा लखलखती ।
रक्ताचे पाट वाहती । डोक्यांच्या कपर्याख ऊडती ।
कोणाचे हात तूटती । बेशुद्ध कैक रक्ताच्या पाटामधिं पडती ॥
निकराचे हल्ले चढविती । ’हर हर महादेव’ असें कैक बोलती ॥
’दीन दीन’ यवन बोलती । किती अर्धमेले बरळती ।
हाणा मारा कापांचा भरला नाद हो अती ॥
शिरकमळं अंबेच्या पायीं वीर वाहती ॥
दशदिशा दणाणुन जाती । तलवारी भाले चमकती ।
एकमेकां घासुन ठिणग्या लाल निघताती ॥
वर मुंडकी उंच उडताती । जणू अंबाबाई चेंडवांचा खेळ खेळती ॥
ऐका जी त्याच वेळेला । विजयश्री आली बघण्याला ।
तिनं हातीं धरलं माळेला । ’माळ घालूं आतां कवणाला’ ।
अशि चिंता पडली हो तिला । जगदंबा बोलली मृत्यूला ।
काय ऐका सांगतों तुम्हांला । "आली विजयदेवी वरण्याला ।
अशी वर्दी द्यावी बाजीला । आणि करावा थाट चांगला" ॥"ठीक ! करतो" मृत्यु बोलला । आणि थाट कराया लागला ।
लाल रंग खिंडीला दिला । रक्तांचा सडा घातला ।
धडांचा कारंजा केला । मांसाचा गालिचा केला ।
हाडकांच्या नक्षी काढल्या । दातांच्या कवळ्या पसरल्या ।
मुंडक्यांच्या केल्या त्यानं माळा । अंबेची वर्दी बाजीला ।
जंवा कळली चेव तंवा आला । जसा वारा उडवी भुश्श्याला ।
तसा बाजी उडवी शत्रुला ॥ रक्ताच्या धारा अंगाला ।
त्याच्या लागल्या, नाहीं पर भ्याला ! । जसा पळस प्रफुल्लित झाला ! ।
त्यानं केलं जेर यवनाला । पर ताजी फौज मदतीला ।
फाजलाच्या आली जोर झाला । म्हणून पुन्हां आला बाजीवर हल्ला ॥
चाल
विजापुरचं आलं पायदळ । फिरुन परतलं ।
सारं घोडदळ । निकराचा हल्ला केला त्यांनीं फार ।
बाजी पर होता मोठा बाणेदार । हल्ला हटवायला झाला तय्यार ॥७॥
चौक ८
आयुष्य सरतं घडोघडीं । काळाजी उडी ।
आल्यावर मढी । पडती; कुडी खास एकदां पडणार ।
पळभर उशीर नाहिं खपणार । जर मरण खास तर प्राण्या !
कसा मरणार ? । जो मर्द मानव झाला । सोडी जीवाला ।
रणांगणिं; त्याला कीर्ति वरणार ॥ पुन्हां चढला बाजीला जोर ।
दिलाय त्यानं मार । केला थंडगार । यवन; तवा झाली होती दोन पार ।
भूमिला झाला मुडद्यांचा भार । अंगावर चालले होते तरी वार ।
जरि झाला शत्रुचा मोड । वाटेना तो गोड । काय अवघड ।
बाजीला झालं सांगतों तुम्हांला ॥ त्यानं पहिला मान फिरवून ।
किल्ला निरखून । नाहीं पर खूण दिसली हो त्याला ! ॥
तोफांचा जाळ दिसेना । म्हणून यातना । होत बघ नाना ।
वाटल त्याला झाला नाश कार्याचा । ज्यासाठीं देह खर्चिला ।
तोंच नाहीं झाला । पार मनीं लागला । घोर----शिवाचा ! ॥
ऐका हा नाद----झाला । कसला हो बोला ।
गोळीबार झाला ! । हाय गोळा आला । लागला वीराला ।
धाडकन पडला भूवर । बाजी रणवीर । जसा काय थोर वृक्ष उन्मळला ॥
चाल
’बाजी पडला ? हाय ! घात झाला’ शब्द हे झाले रणांगणावर ।
त्यानं खचला मावळ्यांचा धीर ।
जिकडं फुटली वाट तिकडं चालले सारे चौफेर ॥
जंवा पाहिलं बाजिन सारं । तंवा बोलला त्यांना रणवीर ।
"मेलों नाहिं मी, फिरा माघार । आणि चढवा हल्ला जोरदार ।
जर मराल स्वर्गाला जाल । जर जगाल सौख्य भोगाल !
जर पळाल, तर नरकाला जाल !! " ॥
चाल
ऐकून अशा शब्दाला, पुन्हां सारा उलटला भाला ॥
निकराचा केला मग हल्ला, हैराण शत्रु हो झाला ॥
मरणाचा विळखा बाजीला, हाय बसला कासाविस झाला ! ॥
चाल
त्याचं लक्ष होतं परि खिळलं विशाळगडावर ॥
बाजी पडला आतां मरणाच्या शय्येवर ॥
जणु भीष्म पहुडला रणीं रणशय्येवर ॥
जगदंबा आणि विजयश्री आल्या लौकर ॥
हातांत माळ घेऊन झाल्या तय्यार ॥
माळ घातली बाजीला, झालं दुःख परि फार ॥
त्याचि दृष्टि होती खिळलेली विशाळगडावर ॥
तोफांचा नाद कुठं गेला ? । बाजीचा गळा दाटला ।
बाजीला घोर लागला । जीव धरुन राहिला आशेला ॥
बाजीचा सरता काळ आला । कुठं गुंतली आस मग बोला ?
जंवर शिवबा पार नाहीं झाला । तंवर आशा राहिली जीवाला ॥
चाल
धूमधडाधडा धड-धडा । धडाडा ! असा तोफांचा नाद कानीं पडला ।
"झालों देवा धन्य !" बाजी बोलला । देहातुन जीव पार झाला ! ॥
धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार । धन्य तो शूर ।
धर्माच्या कामीं जो जो मरणार । त्याचा जयनाद जो जो होणार ।
शाहीर ’पांडुरंग’ गाणार ॥८॥

1 comment:

  1. थोर पोवाडा ! थोर इतिहास! पोस्ट केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद !

    ReplyDelete