Thursday, July 2, 2009

शौर्यकथा हिरकणीची

रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।

आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

No comments:

Post a Comment