Wednesday, July 29, 2009

शिवप्रतिज्ञा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।
येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।
मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥
चौक १
एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, "चल बाळा । जाऊ दरबाराला ॥
जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।
बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा" ॥
"चला, बाबा !" बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।
पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।
शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । कारंजे केले ।
तुषार उडविले । इंद्रधनुष्यांनीं कमान जिथं केली ! ।
अशी शोभा जिथं रंगली । आस भंगली । तिथंच, बघा आली ।
शिउला ओकारी !! ॥ सोन्याच्या फुलांचा सडा । कुबरे जिथं खडा ।
वाद्य झडझडा । झडति जिथं रंग आला नाचाला । जिथं प्राणीमात्र रंगला ।
तिथं शिवबाला कसा वीट आला । ठावं कोणाला !! ॥ तंव शहाजी बोले शहाला ।
"शिवबाळ आला । आपल्या भेटीला । कर रे बाळा ! कुर्निसात मानाचा । हा घ्यावा मुजरा
चाल
पोराचा । बंदा हुकमाचा । मुलगा हा आमुचा" ॥
शिवबाळ बोलला बापाला । "नमावं देवाला ।
नमावं तुम्हांला । नमणार नाहीं कधीं पण याला ।
अपमान झाला । राग मज आला ! ॥
हा ’बंदा’ नाहीं शाहाचा । बंदा रामाचा ।
पठया मानाचा । नमणार मान नाहीं कधीं याला ॥
राहवेना बाबा ! हो मला । जातो मी घरा । आतां या वेळा " ! ॥
चाल
असं म्हणून दरबारात्नंा बाळ थेट चालला ! ॥
जसा छावा सिंहाचा नाहीं ठाव भीतिला ! ॥
रस्त्यानं त्याअ वेळेला । एक ब्राह्मण नेई गाईला ।
तिचं वासरुं होतं पाठीला । येक खाटिक सुरा घेऊन मागं लागला ॥
’जब करतो गाय’ बोलला । पाणी गाईच्या हो डोळ्याला ।
झाली कावरीबावरी त्या वेळा । हंबरडा फोडूं लागली, लागली कांपायाला !! ॥
हजारों लोक बाजूला । पर बघा कोण पुढं आला ? । शिवबाळ वेगानं आला ।
अन् खाटकाचा हात उडविला । सारा लोक थक्क जाहला ! ।
कुजबुजती एकमेकाला । "आतां काय होईल ठाव देवा ! कोणाला" !! ।
शिवबाळ घरीं परतला । पर् त्याचा निर्धार झाला ।
"हिंदवीराज्य" करण्याचा हिय्या घेतला !! ॥१॥
चौक २
हिंदवी राज्य करण्याला । पुणें प्रान्ताला ।
शिवबाळ गेला । मावळीं बारा आणलीं सारीं कबजाला ॥
ध्रुवबाळ याच्या जोडीला । एकटा शोभला । निश्चय केला ! ॥
मावळ्यांची दुःखं ओळखून । द्रव्य देऊन । समाधान करुन ।
जोडली मनं त्यांचीं आपल्या कार्याला ॥ जशीं वानरं रामचंद्राला ।
यादव कृष्णाला । तसा मावळा झाला । शिवबाळाला ! ॥
चाल
नरस प्रभु रोहिला खोर्याळचे । देशपांडे होते त्या वेळा ॥
दादाजी मुलगा हो त्यांचा । दिलदार चित्ताचा झाला ॥
नरस प्रभु ऐंशी वर्साचा । पर सुरकुती नव्हती गालाला ॥
मिश कल्ले पांढरे जरी झाले । तरी लाली होती डोळ्याला ॥
दांत किती घट्ट हो सांगू ? । जणू वज्रपंक्ति तोंडाला ! ॥
हरबरे घट्ट मुलखाचे । करि चूर एका दणक्याला ! ॥
धार्मिक मोठया भक्तीचा । नित्य पूजी रोहिडेशाला ।
चाल
पर विजापुरचा अंकीत ॥ नरस प्रभु होता ॥
वसूल जमा देत ॥ रोहिडया खोर्याुचा यवनी राजाला ! ॥
चाल
एके दिवशीं दृष्टादृष्ट झाली । नरस प्रभु आणि शिवबाची ।
दृष्टिला दृष्टि ती भिडली । गांठ पडली जीवाशिवांची ॥
चाल
मग बाळ चौदा वर्साच बोले नरसाला ॥
"होतो विजापूर गांवाला । खाटीक कांपी गाईला ।
मी उडवलं त्याच्या हाताला । भवानी आली सप्नाला ।
रोहिडेश आला सप्नाला । अन् मला बोलूं लागला ।
’रे बाळा ! येऊं दे चढती दौलत तुला ! ॥
तू राख गायधर्माला । सारा मावळा येईल धांवून तुझ्या मदतीला ॥
कर बाळा ! आपल्या राज्याला, । असा दृष्टांत हो जाहला ! ॥
आतां राखा लाज पोराची यावं मदतीला" ॥
नरस प्रभु आणि दादाजी देती वचनाला ! ॥
चाल
नरसाजी आणि दादाजी । मोठे रणगाजी ।
जोडले निज कापी । झाला आरंभ मोठया कार्याला ।
शिवसांब सहाय हो ज्याला । अडथळा त्याला । कसला नाहीं झाला ! ॥२॥
चौक ३
रोहिडयाच्या डोंगरावर । जमले रणवीर ।
करण्या निर्धार । बेडी आर्यांची दूर करण्याला ॥
धन्य धन्य दिवस तो झाला । धन्य तो मेळा ! ।
अजरामर झाला ! ॥ गुरु कोंडदेव दादाजी ।
बाल शिवाजी । नरस, दादाजी । मावळे जमविले कैक त्या वेळा ।
सांबाच्या देवळामधीं । आणिल काय विधी ! ।
वेळ तशी कधीं । सुदिन तो झाला ! ॥
रोहिडेश सांब साक्षिला । ठेवून त्या वेळा ।
मध्यरात्रीला । बोलला शिवबाळ सार्या लोकांला ॥
"का जमलों आपण या वेळा । आज या स्थळा । सांगतो तुम्हांला ! ॥
चाल
घरदार लुटलं संपूर्ण । हैराण झालों जुलमानं ॥
हरघडी गाईची मान ॥ किती तुटती नाहीं त्या मान ! ॥
जर राखल नाहीं घरदारा । धिःकार आमच्या जगण्याला ! ॥
जर राखलं नाहीं गाईला । थू ! थू !! रे आमच्या जगण्याला !! ।
हिंदवी राज्य करण्याचा । आज आम्ही निश्चय केला ॥
चाल
काय भिताय आपल्या मरणाला ! ।
आज नाहीं उद्यां तर घाव मरणाचा आला ! ॥
नर्कांतले किडे नर्कात करती मौजेला ! ॥
काय तुम्ही तसले हो झाला ? । छे !
माणूस म्हणती तुम्हांला । म्हणून सांबाच्या शिवा पिंडीला ।
अन्‌ घ्यावं आतां शपथेला ।" असं शिवाजी हो बोलला ।
रोहिडयाच्या डोंगरानं, पुन्हां पुन्हां तोच बोल त्यांना सांगितला !! ॥
सांबाच्या पिंडीच्या भोंवती जमला मावळा । अन् पिंडीवरती ठेवलं हाताला ।
अन्‌तिथं घेतलं शपथेला !! ॥ धन्य ! धन्य ! दिवस तो ! धन्य रोहिडा झाला !! ॥३॥
चौक ४
देवळांत जमलेले लोक । होते कित्येक ।
त्यांत पर एक । होता स्वजनांचा घात करणारा ! ॥
जणू फुलं फुलली हो छान । दरवळलं वासाचं रान ।
पर लपला आंत दुष्मान । भुजंगम काळा ॥
जणुं राजहंसाचा मेळा । रोहिडयावर जमला ।
एक पर बगळा । त्यांत होता ठाव नाहीं कोणाला !! ॥
सापाचा विळखा चंदनाला । टोळ हिरव्या हिरव्या पानाला ।
वरी वरी दिसतो एकरंग । भिन्न अंतरंग । नित्य पर संग दोघांचा झाला !! ॥
नांव त्याचं होतं बाळाजी । सासरा नरसाजी । मेहुणा दादाजी ।
ज्याचा, तो हा झाला काळ देशाला । त्यानं लिहिला खलिता शहाला ।
कां "बंडाचा झेंडा उभा झाला । शिवाजीनें नरस वश केला ।
कितिक मावळा । झेंडयाखालीं जमला ! ॥
रोहिडयाच्या डोंगरावर । ऐका, सरकार ! ।
असला हा घोर । काल रात्रीला बेत हो झाला !!" ॥
फितुरीचा संचार झाला । तिनं त्याला खिळखिळा केला ।
अभिमान गेला । घातकी बनला ! ॥
चाल
फितुरानें देश किती मिळाले हो मातीला ॥
किती पापी चांडाळ गेले घोर नरकाला ! ॥
नखं दीड वीत बोटाला । लाली लालबुंद डोळ्याला ।
ते सुळके दांत तोंडाला । दीड हात जीभ टाळ्याला ।
रक्ताचा टिळा डोक्याला । हाडकांचा सांगाडा-असा आकार झाला !! ॥
जिथं जिथं गेली तिथं तिथं नाश तिनं केला ॥
रायगडच्या किल्ल्यावर गेली, माचा कोसळला ! ॥
झांशीच्या बुरुजावर गेली, बुरुज ढांसळला ! ॥
फितुरीच्या जळवा देशाला । सारं रक्त खाऊन देश निस्त्राण केला !! ॥
असो ! आतां ऐका गोष्टीला । असं पत्र धाडलं शाहाला । अन्‌ बाळाजी घरीं परतला ।
मग बोलला काय बायकोला । सांगीन दादांनो ! आतां पुढच्या चौकाला ॥४॥
चौक ५
बाळाजी गेले बायकोला । "ऐक गडे ! बोला ॥
उदयकाळ आला । झाले गेले हाल गरीबीचे ।
मान येतील सुभेदारीचे । सोन्यामोत्यानं ग फुलवीन ।
असा योग छान । आला या काळा ॥
शिवाजीचा नाद लागला । तुझ्या ग बापाला । तुझ्या भावाला । मावळा जमविला ।
बेत त्यांनीं केला ! ॥ रोहिडेश सांब साक्षिला ।
बंडाचा झेंडा उभा केला । आर्याचं राज्य स्थापावं ।
शिवानं बोलावं । थेरडयानं ऐकावं । चाळा असा केला !! ॥
चाल
साठी बुद्धि नाठी ! हे बोल !
खरे झाले ! गेला ग तोल ।
आतां दरी दुःखाची खोल ! ॥
शिवाजीनं पुंडावा केला ।
नरस प्रभु सामीलहि झाला ।
खलिता मी शाहाला असा लिहिला ! ।
चाल
आतां बादशाहा खूष होईल । बढती देईल ।
सुभेदार करील । खास ग मजला ।
मग हिर्यारमाणकानं फुलवीन । सोन्यामोत्यानं ग नटवीन ।
उमलेल हृदयाचं पान । असा योग छान ।
आला या काळा" ॥ ऐकून पतीचे बोल । सतीला खोल ।
मंचकीं घोळ दुःखाचा झाला ! ॥ कीं चवताळली वाघीण ।
काय फणफणली नागीण । पतीस पाहून ।
बोलली बोला ॥ "कधीं नाहीं उलट बोललं ।
वचन मोडलं । दुःख नाहीं दिलं कोणत्या वेळा ।
बाई ! केलं केवढं हें पाप । माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
राहवेना आतां हो मजला । ऐकावं चार शब्दाला ।
बायकोचा शब्द जरी झाला । तरि हळू चित्तावर झेला ॥
चाल
लागला डाग वंशाला । डाग नांवाला ।
डाग अंगाला । बाई ! केलं केवढं हें पाप ।
माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
कां जळली नाहीं लेखणी पत्र लिहितांना ॥
कां झडला नाहीं हो हात पत्र लिहितांना ! ॥
कां झडली नाहीं हो जीभ असं वदतांना ! ॥
म्हणतील ’फितूर’ तुम्हाला । घात देशाला ।
द्यात कीर्तीला । खास हा आर्या ॥
बाई ! मला वाटते लाज । अशांची आज ।
झाले मी भार्या !! ॥ यवनांनीं धूमाकूळ केला ।
भीती साध्वीला । भीती गाईला । फांस कंठाला ! ॥
देवतांच्या मूर्ति भंगल्या । अशा त्यांच्या लीला चालल्या ।
जो झटे मुक्त करण्याला । अशा जीवाला ।
दीन दुबळ्याला । त्याच शिवबाला । वैरी तुम्ही झाला ॥
चाल
आग लागो सोन्यामोत्याला । आणि असल्या उसन्या भोगाला" ।
चाल
पर रुचला नाहीं बोला त्याला । लालेलाल झाला ! ।
म्हणे बायकोला । "हट्‌ गे वेडे ! सांगूं नको कांहीं मजला ॥
नवर्याबची लाज नाहीं तुला । आंवर जीभेला ।
लहान तोंडाला । मोठा घांस झाला !! " ॥५॥
चौक ६ वा
बादशाह खलिता वाचून । झाला रागानं ।
लाल, मग त्यानं । पाठवलं पत्र नरस प्रभुजीला ।
"तुम्ही घोर अपराध केला । शिवाजीच्या नादिं लागला ।
रोहिडयाच्या डोंगरावर । झाला विचार ।
आमचा कारभार । हाणुन पाडण्याला ! ॥
शिवाजी टवाळ एक पोर । तुम्ही पर थोर ।
विचार हा घोर । सुचला तुम्हाला कसा समजेना ।
होतील यातना नाना । बंडखोरांना ।
पाजी हरामांना । तुमच्या सारख्यांना ॥
या शरण आठ दिवसांत । मावळ्या सहित ।
नाहींतर घात । खास हो करिन तुमच्या जीवाला ।
करवून जप्त जहागीर । बेचिराख करिन घरदार ।
उडवीन तुमचं मग शीर, । यावं भेटीला" ॥
चाल
शहाच्या वाचलं पत्राला । नरस प्रभू घाबरुन गेला ! ॥
हाय खाल्ली त्याच वेळेला । पूजितो रोहिडेशाला ॥
अनुष्ठान करित सांबाला । सात दिवस उपास केला ॥
चाल
दादाजी प्रभु तंवा बोलला आपल्या बापाला ॥
"बाबा ! द्यावा धीर चित्ताला । कुणासाठीं करतां चिंतेला ? ॥
दोन दिवस जगणं तुम्हांला । मग कोणच्या करता चिंतेला ? ।
जहागीर राहावी पोराला । म्हणून करतां काय काळजीला ? ।
पर हा देह दिला धर्माला । जहागीर गेली तरी फिकीर नाहीं हो मला ! ॥
रोहिडेश वाली आम्हांला । तो दूर करील दुरिताला ।
असं बाबा ! असल्या प्रसंगीं वाटतंय मला" ॥
चाल
पर कशी बातमी कळली शाहाला । कळेना हो त्याला ।
वैरी कोण झाला । लागली चिंता हीच दादाला ॥
रोहिडेश सहाय हो त्याला । आला मदतीला । देव वश झाला ! ॥६॥
चोक ७
ती बातमी कळली शिवबाला । बाळ जरी झाला ।
धीर त्यानं केला । पत्र मग धाडलं नरस प्रभुजीला ।
काय चौदा वर्साच पोर । देई पर धीर ।
थोरामोठयाला ! ॥ "शाहाचा राग फार झाला ।
आपल्यावर आला । दुःखाचा घाला । कळली ही वार्ता आज आम्हांला ॥
रोहिडेश सांब मदतीला । सोडुं नका आपल्या धीराला ।
भार देवाला । भक्ताचा झाला ॥ ज्यानं दिलं सहाय्य ध्रुव बाळा ।
अंबरीषाला । पंडुकुमारांला । राखील तोच देव आम्हांला ! ॥
हिंदवी राज्य करण्याला । पुढं जो झाला ।
त्याच्या मदतीला । देव हो आला !!
चाल
नरसाजी ! आणि एक बोल । ऐकावा सांगतों तुम्हांला ॥ देहाची करुन हो ढाल । राखीन आधीं तुम्हांला ॥
देहाची करुनियां भिंत । आड करिन तुमच्या जीवाला ॥
माझ्या रक्ताचा हो कारंजा । भिजवील आधीं तुम्हांला ॥
माझ्या लालबुंद डोक्यानं । पूजीन तुमच्या पायांला ॥
पंच प्राणांच्या हो ज्योतीनं । ओंवाळीन आधीं तुम्हांला ॥
ही खूण द्यावी हृदयाला । लक्षांत ठेवा या बोला ।
चाल
जंवर माझा नाहीं जीव गेला ।
तंवर धक्का नाहीं कसला तो तुमच्या जीवाला ! ॥
लौकरच आतां मी येईन तुमच्या भेटिला" ॥
असं पत्र धाडलं नरसाला । इकडं काय प्रकार झाला ।
नरस प्रभू अनुष्ठान करित होते सांबाला ॥
पूजा बांधली रोहिडेशाला । गंधाचा वास पसरला ।
धूप देवाला हो घातला । इतक्यांत पत्र घेऊन एक जण आला ॥
त्यानं दिलं पत्र नरसाला । नरसप्रभू वाची पत्राला ।
शिवाजीचं पत्र पाहून नरस गहिंवरला ! ॥
"म्हणे, धन्य ! धन्य ! शिवबाळ आलं जन्माला !! ॥
अजून मिसरुड फुटलं नाहीं त्याला ! ॥
पद देतो धीर आम्हांला " ! असं बोलला आपलं आपणाला ।
मग डोळे घट्ट झांकून । करित ध्यानाला ! ॥
एकाग्र चित्तानं झाला । मग काय चमत्कार पाहिला ।
ऐकावं सांगतों तुम्हांला । पिंडित्नंा त्याच वेळेला ।
’घुम्‌म्’ असा आवाज झाला ! ॥ दुभंगली पिंडी ते वेळा ।
अन् शिवाजीचं रुप घेऊन सांब प्रगटला ! ॥ असा चमत्कार पाहिला ।
मग डोळे उघडून पाहिलं बाहेर त्या वेळा ॥ शिवबाळ त्याला दिसला ! ।
आला नंदीचा हो कंटाळा । म्हणुन घोडयावर बसून जणु काय सांब भेटिला आला ! ॥
बघा इकडं दुसर्याट बाजूला । हा कोण त्याच वेळीं आला ।
दादाजी पुढच्या बाजूला । अन्‌ बाळाजी मागच्या बाजूला ।
दादानं त्याला कैदा केला ! । पुढं काय प्रकार झाला । सांगीन पुढच्या चौकाला ॥७॥
चौक ८
दादाजी बोले शिवबाला । "वैरी हा झाला ।
बादशाहाला । बेत कळविला यानं हो सारा ।
म्हणून कैद केलं मी याला । आणि आणलं आज या वेळा ।
आतां हातीं घ्यावी तलवार । उडवावं शीर ।
देहाचा चूर । करुन बळि द्यावा ।
घारीगिधाडाला !! ॥ इवितिवी नाश होणार ।
आमचा खरोखर । करा परि ठार ।
दुष्ट हा आधीं घात करणारा । देहान्त प्रायश्चित्त याला ।
अशा पातक्याला योग्य या काळा ॥ बहिणीचा माझ्या पति जरी ।
असे हा तरी । पाप जो करी । दया माया कधीं दाऊं नये याला ॥
आज साप आम्हां चावला । उद्या डसेल कितिक दुसर्यायला ॥
’आईबाप भाऊ सोयरे । कांटे जर झाले ।
उचलावे सारे’ । धर्म हें वदला "।
चाल
दादाचा सल्ला आवडेना बाळ शिवबाला ॥
मग बाळाजीला बोलला । "बाळाजी ! ऐका शब्दाला ।
कठिण काळ आला । धर्म गांजियला ।
फांस कंठाला ॥ निशिदिनीं लागला घोर भरतखंडाला ! ॥
गाय हंबरती हरघडी । रडती बापडी ॥
सुरी पर खडी । मानेवर आली ! ।
झाली मान धडावेगळी ! । जीभ लांब बघा लोंबली ! ।
बघा चालल्या गुळण्या रक्ताच्या जीवा अंतरली !! ॥
जर नसे रुचत हा बोल । घ्या ही तलवार ।
उडवा हें शीर । आधीं या वेळा । मग सुभेदार होऊन भोगा सोहळा !" ।
चाल
उपरति झाली चित्ताला । बाळाजीपंत गहिंवरला ॥
मिठी मारली घट्ट शिवबाला । पाण्याचा पूर डोळ्याला ॥
मग काय बोलला शिवबाला । "अर्पिला जीव चरणाला ॥
जरी दिलं इंद्रपद मजला । तरी नाहीं शिवणार त्याला ! ॥
आपल्या चरणाचा मी पायपोस । काय काम सांगावं मजला" ।
असा सारा प्रकार झाला ।
चाल
पुढं तोरणा किल्ला घेऊन । बाळाजीरावानं ।
बांधलं तोरण । हिंदवी-स्वराज्याचं त्या वेळा ॥
’पांडुरंग’ शाहीर झाला ॥ कीर्ति गाण्याला । आज या वेळा ॥८॥

No comments:

Post a Comment