Sunday, July 12, 2009

सिंहगड (पोवाडा) - शाहीर स्वातंत्र्यवीर सावरकर

चौक १
धन्य शिवाजीतो रणगाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥ध्रु०॥
देशमाजीं कहर गुदरला पारतंत्र्य जहरें ।
हलाहलहि या परदास्याहुनि झणिं प्राशितां बरें ॥
गोमातांची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची ।
परदास्याची सुरी बंधु हो चिरी एकदांची ॥
देश हिंदुचा, हाय ! तयाचा मालक म्लेंच्छ ठरे ।
परि परमेशा फार दिवस हें रुचेल केविं बरें ॥
चाल
मग आर्य देशतारणा । अधम मारणा ।
कराया रणा । परदास्य रात्रि नाशाला ।
स्वातंत्र्य सूर्य उदयाला । शिवनेरीं श्रीमान्‌ झाला ।
त्या सूर्याचा किरण रणांगणि तळपे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१॥
चौक २
ठायीं ठायीं वीर मराठा सरसावुनि भाला ।
रामदास मत छत्रपतीचा अनुयायी झाला ॥
स्वातंत्र्य श्री-तोरण, तोरण-गड अवघड पडला ।
भगवा झेंडा त्या भाल्यासह सरसर वर चढला ॥
प्रतापगडची शांत कराया स्वतंत्रता देवी ।
पुढती फाडुनि अफझुल्याला भग तो मग ठेवी ॥
चाल
ते धन्य मराठे गडी । घेति रणिं उडी ।
करुनि तांतडी । देशार्थ मृत्युही वरिला ।
शाहिस्ता चर चर चिरिला । गनिमांनि वचक बहु धरिला ।
झुरतो परि रिपु अजुनि नांदतो सिंहगडामाजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥२॥
चौक ३
जरा लढाई पाहुनि वदली जिजा शिवाजीला ।
गड सर केल्याविण वरणें ना अन्न शपथ तुजला ॥
परके बाळा भूमातेला ते लाथा देतां ।
अन्न न गमतें गोमांसाचा घांसचि तो घेतां ॥
गुलामगिरिची बेडिच पायीं अशीच खुपतांना ।
गुलामगिरिच्या नरकामाजीं असेच पचताना ॥
चाल
निर्जीव अन्न कां रुचे । उदर शत्रुचें ।
फाड तेथिंचें । रक्तानिं भूक शमवावी ।
मांसानि भूक शमवावी । अतडयांनि भूक शमवावी ।
घ्या गड कड कड फोडुनि अधरां धावा ये काजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥३॥
चौक ४
धन्या माता जिजा तिलाची शिवबा सुत साजे ।
स्वतंत्र झाल्यावीण सुताला अन्नचि दे ना जे ॥
स्वातंत्र्याच्या सुखनीमाजीं जन्म स्वतंत्रांचे ।
गुलामगिरिच्या उकिरडयावरी गुलाम निपजाचे ॥
श्वानहि भरतें पोट बापुडें चघळुनिया तुकडे ।
शेणामाजीं बांधुनि वाडे नांदति शेणकिडे ॥
चाल
संसार असा जरि करी । मनुजता तरी ।
कशासी धरी । हो तुच्छ किडाचि न कां तो ।
जो गुलाम असुनी हंसतो । परदास्यीं स्वस्थचि बसतो ।
धिग् धिग् वदला श्री शिव घेउनि गड राखूं बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥४॥
चौक ५
प्रभात झाली वाद्यें झडली मुहूर्त लग्नाचा ।
बोहल्यावरी उभा राहिला सुत तानाजीचा ॥
घटिका पात्रें मोजुनि द्विजगण शेवटच्या घटिला ।
दंगल सोडुनि मंगल व्हाया सावधान वदला ॥
वदला द्विज परि कुणि भेटाया तानाजीस आला ।
आला तो तों तरवारींनीं मंडप खणखणला ॥
चाल
तों हर हर एकचि झाला । चमकला भाला ।
म्हणति रे चला । शिवराय दूत पातले ।
हें लग्न राहुं द्या भलें । युद्धार्थ जनन आपुलें ।
लहान मोठा निघे मराठा पुढती तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥५॥
चौक ६
परमात्म्याशीं जीवात्म्याची तन्मयता झाली ।
वायुकुमर कीं रघुविरचरणीं मिठी पुन्हां घाली ॥
अरुणचि की श्रीजगन्मित्रवर सूर्या आलिंगी ।
आलिंगी कीं तानाजी श्रीशिवरायालागीं ॥
भेट जाहली मसलत बसली राया धाडिं मला ।
प्राणहि देईन, घेईन गड परि तानाजी वदला ॥
चाल
हें पर्व स्वातंत्र्याचें । शत्रु रुधिराचें ।
स्नान मज साचें । घडुं द्यावें हो शिवराया देशार्थ पडो द्या काया ।
जाईल ना तरी वाया । अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥६॥
चौक ७
शिवरायाच्या तीरा जा बा तानाजी वीरा ।
वीरामाजीं हो रणगाजी अरि मारुनि घोरा ॥
सिंहगडावरी तुझी आर्य भू फोडी हंबरडे ।
गुलामगिरीचा खून पाडण्या जा जा जा तिकडे ॥
देवदूत हो स्वातंत्र्याच्या पवित्र कार्याला ।
जातो आहे अमुचा ताना रक्षण व्हा त्याला ॥
चाल
हे मंगल तारागण हो । अप्सरा जन हो ।
गडावरि जा हो । तानाजि लढाया जातो ।
अरि फार, एकला कीं तो । परि धीर पुढेंची घुसतो ।
त्या धीरावरि वर्षा अमृत आणि फुलें ताजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥७॥
चौक ८
मध्य रात्रिची वेळ शांत परि भयदायी थोर ।
गडा खालच्या झाडी मध्ये घन अंधःकार ॥
रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द उमटे ।
करवंदीच्या एका झाळिंत तो ध्वनि घोर उठे ॥
"अहो मारिती पूर्वज तुमचे स्वर्गांतुनि हांका ।
अहो मराठे कान देउनी तुम्ही सर्व ऐका ॥
आई तुमची ही भूमाता पाठीवरी तिच्या ।
उठला चाबुक फुटल्या ना रे धारा रक्ताच्या ॥
या रक्ताच्या एका थेंबासाठीं लक्ष शिरा ।
अरिच्या कुटुनी मलम लावणें आईच्या शरिरा ॥
अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा ।
त्यानें येउनि, देउनि प्राणा, मजसह गड घ्यावा ॥
चाल
बाकीचे षंढ हो चला । गृहाप्रति वळा ।
बचावुनि गळा । गळसरी त्यांत घालणें ।
तें योग्य तयांना लेणें । तलवार करीं ना घेणें ।"हर हर गर्जुनि सिंह झाडिंतुनि चवताळुनि ये जी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥८॥
चौक ९
रामा लक्ष्मण किंवा भीमा अर्जुन तो गमला ।
अपुल्या भावा सूर्याजीला तानाजी वदला ॥
कल्याणाचे दारामागें दबा धरुनि बसणें ।
शंभर घेउनि गडी दार मी फोडिन लाथेनें ॥
शंकित कां हो, हस्त, मस्तकें लढतां जरि पडतीं ।
धडें तथापि दार फोडितिल पार आमुची तीं ॥
चाल
हें कार्य आमुचे ठरे । बाकि जें उरे ।
तें करा पुरे । किल्ल्यांत शिरुनि तें खानीं ।
आणि तुम्हीं वीर मर्दानीं । हां निघा चाललों हा मी ।
जा तरि येशिल परत भेटण्या केव्हां तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥९॥
चौक १०
दरड उभट बहु चढणें मुश्किल घोरपडीलाही ।
म्हणुनि पहारा तिथें गडावरि मुळिं नव्हता कांहीं ॥
साधुनि ही संधी तानाजी तिथें नीट आला ।
सज्ज नव्हे चढण्यासि हवेमधिं उडण्यासी झाला ॥
कोणी वदतां, ’पाय निसरतां अहा ! काय होई ।’
वदे ’शूर देशार्थ मरोनी स्वर्गाप्रति जाई ॥’
चाल
यशवंती सरसर चढतां । हर्ष हो चित्ता ।
सोल घे हातां । तानाजि चढूं लागले ।
सद्‌भाग्य चढूं लागले । स्वातंत्र्य चढूं लागलें ।सांभाळी रे म्लेंच्छा आतां आला तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१०॥
चौक ११
एकामागुनि एक मराठा सरसर वर चढला ।
दहा हजारावरि रिपु असुनी चढविति ते हल्ला ॥
कोण कोठुनी किती आणखी कसें कुठें लढलें ।
दडले अंधारीं रिपु अपसामधिं झुंजुनि पडले ॥
खालीं वरती मागें पुढती आजूबाजूनीं ।
सैरावैरा पळतां मारिती भाला भोंसकुनी ॥
चाल
तो मर्द मराठा गडी । शत्रुंचीं मढीं ।
हजारों पाडी । तुडवीत चिखल मांसाचा ।
पोहुनी पूर रक्ताचा । दे मार करित ये साचा ।
कल्याणाचें दार धडाडे झाली रे बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥११॥
चौक १२
झाली बाजी परि तो कोठें आहे तानाजी ।
मारित काटित छाटित चढला रणरंगामाजीं ॥
उदयभानु तो नजरे पडतां घे घे मार उडे ।
झुंज झुंजतां नजरा फिरल्या गर्जे सिंह पुढें ॥
सह्याद्रीच्या वाघा शेळी उदयभानु खाशी ।
खान आपुल्या बापा म्हणतो मी रजपुतवंशी ॥
धिक्‌ धिक्‌ नीचा लाविसि वंशा लाज रजपुतांच्या ।
श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या प्रतापसिंहाच्या ॥
मुसलमान कां बाप तुझा जो लढसी आम्हांसी ।
आर्यभूमिला मुक्त कराया जे झटती त्यांशी ॥
वदोनि पुनरपि तुटोनि पडला जरि तो श्रमलेला ।
उदयभानुचा वार मर्मिंचा अवचित तो बसला ॥
चाल
मूर्च्छना तया भीतरी । पातकी खरी ।
वीररसशाली । तानाजी खाली येतो ।
तो धैर्य मेरु उसळीतो । शिवकरिचा भाला गळतो ।
भूमातेच्या मांडीवरती पहुडे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१२॥
चौक १३
पडतां ताना आणि मराठे बंधू पळतांना ।
सूर्याजीची सिंहगर्जना भय देते कर्णा ॥
’अरे चालला सांगा कोठें सर्व मराठे हो ।
भाला ठेवा भरा बांगडया मग पुढती जा हो ॥
बाप तूमचा मरुनी पडला येथें लढतांना ।
परत जाउनी नरकी ढकला अपुल्या पितरांना ॥
जाउं इच्छितां काय धरोनी अपुल्या दोराला ।
अहो षंढ तो दोर मघांची तुटोनीयां गेला ॥
चाल
धिक्कार शब्द उठले । पुन्हा परतले ।
मराठे भले । घनधोर युद्ध मातले ।
वीरासि वीर तो भिडे । देशार्थ मराठा लढे ।
धमार्थ मराठा लढे । त्यांना घुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१३॥
चौक १४
’अहो धरा तो अधम घातकी मातृघातकी हो ।
चला चला हो त्या ठायाला अन्य विषय राहो ॥
सर्व मराठा लोटे तिकडे घ्याया सूडाला ।
उदयभानु परि अधींच कोणी वर कां पाठविला ॥
त्याच्या रक्तीं भिजवुनि फडका केला झेंडा तो ।
स्वातंत्र्याचा विजयध्वज जो अजुनि तिथें डुलतो ॥
चाल
तानाजिकडे जन वळे । दाटले गळे ।
वाहती जळें । तानाजि कांहींसा उठला ।
जय पाहुनि ’हर हर’ केला । ’देशार्थ मरें मी’ वदला ।
मागुति पडला आतां कैंचा उठतो तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१४॥
चौक १५
मग त्या गडची भूमी ठेवी तानाजिस उदरीं ।
तेव्हां पासुनि रत्नावकर बहु तीचा द्वेष करी ॥
स्वातंत्रतेच्या रणांत लढतां स्वतंत्रतेसाठीं ।
त्या पक्षाचा कैवारी श्री मुरहर जगजेठी ॥
देशाला हो धर्माला हो स्वातंत्र्याला हो ।
बा तानाजी सूर्याजी श्री शिवरायाला हो ॥
धन्य मराठे पुनीत झाले अरि-रुधिर स्नानें ।
आणि ’विनायक’ त्यांच्या नामें यशःसुधापानें ॥
असो समाप्ती छत्रपतीच्या सरस्वतीमाजीं ।
’गड आला परि सिंह चालला’ अमुचा तानाजी ॥
धन्य शिवाजी तो रण गाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥

No comments:

Post a Comment