Wednesday, July 29, 2009

छत्रपती शिवाजी अवतारी कसे ? (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

चौक १, चाल : मिळवणी

चारी खंडांत झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यांत रणशूर,

सर्वांहुनी श्रेष्ठ शिवाजी खास । षड्‌गुणैश्वर्य संपत्ती ज्यास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥ध्रु०॥

औदार्य आणि सत्कीर्ति, विज्ञानस्फूर्ती, वैराग्य वृत्ती,

गुण हे प्रभूवीण नसे कवणास ।

शिवाजीच्या ठायीं दिसती आपणास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

सर्वदा जयाला यश, कधीं न अपयश,

सकळ जन खूष, कार्यामध्यें विघ्न नसे मुळीं ज्यास ।

दहशत पडली यवन राज्यास ।

म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

प्रसन्नपूर्ण ज्यास लक्ष्मी, न पडे कधीं कमी,

पाहिजे तिथे भूमी, द्रव्य देउनि उभी साह्यास ।

दरिद्र दिसेनाचि पाहावयास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

औदार्य विलक्षण जाण । त्याचें ऐकुनी घ्या अनुमान ॥

गुण चौथा उत्तम ज्ञान । त्यास म्हणती साधु विज्ञान ॥

वैराग्य पांचवें छान । सत्कीर्ति आली धावून ॥

चाल दुसरी

औदार्य ज्ञान लक्षण पहा शिवबास ।

वाटली मिठाई आग्र्यांत धनिक गरिबांस ।

अटकेंत असूनी ठकविलें औरंगजेबास ।

ऐकुनी सुज्ञजन म्हणती भले शाबास ।

ज्यानें आणून पोंचविलें मथुरेहुन सांभास ।

दिले लक्ष रुपये बक्षीस मुळारंभास ।

मोडते

काशी कृष्ण विसाजीपंतास, कितीक संतास,

साधु महंतास, देणग्या देउनि हारविला त्रास ।

षडगुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥१॥

चौक २, चाल : मिळवणी

एकनिष्ठ सद्गुरु भक्ती, तशीच सुविरक्ति, चरणीं लोळे मुक्ती, गुरुदक्षणा मागतां ज्यास ।

राज्य अर्पिलें उदारपणें खास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

कीर्तनांत असतां भले, यवन धांवले, कौतुक केले, देवानें दूर नेलें यवनास ।

त्यांत कितीकांचा जाहला नाश । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

काम क्रोधादिक सर्वथा, जिंकुनी स्वतः, परस्त्री माता, मानुनी पाळी नीतीधर्मास ।

शिक्षा देतसे दुष्ट कर्मास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

कपटासी कपट लढवून । मारिला अफझुलखान ॥

हें यश नव्हे नव्हे सामान्य । युक्ती बुद्धि शाहाणपण धन्य ॥

शाहिस्त्याचें लाखभर सैन्य । त्यांत शिरुनी केलें महाविघ्न ॥

चाल दुसरी

लक्ष्मी, बुद्धि आणि तिसरी शरीर संपत्ति ।

तपोबळ चौथे त्यामुळें यशस्वी गती ।

छावणींत शत्रुच्या ठरवुनी लग्नतिथी ।

वरातींतुनी शिरतां मनांत नाहीं भिती ।

बोटें तोडून खानाची केली फटफजिती ।

मोडते

कल्पना अजब किती अशा, शत्रूची दशा,

केली दुर्दशा, वाचुनी पहा पहा इतिहास ।

षड्‌गुणैश्वर्य संपत्ति ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥२॥

चौक ३, चाल : मिळवणी

रामकृष्ण अवतार जसा, पुरातन ठसा,

शिवाजी तसा । कलींत गोब्राह्मण पालक खास ।

उज्ज्वल कीर्ति चारी मुलखास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

भगवद्भक्तियुक्त मन स्थैर्य, तसेंच औदार्य, अचाट शौर्य, भारती वीर पाहतां ग्रंथांस ।

कृष्ण आणि शिवाजी एकच रास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

दोघांची समान करणी, जन्म एक वर्णी, जगीं अवतरुनीं, दोघांनीं केला दुष्टांचा नाश ।

रक्षिले स्वधर्म आणि सुजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

चाल

सद्‌गुरु सांदिपनी तिकडे । रामदास त्यापरी इकडे ॥

गर्गाचार्य पुरोहित तिकडे । गागाभट काशीकर इकडे ॥

मातृकूळ दोघांसी वांकडे । दर्शवी साम्य दोहीकडे ॥

चाल दुसरी

त्यानें काळयवन याने अफझुल वधिला रणीं ।

मृत गुरुपुत्र त्यानें आणून दिला तत्क्षणी ।

वाघिणीचें दूध यानें दिले गुरुलागुनी ।

त्याचा पुत्र सांब याचा संभाजी दुर्गुणी ।

त्यास उद्धव अक्रूर साह्य मनापासुनी ।

येसाजी तानाजी यास मिळाले बाळपणी ।

मोडते

श्रीकृष्ण श्यामल वर्ण, अवतारी पूर्ण, तसेच अवतीर्ण,

शिवाजी अंश शिवाचा खास ।

कृष्ण योगी हाहि योग्याचा दास ।

म्हणून अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥३॥

चौक ४, चाल : मिळवणी

दोघांच्या अखेरी पदा, आली आपदा, मोक्ष संपदा,

दोघांची मिळणी स्वयंब्रह्मास । आनंदात गेले निजधामास ।

म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास ॥

श्रीकृष्ण गेल्यावर बली, सुटला कली,

तसेंच या स्थलीं, शिवाजी मागें पीडा सुजनास ।

दुजा नच भारतीं वीर तुलण्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

भारती वीर निवडिले तीन, भीष्म आणि कर्ण, युद्धिष्ठिर जाण,

एक उणा गूण प्रत्येकास । शिवाजी त्रिगूण संपन्न खास ।

म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ।

चाल

भीष्मास भक्ति आणि शौर्य । परि मुळीं नसे औदार्य ॥

धर्मास भक्ति औदार्य । परि अंगीं नसे मुळीं शौर्य ॥

कर्णास शौर्य औदार्य । परी नसे भक्तिचें वीर्य ॥

चाल दुसरी

या त्रिगुण बळें परसत्ता लया घालविली ।

दोन तपांत अवघी पातशाही हालविली ।

तलवार भवनी रात्रंदिन झुलविली ।

आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।

म्लेंछाची करुन दुर्दशा नरद भुलविली ।

आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।

राजनिष्ठा प्रजा सोन्या मोत्यानें फुलविली ।

मोडते

यवनांची राक्षसी नीती, लुटली संपत्ती, पाहून अधोगती, दया उपजली शिवरायास ।

षड्‌गुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥४॥

चौक ५, चाल : मिळवणी

सामर्थ्य लंकेमध्यें किती, परी रघुपती,

वान्नरा हातीं, घेतली जिंकुनी त्या रावणास ।

शिवाजीनें तसेंच केलें यवनास ।

म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

अज्ञान गरिब मावळे, दिसती बावळे,

काळे सावळे, परी रणीं नायकती कवणास ।

रंकांचे राव केलें स्वजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥

स्वराज्य स्थापुनी बेलाशक, आरंभिला शक, राज्य अभिषेक, करुनी तोषविले देवास ।

छत्रपती पद जोडिले नांवास । म्हणुन अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥

चाल

भाग्यवान भूपती शूर । दारिद्रय पळविलें दूर ॥

अष्टप्रधान मानकरी वीर । वेवस्था केली सुंदर ॥

सैन्यांत शुर भरपूर । नसे कोणी मनीं दिलगीर ॥

चाल दुसरी

राज्यारोहण प्रसंग सारांश सांगतो तुला ।

दीड कोटि होन खर्चिले सढळ हे तुला ।

गागा भटास पांच लक्ष दिले दक्षणा पांतुला ।

सोळा हजार होन भार आपुली सुवर्ण तुला ।

दान करतां कीर्ती गेली हिमाचळ सेतुला ।

रामभक्त पाहुन या मालोजीच्या नातुला ।

थरकांप दिल्ली विजापुरच्या राहू केतुला ।

मोडते

शिवचरित्रावर तुम्ही टिका, शब्दवाटिका,

गुरुकृपें टिका, साधिल्या रामचंद्र विप्रास ।

सुंदर ज्यांचें लाघवी प्रास, साखर जणूं लाविली गोक्षिप्रास ॥

No comments:

Post a Comment