Wednesday, July 29, 2009

प्रतापगडचा रणसंग्राम (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार ।
कपटभाव वळखिला खानाचा, केला त्याचा मग संहार ॥ध्रु०॥
चौक १
चंद्रराव मोरे ठार करविला, जावळी जोडली मुलखाला ।
बाई कर्हामड सुभे आदिलशाहाचे हळुहळु आले कबजाला ॥
बातमी कळली ही आदिलशहाला मोठी धडकी भरली त्याला ।
म्हणे "बडा सैतान मत्त हुवा ! क्या करना अल्ला ! अल्ला !! " ॥
आदिलशाहानं लौकर तेव्हां मोठा दरबार भरवीला ।
बडे अमीर उमराव जमविले कितिक हिंदु सरदारांला ॥
कर्नाटकांतुन जल्दी बोलावुन आणलं शहाजी राजाला ।
"धाक घालुन बापाला बंदोबस्त करिन"" आशा ही अल्लीला ॥
चाल
जरि होता शहाजी शाहाचा मसबदार ॥
तरी तोच होता खरा, शहा , मोठा शिरजोर ॥
त्याच्या हुकमावीण एक नव्हतं पान हलणार ! ॥
चाल
बादशाहा शब्द दुभंगला । बाद शाहा झाला ।
शहाजी शहा झाला ! । एवढी त्याची होती फौज तय्यार ।
अल्ली आदिलशाहा झाला गारेगार ! ।
उसना पर आणला जोर त्यानं फार ॥
चाल
आदिलशहा बोलला शाहाजीला । "तुम्ही आमचे नोकर झाला ।
पोरानं पुंडावा केला । कल्याणचा खजिना पळविला ।
वाई, कर्हा ड, बेजार केला । हा आमचा अपराध झाला ! ।
दोन गोष्टी सांगा पोराला । बरं वाईट होईल जीवाला" ।
मग बोलला शहाजी शाहाला । "किती सांगू, हुजूर ! कारटयाला ? ।
काय म्हणता ? लुटलं खजिन्याला ? । हा मोठा अपराध झाला ।
पण पोरटा हूड फार झाला । ऐकेना माझ्या शब्दाला ।
म्हणून ठेवला दूर मी त्याला ! । पुणें प्रांतीं जाहगीरिला ।
आमचंच बापलेकांचं आधीं पटेना एकमेकांला । मग सांगूं काय मी त्याला ? ।खावंद ! आपण आणावं त्याला वठणीला ! लावावी वेसण नाकाला ।
दरदर ओढुन आणावं आपल्या सदरेला ॥ मग दोन शब्द सांगावे त्याला" ।
असं बोलला आदिलशाहाला । मग शाहा बोलला सदरेला ।
शाहाजीचा उपाय सारा थकला । कोण कैद करील हो त्याला ? ।
"मैं जाता हूँ; क्या बात है !" असा नाद आला कानाला ।
मग शाह बोलूं लागला । "जिता धरुन आणावं सदरेला" ।
पैजेचा विडा मांडला । सारा लोक बसला जागेला ।
पर एक कोणी जाऊन घेईना पैजेला ॥ मैं मैं ! करणं काम तोंडाला ।
वैं ! वैं ! करावं लागेल जीवाला ॥ म्हणून कोणी नाहीं उठला ।
पर जरा वेळ गेल्यावर आला । एक वजीर, धिप्पाड झाला ।
अफझुल्ला म्हणति हो त्याला । त्यानं लावला हात पैजेला ।
अन्‌ बोलला काय सदरेला । "मैं गिरफदार करता हूँ " विडा उचलला ! ॥
या अल्ला ! अल्ला ! शब्दाचा गजर जाहला ॥
चाल
शाहाजी राजानं लिहिलं शिवबाला "असा घडला हा प्रकार ।
गाफिल कधीं रे राहूं नको, करि फौजफांटा तूं तय्यार" ॥१॥
चौक २
पान उचललं हिरवं पैजेचं, पिकला परि अफझुलखान ।
’आपल्या हातानं मरण ओढवलंस’ बोललं सदा मन जोरानं ॥
उंट, घोडा, पायदळ जमविलं, बारा हजार खानानं ।
विजापूरहून खान चालला दौड मोठया सरंजामानं ॥
वेशीबाहेर अपशकुन जाहला हत्त्ती बीनीवरचा मेला ।
निशाण पडलं ! ऊर धडधडलं, बेत अल्लाचा ना कळला !॥
धीर धरुन पर पुढं चालला, लागलं गांव पंढरपूर ।
तुकडे केले विठ्ठल मूर्तीचे, नाहीं कुणाचा दरकार ॥
चाल
खान आला तुळजापुरला । छिन्नभिन्न केलं देवीला ।
जात्यानं भरडलं तिला । देवीचा कोप जाहला ।
जगदंबामाई शिवबाच्या गेली सप्नाला ॥ काय बोलली ऐका राजाला ।
"बत्तीस दातांचा बोकड कांपावा मला ॥ रक्तानं त्याच्या माखावं माझ्या अंगाला ॥
मुंडक्याचा नारळ बांध माझ्या देवळाला" ॥ इकडं खान पुढं चालला ।
जातां जातां फोडेलं त्यानं अशा कैक मूर्तीला ! ॥ बाटवले कैक लोकाला ।
घरंदारं लुटली कैकांची त्रास लोकाला ॥ किती बळी पडले चैनीला ।
कितिकांची नरडीं उडविलीं, डोळा काढला ! ॥ कितिकांच्या बायका पळविल्या ।
दारुचा पाट चालला । गुडगुडी लावती तोंडाला । देहभान नव्हतं कोणाला ।
ब्राह्मणाच्या धरती शेंडीला । अन् बांधती उंच झाडाला ।
अंगात्नंा खुपसती भाला । असं हाल करती जीवाला ! ।
अशा अशा करुन खेळाला । खान आला वाई गांवाला ।
तळ दिला वाईला पुढचा बेत करण्याला ! ॥
चाल
भरली घडी खानाची मृत्युच्या आला जवळ जो अफझुल्ला ।
पतंग विसरुन देहभानाला झडपी जोरानं वणव्याला ॥२॥
चौक ३
एके दिवशीं दोन घटका रात्रिला किल्ल्याच्या गच्चीवरती ।
सभोंवार सरदार, शिवाजी राजे होते मध्यावरती ॥
नीलनभाच्या हृदयावरती फुलली चंद्राची कोर ।
स्फटिकासम चांदण्या चमकती शीतळ वेळिं सभोंवार ॥
सह्यगिरीच्या हृदयावरि ’शिवचंद्र’ शोभला सुकुमार ।
नेता पालकर, ताना मालुसरे, तारे झळकती रणवीर ॥
सह्यगिरीवर जणु शिव बसले घेउनियां निज परिवार ।
प्रळयकाळ यवनांचा आला ! झाला महिवर अवतार ॥
रानफुलांचा गंध पसरला मंजुळ वार्यानच्या लहरी ।
प्रतापगडच्या किल्ल्यावरुनी यश राजाचें ललकारी ।
गडबड धडपड आरडाओरड रड भूमिवरची सरली ।
सर्व शांत जग झालं ऐकली पर वाघाची उरकाळी ! ॥
चाल
करवंदी झाडी कांटेरी कुंप करणार ।
धबधबे खळाळत नित्य गाणं गाणार ।
चाल
उंच उंच अति उंच धांवली आभाळांतुन शिखरं किती ।
चित्रं काढलीं जणुं शिखरांचीं नभोमंडळाच्या वरती ॥
चाल
अशा वेळिं एक हेर किल्ल्यावरती चालला ॥
झपझपा चढुन गड राजाजवळ पोंचला ॥
मग बोलला शिवरायाला । "रामराम ! ऐका खबरेला ।
विजापूरच्या ऐकलं बातमीला । कां आपण वाई प्रांत घेतला ।
कल्याणचा खजिना पळविला । म्हणून बादशहा लालेलाल झाला ॥
घेण्याला आपल्या सूडाला । त्येनं धाडलं अफझलखानाला ।
बारा हजार घेऊन फौजेला । आतां येईल वाई प्रांताला ।
अशी बातमी आली कानाला" । असं बोलून हेर तो गेला ! ।
तय्यारीचा बेत मग केला । गडाखालीं मावळा सरदार सारा उतरला ॥
रातोरात पल्ला मारला । एक चालला बंदोबस्ताला ।
एक चालला फौज तय्यार खडी करण्याला ॥ एक दारुगोळा बघण्याला ।
असा सारा मावळा सरदार लागला कामाला ॥
चाल
शरदऋतूच्या निळ्या नभामधीं कडकडाट हा बिजलीचा ।
झाला एकदम जीवघातकी खेळ कळेना दैवाचा ! ॥३॥
चौक ४
वाईगांवाहून त्वरित धाडला कृष्णाजी भास्कर वकिल ।
प्रतापगडला अफझुल्लानं, सांगतो पत्र काय काय लिहिलं ॥
"द्यावा मुलुख परतून शाहाचा, घ्यावी भेट या वजिराची ।
म्हणाल ’नाहीं’ तर मग आतां आशा सोडावी जीवाची" ! ॥
चाल
कृष्णाजी भास्कर प्रतापगडिं पोचला ।
संदेश खानाचा शिवाजीस कळविला ।
त्या रात्रीं कृष्णाजी प्रतापगडिं राहिला ।
चाल
मध्यरात्रीचा वेळ जाहली रात्रहि बुडली झोपेंत ।
शिवरायानं त्या वकिलाला नेलं अंबेच्या देवळांत ! ॥
देवी भवानीपुढं बोलला राजा कृष्णाजी पंतास ॥
"सांगा बेत खानाचा, घातली शपथ देवीची तुम्हांस ॥
चाल
या भूवरचे तुम्हांस म्हणति भूसुर ।
आम्ही नित्य ठेवावं मस्तक चरणावर ।
कां पाप जोडतां बनुन यवन नोकर ? ।
केसानं कांपतां गळा सोडा अविचार ।
चाल
मस्तक चरणावरी ठेवतों सांगा बेत त्या खानाचा ।
देवी भवानी असे साक्षिला घात करुं नका स्वजनांचा ।
चाल
कृष्णाजीपंत भास्कर । विरघळले झाले मनिं गार ॥
चाल
डबडबला पाण्यानं डोळा । अंगीं कंटाळा ।
कंप देहाला । मोहाचा कडा पार कोसळला ।
विवेकाचा डोळा उघडला । अभिमान आला । बोलला शिवबाला ॥
चाल
"जय नमोऽस्तुते जगदंबे पदरीं घे मला ॥
शिवराया ! धन्य तूं, यश येईल रे तुला ॥
देहभान नव्हतं रे मला । रोग जडला होता दृष्टीला ।
अंजन भेटलं डोळ्याला । स्वातंत्र-बुद्धि-कोकिला ।
आनंद देती जीवाला । महाराज ! जीव वाहिला आपल्या चरणाला ॥
खानाचा कपटभाव झाला । जिता मेला धरणं तुम्हाला खानाचा मानस झाला ॥
म्हणून त्याला एवढा भेटीचा आला उमाळा" ॥
असं बोलला कृष्णाजीपंत शिवरायाला ॥
शिवराय बोलला मावळ्याला । "हा पेंच आला जीवाला ।
काय करावं सांगा या वेळा" । तानाजी बोलूं लागला ।
"महाराज ! बोलवा खानाला । किल्ल्याच्या खालच्या बाजूला ।
’भ्यालो’ असं दाखवावं त्याला । मग करुं खानाचे तुकडे उडवु मुंडक्याला !" ॥
शिवराय बोलले लोकांला । "हा सल्ला योग्य नाहीं झाला । असं करणं योग्य नाहीं मला !
शत्रु मित्र कोणी जरी झाला । तरी न्यायमार्ग थोरांनीं पाहिजे घेतला ॥
पर आणूं त्याला भेटीला । मी जाईन भेट घेण्याला ।
जर रंग घाताचा आला । तर असा सज्ज युद्धाला ।
नाहींतर जाऊं दे खान आपल्या देशाला" ॥
असं बोलला राजा मावळ्याला । पंताजी गोपिनाथ वकिल त्यानं नेमला ॥
चाल
काय निरोप धाडला खानाला सांगिन पुढच्या चौकांत ।
वीर मर्दाचा गुण गौरव करि कवी आपल्या कवनांत ॥४॥
चौक ५
पंताजी गोपीनाथ चालला खानाच्या वकिलासहित ।
आला वाईला पत्र राजाचं दिलं खानाला सदरेंत ॥
रघुरायाचा अंगद जैसा शिवरायाचा पंताजी ।
भला सराईत, मिठ्ठा बोलका, नाहीं ठाव कधीं इतराजी ! ॥
पत्र लिहिलं जें शिवरायानं तेव्हा अफझुलखानास ।
सांगतो आज मी तें तुम्हांला, जाग करावं कानास ॥
"पर्वत कुणीकडं ? कुठं मातीचा कण ! सिंधु तो कुठं नाला !!
कुठं सूर्य कुठं मशाल साधी ! कुठं वाव त्या बेडकाला ! ॥
कुठं इंद्राचा ऐरावत तो कुठं शाम्भटी तट्टाणी ।
कुठं सिंह, कुठं उंदिर झाला ! मोठी शाहाची अमदानी ॥
चाल
खानसाहेब घ्यावा मेरा सलाम द्यावं अभयाला ।
मोठी धडकी भरली जीवाला । वाई प्रांतिं पुंडावा केला ।
हा मोठा अपराध झाला । सारा मुलुख देतों शहाला ।
पण द्यावं जीवदानाला ! । डोई लावतों आपल्या पायाला ।
नुसतं नांव ऐकल्यावर आला घाम अंगाला । मग कोण करिल दोन हात बोला ? ।
आज चुकलों, शरण तुम्हांला" । असा निरोप धाडला खानाला ।
खानाला संतोष झाला । दाढीवरनं हात फिरविला ।
गांजाचा झुरका मारला । आणि खान बोलूं लागला ।
"अहमदुल्लिला ! बंदे का क्या रोब है !
मेरा सिरफ नाम ही सुनकर उसका पसीना पसीना हो गया !
वाहवा अफझलखानबहादर !" । कृष्णाजीपंत बोलला !
"जंवा बातमी ऐकिली कीं, आपण आला युद्ध करण्याला ।
आणि आणलं इतक्या फौजेला । तवा टाकलं अंग धरणीला ।
त्यानं लावले डोळे आकाशाला । जसं भूतखेत झडपावं तसा जाहला ।
मग आणलं त्याला ताळ्याला । त्याचा वाण सारा बदलला ।
तो येणार नाहीं भेटिला । तर आपण जावं त्याच्या भेटिला ।
अन साधावं आपल्या बेताला" । "अच्छा है" खान बोलला ।
तसा निरोप धाडला शिवबाला । खानानं तळ हालवला ।
पसरणीच्या घाटावरनं चालला प्रतापगडाला ॥
चाल
जा खाना, जा दुष्टा, जल्दी जा, ओढवलं सत्वर मरण ।
मृगपंचानन सह्यकंदरी करिल तुझी रे धुळदाण ॥५॥
चौक ६
भेट घेण्याला अफझुल्लाची मंडप श्रीशिवरायानं ।
प्रतापगडच्या खालीं सजविला नाहीं तिलोकीं उपमान ।
निळा चांदवा दिला छानदार चंद्रतारका त्यावरती ।
झालर तांबुस सभोंवार ती शोभा देई घडी घडीवरती ॥
हंडया झुंबर किती लटकती लौलक झळके त्यावरती ॥
आरसे टांगले किती मनोहर, काय राजाला हो कमती ॥
नीलमण्यांचे खांब बनविले, लोंबती मोतियांचे घोस ।
शिवरायानं क्षुद्र खानाचा किती पुरवावा तो सोस ! ॥
वेलबुटया काढल्या भिंतीवर चित्रं काढलीं रंगाचीं ।
इंद्रधनुष्या रंग लाजवित, अपार शोभा मंडपाची ॥
चाल
जमखाने शुभ्र हांतरले शोभे भरजर ।
गाद्या गिरद्या तिवासे तक्के ठेविले त्यावर ।
गालीचे पसरले उंची कैक त्यावर ॥
चाल
कुबेर अलकापुरी घेऊनी जणूं वाटला तो आला !
रत्ना कर करिं रत्नव घेउनी, विष्णु सोडि वैकुंठाला ॥
कुणी कधी ऐकला असा हा विष्णुशिवांचा हो मेळा ।
छत्तीस आंकडा सदैव त्याचा गब्बार एक दुसरा दुबळा ॥
उडती फवारे कारंजांचे बाग फुलली हिरवीगार ।
यज्ञभूमी श्रीशिवरायानं केली जणूं काय तय्यार ! ॥
चाल
आधींच पर्वतावरचा देखावा गोड ।
त्यात असा सजविला मंडप नव्हती तोड ।
किती कसब शिवाचं होतं मोठं बिनजोड ।
चाल
मंडप झाला, खानहि आला, झाला भेटिला तय्यार ।
पण तो आला फौज घेऊनी हत्यारबंद दीड हजार ॥
चाल
मग निरोप धाडला शिवबानं अफझुलखानाला ॥
"फौजेचं काय काम कळलं नाहीं हो मला ॥
जर आणतां एवढया फौजेला । तर कसला भेटू तुम्हाला ।
आत्ताच जीव आला घाईला । जर एकटे याला भेटिला ।
तर कसं तरी भेटणं तुम्हाला !" । खानाला वाटलं ते वेळा ।
शिवाजी शिवाजी तो केवढा ? । सहज घेइन खाकुटींत त्याला ।
अन् चिरडीन त्याच्या नरडयाला ॥ भेटिला एकटं जाण्याला ।
कृष्णाजी पंतांनी ही सल्ला जेव्हां त्याला दिला । तवा खान चालला भेटिला ।
शिवाजीनं ठेवली बडदास्त मोठी ते वेळा ॥ मग खान आला सदरेला ।
मानमरातब घेऊन गारेगार झाला ॥ वर हांसरा चेहरा केला ।
पर आंता ’दगा’ राहिला । ’कधी भेटिन एकदां मी’ असं झालं हो त्याला ॥
चाल
आला आला ! रे सर्जा शिवाजी खाना !
आतां तू सांभाळ । नागसापापर चपळ जाहला घेईल चावा तो काळ ॥६॥
चौक ७
आला भेटिचा दिवस सकाळिंच केली पुजा जगदंबेची ।
हात जोडुनी शिवरायानं करुणा भाकली अंबेची ॥
"आई ! संकटीं कोण तुझ्याविण सोडविणारा दीनाला ।देइ आशीर्वाद आज माय ! तूं घेई पदरिं या लेंकराला !" ॥
डोळे झांकले शिवरायानें, चमत्कार, दिसला त्याला ।
जगदंबा पुढं उभी राहिली, वर्णूं कसं त्या स्वरुपाला ! ॥
किरिट डोक्यावर, केंस पाठीवर, लांबलचक काळे भोर, ।
कुंकुम शोभे रुंद कपाळीं, कंठीं मोतियाचा हार ॥
शंख चक्र करि पद्म घेतलं त्रिशूळ भाला तलवार ।
सिंहावर होती बसलेली खालीं होता महिषासूर ॥
जबडा लाला सिंहाचा, डोळेही लाल, पंजेही लाल अती ।
दिला पोटावर पाय सिंहानं त्या दैत्याच्या---अशी मूर्ती ॥
एका हातामधिं महिषासुराचं डोकं धरलं जगदंबेनं ।
थेंब रक्ताचे टपटप गळती पट चालला भूवरनं ।
हंसरं तोंड देविचं जाहलं बोलली देवी शिवरायाला ।
"आशीर्वाद हा दिला लेंकरा । होशिल भारी कळिकाळा ॥"
चाल
देविनं शिवाच्या शिरीं मुगुट घातला ।
असुराच्या रक्ताचा टिळा त्यास लावला ।
हा असा देखावा शिवाजीनं पाहिला ॥
चाल
डोळे उघडले, गुप्त जाहली देवी, दिला साक्षात्कार ।
नंतर शिवराजानं जमविले सर्व मावळे सरदार ॥
मोरो, शाम, रघुनाथ पेशवे, नारो शंकर माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी, शूर जिवाजी, पिलाजी, नेता, तानाजी ॥
चाल
मग बोलला राजा गहिंवरुन सार्याू मावळ्याला ॥
"काय सांगू तुमच्या प्रेमाला ? ही राहिली तुमची आठवण जन्मोजन्माला ॥
राखायला माझ्या जीवाला । तुम्ही सोडलं सार्या् सुखाला ।
घरदारं सोडली वार्यालला । उतराई होऊं कसा बोला ।
काय सांगूं वेळ कशि येईल कोणत्या वेळा ? ॥
जगलों वाचलो येईन भेटिला । नाहींतर----" ।
शिवबाचा कंठ दाटला । पाण्यानं डोळा दाटला ।
ढळढळा सारा मावळा रडूं लागला ॥
प्रेमाचा दोर भला मोठा खंबीर झाला ।
पर दांत लावेना कमळाला । जवा कमळामाजिं आडकला ! ।
प्रेमाचं कोडं समजेना ब्रह्मदेवाला ! ॥ "जगलों वाचलों येईन भेटिला ।
नाहींतर राज्य हें द्यावं उमाजीराजाला ॥
रामराम दादांनो घ्यावा आतां या वेळां " ॥
मग सारा मावळा बोलला । हुंदक्यानं आला उमाळा ।
"जाऊं नको राजा ! भेटिला ! तो खान कपटी बघ झाला ।
बरं वाईट होईल जीवाला !" मग तान्या बोलूं लागला ।
"मी जातो शिवा म्हणुनशान त्याच्या भेटीला ॥
अन् उडवतों त्याच्या मुंडक्याला " । पर राजा त्याला बोलला ।
"फसवणं कधीं खपणार नाहीं देवाला ॥ मी जातों त्याच्या भेटिला ।
तुम्ही असा जाग जागेला । कमजास्त झालं तर यावं घुसुन त्या वेळा" ॥
चाल
जागो जागेला मावळ ठेवला दर्यासखोर्यांघतुन तय्यार ।
शाहिर पुढच्या चौकीं सांगणार पुढं घडलेला प्रकार ॥७॥
चौक ८
पोशाख केला कसला राजानं सांगतो आतां मी तुम्हांला ।
वर्णन कधिं कां शिवरायाचं शिणविल माझ्या वदनाला ॥
टोप शिरीं पांढरा शोभला, तुरा मोत्याचा, त्यांत हिरा ।
शिवमौलींतुन शुभ्र चालला ओघ गंगेचा काय खरा !
खांद्यांतून जणु गुप्त जाहली शिवरायाच्या सुरगंगा ।
उजव्या हातिं तलवार रुपानं प्रगट जाहली धवलांगा ! ॥
आंत पोलादी सील, पांढरा झगा शोभे अंगावरती ।
मुसेजरी सुरवार पायाला बंद लोंबती त्यावरती ॥
उजव्या हातामधिं बिचवा, वाघनख होत राजाच्या पंजाला ।
पट्टा जिवा म्हाल्यानें घेतला, तलवार लटके कमरेला ॥
जिजाबाईच्या भेटिस गेला ठेवलं डोकं पायावरती ।
शिवनेत्रांतुन टपटप गळले थेंब पायावर, धन्य सती ! ॥
हळुच उठवलं शिवरायाला, अवघ्राण मस्तकिं केलं ।
जिजामाईनं शिवबाळाला गालबोट तें लावियलं ! ॥
जिजा बोले, "कां शिवबा ! डोळे आले पाण्यानं भरभरुन ।
शूर पुत्र तूं, जा प्रेमाचा बंध तोडुनी हौसेनं ॥
क्षत्रियकुळी मी जन्म घेतला, तूंहि तसा क्षत्रियपुत्र ।
आशीर्वाद हा दिला बाळका ! काय करिल अफझुल कुत्रं ? "
दृष्ट काढली शिवरायाची, दहीं साइचं तळहातीं ।
दिलं आईनं; शिवबाळानं चाटुन खाल्लं गोड अती ! ॥
किल्ल्यावरच्या उंच तटावर फडफड करि भगवा झेंडा ।
फडफड करुनी त्यास बोलला , ’फाड ! फाड ! रे तो मेंढा’ ! ॥
चाल
आठवलं मनीं शिवबानं रामदासाला ।
चुचकारलं कृष्णेला वरती स्वार मग झाला ।
धडधडा सात तोफांचा नाद जाहला ।
चाल
दुपारची भरवेळ जाहली, सूर्य छत्र धरी किरणांचं ।
वार्याीपर वेगानं चालला राजा, दैव त्या खानाचं ! ॥८॥
चौक ९
कृष्णी चपळ बहु शिवरायाची मोठी लाडकी ती झाली ।
चालली घोडी चौफेर सारखी, लाज वार्या ला ही आली !! ॥
टाप घोडिची कणखर मोठी, जमीन भ्याली दणक्यानं ।
झाडंझुडपं किति टकमक बघती पळति मागंमागं भीतीनं ॥
मंडप आला, राजा उतरला, नेली घोडी दूर हुजर्या नं ।
शिवबा बोले त्या हुजर्यााला, "जपा घोडीला प्रेमानं !" ॥
दबकत दबकत सर्जा शिवाजी चालला भेटिच्या मंडपांत ।
आनंदाच्या उकळ्या उसळती वेडया खानाच्या हृदयांत ! ॥
शिवरायानं सलाम केला खूष जाहला मनिं खान ।
म्हणे शिवाला, "असा शाहाला नाहिं कधीं मिळला मान" ! ॥
खान उठुन राजाला बोलला, "शिवा ! एक आशा मजला ।
मुलासारखा तूं मला वाटतोयस कडकडून भेटावं तुला" ॥
"ठीक ! ठीक ! शिवराय बोलला, हरकत नाहीं मुळिं आतां ।
वडिलही तुम्ही मला जाहला, नसे मनाला मुळिं चिंता" ॥
चाल
खानानं हातीं कवटाळलं शिवरायाला ॥
खान केवढा धिप्पाड ! शिवबा पोर वाटला ॥
खानानं कवळ मारली शिवबा दचकला ! ॥
शिवबाचं मुंडकं त्यानं दाबलं डाव्या बगलेला ॥
प्रसंग जीवावर आला । पर शिवबा चपळ फार झाला ।
ओळखलं त्याच्या बेताला । अन् हिसडा मारला त्याला ।
वाघनखं भिडली पोटाला पंजा मारला ! ॥
खानाची आंतडीं काढलीं, फाडलं पोटाला !
खान हत्ती फार खवळला । पर करतो काय सिंहाला ?।नानं केला वार जिरेटोप छाटला ॥
पर इकडं सर्जानं पट्टा वेगिं चालवला ॥
जणुं नारसिंह प्रगटला । खांद्यात्नं चिरलं खानाला ! ।
"खान ’लवा लवा’ बोलला ! " । खान ’पट्टा पट्टा’ बोलला ।
आतां कंचा पट्टा ? सर्जानं घातल्म झडपेला ! ॥
बघा झालीं त्याचीं दोन छकलें आला भूमीला ! ॥
एक मुंगी मोठया हत्तीच्या घेइ जीवाला ॥
मुंगसाचं पिल्लु करि ठार नागसापाला ॥
अभिमन्युबाळ करि जेर कितिक लोकाला ॥
श्रीकृष्ण मारी कंसाला । रामचंद्र मारी रावणाला ।
सर्जाची खूण लोकांला । लगबगीनं जमला मावळा ।
बंडा सय्यद करतो वाराला । पर जिवा म्हाल्यानं बंडा सय्या पुरा केला ॥
घनघोर केलं युद्धाला । रक्ताचा पाट चालला ।
शिवराय वेगानं आला । खानाच्या छाटलं मुंडक्यांला ।
अन् मुंडकं घेऊन शिवराय किल्ल्यावर गेला ! ॥
रक्तानं माखलं देवीला । मग मुंडकं टांगलं बुरजाला ।
यवनांचा मोड पुरा झाला । पळ काढला यवनी फौजेनं, आनंद झाला ! ॥
दुंदुभी झडूं लागल्या कर्णा वाजला ! ॥ नऊ तोफा झडल्या, लोकाला आनंद झाला ! ॥
गुढया तोरणं घरदाराला । उभी केली उत्साव केला ।
’धन्य धन्य अवतारी राजा’ डंका गाजला ! ॥
चाल
मागं रचला अज्ञानदासानं शिवरायाचा पोवाडा ।
भाग्य त्याचं राजानं दिला एक तोडा सोन्याचा आणि घोडा ॥
कोण मला देणार सोन्याचा तोडा शेराचा आणि घोडा ? ।
दाता गेला ! आज फार तर पायिं घालतिल हो खोडा ! ॥
ये शिवराया ! पुन्हां कधीं तूं येशिल तोडा देण्याला ! ॥
नित्य उभा कर जोडुनि तुमच्या ’पांडुरंग’ हा कवनाला ॥९॥

1 comment:

  1. छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!!!!!!!!

    ReplyDelete