Tuesday, December 1, 2009

शिवरायांचे पुण्यस्मरण (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें ।
महाराष्ट्राला समर्थ केलें धन्य धन्य शिवबा झाले ॥जी॥
पन्नासवर्षे जीवन जगले कार्य परी अद्‌भुत केलें ।
चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांचें जीवन संपुनियां गेलें ॥जी॥
चंदनी रचुनी चितेला । राजदेह वरति ठेविला ।
अग्निला देह तो दिला । अन् ज्वाला धडधडा भिडल्या पहा गगनाला ॥जी॥
चाल
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला ।
झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥
राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
शौर्य ही सोडेना त्याला । जनसेवा सोडेना त्याला ।
चैत्राच्या शुद्ध पुनवेला । भर दुपारच्या वेळेला ।
सूर्यानं राजाचा आत्मा ओढुनी नेला ॥जी॥
पार्थिव देह हरपला । पण कीर्तिनं अमर तो केला ।
रायगड रडूं लागला । झाडं झुडपं कोमेजुन गेलीं आकांत झाला ॥जी॥खूबलढा बुरुज तो तेव्हां रडूं लागला ॥जी॥
हिरकणी बुरुज गहिवरला । टकमक बुरुज पोरका झाला ।
धर्माचा आधार गेला ॥
चाल
शिवछत्रपती निघुनी गेले तीनशें वर्षं झालीं त्याला ।
काळ झराझर निघुनी गेला यशोगंध परि दरवळला ॥जी॥महाराष्ट्राचा कानाकोपरा शिवकार्यानें व्यापियला ।
असा राजा कधिं नाहीं झाला पुढें कधी नच होणारा ॥जी॥
युक्तिबुद्धिनें पराक्रमानें परकी सत्ता लोळविली ।
अज्ञ मावळे फुंकर मारुन सेना त्यांचि खडी केली ॥जी॥
पांच शाह्यांना पुरुनी उरले फितुरहि नाहींसे केले ।
राजाच्या त्या पराक्रमाने सर्व मावळे भारविले ॥जी॥
पन्नास वर्षे कणाकणानें अर्पण केलीं देशाला ।
मातींतुन स्वातंत्र्य निर्मिलें असा पराक्रम हा केला ॥जी॥
प्रचंड शत्रू चालून आले तरी वीर नच डगमगला ।
त्या वैर्यां ना दूर पळविले तोड नसे या कार्याला ॥जी॥
संकटें आणि मृत्यूशी सामना केला ॥ कधिं उसंत नाहीं त्याला ।
मावळ्यांचे सैन्य बनविलें लढा देण्याला ॥जी॥
जिवाभावाचा मित्र जमविला । स्वातंत्र्याचा छंद घेतला ।
आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला ॥
चाल
असा छत्रपति कधिं ना झाला पुढें कधीं नच होणारा ।
शिवरायांचें नांव सदोदित देवो स्फूर्ती आम्हाला ॥जी॥
खडकांतुन स्वातंत्र्य फुलविलें स्वाभिमान जागा केला ।
वंदन करितो शिवप्रभूला पांडुरंग हा या वेळा ॥जी॥

No comments:

Post a Comment