Tuesday, December 15, 2009
शिवराज्याभिषेक (पोवाडा) – शाहीर प्रल्हादराय जामखेडकर
हिंदभू आलीं, तिलक शोभतो शिवराय खास,
पटाईत योद्धा महाराष्ट्रात, प्रल्हादराय नित्य दंग कवनांत ॥ध्रु०॥
चौक १
शिवराज राजकारणी, महाधोरणी, उडी घे रणीं,
करुनिया शत्रूंचा संहार, स्थापिलें राज्य महाराष्ट्रांत,
हिंदूचा वाली जन्मला ख्यात ॥
आकस्मात आली कल्पना, सुचेना मना, एक भावना,
शत्रूवरी पूर्ण कराया मात, राज्याभिषेक व्हावा आपणांस,
मान सन्मान सर्व जगतांत ॥
भले भले विद्वान आले, रण माजले, शेतकरी भले,
यांना कोठला राज्याधिकार, पुंड पाळेगार सारे ठरणार,
क्षत्रिया खरा खरा अधिकार ॥
गागाभट्ट काशी क्षेत्रीचे, विद्वान पट्टीचे, नाही लेचेपेचे,
षड्शास्त्रे तीं त्यांचे मुखांत, वेदशास्त्रांचा मोठा हव्यास,
न्यायनीतीत पूर्ण निष्णात ॥
चाल
गागाभट्ट आले पाहून, त्यांचा तो केला सन्मान ॥
शास्त्राधार सर्व पाहून, शास्त्रीजी बोले झटकन ॥
मराठयांस नाहीं अधिकार, छत्र हें शिरीं धरण्यास ॥
शास्त्रीजी देती वचन, मूळ मी तुमचे शोधीन ॥
चाल
आटोकाट यत्नद तो केला त्यानं त्या वेळा ॥
शिसोदे कूळभूषण सूर्यवंशाला ॥
जन्मला शिवभूपाल याच वंशाला ॥
राज्याभिषेक करण्याचा बेत त्यांनीं ठरविला ॥
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिवस नेमिला ॥
काय वर्णूं भाग्य रायाचे धन्य सुवेळा ॥
हरकली जिजाई मोद मनीं मावेना ॥
पुत्र हा गुंडा नाचतो त्याच्या कीर्तीचा झेंडा ॥
गो-ब्राह्मण-पालक वंद्य देवदेवता ॥
चाल
शिवाजीनें तीं वस्त्रें चढविलीं स्वच्छ पांढरीं त्या वेळा ।
पुष्पमालाहि गळ्यामधे शुभ्र-अलंकार ते नाना ॥
सोन्याचा चौरंग करविला, कलशहि केला सोन्याचा ।
त्यावरी राजा-राणी बसले मागें संभाजी तो साचा ॥
अभिषेक होता, सर्जा चालला त्याच वेळेला सदरेला ।
सदर सजविली नाना प्रकारें तेंच सांगतों तुम्हांला ॥
चाल
भिंतीवरी चित्रें काढलीं हातीं आटोकाट,
वृक्षछाया घनदाट, काय वर्णावा थाट,
भरजरी छत शोभेला, शोभेला हो मोत्याच्या झालरी लोंबल्या ॥
डवणा, पाचू, मर्वा कुंडया होत्या लई दाट,
काश्मीरी गुलाब दाट, सुवास येतो घमघमाट,
पानविडे जागजागेला, जागेला हो गालिचे सर्व जमिनीला ॥
सुवर्णाचें तक्त केलें त्यानें मजेदार, बत्तीस मण त्याचा भार,
रत्नेंा जडलीं अनिवार, माणिक मोतीं पाचू चमकती,
चमकती हो आकाशीं तारे जणूं अती ॥
रत्नीजडित सिंहासन त्या खांब आठ, छत्रचामर अफाट,
धार्मिक सारा थाट, व्याघ्रांबर त्यांत बसण्याला,
बसतांना हो आर्यांचा आचार आचरिला ॥
मृत्युलोकीं आला काय इंद्रदरबार, अष्ट प्रधान बाणेदार,
रणमस्त सरदार, इंद्रास शोभे देवगुरु हो तसा शिवाजीस भट गुरु ॥
सिंहासनीं बसविला शिव भूपाल, पुष्पवृष्टीची धमाल, केली सार्यां नीं
कमाल, पंचार्ती आली आर्तीला, आर्तीला हो वेद घोष त्याचे जोडीला ॥
वाद्यांचा गजर झाला सारा दणदणाट, तोफा सुटती आफाट, भयंकर गडगडाट,
क्षणो क्षणीं आवाज दणक्यांत, दणक्यानं हो किल्ल्यावरनं तोफा सुटतात ॥
भरी जरी राजमुगुट घेऊन हातांत, मध्यभागीं तो मध्यांत,
मोत्याचा तुरा त्यांत, गागाभट्ट चाले डौलानं, डौलानं हो शिवाजीचे मस्तकीं ठेवीत ॥
छत्रपति गर्जति लोक वारंवार (श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय), केला त्यांनीं जयजयकार,
वंदितो दरबार, दुमदुमे अवघी मेदिनी, मेदिनी हो तशी धन्य शिवजननी ॥
नाना वस्त्रें अलंकार दिले त्यानें दान, ज्याचा त्याचा ठेवून मान,
केला योग्य तो सन्मान, लाखों होन दिले विप्रांना, विप्रांना हो तसे दिले गोरगरिबांना ॥
पन्नास हजार विप्र आला होता आटोकाट पन्नास हजार इतर जात, भिक्षेकरी वेगळा त्यांत,
लाखावर लोक पंगतीला, पंगतीला हो होते दोन्ही वेळ जेवण्याला ॥
हत्तीवर अंबारी राजा झाला स्वार, मागेंपुढें घोडेस्वार, ललकारी चोपदार,
जरीपटका होता आघाडीला, आघाडीला हो तसा भगवा झेंडा जोडीला ॥
स्वारी चाले रस्त्यानं मंगलप्रभात, नारी होत्या त्या दारांत,
ओवाळीती आनंदांत, आनंद मावेना हृदयांत, हृदयांत हो आनंद सर्व जनतेंत ॥
चाल : मिळवणी
शिवसिंह झाला भूपाल । राज्य स्थापिल ।
बंड मोडिलं । यवनावर केली पूर्णपणे मात ।
गो-ब्राह्मण-पालक ख्यात । प्रल्हादराय नित्य दंग कवनांत ॥
नरवीर तानाजीचा पराक्रम (पोवाडा) – शाहीर सदाशिव लक्ष्मण ठोसर
चौक १
गातो असा सिंहगडाचा पोवाडा । उदयभानु बडा ।
बाटगा नोडा । ठेचला ऐका नवलाई ॥
स्थापिली हिंदु पातशाही ॥ धन्य मातोश्री जिजाबाई ॥ध्रु०॥
जगामध्ये कितीक झाल्या । होतील आहेत आता ।
त्यात श्रेष्ठता । पावली एक जिजाबाई ॥
एकटया शिवरायाची नाहीं । हिंदु धर्माची झाली आई ॥
दिल्लीपती आला जोरदार । झाला शिरजोर ।
घेऊन तलवार । उठला हिंदु धर्मावरती ॥
बाटविले कैक नाहीं गणती । नाव ऐकता हिंदु पळती ॥
जिकडे तिकडे उडाला हाहाःकार । रजपुत भिऊन सारं ।
मराठेही वीर । मिळाले थोडे बादशहाप्रती ॥
बाकी आपसात चुरस करती । स्थापण्या राज्य कठीण किती ॥
चाल
ती वेळ आणीबाणीची । हिंदूच्या मर्दुकीची ॥
पुत्रांच्या मातृभक्तीची । मातांच्या मातृत्वाची ॥
मारण्याची किंवा मरण्याची । कर्त्यांची कर्तृत्वाची ॥
चाल
त्या जिजाबाई माउलीनं केला सुविचार सोडलं विजापूर ॥
स्वातंत्र्यांकुर म्हणी इथं नाहीं फोफावणार ॥
घेऊन गेली पुण्याला संग बाल शिववीर ॥शिक्षण दिलं धर्माचं राजकारणाचं केला हुश्शार ॥
सोळाव्या वर्षी सुरवात गनिमी लढणार ॥
किती किल्ले बळकावले नाहीं कुठें हार ॥
चाल : मिळवणी
संगे रणधीर वीर तानाजी । फासलकर बाजी ।
कंक येसाजी । जिवाचे कलिजे भाई भाई ॥
मानिती जिजाईस आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१॥
चौक २
आला चालून सिद्दी जोहार । मोठा सरदार ।
बढाईखोर । विडा उचलून पाच पानी ॥
बोले हम बडा खानदानी । पिला दूँ मराठेकु पानी ॥
मराठयांशी पडली त्याची गांठा । लढती अफाट ।
दाविती न पाठ । स्वाराला स्वार जाऊन भिडती ॥
मराठे वीर अचुक लढती । उपजली सिद्दीमनी भीती ॥
बोल बोलता जिरली घमेंडी । पळतां भुई थोडी ।
बचावुनी दाढी । सिद्दी जोहार पळत सुटला ॥
बोले ये सैतान है अल्ला । तोबा तोबा अल्ला भिसमिल्ला ॥
चाल
दुसरा बडा भाई-शाहिस्तेखान । पळवीला बोटे छाटून ॥
दगाबाज तो अफझलखान । मारीला वाघनखानं ॥
एक एकटे हरविले तीन । बादशहा झाला बेभान ॥
चाल
मग मोअज्जिम जयसिंग दोघे वीर धाडले ॥
मोठे सैन्य तोफखाना संगे घोडे दौडले ॥
मजल दर मजल करित सारे दक्षिणेंत पातले ॥
दर्यावानी तुफान सेना बघुन मराठे हादरले ॥
दोन हल्ले मराठयांनीं शिताफीनें चढविले ॥
परि पुढं टिकाव अवघड शिवबा उमजले ॥
चाल : मिळवणी
बलाबल जाणून टाकितो डाव । आमचा शिवराव ।
किल्ले म्हणी घ्याव । आम्च्यापासून परत कांहीं ॥
मुलगा त्यो कोणाचा हाई । त्याची मातोश्री जिजाबाई ॥२॥
चौक ३
(शिवाजीनें वेळ प्रसंग ओळखून मोगलांशी तह केला व २६ किल्ल्यांपैकीं १८ किल्ले मोगलांना दिले. त्यांत कोंडाणाही दिला.)
मोअज्जिम जयसिंगाला । आनंद लई झाला ।
दोन बोटं उरला । स्वर्ग; त्याला चढली विजयधुंदी ॥
मराठेशाहीची नाकेबंदी । कोंडाणा घेऊन केला संधी ॥
आपल्या सैन्याचा तळ हालविला । खंद्या वीराला ।
उदयभानूला । कोंडाण्यावर नेमून परत फिरले ॥
ताब्यांत त्याच्या दिले सारे किल्ले । म्हणती काय मराठे आतां मेले ॥
नाकेबंदीचा किल्ला गेला । कोंडाणा आपुला ।
जीव हळहळला । शिवबा मनीं चिंतातुर झाले ॥
मराठे वीर सारे जमले । बारांनीं बारा बेत केले ॥
चाल
गडामधीं गड-गेला कोंडाणा । मराठेशाहीची होईल दैना ॥
रात्रंदिन झोप नाही कोणा । लागली हुरहुर सर्वांना ॥
कांहीं केल्या बेत जमेना । उपाय सुचविती नाना ॥
चाल
चलबिचल अशी ही पाहून जिजाबाई बोले ॥
मुर्दाड भार भूमिला कशाला रे जगले ॥
स्वातंत्र्य पारखे जिवंत असुनी मेले ॥
शिवराय डिवचता सिंह जसे खडबडले ॥
पाहुनि सोन्याची संधी ही माता काय बोले ॥
भवानीनं रात्रीं मला स्वप्नामधिं सांगितले ॥
चाल : मिळवणी
सकाळच्या रामप्रहराला । तुझ्या नजरेला ।
पडेल जो किल्ला । सोडाव जीव त्याचे पायीं ॥
कोंडाणा आज पाहिला म्हणी आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥३॥
चौक ४
शिवराय राजकारणी । माता त्याहुनी ।समशेर भवानी । दावुनी पाया पडुनि आईला म्हणती ॥
हरवील हिला अशी कुणाची छाती । माता काय बोले ऐका पुढती ॥
दावता कमरेच्या नुसत्या तलवारी । ऐट वरिवरी ।
विराटाच्या घरी । मुलगा (उत्तर) काय थोडकं रे बडबडला ? ॥
अखेर काय त्यानं दिवा लावला । सांग का रे कोंडाणा घालविला ॥
वेद उपनिषद सार सांगुनी । कृष्ण देवांनी । अर्जुना रणीं ।
लढविलं सांग कशासाठीं ॥ फुकट जन्मलास माझ्या पोटीं ।
हिर्याच्या खाणींत गारगोटी ॥
चाल
एकीकडं आईच्या इच्छेची आड । विहीर बघा लढाईची दुसरीकडं ॥
शिवबा राजाला पडलं मोठ कोडं । दोन्ही बाजू आहेत कशा बिनतोड ॥
अखेर दिलं वचन आईला लै गोड । शत्रूचा पुरा करतो बीमोड ॥
चाल
ऐकुन आनंदाश्रू आईच्या नयनीं बघा थबथबले ॥
फिरविताच पाठीवर हात शिवबा गहिवरले ॥
इतक्यांत रायाच्या लग्नाला बोलवाया आले ॥
शेलारमामा तान्हाजी दोघे भेटले ॥
आम्ही चाललों आमच्या लग्नाला शिवबा त्यांना बोले ॥
वरघोडा निघायचा आज कोंडाण्यावर बोहलें ॥
चाल : मिळवणी
ऐकतां शब्द हे कानीं । शेलारमामांनीं ।
स्वार सांडणी । धाडीला लगीन थांबबाई ॥
धन्य त्या मर्दांची आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥४॥
चौक ५
तिकडं बघा तान्हाजीच्या गावाला । (उमराठे गावाला) ।
सोयरा जो आला । त्याचे दिमतीला । कामकरी हेटकरी लई ॥
माहीतगार आणखी मराठे भाई । देऊन सोयर्यांच्या केल्या सोई ॥
दोन्ही बाजूंच्या मांडवांचा थाट । सहस्त्र साठ । दिव्यांचा लखलखाट ।
पाहुनी डोळे दिपून जाती ॥ सूर्य काय आलाय पृथ्वीवरती ।
पाहण्या मराठेशाहीची धर्ती ॥ पाहावया रायाचा मुखचंद्र ।
लाळ घोटी इंद्र । सूर्य आणि चंद्र । शाहीर म्हणे इथं झाली यूती ॥
होतांच जनसागराला भरती । नवल नाहीं निसर्गाची रीती ॥
चाल
इतक्यामधी आला स्वार सांडणी । लखोटा वाचला रायांनीं ॥
लगीन थांबवा याच क्षणीं । लढाईला निघावं सर्वांनी ॥
चाल
रुकार पाहिला दिला वरुमाईंनीं निरामाईंनी ॥
हुकूम सर्वाला सोडला रायांनी सूर्यरायांनीं ॥
राजा बघा बोले तसे दळ हाले बोलतां क्षणीं ॥
आपापले सैन्य घेऊन निघाले देशमुख वतनी ॥
पुढें चालले पहिले मानकरी हत्तीवर बीनी ॥
मोहिते चव्हाण महाडीक जाधव थाटांनीं ॥
चाल : मिळवणी
इकडे तान्हाजी म्हणे शिवराया । गड जिंकाया ।
सांडीन मी काया । रायाला समजा माझ्या ठायीं ॥
गहिवरुन आशीर्वाद देई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥५॥
चौक ६
(तानाजीराव म्हणतात-----"शिवबा राजे, र्हाऊ द्या माझ्या पोराचं लगीन;
आधीं लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं !" तान्हाजीच्या तोंडचे हे
शब्द ऐकून जिजाईचं हृदय भरुन आलं.)
तोंडावाटे शब्द उमटेना । स्तब्धता मना ।
मनीच्या खुणा । मनाला कळल्या एकमेका ॥
जिव्हाळ्याचा शेवट असाच मुका । मुक्यानं चालतो पुढं ऐका ॥
पंचारती घेऊनी आई । आली लवलाही । कमती तिथं कायी ।
टिळक लावी ठळक कुंकुमाचा ॥ पाठीराखा म्हणी तू आर्यभूचा ।
महाराष्ट्राच्या सौभाग्याचा ॥ ओवाळणी देई मज तान्हा ।
गड कोंडाणा । मनची कामना । पुरविता वीर नाहीं दूजा ॥
तुझ्यावीण कोण करील काजा । आला संदेश निघाल्या फौजा ॥
चाल
आतां तान्हाजी ठेवितो डोई । जिजाबाई मातेच्या पायीं ॥कडकडुनि भेट मग घेई । शिवबाची तान्हा लवलाही ॥
शाहीर अशा या समयीं । शिव जीव एकता पाही ॥
चाल
तो सुभेदार तान्हाजी तडक निघाला ॥
शेलार मामा म्हातारा त्याचे मागें गेला ॥
निघतांच जिजा माऊली वदे तान्हाजीला ॥
बघ वळुन मागं डोळे भरुन पाहु दे तुला ॥
तान्हाजीनं मागं बघतांच प्रकार काय झाला ॥
स्तब्धता चराचराला कंठ दाटला ॥
चाल : मिळवणी
सारे पशू पक्षी आणि वृक्ष । तान्हाजीकडं लक्ष ।
सूर्यही साक्ष । थांबला वायू झुळूक नाहीं ॥
आईची स्थिती सांगूं काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥६॥
चौक ७
सिंहगडच्या पायथ्यापाशीं । थोडया लोकानिशीं ।
गेला त्याच दिशी । मराठा खरा समर गाजी ॥
गडाचा भेद काढूं म्हणे आजी । युक्ति सांगतां मामा राजी ॥
नाईक चौक्यांचा रायाजी कोळी । वळवूं याच वेळीं ।
होऊन गोंधळी । नाद त्याला भारी पोवाडयांचा ॥
त्याला ऐकवूं दोष त्याचा । टाकूं डाव राजकारणाचा ॥
तान्हाजीनं घेतलं तुणतुणं । शेलार मामानं ।
मोठया ऐटीनं । मारिली थाप डफावरती ॥
ऐकता सारे लोक जमती । शाहीर कोण आलाय पाहूया म्हणती ॥
चाल
आला नाईक रायाजी कोळी । चौकीवर जमली सारी मंडळी ॥
लवुन मुजरा करी आमचा गोंधळी । मुजर्याला खूष सारी मंडळी ॥
चाल
त्यो मामा म्हातारा थाप डफावर मारी ॥
गोंधळी म्हणे सर्वांना ऐका करझारी ॥
हवालदार म्हणतां जसा खूष शिपाई भारी ॥
तशी खूष मंडळी सारी म्हणतां कारभारी ॥
जरी सिंह विसरला स्वतः जात लढणारी ॥
त्याचं त्याला देईल पटवून ऐना शाहीरी ॥
चाल : मिळवणी
(मामा) गोंधळी म्हणे ऐका एक घडी ।
करील मजा थोडी । आमचा हा गडी ।
नात्यानं भाचा माझा हाई ॥
ऐका आतां गोंधळ म्होरं गाई ।
धन्य मातोश्री जिजाबाई ॥७॥
चौक ८ : गोंधळ
उदे ग अंबाबाई उदे ॥ उदे ग अंबाबाई उदे ॥
कोल्हापुरच्या अंबाबाई गोंधळा यावं ॥ तुळजापुरच्या भवानी गोंधळा यावं ॥
राजगडच्या जगदंबे गोंधळा यावं ॥ प्रतापगडच्या भवानी गोंधळा यावं ॥
शिवनेरीच्या शिवाई गोंधळा यावं ॥ जेजुरीच्या खंडोबा गोंधळा यावं ॥
पंढरीच्या विठोबा गोंधळा यावं ॥ औंधाच्या यमाई गोंधळा यावं ॥
गाणगापूरच्या दत्तात्रेया गोंधळा यावं ॥ बार्शीच्या भगवंता गोंधळा यावं ॥
वाडीच्या नरसोबा गोंधळा यावं ॥ उदे ग अंबे उदे उदे उदे ॥
चाल : मिळवणी
गोंधळी नमी जगदंबेला । मूळ मायेला ।
जगन्मातेला । ऐका आईचं सुयश गाई ॥
रणांगणीं वीरां यशदायी । युद्ध हा तिचा खेळ पाही ॥
येऊं देऊं नका मनामधी शंका । सुयश मिळे एका ।
दुजा तो फुका । रणीं लढतांना मरुन जाई ॥
जिंकिता एक भोगी मही । दुजा धारातीर्थी मुक्त होई ॥
सारखेंच सुयश देई दोघांला । एकमेकाला । नांव ठेवायाला ।
तीळभर जागा ठेवीत नाहीं ॥ म्हणून जो तिचा भक्त हाई ।
मारतो वा मारतो त्याच ठायीं ॥
चाल
न्याय हा लागू स्वातंत्र्याला । धर्मवीर आणि राष्ट्रवीराला ॥
गुलाम जरी शूर वीर निपजला । मारतां मरता लाभ नाहीं त्याला ॥मरतां, महीभोग दुसर्याला । मरतां बघा जातो रौरवाला ॥
चाल
परतंत्र इहपर सौख्य नाहीं गुलामाला ॥
मनाला पटुन रायाजी कोळी गोरामोरा झाला ॥
या गुलामीचा नायनाट कराया अवतरला ॥
म्हणती कैलास सोडूनी सांभ शिवाजी झाला ॥
गोंधळी म्हणे आम्ही हिंडतो चारी मुलखाला ॥
आसेतु हिमाचल असा वीर नाहीं पाहिला ॥
चाल : मिळवणी
ऐकतां शत्रुची स्तुती । रागाला येती ।
मंडळी किती । मुख्य रायाजी बोलत नाहीं ॥
मनाची साक्ष जनाला काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥८॥
चौक ९
रायाजी कोळी म्हणे गोंधळ्याला । अधीर बहु झाला ।
जीव आपुला । शिवाजीच्या दर्शनाचे साठीं ॥
आजवर पडली होती तुटी । जिवाला जशि अविद्या गुरफाटी ॥
गोंधळी म्हणे राया कोळ्याला । वेळ काय त्याला ।
सिंह पाहायाला । सांपडे पारधीच्या पाठीं ॥
वनच्या राजाच्या वनांत गांठी । पडायच्या नाहींत गावांत भेटी ॥
रायाजी कोळी म्हणे निक्क्याचा पण (कमलदेवीच्या निक्क्याचा पण)
बळजबरीनं । ठरलाय आज म्हणून । गडावर पहारे झिंगताती ॥
(रजपूत आणि पठाण दोन्ही जाती) । कुसुंबा पिऊन तर्र हायती ।
चौक्या सार्या आमुच्याच हातीं ॥
चाल
वेळ ही पारधीची असली । कळवील कोण या काळीं शिवबा सिंहाला ॥
अजुनिया भ्रष्ट नाहीं केली । मध्यरातची वेळ नक्की ठरली कळव तू त्याला ॥
द्रौपदी जशी सोडविली । शिवबानं व्हावं वनमाली याच वेळेला ॥
चाल
मदत सारी करुं मनोभावानं शपथ वाहातों ॥
या मावळत्या सूर्याची साक्ष आम्ही ठेवितो ॥
लगेच गोंधळी वेश टाकूनी तान्हा गर्जतो ॥
नरडीचा घोट म्हणी उदयभान्याच्या घेतों ॥
देवाची करणी, नारळांत पाणी । पाहून कोळी नेमितो ॥
तान्हाजी गळ्यांतील कंठा कोळ्याला देतो ॥
चाल : मिळवणी
भेद किल्ल्याचा मिळविला सारा । देऊन इशारा ।
तान्हा माघारा । परतला मामा संग हाई ॥
आजच्या तरुणांत जोम नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥९॥
चौक १०
मामा काय बोले आपल्या भाच्याला । अपशकुन झाला ।
पहिल्या फितुरीला । मावळत्या रविची शपथ वाही ॥
चर्र झालं मन त्याच ठाईं । लेका (तान्ह्या) धडगत दिसत नाहीं ॥
चैन खालीं पडणार नाहीं पायथ्याला । तुला सोडून मला ।
आतां एकल्याला । होणारं कधी चुकत नाहीं ॥
म्हणून तुझ्या संग येणार मीही । नाही हो म्हणू नको कांहीं ॥
ऐकून तान्हाजीला आनंद लै झाला । म्हणी जाऊं चला ।
पश्चिम बाजूला । गडावर तिकडं पहारा नाहीं ॥
उंच कडा खोल दरी हाई । सुयश आपणाला त्याच ठायीं ॥
चाल
रात्र अंधारी भयाण भारी । तीही ना किर्र शब्द करी ॥
आणखी किती सांगूं खोल दरी । पोचेना रविकर तेथवरी ॥अशा त्या ठायीं गेली स्वारी । निवडक मावळे बरोबरी ॥
चाल
टेहेळकरी तुम्ही सांगा सूर्याजीला गेलो आम्ही पुढती ॥
आतुन उघडतों कल्याण दरवाजा घुसा मग वरती ॥
मोहिते चव्हाण महाडीक जाधव आपले सेनापती ॥
यांच्यासह तुम्ही सावध रहावं कल्याण दारावरती ॥
आता शेंदूर थापून मस्तकीं घोरपद पुजिती ॥
चढायासाठीं कठीण तो कडा नाव यशवंती ॥
चाल : मिळवणी
बांधुनी दोरखंड तिच्या कमरेला । तान्हाजीनं तिला ।
प्रणिपात केला । वेळ आतां लावूं नको ग बाई ॥
चढ यशवंती सुयशदाई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१०॥
चौक ११
यशवंती सरसर चढली । अर्ध्यावर गेली ।
भविष्य समजली । परतली खालतं येण्यासाठीं ॥
मामाच्या धस्स झालं पोटीं । रक्षिता म्हणे जगजेठी ॥
मामा काय बोलला यशवंतीला । झालं काय तुला ।
आजच्या येळला । मागं अशी कधी फिरलीस नाहीं ॥
यशा अपयशाची पर्वा नाहीं । वीराची वीर भावना ही ॥बर्या बोलानं वर तू ग जाई । नाहींतर पायीं ।
ठेचीन तुझी डोई । मागं म्होरं आतां पाहणार नाहीं ॥
गेली वर तिचा पाड काई । बिचारी रडत धायी धायी ॥
चाल
भारती त्यावेळी अशी ही मुकी । जनावरे पाळीत होती नेकी ॥
चराचरी राष्ट्रकार्यी एकी । तत्त्वज्ञान पटलं होतं लोकीं ॥
देह जरी पडला मृत्युमुखीं । आत्मा अविनाशी राहतो बाकी ॥
खरोखर दादा ॥ दादा रंऽऽजीरंदाजीरंऽऽजी ॥
चाल
जाणून तो सुभेदार तान्हाजी पहिला वर चढला ॥
शेलारमामा म्हातारा त्याच्या मागं गेला ॥
एका मागून एक असा दोनशे वीर वर चढला ॥
पोचले कडयाच्या वरतं वेळ नाहीं त्याला ॥
अर्धे तुम्ही उघडा छापा घालूनी कल्याण दरवाजाला ॥
तोवर आम्ही हिकडं सोडवितों कमलदेवीला ॥
चाल : मिळवणी
सारे गाफील रजपूत पठाण । अर्धे अधिक जाण ।
टाकले छाटून । बघा बोलबोलतां वेळ नाहीं ॥
रणीं जगदंबा साह्य होई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥११॥
चौक १२
हलकल्लोळ एकचि झाला । कोठून कसा आला ।
कुणाचा घाला । सपन कीं खरें कळत नाहीं ॥
सैरावैरा पळती दिशा दाही । भोंबावले हत्यार गावत नाहीं ॥
थोडया वेळेमधी सावध झाले । लगेच उलटले ।
सरसावून भाले । घे घे हाणमार करती ॥
परस्पर दांतओठ खाती । मारुं वा मरुं तुटून पडती ॥
वार्ता ही ऐकतां क्षणीं । जसा जाळींतुनी । निघे चवताळुनी ।वाघ-तसा भानू बाहेर पडला ॥ घेऊन तलवार ढाल आला ।
तोच तान्हाजी येऊन भिडला ॥
चाल
नजरेला नजर दोघांची भिडली । वीराची वीराला खूण पटली ॥
नंग्या तलवारी चमक झडली । काळोखांत आकाशीं जशी बिजली ॥
आतां तोडीला तोड सुरु झाली । दोघांनी शर्थ बहु केली ॥
चाल
बारा रेडयांची शक्ती एकटया उदयभानूला ॥
तान्हाजी कांहीं कमी न्हवता ऐका भाग पुढला ॥
दहा हजार जोर बैठका काढी येळेला ॥
त्याला पाच पाचुंदे रोट लागत न्याहारीला ॥
द्वापारीं भीम-जरासंध जसा लढविला ॥
भगवान पाठीराखा तसा मामा बाजूला ॥
चाल : मिळवणी
डावासी डाव टाकती । सांगूं तरी किती ।
खुंटली मती । कवीला पुढं स्फूर्ति देई ॥
अहा तूं धन्य माझे आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१२॥
चौक १३
वरती तान्हाजीच्या तमंचा वाराला । कंबर त्यानं केला ।
बहिरा उलट दिला । भानूच्या शिरवारानं ढाल फुटली ॥
(तान्हाजीच्या हातची ढाल फुटली ) । गुंडाळुन शेला ढाल केली ।
धन्य त्याची माय त्याला व्याली ॥
एकमेकांना वार लागती । सांगूं तरी किती ।
तेल तोवर ज्योती । रक्तानं न्हाले वीर दोन्ही ॥
लाली त्याची चढली आकाशी पाही । तान्हा मावळला उगीच नाहीं ॥
चाल
भानूही थकला त्राण नाहीं । माराया परी लाथ धांव घेई ॥
म्हातारा मामा आडवा होई । कमरेचा वार चुकवी पाही ॥केला चवताळुन वार जनोई । भानूला उभा चिरला वेळ नाही ॥
तो खरोखर दादा ॥ दादा रंऽ जीरं दाजी रंजी ॥
चाल
पडतांच तान्हाजी जोर शत्रूनं केला ॥
जरी मर्द मावळे परी धीर त्यांचा खचला ॥
आवरुन शोक मागानं चंग बांधीला ॥
लाजले तरुण वीरश्री चढली सर्वांला ।
इतक्यांत कल्याण दरवाजानं सूर्याजी आला ॥
शाबास लढून शर्थीनं किल्ला सर केला ॥
चाल : मिळवणी
ओवाळावे दिवे जीवाचे लक्ष कोडी । त्यांच्यावरुन कुडी ।
कुरवंडुनि सांडी । शाहिर म्हणे जिवाची दूर बलाई ॥
नांवासाठीं यांत काय नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१३॥
चौक १४
किल्ला जिंकिला बातमी ही खास । कळाया शिवबास ।
आग गंजीस । लावली ज्वाळा गगनभेदी॥
मामा सूर्याजीला न्हवती शुद्धी । हरपलं भान आणि बुद्धी ॥
तिकडं धीर कुठाय माय लेकाला (जिजा शिवबाला । प्रताप गडाला )।
आधींच निघाला । अर्ध्या वाटेला । गडावर दिसली विजयी ज्वाळा ॥
रात्रभर न्हवता डोळ्याला डोळा । सूर्य उदयाची होती वेळा ॥
मारली टाच कृष्णा घोडीला । वेळ काय तिला ।
किल्ला गाठायाला । येतांच तिथं लागली पहिली चौकी ॥लगेच घोडीवरनं उडी टाकी । सारे शोकाकुल अवलोकी ॥
चाल
शिवबा जरी धीर वीर मुत्सद्दी । तरी गोंधळला खालतं आधीं ॥
उठेना पाऊल त्याचं जलदी । चित्तीं खवळला दुःख-उदधी ॥
वरतं देखावा एकच गर्दी । तान्हा पहुडला सर्वांमधीं ॥
चाल
येतांच शिवबा कडकडून मामा भेटला ॥
शिवबास दुःख अनिवार कंठ दाटला ॥
म्हणी गड आला परी सिंह माझा हरपला ॥
आतां काय जाऊनी सांगूं माझ्या आईला ॥
बरं झालं देवा आई नाहीं अशा या वेळेला ॥
आकांत किती केला असता ठाऊक एक तुला ॥
चाल : मिळवणी
सदाशिव शाहीर सांगे सर्वाला । मातृभक्ताला ।
अनुभव आपुला । सुशिक्षण धीर वीर दायी ॥
जगीं देवता एक आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥
अखेर सांगणें एक राहिलें । ताल-सूरवाले ।
पाठीराखे भले । लाभले म्हणून रंग हाई ॥श्रोते तुम्ही हंस-क्षीर न्यायी । सदाशिव शाहीर धन्य होई ॥१४॥
Tuesday, December 1, 2009
छत्रपती शिवाजी महाराज (पोवाडा) - शाहीर महादेव नानिवडेकर
छत्रपती शिवाजी रणशूर । घेऊनि तलवार ।
मोंगल जर्जर । करुनि राखिला हिंदुधर्मास ॥
स्थापियली स्वतंत्रता देशास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥जी॥
भोजराजा माहित सकलांस । रजपूत वंश । त्याचा जो अंश ।
वाढला म्हणती भोंसला त्यास ॥ त्याच कुळिं शहाजी आला जन्मास ।
पराक्रमी महान् वचक यवनांस ॥ धन्य वीर शहाजी भोंसला ।
पिता शोभला । शिवाजी राजाला । जिजाबाई माता जन्म देई ॥
शिवनेरी किल्याच्या ठायीं । किल्ला हा पुण्यानजिक हाई ॥
शके १५५१ स । फाल्गुन महिन्यास । वद्य तृतीयेस ।
शिवाजी रुपें शंकर अवतरला ॥ सुटला थरकांप दुश्मानांला ।घडा पापांचा त्यांचा भरला ॥ जसा बाळ शिवाजी वाढला ।
चंद्र भासला । जिजाऊ मातेला । बहुत शिकविल्या कला तिनं त्यास ॥सांगुन पूर्वजांचा शौर्य इतिहास । ओनामा वीरश्रीचा पढविला त्यास ॥
बाळ शिवाजी पुसी मातेला । सांग आई मला । सर्व माहितीला ।
यवन हा आला कोठून ॥ इथं कसा बसला राज्य घेऊन ।
आई मला सांग पहिल्यापासून ॥ आला खैबर खिंडींतून ।
सिंध जिंकून । पंजाबांतून । दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ॥
खङगा फिरवुनी वारंवार । रक्ताचे वाहवले पूर ॥
तें मयूर सिंहासन । खुशाल भोगून । देश दख्खन ।
जिंकाया यवन येऊन भिडले ॥ हिंदी वीरांचे मुडदे पडले ।
अखेर यवनांचें निशाण चढलें ॥
चाल
शहाजहान बादशहा होता तवां दिल्ली तख्ताला ॥
निजामशाही राज्य अहमदनगर मुलुखाला ॥
आदिलशाही मुसलमानी राज्य विजापूराला ॥
कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळकोंडयाला ॥
सार्याा हिंदुस्थानभर मुसलमान पसरला ॥सारी सत्ता मोंगलांची थारा न्हवता हिंदूला ॥
मानाच्या जागा मोठाल्या सार्याु यवनांला ॥
शिपाईगिरी तेवढी हिंदूंच्या राहिली वाटयाला ॥
बाटवुनी करती मुसलमान गरीब रयतेला ॥
कापिती गायी चरचरा हामरस्त्यांला ॥
अबलांना कोणी रे वाली नाहीं राहिला ॥
हिंदुधर्म बुडाला जो तो बोलुं लागला ॥
हे शब्द ऐकूनी शिवाजी बाळ खवळला ॥
रागानं लाल तो झाला । डोळे फाडुन बघूं लागला ।
करकरा चावुनि ओंठाला । बोलला जिजाऊ मातेला ।
बोलुं नको पुन्हां कीं ग हिंदुधर्म लोपला ॥
कशि लढाई करायची आई शिकिव तूं मला ॥
देशाचा करिन उद्धार सांगतों तुला ॥
बारा वर्षं न्हवती झाली शिवाजीच्या उमरीला ॥
असा लहानपणांत लढाईचा ओनामा घेतला ॥
भाला विटा तिरकमटा निशाणबाजी शिकला ॥
ढाल पट्टा फिरंगीचे वार फिरवूं लागला ॥घोडयावरतं बसुन भरधांव दौडुं लागला ॥
खडान् खडा देशाची माहिती घेऊं लागला ॥
कोणकोणते किल्ले आणि शहरं हायत मुलखाला ॥
चाल : मिळवणी
दादोजी कोंडदेवानं । जिजाऊ मातेनं ।
दिलं शिक्षण । शिकविला भूगोल आणि इतिहास ॥
(भारताचा भूगोल आणि इतिहास ) वर्म समजला शिवाजी खास ।
धरला मनिं स्वातंत्र्याचा ध्यास ॥
चौक २
खेळगडी मित्र जमविले । तान्हाजी भले ।
येसाजी आले । आले बाजी पासलकर दोस्त ॥
स्वराज्याचा ध्यास अहोरात । शपथा घेती रोहिडेश्वरापुढतं ॥
मग आपुल्या जहागीरींत । (पुण्याच्या मुलखांत) करुनी बंदोबस्त ।
लावितो शिस्त । सदगुणी बाळ जिजाईचा ॥
सुपुत्र शहाजी राजाचा । चेला दादोजी कोंडदेवाचा ॥
गेली काळ विजापूरला । बादशाह लाल झाला ।
हुकूम काय केला । बोलावून शहाजी राजाला ॥
ताकिद द्या तुमच्या शिवाजीला । नाहींतर आणा दरबाराला ॥
जिजामाता घेऊन बरोबर । घोडयावर स्वार ।
गांठी विजापूर । शिवाजी बाळ मोठया जल्दीनं ॥
वंदुनिया बापाचे चरण । कां हो म्हणी केलं बोलावणं ॥
बापाचा हात हिसडून । गेला धांवुन । तलवार उगारुन ।
कसाबाचा हात कलम केला ॥ गाईचा प्राण वाचवीला ।
विजापूर वेशीच्या रस्त्याला ॥
चाल : दांगट
आला बादशाहाच्या दरबाराला । नाहीं त्यानं कुर्नीसात केला।
नाहीं त्यानं लवुन मुजरा केला । राग भारी चढला बादशाहाला ।
आज्ञा करी बादशाहा शहाजीला । रीत नाहीं तुमच्या या मुलग्याला ।
दरबाराची शिस्त शिकवा त्याला । बाप मग बोलतो शिवाजीला ।
ऐक बाळा गोष्ट सांगतों तुजला । लवुन कर मुजरा बादशाहाला ।
अन्न देणारे हेच आम्हाला । आईबाप बादशाहाच आपुणांला ।
मान द्यावा अन्न देणार्या।ला ॥ दरबारांत दादा ॥बापाला शिवाजी बोलला । ऐका समयाला ।
नमीन म्हणी भवानी शंकराला । नमीन एक माता न् पितयाला ।
सद्गुरु गोमाता ब्राह्मणांला । नाहीं नमणार मोंगलाला ।
अपमान नाहीं सहन व्हायचा मजला । यायचा नाहीं यापुढं दरबाराला ।
पाय नाहीं ठेवायचा विजापूरला । निरोप बापाचा घेऊन निघाला ।
जिजाबाई घेतली संगतीला । थेट आला पुण्याच्या शहराला ।करतो प्रार्थना भवानीला ॥ हो भक्तीनं दादा ॥
चाल : मिळवणी
जय भवानी म्हणी सत्वर । प्रसन्न मजवर ।
होऊनि दे वर । सोडीव बंदीवान् हिंदु बांधवांस ॥
देऊनि जीवादान गायीब्राह्मणांस । जगवि सनातन हिंदुधर्मास ॥
चौक ३
शिवाजीचा निर्धार पुरा ठरला । भोसले वंशाला । (रजपूत वंशाला)
आलों मी जन्माला । करिन सार्थक खरा पुरुषार्थ ॥स्वतःच्या कमाईचा घांस खाण्यांत । नाहीं परक्यांची हांजी करण्यांत ॥
चाल
तोरणा गडावर स्वातंत्र्याचें बांधुन तोरण । फडकविला झेंडा शिवाजीनं ॥
बाई जवळचा मुलुख जावळी घेतला जिंकून । प्रतापगड बांधला नवीन ॥
मावळे शेतकरी वीर जमविले गोष्टी बोलून । तलवारी बक्षीस देऊन ॥
सैन्य उभारलं हां हां म्हणतां शिवाजी राजानं । सर्वदा भवानी प्रसन्न ॥
किल्ला बांधतां पाया खणतां सांपडलें धन । लक्षुमी झाली प्रसन्न ॥
स्वातंत्र्याचें शिंग गर्जलें सह्याद्रीमधुन । बादशाहा झाला बेभान ॥
चाल : मिळवणी
विजापूरच्या आदिलशहाला । संशय असा आला ।
शिवाजी राजाला । असावा बाप शहाजी फूस देणार ॥
शिक्षा शहाजीला बादशाहा देणार । भिंतीमध्यें चिणून ठार करणार ॥
ही बातमी कळली शिवाजीला । उपाय योजला । बाप मुक्त केला ।
दिल्लीपति दोस्त केला समयास ॥ परस्पर धमकी आदिलशाहास ।
शहाजीला सोडणं भाग झालं त्यास ॥ मुत्सद्दी शिवाजी खरोखर ।
कार्य संपल्यावर । बादशहाबरोबर । शत्रु समजुनी जपुनि वागणार ॥
सावधपणे पावलं टाकणार । दोघांशी एकला टक्कर देणार ॥
शिवाजीचा कांटा काढाया । दोन्ही बादशाह्या । करिति कारवाया ।
शिवाजी फसला नाहीं कवणास ॥ गीतेचा मनन केला अभ्यास ।
ठोशाशी ठोसा देणं समयास ॥
चौक ४
पैजेचा विडा उचलून । मोठया तोर्या नं । आफझल्लखान ।
निघाला विजापुराहून ॥ शिवाजीला आणतों मी पकडून ।
बरळला खान शेंफारुन ॥ शिवाजी तो उंदिर डोंगराचा ।
मराठी बच्चा । नेम काय त्याचा । कदाचित घेईल अपुला प्राण ॥
सगें वीस हजार सैन्य घेऊन । निघाला मोठया तय्यारीनं ॥
तुळजापुरला धडक मारिली । भवानी भरडली । जाळपोळ केली ।
प्रलय मांडला पंढरपुरला ॥ प्रजा केली हैराण रस्त्याला ।
येऊन धडकला प्रतापगडाला ॥
चाल
खानाला चढली बेफाम धुंदी बरळला ॥
मेला देव हिंदूंचा धर्म त्यांचा संपला ॥
किती मूर्ख हिंदु हे देव म्हणती दगडाला ॥दाढीवरनं हात फिरवीत डुलाय लागला ॥
दगडांत देव तंवा न्हवता खचित राहिलेला ॥
तो गेला होता कुठं ऐका सांगतों तुम्हांला ॥
संचरुन अंगामध्यें शिवाजीच्या प्रगटला ॥कर तुकडे तुकडे खानाचे । कापून आण शिर त्याचें ।
भिऊं नको साह्य हाय आमुचें । तुळजापुरची भवानी नी विठोबा बोलूं लागला ॥
चाल : मिळवणी
खान प्रतापगडासी आला । वर्दी शिवाजीला ।
यावं भेटीला । कृष्णाजी पंत वकील धाडून ॥
शिवाजीन बांका वकुत वळखून । बहाणा समेटाचा दिला पटवून ॥
प्रतापगडाच्या पायथ्याखालीं । भेट ठरविली ।
तयारी करविली । शामियाना खास उभारुन ॥
मोत्याच्या झालरी लावून । शृंगारिला तंबू शिवाजीनं ॥
पंताजी गोपीनाथ भला । वकील आपुला । धाडुनी दिला ।
खानाला पुरता फसवायाला ॥ शिवाजी बघा तुम्हांस लै भ्याला ।
द्यावं जीवदान शिवाजीला ॥ भवानीनं स्वप्नीं येऊन ।
केलं वरदान । सावध रे पूर्ण । भेटीमधीं दगा करील रे खान ॥वर्म त्याचं पुरतें ओळखून । भेटीला जा रे हुषारीनं ॥
चाल
भवानीचं होतां वरदान शिवबा हर्षला ॥
जाळीदार चिलखत सार्याश आंगभर त्याला ॥
त्यावरनं लांब भरजरी झगा चढविला ॥
पोलादाचं शिरस्त्राण वरुन फेटा बांधला ॥
वाघनखं पोलादी धरली डाव्या पंजाला ॥
लटकावली भवानी तलवार डाव्या कमरेला ॥
चाल
भवानीचं घेतलं दर्शन । जिजा आईला केलं वंदन ।
आशीर्वाद त्यांचा मिळवून । शिवराय चालले निकडीनं ।
जिवा महाला, संभाजी कावजी वीर संगतीला ॥
अफझुल्लखानाच्या समोर येऊन ठाकला ॥
खान घाली झेंप शिवाजीला धरुन मारण्याला ॥
जणुं घालावी झेंप पतंगानं प्रखर ज्योतीला ॥
शरीरानं खान धिप्पाड शिवाजी धाकला ॥
शिवाजीच्या दसपटीचं बळ होतं खानाला ॥
उंदरासारखा टाकीन चिरडून म्हणतो शिवाजीला ॥
धरुन मुंडकं शिवाजीचं काखेंत चिरडूं लागला ॥
शिवाजीच्या बरगडींत कटयार भोसकूं लागला ॥त्याच्या बाचं बारसं होता शिवाजी वीर जेवलेला ॥
चिलखत मजबूत अंगाला । कटयारीनं दगा नाहीं केला ।
खर्र खर्र आवाज वरच्यावर झाला । शिवाजीनं विचार मनीं केला ।
शुभ शकुन खानानं केला । आतां करुंया म्हणी डावासी डाव आपुला ॥
वाद्यनखं भोंसकून खानाचा कोथळा फाडला ॥ आंतडयाचा गोळा पोटात्नं बाहेर काढला ॥
खान अल्ला अल्ला बोलला । तोबा तोबा तोबा बोलला । दगा दगा ओरडूं लागला ।
त्याबरोबर सय्यद बंडा धांवुनिया आला ॥ शिवाजीच्या शिरावर पट्टा त्यानं उगारला ॥
हां हां म्हणता जिवा महाला आडवा त्याला भिडला ॥ पट्टयाचा वरच्यावर वार त्यानं तोडला ॥
खानाला शिवाजीनं पुरता खालीं पाडला ॥
होता जिवा म्हणुनि कीं हो शिवा वाचला आपुला ॥
चाल : मिळवणी
तोफांचे वार उडविले । सैन्य लढविलें ।
दडवुन ठेवलेलें । रानोमाळ पाटच रक्ताचे ॥विजयी तें सैन्य मराठयांचें । वंदिती पाय शिवाजीचे ॥
प्रतापगडी भवानी म्होरं । खानाचं शिर ।
वाहुन सत्वर । जिजाबाई चरणीं लीन झाला ॥
मातोश्री ओवाळी त्याला । पाणी दोघांच्या नयनांला ॥
आल्या खवळून शाह्या दोन्ही । खङग परजुनी ।
सूड गर्जुनी । शिवाजीचा पूर्ण कराया नाश ॥
शिवाजी पुरुन उरला उभयांस । रम्य तो भाग पुढल्या चौकास ॥
चौक ५ : चाल
एकाहुनि एक शिवरायाचे प्रतापी सरदार ।
स्वातंत्र्याच्या मानकर्यांपचा करुं या जैकार ॥ध्रु०॥पन्हाळगडला वेढा घालितो शिद्दी जोहार ।
त्यांतून जातो निसटुन अमुचा शिवबा रणशूर ॥
विशाळगडची खिंड रोखितो बाजी सरदार ।
अगणित शत्रूसंगें एकला टक्कर देणार ॥
चाल
शिवराय गडावर गेले । सुखरुप जाऊन पोंचले ।
तोफांचे बार ऐकले । बाजीने प्राण सोडीले ।
घोडखिंडीमधीं अजून घुमतो बाजी सरदार ॥
स्वातंत्र्याच्या०॥ अफाट सेना शाहिस्त्याने आणली पुण्यावर ।
त्याचीं बोटेंछाटुन त्याला पळवियला दूर ॥
भेटीसाठीं आग्रा शहरी शिवबा जाणार ।
दगा करोनी बादशहा त्याला अटक करणार ॥
चाल
हिंमत धरुनी मोठी । कपटासी बनला कपटी ।
किती वर्णाव्या त्या गोष्टी ।
चाल
पेटार्या मधि बसुन निसटला शिवाजी बाहेर ।
बैराग्याच्या वेशें आला रायगडावर ॥
माझ्या शिवबा ये रे झडकरी भेट मला देई ।
आरती आणिते ओंवाळीते म्हणे जिजाबाई ॥
नयनांमधुनी टप् टप् अश्रू ओघळती मोती ।
आरती भरली स्वातंत्र्याची कांठोकांठ पुरती ॥
सत्यपाठीं भवानी माता सदैव असणार ॥ स्वातंत्र्याच्या०॥
पुरंदरावर मुरारबाजी कमाल करणार ।
शिरावांचुनी धड झुंजलें अजब चमत्कार ॥
मध्यरात्रीला कोंडाण्यावर घोरपड लावणार ।
निधडया छातीचा तानाजी तो चढला कडयावर ॥
चाल
येसाजी हाडकुळा दिसला । परी हत्तीसंगें लढला ।
हत्तीनें मोर्चा फिरवीला । येसाजीनें पट्टा धरिला ।
चाल
एक्या वारामधीं सोंड हत्तीची चिरी आरपार ॥ स्वातंत्र्याच्या०॥
पवाडा गातां रंगुनि जातो नानिवडेकर ।
महाराष्ट्राचा तुमचा लाडका महादेव शाहीर ॥
वीर रसाचीं गाणीं मर्दाविण कुणास कळणार ।
चुकी भूलीला क्षमा असावी करतो नमस्कार ॥
चाल
अशापरी यवनांची दिली झुगारुन सत्ता शिवाजीनं ॥
तीस वर्षे अहोरात्र खपून स्वतंत्रता मिळवून ॥
रायगड किल्ला राज्याभिषेकाला योग्य ठिकाण पाहुन ॥
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी उत्तम मुहूर्त काढला शोधून ॥
सिंहासनारुढ झाले छत्रपति शिवाजी धन्य तो दिन ॥
शके १५९६ सालीं हें अपूर्व राज्यारोहण ॥
चाल : मिळवणी
स्वातंत्र्य पूर्ण मिळवून । शिवाजी विनयानं । करी वंदन ।
जिजाऊ मातेच्या चरणांस ॥ अश्रूंच्या धारा त्यांच्या नेत्रांस ।
रायगडीं घडला सत्य इतिहास ॥ स्वातंत्र्यवीर शोभला ।
भारतीं भला । तोड नाहीं ज्याला । रक्षी जो देव देश धर्मास ॥
ब्रीद गोब्राह्मण पालक खास ॥ झळकला हिरा महाराष्ट्रास ॥
परस्त्रीस मानितो माता । भगवद् गीता । धरुनियां हातां ।
शरीरसंपदा देशकार्यास ॥ सज्ज ठोशांस ठोसा देण्यास । झळकला० ॥
शिवाजी तो शिवाजीच खरा । कोहिनूर हिरा । झळकला तु रा ।
मराठी जरिपटका मुलखांस ॥ डंका गर्जला चारी खंडास । झळकला० ॥
दर्यात दुर्ग बांधिले । कोट उभविले । खड्ग फिरविलें ।
क्षणामधिं केला रिपूंचा नाश ॥ महादेव गातो त्याच्या कवनास । झळकला० ॥
श्रोत्यांनो पोवाडा ऐकुनी । जाल परतुनी । मर्म घ्या ध्यानीं ।
क्षात्रतेजाचा धरा हव्यास ॥ जन्मुं द्या शिवाजी अजिं समयास ॥ झळकुंद्या०॥महादेव तुमचा शाहीर । नानिवडेकर । कवन करणार ।
किसरुळ गांवीं जन्मला खास ॥ ठिकाण हें कोल्हापूर जिल्ह्यास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥
शिवरायांचे पुण्यस्मरण (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
महाराष्ट्राला समर्थ केलें धन्य धन्य शिवबा झाले ॥जी॥
पन्नासवर्षे जीवन जगले कार्य परी अद्भुत केलें ।
चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांचें जीवन संपुनियां गेलें ॥जी॥
चंदनी रचुनी चितेला । राजदेह वरति ठेविला ।
अग्निला देह तो दिला । अन् ज्वाला धडधडा भिडल्या पहा गगनाला ॥जी॥
चाल
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला ।
झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥
राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
शौर्य ही सोडेना त्याला । जनसेवा सोडेना त्याला ।
चैत्राच्या शुद्ध पुनवेला । भर दुपारच्या वेळेला ।
सूर्यानं राजाचा आत्मा ओढुनी नेला ॥जी॥
पार्थिव देह हरपला । पण कीर्तिनं अमर तो केला ।
रायगड रडूं लागला । झाडं झुडपं कोमेजुन गेलीं आकांत झाला ॥जी॥खूबलढा बुरुज तो तेव्हां रडूं लागला ॥जी॥
हिरकणी बुरुज गहिवरला । टकमक बुरुज पोरका झाला ।
धर्माचा आधार गेला ॥
चाल
शिवछत्रपती निघुनी गेले तीनशें वर्षं झालीं त्याला ।
काळ झराझर निघुनी गेला यशोगंध परि दरवळला ॥जी॥महाराष्ट्राचा कानाकोपरा शिवकार्यानें व्यापियला ।
असा राजा कधिं नाहीं झाला पुढें कधी नच होणारा ॥जी॥
युक्तिबुद्धिनें पराक्रमानें परकी सत्ता लोळविली ।
अज्ञ मावळे फुंकर मारुन सेना त्यांचि खडी केली ॥जी॥
पांच शाह्यांना पुरुनी उरले फितुरहि नाहींसे केले ।
राजाच्या त्या पराक्रमाने सर्व मावळे भारविले ॥जी॥
पन्नास वर्षे कणाकणानें अर्पण केलीं देशाला ।
मातींतुन स्वातंत्र्य निर्मिलें असा पराक्रम हा केला ॥जी॥
प्रचंड शत्रू चालून आले तरी वीर नच डगमगला ।
त्या वैर्यां ना दूर पळविले तोड नसे या कार्याला ॥जी॥
संकटें आणि मृत्यूशी सामना केला ॥ कधिं उसंत नाहीं त्याला ।
मावळ्यांचे सैन्य बनविलें लढा देण्याला ॥जी॥
जिवाभावाचा मित्र जमविला । स्वातंत्र्याचा छंद घेतला ।
आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला ॥
चाल
असा छत्रपति कधिं ना झाला पुढें कधीं नच होणारा ।
शिवरायांचें नांव सदोदित देवो स्फूर्ती आम्हाला ॥जी॥
खडकांतुन स्वातंत्र्य फुलविलें स्वाभिमान जागा केला ।
वंदन करितो शिवप्रभूला पांडुरंग हा या वेळा ॥जी॥
कल्याणचा खजिना लूट (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
जिवाभावाचे मित्र जमविले केली तयारी युद्धाची ॥
कंक येसाजी बाजी फसलकर जिवाजी शूर हि माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी वीर हिरोजी पिलाजी नेता तानाजी ॥
कैक असे हे मित्र जमविले झाली तयारी लढण्याची ॥जी॥
चाल
तोरणा गड जिंकून आरंभ केला ॥
स्वराज्याचे तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला ॥
असा व्याप वाढतच गेला । पण पैसा कुठून आणायचा कार्याला ।
तेव्हां शत्रूची लूट करण्याचा बेत तो केला ॥
कल्याणचा खजिना चालला होता विजापूरला ।
तो खजिना आला बोरघाटाला । मावळ्यांनीं लुटून फस्त केला ।
सारा पैसा नेला पुण्याला । अन् इकडे कल्याणवर जोराचा हल्ला चढविला ।
आबाजी सोनदेवानं जोराचा हल्ला केला ।
अन् कल्याणचा सुभा मराठयांनीं आणला हाताला ॥
कैद केलं सुभेदाराला । कैद केलं त्याच्या सुनेला ।
सारी वार्ता कळली शिवाजीला । तंवा राजा कल्याणला गेला ।
अन् मोठा दरबार त्यानं भरविला । बक्षिस, वस्त्रं नजराणे दिले कितिकाला ।
आबाजी सोनदेव बोलला शिवाजी राजाला ॥
"महाराज, लूट ही आणली आपल्या चरणाला ।
पण त्या लुटींत अशी एक वस्तू सांपडली आहे कीं
तशी कुणी कधिं नसेल पाहिली या काळा" ।
असं म्हणून बोलती चालती नार आणली सदरेला ॥१॥
लावणी
पाहुनी रुप तिचं सुंदर । लाजला हृदयीं रतीचा वर ।
इंदिरा आली भूवर । मनोहर नार ॥ खरी ॥ जी ॥
वेचुनी तिळ तिळ जगिं सुंदर । घडविलं रुप तिचं मनोहर ।
जणुं मदनानं खंजीर । केला तय्यार ॥ खरा ॥ जी ॥
पोवाडा चाल
रुप पाहुनी चकित झाला दैवि गुणांचा तो पुतळा ।
सात्त्विकतेचे भाव उमटले बोलू लागला तरुणीला ॥जी॥
"आईसारख्या तुम्ही मजला बाई सांगतों तुम्हांला ।
भिऊं नका तुम्ही जावें येथून त्रास न कसला जीवाला" ॥
चाल
शिपायांच्याकडं मग वळून शिवबा बोलला ॥
"ऐकावे बोल मोलाचे आतां या वेळां ॥
कटाव
स्त्री दुसर्यामची आपली माता । विचार हा आणावा चित्ता ।
कराल कोणी विटंबनेला । तर कडेलोटाची शिक्षा त्याला ।
हात तोडुनी, डोळे काढुनी, गर्दन उडवू, निश्चय झाला ॥
चाल
कोण स्त्री जर हातीं लागली करा तिचा तुम्ही सत्कार ।
सन्मानाने तिला वागवा तरीच तुम्ही झुंजार ॥
आज्ञा माझी कडक अशी ही कळवा सगळ्या लोकांला ।
या आज्ञेच्या मर्यादेंतुन राजा ही नाहीं सुटला" ॥
असं म्हणून मानानं पाठविलं मग तिला ॥२॥
मौलाना, सुनेसह गेला विजापूरला ।
अन् अहमद दरबारांत गेला आणि लागला सांगायला लोकांला ।
शिवाजीनं पुंडावा केला । त्याला धरुन आणिल असा कोण आहे बोला ? ।
शिवाजीला धरणं हें कार्य बिकट वाटतं मला ॥
चाल
घालूनिया घेर धरलं या सुभेदारा । तुमच्या ।
बोरघाटीं तो खजिना झुंजुनिया दूर नेला ।
मारुनिया ठार सारा दूर पळविला । खजिना ।
सून माझी फार प्यारी । दूर गेले घेऊनिया ।
शिवा लेकिन बहोत अच्छा । सोडलं आम्हां दोघां ।
येत केव्हां जात केव्हां ठावं नाहीं हें कुणाला ।
लढनेवाला है मराठा । नाश हा झाला समजा ।
सभा झाली बरखास्त गेले सारे निघून त्या वेळा ॥
असा पाहिला विजय मोठा मिळविला ।
शिवाजीचे नांव हो झाले चारी बाजूला ॥३॥
छत्रपतींचा पोवाडा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
येईल मग स्फूर्ति । जाई भयभीति पार विलयाला ।
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा इमला बांधून धन्य तो झाला ।
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥ध्रु०॥
असंख्य तारे तेजबलानें शोभविती आकाशाला ।
परि शुक्राचा तारा एकच खेचुनि घेतो डोळ्याला ॥
दाहकता सूर्याची भरली शिवरायाच्या मूर्तीत ।
तशि मोहकता चंद्राची ती भरुनि राहिली देहांत ॥
वटवृक्षाची विशालता ती कडुलिंबाची कडवटता ।
आम्रफळाची रसाळता ती बाभळिची ही कंटकता ॥
अथांग गंभिरता दरियाची सरोवरची गोडी ती ।
हिमालयाची असे भव्यता उदारता पृथिवीची ती ॥
वैराग्याची शोभा दिसली शिवरायाच्या वृत्तींत ।
सत्पुरुषांचें दर्शन होते शिवरायाच्या प्रतिमेंत ॥
हयपति गजपति धनपति राजा पति सर्वांचा जरि झाला ।
त्यागी जीवन नित्य तयाचे नमन असो त्या शिवबाला ॥१॥
चाल
जुलमाचे घोर थैमान माजले सारे ॥
वीरत्व लोपले भ्याड झाले हो सारे ॥
थरथरती अन्यायापुढे लोक हो सारे ॥
चाल
अशा वेळीं जन्माला आला । एक बाळ धीर देण्याला ।
जिजाईच्या पोटीं जन्मला । शिवराय नावानं बाळ चमकुं लागला ।
जिजाईनं धर्म शिकविला बाळ शिवबाला । दादाजी कोंडदेव गुरु राष्ट्रकार्याला ।
पारतंत्र्य दूर करण्याचा निश्चय केला ॥ बाळ आठ वर्षाचा झाला ।
तेव्हा तेज त्याचे पसरले चारी बाजूला ॥
खाटकाच्या सुर्याेखालून सोडवल एका गायीला ॥२॥
चाल
रोहिडेश्वरई शपथ घेतली राज्य हिंदवी करण्याला ।
तोरण गड सर करुनि बांधले तोरण त्यानें किल्ल्याला ॥
जुलूम लोकांवरचे सारे हळुहळु त्यानें थांबविले ।
जीवावरचे सारे धोके धैर्यबळानें संपविले ॥
चाल
सूर्य असा हा हळुहळु चढला ।
अंधार सारा लोपून गेला ।
घुबडांचा घूत्कार थांबला ॥
चाल
अफझल, फाझल, शिद्दी जोहार शाहिस्ताही हारविला ।
औरंगजेबाला पार चकविले, आग्र्याजहुन सुटुनी आला ॥
लहानपणापासून संकटें अशी आलि बळि घेण्याला ।
तरी त्या वरती मात करोनी शिवाजी आला उदयाला ॥३॥
चाल
शिवरायाच्या मनोमंदिरी होति देवता जिजाई माता !
स्फूर्ति देवता । सत्त्व देवता । तुळजापुरची भवानी माता ।
युद्ध देवता । शौर्य देवता । रामदास गुरु राष्ट्रदेवता । तुकाराम वैराग्यदेवता ॥
चाल
१६७४ सालीं । रायगडावरी अभिषेक झाला राजाला ।
हर्षली धरती शिवाजी राजा गरिबांचा वाली झाला ॥
शिवछत्रपतीचें नाव दुमदुमे जगतीं ॥
चाल
खडा केला भित्रा माणूस । झुंज देण्याला ॥ जी ॥
भ्याडपणा गेला विलयाश । ढाल-तलवार हाती घेतली ।
थरकांप सुटला शत्रुला । त्यानें दिला न्याय सर्वाला ।
माणुसकी मंत्र हा झाला । मग तो जुलुम कोणीही केला ।
तरी त्याचा नाश त्यांनीं केला । असा छत्रपती जगतांत कोणी नच झाला ॥४॥
चाल
बंधुंनो ऐका या वेळां । जिवाजीचे गुण बाणावे ।
विचार हा करा । महाराष्ट्र मोठा होऊ दे ।
नीतिचा झरा ॥ माया ममता वसुंधरेची ।
भेदक दृष्टी गरुडाची । विरक्तता ती वृक्षाची ।
राष्ट्रभक्ति ती, ती त्याची ॥ प्रेमळता ही गोमातेची ।
झेप असे ती चित्त्याची । निर्मला ती त्या संताची ।
तळमळ होती मातेची । अशा गुणांची एक संगती ।
शिवरायाच्या अंगी दिसती ॥
चाल
रामकृष्ण जे कुणी पाहिले जे झाले द्वापारांत ।
कलियुगांत पुरुषोत्तम झाला असा आमुच्या लोकांत ॥५॥
फणस दिसे काटेरी परि तो आंत असे अति गोड गरा ।
वरुनि दिसे तो कडा कोरडा आंत परी अति रम्य झरा ॥
छत्रपती हा राष्ट्रपती हा राष्ट्रोधारक जगिं झाला ।
मानवतेचा खरा पुजारी षड्गुण-संपत्ती त्याला ॥
सर्व धर्म सारखेच त्याला भेदभाव नच चित्ताला ।
जुलुमाचा परि कट्टा शत्रू जुलूम त्यानें चिरडीला ॥
राज्य टाकिले शिवरायानें रामदासांच्या झोळींत ।
असे थोर हे मन राजाचे तोड नसे या जगतांत ॥
मुसलमान ही कैक धुरंधर होते त्याच्या सेवेंत ।
सर्वधर्म ते समान मानुनि राज्य चालवी प्रेमांत ॥
शिवरायाचे गुण हे सारे अंगिं बाणवुन या काळा ।
स्मारक त्याचें मनीं करावे हेच खरे पूजन त्याला ॥
पुतळे देतिल सुख डोळ्यांना, घडवतील गुण तुम्हांला ।
छत्रपतीसम व्हावें मोठे तेच विभूषण सर्वांला ॥
वर्णन किती करुं शिवरायाचें पुरें कधिं नच होणारे ।
जे जे कांही असे चांगलें तें तें येथें दिसणारे ॥
दैवी संपदा पार्थिव देहा इथे राहिली येउनिया ।
भाग्य आमचें म्हणुन लाभला आम्हाला हा शिवराया ॥
सज्जन रक्षण दुर्जन ताडन हेच कार्य त्या पुरुषाला ।
महाराष्ट्राच्या भव्य मंदिरी माता दैवत शिवबाला ॥
मातृभक्त गुरुभक्त शिवाजी तसाच जनता भक्त खरा ।
असे शिवाजी राजे जन हो सदा स्मरा तुम्ही सदा स्मरा ॥६॥
राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
चाल
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
चाल
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
चाल
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय ।
दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
चाल
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला ।
महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । "आई आशीर्वाद दे मला ।"
रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । "बाळा ! आशीर्वाद हा तुला ।
जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला ।
शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला ।
राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां ।
’पुढेंच जा तूं, मागें सरुं नको’, माता बोलली हो तेव्हां ॥
"देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर ।
तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार" ॥
चाल
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली ।
तरी न माता डगमगली ॥३॥
चाल
धीर देत ती पुढे चालली ।
शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला ।
तृप्त झाला मातेचा डोळा ।
चाल
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला ।
मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली ।
जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
चाल
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला ।
धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले ।
मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां ।
भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति ।
पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥